महिना: एफ वाय

गुरुपौर्णिमेचा श्रध्दावंत सागर – कामगारहृदयसम्राट राजन राजेंना निष्ठेचा वंदन!

भारतातील पहिलावहिला पर्यावरणस्नेही हरित-पक्ष अशी सर्वमान्य ओळख असलेला ‘धर्मराज्य पक्ष’ आणि कष्टकऱ्यांची लढाऊ संघटना असलेल्या ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे संस्थापक/अध्यक्ष मा. राजन राजे यांना गुरुपौर्णिमेनिमित्त शुभेच्छा देण्यासाठी व त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी, पक्षाच्या ठाणे कार्यालयात गुरुवार, दि. १० जुलै-२०२५ रोजी ‘धर्मराज्य पक्षा’चे कार्यकर्ते, पदाधिकारी, कामगार सदस्य आणि हितचिंतकांनी एकच गर्दी केली होती. मुसळधार पाऊस कोसळत असतानाही, “राजन राजे” या पंचाक्षरी मंत्रावर श्रध्दा असणाऱ्या निष्ठवंतांचा ओघ मात्र, आपल्या गुरुला शुभेच्छा देण्यासाठी दिवसभर सुरुच होता. कार्यकर्ते, पदाधिकारी आणि कामगार सदस्यांच्या या प्रेमाने, ‘कामगारहृदयसम्राट’ अशी ओळख असणाऱ्या मा. राजन राजे यांचे हृदयदेखील भारावून गेले होते. गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्या प्रत्येकाची, त्याच्या कुटुंबीयांची आपुलकीने विचारपूस करुन, भरभरुन आशीर्वाद देत, मा. राजन राजे यांनी, प्रस्थापित राजकीय व्यवस्था आणि धनदांडग्या-भांडवलदारी प्रवृत्तीविरोधात लढण्यासाठी, सर्वांनी एकत्र येऊन संघर्षरत झाल्याशिवाय पर्याय नसल्याचे सूतोवाच यानिमित्ताने केले. कामगार आणि शेतकरी हे भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा तर आहेतच; परंतु, त्याचबरोबर हे दोन्ही घटक म्हणजे, देशाची सामाजिक व सांस्कृतिक ओळख असल्याची जाणीव मा. राजन राजे यांनी, आपल्या निष्ठावान कार्यकर्ते, पदाधिकारी आणि कामगार सदस्यांना यावेळी करुन दिली. दरम्यान, गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून, मा. राजन राजे यांच्या अध्यक्षतेखालील, ‘सेऊ’ कामगार संघटनेच्या उपाध्यक्षपदी श्रीमती मीनल मल्ल्या यांची निवड करण्यात येऊन, कामगार संघटनेत महिलांनादेखील सन्मानाचे स्थान देण्यात येत असल्याचे, यानिमित्ताने अभिमानास्पदरित्या अधोरेखित झाले.

तिसऱ्या भाषेच्या लबाडीविरोधात एल्गार – ‘मराठीकारण’ासाठी आझाद मैदानात हुंकार!

प्राथमिक अभ्यासक्रमात तिसरी भाषा म्हणून, हिंदीभाषा सक्तीचा समावेश जरी, राज्य शासनाने तूर्तास रद्द केला असला तरी, सरकारची ही शासकीय लबाडी असून, “लबाडी अजून थांबलेली नाही, तर लढाई कशी थांबेल?” या घोषणेखाली, ‘शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समिती’चे आयोजक प्रा. डॉ. दीपक पवार यांच्या नेतृत्वाखाली सोमवार, दि. ७ जुलै-२०२५ रोजी, मुंबईच्या आझाद मैदानात एकदिवसीय धरणे आंदोलन पुकारण्यात आले होते. या आंदोलनाला ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष मा. राजन राजे, पक्षाचे प्रवक्ते श्री. समीर चव्हाण, ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे महासचिव श्री. महेशसिंग ठाकूर, काँग्रेसचे रोजगार विभाग प्रदेश संयोजक श्री. धनंजय शिंदे आणि ठाण्यातील मराठीप्रेमी वकील श्री. रशिकांत थोरवे आदी मान्यवरांसह, श्री. अविनाश सावंत, श्री. सुमित कदम, श्री. निलेश सावंत हे ‘धर्मराज्य पक्षा’चे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी पाचवीपर्यंत कोणतीही तिसरी भाषा नको, डॉ. नरेंद्र जाधव समिती तत्काळ रद्द करण्यात यावी, बालभारतीची शैक्षणिक स्वायत्तता अबाधित ठेवण्यात यावी, शिक्षणमंत्री दादा भुसे आणि SCERT संचालक राहुल रेखावार यांची हकालपट्टी करण्यात यावी, १५ मार्च २०२४चे नवीन संचमान्यता धोरण रद्द करावे, या मागण्या करण्यात आल्या. याप्रसंगी प्रा. डॉ. दीपक पवार आणि मा. राजन राजे यांच्यात महाराष्ट्रात शिक्षणाचे ‘मराठीकारण’ व मराठी भाषेच्या संरक्षण-संवर्धन चळवळीसंदर्भात सखोल चर्चा करण्यात आली.

error: Content is protected !!