दिवस: ऑक्टोबर 12, 2025

१२ ऑक्टोबर-२०२५ : ‘घर हक्क परिषदे’त राजन राजे यांची ज्वलंत भूमिका — “कुणी घर देता का घर?

मराठी माणसाच्या अस्तित्वाचा प्रश्न फक्त, मुंबई आणि उपनगरांपुरता नाहीये; तर, मुंबईसह ठाणे, नाशिक, रायगड, पुणे, नागपूर या सगळ्या शहरांमधून तुम्ही-आम्ही सगळेजण विस्थापित झालेलो आहोत किंवा हळूहळू होत आहोत. करोना-काळात वन्यप्राण्यांनी जशा आपापल्या जागा माणसांकडून पुन्हा ताब्यात घेतल्या होत्या; तशा, आता महाराष्ट्रातल्या सामान्य मराठी-माणसांच्या ताब्यात देण्यासाठी, धनदांडग्यांकडून ‘जागा रिकाम्या’ करुन घ्याव्या लागतील!
वि. वा. शिरवाडकरांच्या ‘नटसम्राट’ नाटकातील, गणपतराव बेलवलकरांचं, “कुणी घर देता का घर”, हे जे स्वगत आहे, अगदी तशीच अवस्था मराठी माणसाची झालेली आहे. अशी ‘घरघर’ लागूच कशी शकते, मराठी माणसाला आपल्याच हक्काच्या महाराष्ट्रात? “माणसांना घरं नाहीत आणि घरांना माणसं नाहीत”, असा विलक्षण विपरीत काळ “घराच्या-दुकानांच्या साठेबाजीतून सध्या मराठी-माणसांवर येऊन ठेपलाय”, अशा रोखठोक शब्दांत ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष आणि ज्येष्ठ कामगार नेते राजन राजे यांनी आपले मनोगत व्यक्त केले…ते दादर येथील महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या, टिळक भवन येथील सभागृहात बोलत होते.
गिरणी कामगार आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हक्काच्या परवडणाऱ्या घरांसंदर्भात, दि. १२ ऑक्टोबर-२०२५ रोजी, आयोजित केलेल्या ‘घर हक्क परिषदे’च्या मेळाव्यात राजन राजे उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना ते पुढे म्हणाले की, “बारा तासांसाठी बारा हजार रुपये” अशी महाराष्ट्रातील भयानक परिस्थिती आहे. मुंबई सोडाच, ठाण्यासारख्या शहरात पाचशे-साडेपाचशे चौरसफुटांचा वन बीएचके फ्लॅट, ५० लाखांत येतो. नोकरी साधारण पस्तीस वर्षांची धरली तरी, कामगाराचा सगळा पगार दरमहा हप्ते फेडण्यात गेल्यावरच, त्याची नोकरी संपताना तो फ्लॅट खऱ्याअर्थाने त्याच्या मालकीचा होणार… या काळात तुम्ही भोजन-खानपान, कपडालत्ता, मुलाचं शिक्षण-आरोग्य कशाकशावर म्हणून खर्च करायचा नाही, हौसमौज तर विसरुनच जा…फक्त, एका हाताने पगार घ्यायचा आणि दुसऱ्या हाताने तो बँकेत भरायचा आणि शहरातल्या प्रदूषित हवेवर घरात कोंडून जगायचं… आहे शक्य कोटीतलं हे भयंकर आक्रित? एवढी केविलवाणी परिस्थिती मराठी सामान्य जनांची आपल्याच महाराष्ट्रात झालीच कशी??
…जर, अजूनही तुम्ही या जैन-गुज्जू-मारवाडी भांडवलदारांना आणि त्यांना साथ देणाऱ्या मराठी राजकारणी-दलालांना आवरलं नाहीत…वेळीच जागे झाला नाहीत; तर, लक्षात ठेवा, एकदिवस वेळ अशी येईल की, जसा तुम्ही जमिनीवर-पाण्यावर कर भरता; तसाच, तो उद्या सूर्य-किरणांवर ते कर भरायला लावतील…सूर्यकिरणांचा ‘सातबारा’च त्यांच्या नावावर करुन घेतील, इतकी गंभीर परिस्थिती आहे.
वर्ष १९७०पर्यंत प्रत्येक प्रौढ व्यक्तिला जास्तीतजास्त एकच फ्लॅट खरेदी करता येत होता; पण, बिल्डर राजकारण्यांनी आणि राजकारणातून बिल्डर बनलेल्यांनी घरांचं बांधकाम, हा ‘उद्योग’ बनवला व आपल्या नफेखोरीतल्या सगळ्या अडचणी, अटीशर्ती काढून टाकल्या; त्यामुळे फ्लॅट व दुकाने खरेदी, हा बक्कळ परतावा देणारा गुंतवणुकीचा मार्ग व त्यातूनच, काळ्या पैशाचा मोठा स्त्रोत बनला!
“अन्न, वस्त्र, निवारा म्हणजे घर”, हा माणसाचा नैसर्गिक व मूलभूत अधिकार असताना…१९७०नंतर घरांची प्रचंड साठेबाजी व काळाबाजार सुरु होऊन भाव गगनाला भिडायला लागले व त्यातच मराठी कामगार-कर्मचारीवर्ग कायमच पिचला जायला लागला!
…तेव्हा, लक्षात ठेवा, सुदैवाने वर्ष १९७७-७८च्या राज्यघटनेतील ४४व्या घटनादुरुस्तीमुळे सुदैवाने ‘संपत्तीचा-अधिकार’, हा आता ‘मूलभूत-अधिकार’ राहिलेला नाही. तो आता फक्त, कायदेशीर-अधिकार आहे; म्हणूनच कायदा करुनच ‘संपत्तीचं फेरवाटप’ व्हायला हवं! त्याकामी, शहरं-उपनगरांमधून प्रत्येक प्रौढ व्यक्तिमागे “एक मकान, एक दुकान”असा कायदा व्हायला हवा…तो झाल्याशिवाय, गगनाला भिडलेले फ्लॅटस् आणि दुकानांचे भाव पत्त्याच्या बंगल्यासारखे कोसळणार नाहीत!
…जसं भूदान-चळवळीतून विनोबा भावेंनी “सब भूमी गोपाल की” गर्जना करत, लाखो हेक्टर जमीन फेरवाटपासाठी मिळवली; तसेच, हे अतिरिक्त लाखो फ्लॅट्स व दुकाने…सिंगापूरच्या धर्तीवर, महाराष्ट्र-सरकारने ताब्यात घेऊन सुशिक्षित मराठी-तरुणाईला, वाजवी भाड्याने उपलब्ध करुन द्यायला हवीत…तरच, मराठी माणूस मुंबई-महाराष्ट्रात सन्मानाने व सुखासमाधानाने अस्तित्वात राहील…अन्यथा मुंबई, ठाणे, पुणे, रायगड, नाशिक-नागपूर (मुंठापुराना) शहरांतून त्यांचं साफ उच्चाटन होईल व वाघांसाठी जशी चंद्रपुरच्या ताडोबासारखी अभयारण्ये राखावी लागलीयत; तशी सामान्य मराठी-माणसांसाठी ‘अभयारण्ये’ निर्माण करावी लागतील!
…या परिषदेच्या निमित्ताने विविध २७ पक्ष-संघटना एकत्र आलेत, ही फार चांगली गोष्ट आहे. पण, एवढ्यावर थांबून चालणार नाही, हर्षवर्धन सपकाळ यांच्यासारखे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आपल्याला लाभलेले आहेत, जे खरंतर चळवळीतून आलेले आहेत. *ते कुठल्या बड्या श्रीमंत घराण्यातून आलेले नाहीत की, एखाद्या बड्या राजकारण्याच्या घरात पाळणा हलला, म्हणून ते नेते झालेले नाहीत, म्हणूनच त्यांच्याकडून आमच्या खूप अपेक्षा असल्याच्या भावनादेखील राजन राजे यांनी बोलून दाखवल्या. यावेळी राहुल गांधी यांचं कौतुक करताना, ते पुढे म्हणाले, मला महात्मा गांधी आणि पं. जवाहरलाल, या दोन्ही व्यक्तित्वांचा ‘संगम’ राहुल गांधीमध्ये दिसतो… आज ही माणसं काँग्रेसमध्ये आहेत, म्हणून आशा करायला काही जागा आहे… राष्ट्रीयस्तरावर राहुल गांधी तर, राज्यस्तरावर हर्षवर्धन सपकाळांसारखी नेतेमंडळी आहेत, म्हणून आम्ही कॉंग्रेससोबत आहोत. राहुल गांधींसोबत महाराष्ट्राचे ‘भीष्माचार्य’ कुमार केतकर आहेत आणि हर्षवर्धन सपकाळांसोबत महाराष्ट्राचे ‘द्रोणाचार्य’ विश्वास उटगी आहेत, अशा ओघवत्या शैलीत राजन राजे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं.
…याप्रसंगी, व्यासपीठावर परिषदेचे अध्यक्ष तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, ज्येष्ठ पत्रकार आणि माजी खासदार कुमार केतकर, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे अर्थशास्त्र विभागाचे अध्यक्ष विश्वास उटगी, सर्व श्रमिक संघाचे अध्यक्ष शिशिर ढवळे, आयटकचे सुकुमार दामले, कम्युनिस्ट पक्षाचे मिलिंद रानडे, गिरणी कामगारांच्या वकील गायत्री सिंग यांच्यासह, ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे कामगार-सभासद तसेच, कामगारक्षेत्रातील व डाव्या चळवळीतील मान्यवर मंडळी मोठ्यासंख्येने उपस्थित होती.
error: Content is protected !!