दिवस: डिसेंबर 6, 2025

दि. ५ डिसेंबर २०२५, रात्री ११ वाजता : महापरिनिर्वाणदिनाच्या पूर्वसंध्येला बाबासाहेबांना अभिवादन, मा. राजन राजे यांची उपस्थिती

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ७०व्या महापरिनिर्वाणदिनाच्या पूर्वसंध्येला, दि. ५ डिसेंबर-२०२५ रोजी, रात्रौ ११ वाजताच्या सुमारास ठाणे शहरातील पंचगंगा सोसायटी-राबोडी येथील ‘संजीवनी बहुउद्देशीय प्रतिष्ठान’ यांच्या वतीने आणि त्यानंतर कोर्टनाका येथे, आंबेडकरी-नेते सुनील खांबे यांनी आयोजित केलेल्या, महापरिनिर्वाणदिनाच्या कार्यक्रमानिमित्त महामानवास अभिवादन करण्यात आले. या दोन्ही कार्यक्रमांस ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष तथा ज्येष्ठ कामगार-नेते मा. राजन राजे यांनी उपस्थित राहुन, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्रस्मृतींस विनम्र अभिवादन केले. याप्रसंगी पक्षाचे प्रवक्ते समीर चव्हाण उपस्थित होते. यावेळी उपस्थित भीमसैनिकांना संबोधित करताना मा. राजन राजे म्हणाले की, “आजच्या महापरिनिर्वाणदिनी बाबासाहेबांना ‘राज्यघटनेचे शिल्पकार’ या भूमिकेच्या पलीकडे जाऊन, ‘समतेच्या संदेशा’तून ‘सामाजिक व आर्थिक’ न्याय देऊ पहाणारा ‘महामानव’ म्हणून पहाणे अधिक गरजेचं असून, ‘राज्यघटनेचे शिल्पकार’ किंवा ‘दलितांचा मसीहा’ या तुलनात्मकदृष्ट्या काहीशा मर्यादित भूमिकेत त्यांना पहाणं म्हणजे, ‘कोहिनूर हिऱ्या’ला अंगठीत कोंडून टाकण्यासारखे आहे. शिवछत्रपती असोत वा बाबासाहेब असोत, त्यांचा प्रामुख्याने भर, संपूर्ण समाजाचं ‘आर्थिक-उन्नयन’ करण्यावर व तळागाळातील समाजघटकांसाठी, शक्य तेवढं सन्मानजनक जीवनमान निश्चित करण्यावर होता. ‘तलवारधारी’ शिवछत्रपतींपेक्षा, ‘नांगरधारी’ शिवछत्रपती जे, न्याय-समतापूर्ण प्रशासकीय व्यवस्था लावणारे होते. हे जेवढे महात्त्वाचे; तितकेच, ‘राज्यघटना’ हाती घेतलेल्या बाबासाहेबांपेक्षाही, ‘समतेचा संदेश’ देणारे बाबासाहेब जनसामान्यांसाठी अधिक महात्त्वाचे आहेत!” अशा शब्दांत त्यांनी आपल्या परखड भावना व्यक्त केल्या. यावेळी आपल्या भाषणात मा. राजन राजे यांनी, कंत्राटी-कामगार पद्धत व केंद्र सरकारने लागू केलेल्या ‘काळ्या-कामगार संहिते’वर एकच शरसंधान साधून, कामगारद्रोही भाजप सरकार आणि भांडवलधारी प्रस्थापित व्यवस्थेवर सडकून टीका केली. या अभिवादन कार्यक्रमाला पंचगंगा-राबोडी परिसरातील शेकडो आंबेडकरी अनुयायी तसेच, कोर्टनाका येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णकृती पुतळ्याजवळ मोठ्यासंख्येने भीमसैनिक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन आंबेडकरी चळवळीतील नेते सुनील खांबे आणि संदीप खांबे यांनी केले होते.

error: Content is protected !!