गिरणी कामगार आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी, परवडणाऱ्या दरात हक्काची घरे मिळावीत यासाठी ‘घर हक्क परिषदे’च्या वतीने, मोर्चेबांधणी सुरु झालेली असून, त्याच पार्श्वभूमीवर शनिवार, दि. १५ नोव्हेंबर-२०२५ रोजी, ‘राष्ट्रीय मिल मजदूर संघा’च्या परळ-भोईवाडा येथील कार्यालयात एक महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष मा. राजन राजे, काँग्रेसच्या अर्थशास्त्र विभागाचे अध्यक्ष श्री. विश्वास उटगी, राष्ट्रीय मिल मजदूर संघांचे कार्याध्यक्ष श्री. गोविंदराव मोहिते, काँग्रेसचे श्री. गजानन देसाई, श्री. मोहन तिवारी, श्रीमती छाया थोरात, डाव्या पक्षांचे नेते कॉ. शिशिर ढवळे, कॉ. सुकुमार दामले, श्री. विजय कुलकर्णी, रेमण्ड कामगार संघर्ष समितीचे श्री. अनिल महाडिक आणि ‘धर्मराज्य पक्षा’चे प्रवक्ते श्री. समीर चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, उप-मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे व श्री. अजित पवार आणि संबंधित मंत्र्यांना, दि. १७ नोव्हेंबर-२०२५ रोजी निवेदन देण्याचे बैठकीत ठरले असून, आगामी हिवाळी अधिवेशनात गिरणी कामगार आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी परवडणाऱ्या घरांसंदर्भात ‘लक्षवेधी’ आणण्याबाबत आग्रह धरण्याची मागणी, निवेदनाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर, गिरणी कामगार व लोकांमध्ये याबाबत जनजागृती होण्यासाठी मुंबईसह, महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांमध्ये सार्वजनिक सभा आयोजित करण्यात येतील, असे या बैठकीत सर्वानुमते ठरविण्यात आले.