‘लोकसत्ते’च्या प्रक्षोभक संपादकीयाविरोधात ठाण्यात ‘धर्मराज्य पक्षा’चा धगधगता निषेध

ज्वालामुखी धगधगतो आहे….
‘लोकसत्ते’चे बनावट व प्रक्षोभक संपादकीय, कामगारांनी प्रतिकात्मकरित्या ठाण्यात गोखले रस्त्यावरील ‘लोकसत्ता’ कार्यालयासमोरच जाळले…
कामगारविश्वावर ‘४ काळ्या कामगार-संहितां’चा बुलडोझर फिरवणाऱ्या भाजप-संघीय NDA सरकारचा आणि गिरीश कुबेरांसारख्या, प्रसारमाध्यमातील त्यांच्या मेंदूविक्या ‘बोलक्या बाहुल्यां’चा…’धर्मराज्य पक्षा’तर्फे व कामगारवर्गाकडून ठाण्यात तीव्र निषेध!
—————————-
सोमवार, दि. २४ नोव्हेंबर-२०२५च्या लोकसत्ता-‘संपादकीय लेखाला जाणिवपूर्वक “तळपत्या तलवारीचे म्यान”, असं शीर्षक देत, पद्मश्री कामगार-कवी कै. नारायण सुर्वे यांचा, आपल्या बुद्धीकौशल्याने ‘अवमान’ करणाऱ्या आणि त्या लेखातून “कामगार नेते, हे नेते कमी आणि खंडणीखोर अधिक असेच आहेत”, असं समस्त ‘कामगार-चळवळी’बाबत अपप्रचार करणारं, अत्यंत बेजबाबदार व संतापजनक वक्तव्य करणाऱ्या ‘भांडवली-दलाल’ गिरीश कुबेर यांचा कामगारांकडून लोकसत्तेचे अंक जाळून तीव्र निषेध करण्यात आला!
…तत्पूर्वी, लोकसत्तेसारख्या वृत्तपत्रीय ‘गोदी-मिडीया’ने, ‘अस्पृश्य’ मानलेले…धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष व महाराष्ट्रभरातील संपूर्ण कामगारविश्वात ज्यांचं नाव दीर्घकाळ दुमदुमतंय, असे झुंजार कामगार नेते ‘राजन राजे’ यांनी, ‘लोकसत्ते’च्या हिणकस संपादकियावर संतप्त प्रतिक्रिया नोंदवणारा, एक खरमरीत लेख समाजमाध्यमातून प्रसारीत करत, पत्रकार-जगतातील या दलाली-ढोंगी प्रवृत्तीचा जाहीर निषेध केला होता, ज्याला सगळ्या कामगार जगतातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला! त्यातच, कामगारविश्वातील संतप्त भावनेला सनदशीर मोकळी वाट करुन देणारा, लोकसत्ता-संपादकीय-दहनाचा जाहीर कार्यक्रम ठाण्यात काल, दि. २५ नोव्हेंबर-२०२५ रोजी सायंकाळी पार पडला.
राजन राजे यांच्या खांद्याला खांदा लावून सदर निषेधाच्या कार्यक्रमात…काँग्रेसच्या अर्थविभागाचे प्रमुख व नेते विश्वास उटगी, समतेच्या चळवळीतील एक अग्रणी ॲड. नाना अहिरे, आंबेडकरी चळवळीतील जाज्वल्य विचारवंत-कार्यकर्ते आनंदा ओव्हाळ व धर्मराज्य पक्षाचे उपाध्यक्ष नितीन देशपांडे, धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघाचे सचिव समीर चव्हाण व पदाधिकारी सचिन शेट्टी; तसेच, विविध कंपन्यांतील कामगारांनी हिरिरीने सहभाग घेतला.
“तळागाळातील जनतेला कायम लुबाडणाऱ्या व श्रमिकांच्या रक्तघामाचं ‘वरकड-मूल्य’ ओरपणार्या भांडवलशाहीचे निर्लज्ज समर्थन करत भांडवलदारांच्या चरणांवर आपला मेंदू अर्पण करणाऱ्या व त्या व्यवस्थेचे मोठे ‘लाभार्थी’ असणाऱ्या गिरीश कुबेरांना…खुशाल, राष्ट्रीय संपत्तीच्या निर्मात्याची तळपती तलवार ‘म्यान’ होण्याची स्वप्न पडू द्यात; पण, टोकाच्या अन्याय-अत्याचार-शोषणाने कामगारविश्वातला ज्वालामुखी आतून धगधगतो आहे आणि तो कुठल्याही क्षणी प्रस्फुटीत होण्याचा देशाला मोठा धोका आहे”, असा इशारा देत…राजन राजे यांनी तासाभराच्या आपल्या तडफदार भाषणातून, गिरीश कुबेर बनावट अग्रलेख लिहिल्याबद्दल यांच्यावर अतिशय जळजळीत शब्दात टीका केली. शिवाय, भाषणातून आपल्या भांडवली-हितसंबंधांची जपणूक करणाऱ्या व ‘संपादकीय-हक्का’चा सर्रास गैरवापर करत जनतेची फसवणूक, दिशाभूल करणाऱ्या ‘कुबेरी-प्रवृत्ती’चा मुखवटाही टराटरा फाडला.
ते पुढे म्हणाले की, “४ काळ्या कामगार-संहितांद्वारे कायम नोकऱ्या संपवण्यातून, कामगार-चळवळ साफ कमकुवत करण्यातून…सगळ्या कामगार-कर्मचारीवर्गावर ‘गुलामगिरी’ लादण्याच्या भाजप-संघीय सरकारी-धोरणाचं, ‘आता नव्या कायद्यांतून कामगारांचं चांगभलं होणार’, असं बनावट-विसंवादी ‘कुबेरी’ समर्थन म्हणजे, ‘दहशत-जबरदस्तीने बलात्काराला सामोरं जावं लागणाऱ्या स्त्री संदर्भात, बलात्कार ‘एन्जॉय’ करण्याची संधीच तिला उपलब्ध होतेय’, असं म्हणण्यासारखं, ते एक भयंकर गुन्हेगारी-प्रतिपादन आहे. गिरीश कुबेर, जर कामगार नेत्यांना खंडणीखोर’ म्हणत असतील; तर, त्यांना आव्हान आहे की, अशांना त्यांनी कायद्यासमोर आणून त्यांना कडक शासन करावच; त्यात एखादा जरी डाव्या चळवळीतला पुढारी आढळतो, का ते बघावंच!”
राजन राजे यांनी आपल्या शब्दांच्या अंगारातून लोकभावनेला प्रकट करताना ज्या लोकसत्तेतून नारायण सुर्वेंचा अवमान करण्यात आला, त्याच्या संपादक कुबेरांसह, अवघ्या भांडवल-व्यवस्थेला…पुन्हा एकवार नारायण सुर्वेंचा जाणिवपूर्वक ज्वलंत परिचय व जागर करुन देताना म्हटलं, “कुसुमाग्रज प्रतिष्ठानातर्फे २००४ साली नारायण सुर्वेंना ‘जनस्थान-पुरस्कार’ देताना त्यांच्या गौरवार्थ निवेदकाने जी प्रदीर्घ कविता म्हटली होती, त्यातील चार ओळी आठवतात…आणि, आठवतात ते नारायण सुर्वेंचे पाण्यात बुडून गेलेले डोळे!
‘आठवतं का रे तुला नारायणा, याच हमरस्त्यावर वाळत घातली होतीस तू स्वतःची आतडी कितीकदा…आणि, हिशोब केला होतास, एवढी आतडी पुरतील का, हे जग करकचून बांधायला आणि एकदा बांधल्यावर ते बदलायला’… असा हा, ‘Poet of the Proletariat’ कुठे आणि गिरीश कुबेर नावाचा भांडवली-व्यवस्थेच्या हातातला मिठू मिठू बोलणारा ‘पोपट’ कुठे? अनैतिकरित्या गलेलठ्ठ पगार घेत, भांडवली-व्यवस्थेचे लाभ ‘स्वांतसुखाय’ ओरपणारे, गिरीश कुबेर हे एक भांडवली-दलाल; तर, नारायण सुर्वे म्हणजे, कार्ल मार्क्सच्याच पावलावर पाऊल ठेऊन उन्हापावसात तडफडत, वणवण करत शोषितांचं जग बदलायला निघालेला अवलिया! कविवर्य नारायण सुर्वे यांचे महाराष्ट्राच्या कामगार-चळवळीवर थोर उपकार आहेत…आम्ही ४०-४५ वर्षांपूर्वी त्यांच्याच ‘भाकरीचा चंद्र’, ‘कामगार, एक तळपती तलवार’ वगैरे कविता, बॅनरवर छापून कामगार-चळवळीची मुहूर्तमेढ रोवली होती.”
भाषणाच्या ओघात राजन राजे पुढे गरजले, “आपला ‘EVM-जादुगरी’मधून निवडून आलेला पंतप्रधान, आईबापाशी असलेला आपला जैविक-संबंध नाकारतो आणि स्वतःला ‘नाॅन-बायाॅलाॅजिकल’ घोषित करतो; तर, तिथे मुंबईच्या गिरणगावात कुणी जैविक-आईबापच पोटच्या पोराला नाकारतात आणि एका गिरणीसमोरच्या कचराकुंडीत फेकून देतात… असं ते ‘अनाथ’ पोरं, गंगाराम व काशीबाई नावाचं सुर्वे-दांपत्य
‘सनाथ’ बनवून वाढवतात; पुढे हाच ‘नारायण’, कामगार म्हणून ‘आत्मभान’ जागृत झाल्यावर, एखादा मातीचा घडा फुटावा आणि आतला अंधार मोकळा व्हावा, ‘अवघा प्रकाशू व्हावा’… तसा त्या प्रकाशात भूतकाळाविषयी कुठलाही आकस न बाळगता, कुठलीही तक्रार न करता; आपला भवताल ‘लाल बावटे की जय’ म्हणत, चळवळ आणि साहित्याच्या माध्यमातून बदलायला बाहेर पडतो… जसं अमेरिकेतल्या नवनिर्वाचित डेमोक्रॅटिक-सोशॅलिस्ट महापौर जोहरान ममदानींसाठी एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभापासून युजिन डेब्ज आणि वर्ष-२०१५ पासून बर्नी सँडर्स, ‘डेमाॅक्रसी ॲट वर्क’चे रिचर्ड वोल्फ, अलेक्झांड्रा ओकॅसिओ काॅर्टेझ (AOC) आणि त्यांचा पुरोगामी विचारसरणीचा U.S. House of Representatives मधला सोशालिस्ट-डेमोक्रॅटिक विचारसरणीचा “The Squad” हा गट वगैरेंनी, पार्श्वभूमी तयार करुन ठेवली होती; तशीच, वामनराव दादा कर्डक, शाही अमर शेख, अण्णाभाऊ साठे यांच्याकरवी नारायण सुर्वेंसाठी तयार करुन ठेवली होती; असं म्हटलं तर वावगं ठरु नये…पण, सुर्व्यांचा नारायण, त्यापलिकडे निघून गेला… त्यांच्या काव्यलेखन-शैलीची तुलना जगविख्यात आंग्ल कवी ‘राॅबर्ट फ्राॅस्ट’शी केली जाते. तशीचं संभाषणात्मक, अगदी बोलीभाषेसारखी शैली; पण, थेट भस्सकन आत जाऊन हृदयाचा ठाव घेणारी, कुणाच्या कुठल्या पूर्वपरवानगीविनाच अंतःकरणाला सरळ भिडणारी…म्हणून, मला वाटतं, तेव्हा जर आजच्या सारखं एकनाथ शिंदे, अजित पवार मिळून ‘फडणविशी ट्रिपल-इंजिन’ सरकार महाराष्ट्रात आणि मोदी-शाहांचं रासवट सरकार दिल्लीत असतं; तर, ते ‘पद्मश्री’ वगैरे नागरी-सन्मान मिळणं सोडाच; उलट सरकार-दप्तरी नारायण सुर्वेंचं नाव, ‘शहरी नक्षलवादी’ किंवा ‘अर्बन नक्सलाईट’ म्हणून समाविष्ट झालं असतं. तुकारामांच्या गाथेसारखी ग्रामीण रांगडी काव्यभाषा…तळागाळातील जगण्यातल्या व्यथा-वेदनांचा वेध घेणारी; म्हणून, त्यांचं काव्य तुकारामांच्या गाथेसारखंच अक्षय/अक्षर काव्य ठरलं… म्हणूनच असेल कदाचित, एके प्रसंगी बोलताना, लक्ष लक्ष मराठमोळ्या मनांमध्ये ‘सांस्कृतिक-पूल’ बांधणारे, महाराष्ट्राचे लाडके साहित्यिक पु. ल. देशपांडे म्हणाले होते, ‘अरे, केशवसुत कशाला इकडेतिकडे शोधताय? तुमचा केशवसुत, तिकडे परळमध्ये राहतोय!’
इस्लामिक काळात वर्णव्यवस्थेला छेद देऊन कबीर, सेना न्हावी, सावता माळी, गोरा कुंभार, नामदेव शिंपी आणि तुकाराम वाणी यासारखे बहुजनसमाजातले संत कवी जोरकसपणे पुढे आले खरे… पण, जसं अमेरिकेतही जागतिक-महामंदीच्या पार्श्वभुमीवर आर्थिक-विषमता, बेरोजगारी दूर करणारं व कल्याणकारी-राज्य अथवा welfare state संकल्पना राबवणारं फ्रँकलिन रुझवेल्ट यांचं ‘न्यू-डील’ आलं…मात्र, पुढील काही दशकातच ‘भांडवली-व्यवस्थे’नं पुन्हा उचल खात ‘न्यू डील’ मोडून काढलं. आणि, त्यानंतर, आजतागायत Neoliberalism किंवा नवउदारमतवाद नावाच्या नववसाहतवादाच्या नावाखाली खाजगीकरण, आपल्याकडच्या ‘४ काळ्या कामगार-संहितां’सारखे ‘कामगारविरोधी कायदे’ करुन कामगारवर्गाचं खच्चीकरण व आर्थिक-विषमते’चा नंगानाच, अमेरिका-भारतासह जगभर चालूच ठेवलाय…तशीच, मुस्लिम-राजवटीतील बहुजन-साहित्याच्या सुवर्ण-काळानंतर आपल्याकडच्या वर्चस्ववादी वर्णव्यवस्थेनं पुन्हा उचल खाल्ली आणि ती सगळी साहित्यिक काव्य-व्यवस्था सवर्णांच्या बेड्यात अडकून पडली; ती थेट नारायण सुर्वे यांनी २०व्या शतकाच्या उत्तरार्धात मोकळी करेपर्यंत. त्यांनी फक्त, कृत्रिम रंगांसोबत गिरणीतल्या वस्त्राला आपल्या घामाचाही रंग देणार्या गिरणी-कामगारांचीच व्यथा मांडली नाही; तर, पोटाची खळगी भरण्यासाठी वस्त्रहीन अवस्थेत गिऱ्हाईकाच्या घामाचा रंग आणि गंध, आपल्या देहावर चढवणार्या वेश्यांचाही ‘श्रमिक’ म्हणून वेगळा विचार केला… ‘कामगार’ या नात्याने, वेश्यांचेही प्रश्न सोडवण्याचा व त्यांचा यातनामय प्रवास सुकर करण्याचा प्रयत्न केला होता… कुबेरांच्या गिरीशासारखे सांपत्तिक ‘कुबेरी’ व पत्रकारितेतली ‘सुभेदारी’ उभारण्याच्या स्वार्थकार्यात ते मग्न नव्हते!”
राजन राजेंच्या या घणाघाती भाषणानंतर, लोकसत्ते’चं दि. २४ नोव्हेंबरचं बनावट व प्रक्षोभक संपादकीय, कामगारांनी मिळून ठाण्यातील ‘लोकसत्ता’ कार्यालयासमोरच जाळले…विशेष म्हणजे, या ‘लोकसत्ते’च्या प्रतिकात्मक दहनानंतर गोखले रस्त्यावर पडलेली राख, सुसंस्कृत-नागरिक, या नात्याने सगळ्या कामगारांनी गोळा करुन रस्ता पूर्वीसारखाच स्वच्छ करुन ठेवला!
No comments
Leave Your Comment

error: Content is protected !!