रोहा (जि. रायगड) : मे. अंशुल इनोव्हेटिव्ह केमिस्ट्री प्रा. लि. येथील कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी आदरणीय राजन राजे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या बेमुदत संपाला आज ७३ दिवस पूर्ण झाले. गेल्या ७३ दिवसांपासून सुरू असलेला हा संघर्ष कामगारांच्या एकजुटीने आणि निर्धाराने सुरू असून, या पार्श्वभूमीवर “धर्मराज्य पक्ष” प्रणित धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघाच्या वतीने संपकरी कामगारांना आर्थिक व नैतिक पाठिंबा देण्यात आला.
संपकरी कामगारांना संघर्षकाळात आर्थिक आधार मिळावा या उद्देशाने महासंघाच्या वतीने प्रत्येक संपकरी कामगारास ₹१०,००० ची आर्थिक मदत धनादेशाच्या स्वरूपात प्रदान करण्यात आली. ही मदत केवळ आर्थिक स्वरूपाची नसून, संपूर्ण धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघ आणि त्याच्याशी संलग्न विविध युनिटमधील कामगार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, हा विश्वासही यानिमित्ताने व्यक्त करण्यात आला.
या प्रसंगी महासंघाचे महासचिव महेशसिंग ठाकूर, उपाध्यक्ष रमाकांत नेवरेकर, सचिव समीर चव्हाण, खजिनदार अजित सावंत, सुल्झर पंप युनिटचे सरचिटणीस विनोद मोरे, निरंजन म्हात्रे, जगन्नाथ सलगर, महेश पवार तसेच विविध युनिटमधील पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. वॉलमेट फ्लो कंट्रोल युनिटमधील कमलेश कोल्हे, अविनाश बडे, लोटन येलवे, निलेश घरत, दिनेश पाटील यांच्यासह हिवा इंडिया नितीन भुरे, विनोद गायकवाड, दिपक जाधव, हेमंत कदम, इडिकॉनचे राजेश कदम, राकेश म्हात्रे आणि अन्य कंपन्यांतील कमिटी सदस्यांनीही उपस्थिती लावली.
कार्यक्रमादरम्यान विविध युनिटमधील पदाधिकाऱ्यांनी व कामगार प्रतिनिधींनी आपली मनोगते व्यक्त केली. सुल्झर पंप युनिटचे सरचिटणीस विनोद मोरे यांनी आपल्या भाषणात, “धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघ केवळ कामगारांचा पगार वाढवण्यासाठीच कार्य करत नाही, तर प्रत्येक कामगाराने स्वाभिमानाने आणि सन्मानाने जगावे यासाठी संघटना सातत्याने कार्यरत आहे,” असे मत व्यक्त केले.
यावेळी महासचिव महेशसिंग ठाकूर यांनी संघटनेच्या कार्यपद्धतीविषयी माहिती देताना सांगितले की, करार झालेल्या कामगारांकडून संघटनेकडे जमा होणारे निधीचे स्रोत हे केवळ कामगारांच्या हितासाठी आणि कल्याणासाठीच वापरले जातात. संपकरी कामगारांना देण्यात आलेली आर्थिक मदत हे त्याचेच एक उदाहरण असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच अंशुल इनोव्हेटिव्हमधील संघर्ष हा केवळ एका कंपनीपुरता मर्यादित नसून संपूर्ण कामगार चळवळीशी संबंधित असल्याने महासंघाच्या सर्व युनिट्सनी संपकरी कामगारांचे मनोबल उंचावण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.
उपस्थित सदस्यांनी संपकरी कामगारांनी गेल्या ७३ दिवसांत दाखविलेली जिद्द, चिकाटी आणि एकजूट यांचे कौतुक केले. कामगारांच्या प्रलंबित मागण्यांबाबत व्यवस्थापन आणि कामगार प्रतिनिधी यांच्यात सकारात्मक चर्चा होऊन लवकरच समाधानकारक तोडगा निघावा, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. संपकरी कामगार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी परस्परांशी संवाद साधत संघर्षाच्या पुढील वाटचालीबाबत चर्चा केली.
“मा. राजन राजे (भाई) यांचे मार्गदर्शन, त्यांचा प्रदीर्घ संघटनात्मक अनुभव, विषयांचा सखोल अभ्यास आणि कामगार चळवळीप्रती असलेली निष्ठावान बांधिलकी यांमुळे या संघर्षाला योग्य दिशा व बळ मिळत आहे. त्यांच्या नेतृत्वावर असलेल्या दृढ विश्वासाच्या बळावर कामगार आपले न्याय्य ध्येय निश्चितपणे साध्य करतील, याबाबत कोणतीही शंका नाही.”
दरम्यान, संबंधित मागण्यांवर न्याय्य तोडगा निघेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका संपकरी कामगारांनी पुन्हा एकदा स्पष्ट केली. संघर्ष कितीही काळ चालला तरी अंतिम विजय कामगारांचाच होईल, असा विश्वास यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.
दि. ०८/०६/२०२६ रोजी मेसर्स. वाॅलमेट फ्लो कंट्रोल प्रा. लि., डोंबिवली/अंबरनाथ येथील कंत्राटी कामगार सभासदांनी त्यांना कायमस्वरूपी (परमनंट) सेवेत सामावून घेण्यात आल्याबद्दल ‘धर्मराज्य पक्ष’ व ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघ’चे अध्यक्ष राजन राजे यांची ठाणे येथील कार्यालयात सदिच्छा भेट घेतली.
यावेळी कामगार प्रतिनिधींनी श्री. राजन राजे यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला तसेच कंत्राटी कामगारांच्या हक्कांसाठी सातत्याने उभारलेल्या संघर्षाबद्दल व मिळालेल्या न्यायाबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त केले. प्रसंगी संघटनेचे उपाध्यक्ष रमाकांत नेवरेकर, सचिव समीर चव्हाण, निरंजन म्हात्रे तसेच वाॅलमेट युनिट कमिटीचे पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.
मेसर्स. अंशुल इनोव्हेटिव्ह केमिस्ट्री प्रा. लि., प्लॉट नं. २१/२, एम.आय.डी.सी., गाव-धाटाव, ता. रोहा, जि. रायगड-४०२ ११६ येथील ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे सभासद असलेले कामगार आपल्या न्याय्य हक्कांसाठी व विविध प्रलंबित मागण्यांसाठी दि. १० एप्रिल २०२६ पासून महासंघाच्या नेतृत्वाखाली बेमुदत संपावर ठामपणे बसले आहेत.
‘धर्मराज्य पक्ष’प्रणित ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघ’ या युनियनचा रायगड जिल्ह्यात झंझावात सुरु झाला असून, रोहा तालुक्यातील धाटाव एमआयडीसी या औद्योगिकक्षेत्रात असलेल्या, ‘डीआरटी अँथिया अरोमा केमिकल्स प्रा. लि.’ या कंपनीतील सुमारे १०५ कायम कामगार सभासदांना तब्बल १४ हजार रुपयांची थेट पगारवाढ (CTC वगळून) मिळाली आहे. ‘धर्मराज्य’चे अध्यक्ष आणि महाराष्ट्राच्या औद्योगिकक्षेत्रातील ज्वलंत कामगार-नेते मा. राजन राजे यांच्या नेतृत्वाखाली; तसेच, त्यांच्या कामगारक्षेत्रातील चळवळीला साजेशी ही भरघोस पगारवाढ झाल्याने, रायगड जिल्ह्यात अभिमानास्पद असा औद्योगिक चमत्कार घडला आहे. सोमवार, दि. २ फेब्रुवारी-२०२६ रोजी, ठाणे शहरातील टिपटॉप प्लाझा येथे संपन्न झालेल्या, पगारवाढीच्या या पहिल्यावहिल्या त्रैवार्षिक कराराप्रसंगी, व्यवस्थापनाच्या वतीने एचआर प्रमुख श्री. लतेश मिरकर, प्रोडक्शन मॅनेजर श्री. आशिष दगडे, व्यवस्थापनाचे वकील ॲड. मोहित कपूर; तर, युनियनच्या वतीने उपाध्यक्ष श्री. रमाकांत नेवरेकर, महासचिव श्री. महेशसिंग ठाकूर, सचिव श्री. समीर चव्हाण, युनिट अध्यक्ष श्री. प्रदीप जंगम, उपाध्यक्ष श्री. निखिल वरणकर, सेक्रेटरी श्री. मयुर कोंडे, कार्यकारिणी सदस्य श्री. विनोद मगर आणि श्री. रामदास साखीळकर आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. पगारवाढीच्या या करारात, कामगारांना ६० टक्के डीए बेसिकमध्ये आणि ४० टक्के अलाऊन्समध्ये वाढ मिळाली आहे. त्यामुळे याआधी ३० ते ३५ हजार पगार घेणारे कामगार आता, दरमहा ४५ ते ५० हजार पगार घेणार आहेत. त्याचबरोबर, नव्याने भरती होऊन कायम होणाऱ्या कामगाराला, २२ हजार रुपयांपासून पगाराची सुरुवात होणार आहे, जो आधी एंट्री लेव्हलच्या कामगाराला १३ ते १४ हजार रुपये इतकाच तुटपुंजा पगार मिळत होता, त्यातदेखील या कराराअंतर्गत समाधानकारक वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, ‘डीआरटी अँथिया’ या बहुराष्ट्रीय रासायनिक कंपनीतील कामगारांना, व्यवस्थापनाने गेल्या अनेक वर्षांपासून अतिशय कमी वेतनमानावर झुलवत ठेवले होते. मात्र, मा. राजन राजे यांच्या अध्यक्षीय नेतृत्वाखालील ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे सभासदत्व स्विकारल्यानंतर, कामगारांना सन्मानजनक वेतन व त्यांचे हक्क मिळावेत यासाठी, युनियनकडून कंपनी व्यवस्थापनासोबत बोलणी सुरु करण्यात आली. परंतु, व्यवस्थापन सकारात्मक प्रतिसाद देत नसल्याचे लक्षात येताच, मा. राजन राजे यांनी, कामगार सभासदांना आपल्या न्याय्यहक्कासाठी संपावर जाण्याशिवाय पर्याय नसल्याचे आदेश दिले. त्यासंदर्भात, कंपनी व्यवस्थापनाला “संपाची सूचना” देण्यात आली होती. अखेर व्यवस्थापनाने सामंजस्याची भूमिका घेत, युनियनने पाठवलेला सेवाशर्तींचा मसुदा मंजूर करुन, पगारवाढीचा त्रैवार्षिक करार संपन्न केला. या करारामुळे कामगारांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. यानिमित्ताने ‘डीआरटी अँथिया’च्या कामगार सभासदांचे अभिनंदन करताना मा. राजन राजे यांनी म्हटले की, “कामगारांनी ‘कामगारधर्म’ जोपासून, आपलं आत्मभान जागं केलं तर, भांडवली व्यवस्थेला शरण येण्यावाचून गत्यंतर नाही. कामगारांना आपली ताकद कळली पाहिजे. कारण, कारखान्यात घाम गाळून उत्पादन काढणारा कामगारच, राष्ट्रीय संपत्ती निर्माण करीत असतो. आज कामगारांच्या एकजुटीचा विजय झाला आहे, तुमच्या आतले दिवे आता कुठे पेटायला सुरुवात झालीय, ते तसेच धगधगत ठेवलेत तर, बाहेरच्या सूर्याची तुम्हाला गरजच भासणार नाही!” अशा जाज्ज्वल्य शब्दांत ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे अध्यक्ष मा. राजन राजे यांनी, ‘डीआरटी अँथिया’ कामगारांना पुन्हा एकदा शुभेच्छा दिल्या आणि रोहा-धाटाव परिसरातील उर्वरित कामगार-कर्मचारीवर्गाने या करारातून फार मोठा धडा घेण्याचे संकेत दिले!
“कामगारांना आपली ताकद कळली पाहिजे… कारण, “कामगार हाच खरा संपत्तीचा निर्माता आहे”. कामगारांनी ‘कामगारधर्म’ पाळला, एकमेकांशी स्नेहभाव जोपासून आपलं आत्मभान जागं केलं; तर, प्रस्थापित रक्तपिपासू-निर्मम-शोषक भांडवली-व्यवस्थेला (Vampire-State System) शरण येण्यावाचून गत्यंतर राहणार नाही!” असे रोखठोक प्रतिपादन ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष तथा ज्येष्ठ कामगार-नेते राजन राजे यांनी रायगड जिल्ह्यातील रोहा इथे केले. रविवार, दि. २८ डिसेंबर-२०२५ रोजी, रोहा तालुक्यातील धाटाव एमआयडीसीमधील, ‘डीआरटी अँथिया’ आणि ‘अंशुल इनोवेटिव्ह’ या कंपनीतील कामगार सभासदांच्या बैठकीत संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, “केंद्र सरकारने ४४ कामगार कायद्यांच्या जागी ११ ने भाग धेऊन ४ काळे कामगार कायदे आणले आणि कामगारांच्या जगण्याचाच अवघा ‘भागाकार’ केलाय!त्याविरोधात आम्ही आवाज उठवतोय.
नवी मुंबईच्या महापे एमआयडीसीमधील ‘रेप्रो इंडिया लिमिटेड’ या कंपनीतील ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’च्या कामगार सभासदांचा ‘आनंद-मेळावा’ मंगळवार, दि. १४ ऑक्टोबर-२०२५ रोजी, ठाण्यातील मॉडेला चेकनाका येथील ‘आर नेस्ट’ या वातानुकुलीत सभागृहात मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाला. ‘धर्मराज्य पक्ष’ आणि ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे अध्यक्ष तथा ज्येष्ठ कामगारनेते मा. राजन राजे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. दरम्यान, पगारवाढ आणि आपल्या न्याय्य-हक्कांसाठी लोकशाही व सनदशीरमार्गाने ‘रेप्रो’च्या २८७ कामगार सभासदांनी, दि. ६ मार्च-२०१७ रोजीपासून, व्यवस्थापनाविरोधात बेमुदत संप पुकारला होता. त्यासंदर्भात, मा. औद्योगिक न्यायालय, ठाणे येथे कंपनी व्यवस्थापनाविरोधात दावा दाखल करण्यात आला होता. अखेर साडेआठ वर्षांच्या संघर्षानंतर, व्यवस्थापनाने सामंजस्याची भूमिका घेत, सर्व संपकरी कामगारांची कायदेशीर देणी, या सोहळ्याच्या निमित्ताने धनादेशाद्वारे मा. राजन राजे यांच्या शुभहस्ते अदा केली. ‘रेप्रो इंडिया लिमिटेड’ या कंपनीतील कामगार सभासदांचा कायदेशीर लढा, युनियनचे वकील के. टी. विश्वनाथन यांनी मोठ्या नेटाने लढवला आणि त्याला तेवढीच खंबीर साथ, ‘धर्मराज्य’च्या कामगार सभासदांनी दिली. या कालावधीत ‘राजन राजे’ नावाचा पंचाक्षरी मंत्र सदैव कामगारांना प्रेरणा देत राहिल्यामुळेच, तब्बल आठ-साडेआठ वर्षे, कामगार सभासद आपल्या निर्णयापासून तसूभरही ढळले नाहीत, ही सर्वात उल्लेखनीय बाब होय… याच पार्श्वभूमीवर या ‘आनंद-मेळाव्या’चे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला व्यवस्थापनाच्या वतीने, कंपनीच्या लीगल हेड व कंपनी सेक्रेटरी अलमिना शेख आणि कंपनीचे अकाऊंटंट समीर चौगुले उपस्थित होते. यावेळी ‘रेप्रो’च्या कामगारांचे कुटुंबीयदेखील आवर्जून उपस्थित होते. याच सोहळ्याचे औचित्य साधून, मा. राजन राजे यांनी उपस्थित कामगारांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे मन;पूर्वक अभिनंदन करुन, त्यांच्या भविष्यातील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. “सध्या देशातील कामगार-कष्टकरीवर्गाची अवस्था अत्यंत बिकट असून, केंद्र सरकारपुरस्कृत येऊ घातलेल्या काळ्या कामगार-संहितेमुळे, भविष्यात कामगारांना आपल्या हक्कासाठी संप, उपोषण आणि आंदोलने करता येणार नाहीत. ज्या भाजपला तुम्ही निवडून दिलंत, त्याच पक्षाने कामगार देशोधडीला लावायला घेतलाय.
तुम्हाला गणेशोत्सव-नवरात्रौत्सव, दहीहंड्या, जातीय व धार्मिक विद्वेष यातच गुंतवून ठेवत, सर्वसामान्य जनतेचा बुद्धिभेद करण्याचे कारस्थान, भारतीय जनता पक्षाने हाती घेतलेले आहे… वेळीच सावध झाला नाहीत; तर, तुमच्या पुढच्या पिढीचे भविष्य अंधकारमय होणार हे निश्चित!” अशा परखड शब्दांत मा. राजन राजे यांनी, उपस्थित कामगारांना मर्गदर्शन केले. दरम्यान, याप्रसंगी ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे महासचिव महेशसिंग ठाकूर, उपाध्यक्ष रमाकांत नेवरेकर, सचिव समीर चव्हाण आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

‘धर्मराज्य पक्ष’प्रणित ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’ची युनियन असलेल्या वाल्मेट इंडिया प्रा. लि. (फ्लो कंट्रोल युनिट) या आस्थापनेच्या, डोंबिवली एमआयडीसी आणि अंबरनाथ एमआयडीसी या दोन्ही युनिटमधील, कामगार सदस्यांच्या पगारवाढीच्या त्रैवार्षिक कराराच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त, डोंबिवली (पू.) येथील ब्लॉसम इंटरनॅशनल स्कूल येथे येथे, वाल्मेट युनियन युनिटच्या वतीने रविवार, दि. ६ ऑक्टोबर-२०२४ रोजी, एका स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. ‘धर्मराज्य पक्ष’ आणि ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे संस्थापक/अध्यक्ष मा. राजन राजे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. वाल्मेट इंडिया प्रा. लि. (फ्लो कंट्रोल युनिट) या आस्थापनेतील कामगारांनी, ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे सदस्यत्व स्वीकारल्यानंतर, वर्षभरातच मा. राजन राजे यांच्या सक्षम व प्रखर नेतृत्त्वाखाली, पगारवाढीचा पहिलावहिला त्रैवार्षिक करार यशस्वीपणे संपन्न झाला होता. याच कराराच्या वर्षपूर्तीनिमित्त, या दिमाखदार स्नेहसंमेलनाचे आयोजित करण्यात आले