टॅग: राजन राजे

मतपत्रिकेद्वारे निवडणुकीसाठी ‘धर्मराज्य पक्ष’ आक्रमक…

, , , ,

१९४७ पूर्वी आपण स्वातंत्र्याची पहिली लढाई लढलो, आता मिळालेलं स्वातंत्र्य आपल्याला वाचवायचे असेल तर, मतपत्रिकेद्वारे मतदान करण्यावाचून आपल्याला गत्यंतर नाही. त्यानंतर, भाजपाला अगदी दोन तृतीयांश जरी मतं मिळाली तरी, आमची हरकत नाही; मात्र, अशी बनावटगिरी आणि भोंदुगिरी आम्ही यापुढे खपवून घेणार नाही. आमच्या जनमताचा अनादर चालवून न घेण्यासाठीच ‘धर्मराज्य पक्षा’ने नो “बॅलेट पेपर… नो इलेक्शन” या घोषणेखाली, स्वातंत्र्याची दुसरी लढाई सुरु केली असल्याचे उद्गार पक्षाध्यक्ष राजन राजे यांनी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना काढले. आगामी सर्व प्रकारच्या निवडणुका यापुढे ‘ईव्हीएम’ऐवजी मतपत्रिकेद्वारे घेण्यात याव्यात यासाठी, ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने जनजागृती मोहीम सुरु करण्यात आली असून, ठाणे शहराच्या विविध भागात राजन राजे यांच्या नेतृत्त्वाखाली ही मोहीम राबविण्यात येणार असल्याचे राजे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. दरम्यान पत्रकार परिषदेनंतर, लगेचच ठाणे रेल्वे स्थानक परिसरात घेण्यात आलेल्या जनजागृती मोहिमेला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत, मतपत्रिकेद्वारे निवडणुका घेण्यात याव्यात यासाठी आपले मत नोंदवले. या जनजागृती मोहिमेअंतर्गत, पक्षाच्या वतीने मतपेटी तयार करण्यात आली असून, त्यात नागरिकांकडून आपले मत कोणाला… ईव्हीए की, मतपत्रिकेला? यासाठी प्रतीकात्मक मतदान घेण्यात आले. नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालात, भाजपा-महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले. जर, त्यांचा विजय इतकाच “न भूतो” व ऐतिहासिक होता; तर, त्यांच्या तथाकथित कार्यकर्त्यांखेरीज, रस्तोरस्ती सर्वसामान्य जनतेचा उत्स्फूर्त आनंदोत्सव का दिसला नाही? असा परखड सवाल उपस्थित करुन, ही तर सर्वसामान्य जनतेच्या मतांची थेट चोरी असून, आपली फसवणूक होतेय आणि हीच फसवणूक भविष्यात पुन्हा होऊ द्यायची नसेल तर, दिलीश्वरांना आणि गुजराथी लॉबीला धडका देण्यासाठी ईव्हीएम मशीन अरबी समुद्रात फेकून देण्याशिवाय गत्यंतर नसल्याचा जोरदार घणाघात राजन राजे यांनी पत्रकार परिषदेत केला.
दरम्यान, ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे यावेळी पत्रकारांशी बोलताना पुढे म्हणाले की, यासंदर्भात आम्ही विविध राजकीय पक्षांच्या बड्या नेत्यांना भेटून, ही संकल्पना त्यांच्या गळी उतरवणार आहोत. ज्यांना पटेल ते आमच्यासोबत येतील, न पेक्षा आम्ही “एकला चालो रे” याप्रमाणे, भारतीय स्वातंत्र्याच्या आणि लोकशाहीच्या दृष्टीने जपणूक करण्यासाठी अधिक आक्रमकपणे ‘ईव्हीएम’ला प्राणपणाने विरोध करु. “नो बॅलेट पेपर… नो इलेक्शन” ही आमची घोषणा असून, मतपत्रिकेवरील मतदानाचा हक्क पुन्हा मिळवण्यासाठी, येत्या २६ जानेवारी-२०२५ रोजी, प्रजासत्ताक दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त, रात्री ठीक ९ वाजता, फक्त पाच मिनिटांसाठी सर्वांनी आपल्या घरातले अथवा कार्यालयातले लाईट्स बंद ठेवून, ‘ईव्हीएम’वरील मतदानाचा तीव्र निषेध व्यक्त करण्याचे आवाहनदेखील राजन राजे यांनी यावेळी केले. निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालय, देशातील नागरिकांची अत्यंत लाजिरवाणी व क्रूर चेष्टा करतायेत. दिलेली मतं ‘ईव्हीएम’मध्ये दीडत नव्हती म्हणून, ‘व्हीव्हीपॅट’ आणलं; परंतु, मतं मोजली कुठली? तर, ‘ईव्हीएम’मध्ये न दिसणारी. मतपत्रिका मोजणे हे, एव्हरेस्ट शिखर चढण्याएवढे किंवा एखादा भलामोठा डोंगर खोदण्याएवढे अवघड काम आहे का? असा थेट प्रश्नदेखील राजन राजे यांनी यावेळी उपस्थित केला. उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय हे, राज्यघटनेचे रक्षक असताना, ही न्यायपीठे मात्र, सत्ताधाऱ्यांच्या ताटाखालची मांजरं झालीयेत, अशी जोरदार टीकादेखील ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे यांनी शेवटी पत्रकार परिषदेत केली.

आंदोलनांची पुण्याई संपल्यामुळेच, भांडवलदारी व्यवस्था फोफावली! – राजन राजे

, , , , ,

‘‘या महाराष्ट्रात कंत्राटी-कामगारपद्धतीविरुद्ध, मी गेली २५/३० वर्षे लढतोय. ‘कंत्राटी-कामगार पद्धत’ ही गुलामगिरी तर आहेच, पण ती एकप्रकारची नव-अस्पृश्यतादेखील आहे. अस्पृश्यता म्हणजे, एका विशिष्ट समाज-घटकाने समाजाच्या दुसर्‍या मोठ्या हिश्श्याला विकासाच्या परिघाबाहेर ढकलून देत, त्याला जगण्याचा सन्मान आणि त्याला विकासाचे मूलभूत फायदे नाकारणे… ‘कंत्राटी-कामगार पद्धत’, ही नव-अस्पृश्यता यासाठी की, या प्रकारच्या अस्पृश्यतेत जन्माची जात गुंतलेली नसली; तरी, जन्माचं पोट गुंतलेलं आहे आणि तो कंत्राटी-कामगार अर्धपोटी आहे, त्याला माणुसपणाचे हक्क कामाच्या ठिकाणी नाकारलेले आहेत! मी, गेली तीन दशकं एकहाती या व्यवस्थेविरोधात ‘धर्मयुद्ध’ पुकारुन संघर्ष करतोय. लोकचळवळीकडून, डाव्या चळवळीकडून याबाबतीत काही मोठ्या त्रुटी राहून गेल्या. डाव्या विचारसरणीच्या कम्युनिस्टांनी ‘नागरी आण्विक दायित्व कायदा-123’ (Civil Nuclear Liability Bill-123) साठी बंगाल-केरळ मधील आपले ४३ खासदार संसदेत पणाला लावले; पण, भारतातील सर्वात मोठी समस्या असलेल्या ‘कंत्राटी-कामगार पद्धती’विरोधात त्यांना अंशानेही तसं काही करावसं वाटलं नाही, हे देशाचं आणि एकूणच डाव्या चळवळीचं फार मोठं दुर्दैव आहे. एकांडी शिलेदारी करीत ‘कंत्राटी-कामगार पद्धती’विरोधात आम्ही बेंबीच्या देठापासून बोंबलून-बोंबलून थकलो, मोठमोठी आंदोलनं केली, संपासारखे टोकाचे संघर्ष केले, बड्या बड्या राजकीय नेत्यांना भेटलो, सर्वपक्षीय प्रमुखांच्याही भेटीगाठी घेतल्या…पण, आमच्या हाती ‘राजकीय ताकद’ नसल्याने कंत्राटीकरणाची विषवल्ली अधिकाधिक फोफावली. मी, ‘धर्मराज्य पक्षा’ची स्थापना यासाठीच केली. कारण, चळवळीतील नेत्यांनी, कंत्राटी-पद्धतीचा विषय लावूनच धरला नाही. दुर्दैवाने, आंदोलनांची पुण्याई आता संपलेली आहे. तुम्ही आमरण उपोषणाला बसलात, चक्री-उपोषणाला बसलात; तरी, शंभर टक्के सांगतो, तुमचे प्रश्न सुटणार नाहीत; त्यासाठी, तुम्हाआम्हाला निवडणुका जिंकून विधिमंडळात, संसदेत धडक द्यावी लागेल. कष्टकऱ्यांच्या अपरिमित शोषणातून चाललेली ही संपूर्ण भांडवलदारी व्यवस्था, देशात साम्यवाद-समाजवाद आणूनच संपवावी लागेल…इतर कुठलाही राजकीय पर्याय नाही’’, अशा घणाघाती शब्दांत ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे यांनी, प्रस्थापित राजकीय व्यवस्थेविरोधात जोरदार शरसंधान साधले. महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने, मंगळवार, दि. २८ नोव्हेंबर-२०२३ रोजी, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ शेतकरी आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन करण्यात आले, त्यावेळी राजन राजे बोलत होते. केंद्र सरकारने जाहीर केलेला भाताचा हमीभाव अत्यंत तुटपुंजा असल्याने, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार, उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा धरुन, भाताला प्रति क्विंटल किमान चार हजारांचा हमीभाव देऊन, तसा कायदा करण्यात यावा, भातखरेदी केंद्रे पूर्ववत सुरु करण्यात यावीत, शेतकऱ्यांना वीजपंपासाठी मोफत वीजपुरवठा करण्यात यावा, शेतकरी-शेतमजूर व असंघटित बांधकाम कामगार आणि महिलांना, वयाच्या ६० वर्षांनंतर मासिक पाच हजारांची पेन्शन सुरु करण्यात यावी, सरकारी (जिल्हा परिषद) शाळांचे खासगीकरण थांबवून, कंत्राटी नोकरभरतीचा कायदा रद्द करण्यात यावा, आरोग्यसेवेचे खासगीकरण थांबवा आणि आरोग्यसेवेत आमूलाग्र सुधारणा करुन, सर्वसामान्य जनतेला मोफत सेवा देण्यात याव्यात, या आणि अशा अनेक मागण्यांसाठी, महाराष्ट्र राज्य किसान सभा, ठाणे जिल्हा यांच्या वतीने, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून, संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने, मंत्रालयावर धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले असून, त्याच पार्श्वभूमीवर, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ ही प्रखर निदर्शने करण्यात आली होती.

यावेळी उपस्थित आंदोलनकर्त्यांना संबोधित करताना, ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे पुढे म्हणाले की, ‘‘ज्याप्रमाणे उंदीर, सारखं काही ना काही कुरतडत असतो, तसेच या व्यवस्थेचे हात तुमच्या खिशाला, तुमच्या पैशाच्या पाकिटाला कुरतडत, ओरबाडत असतात… आणि, म्हणूनच या व्यवस्थेला मी ‘रक्तपिपासू शोषक-व्यवस्था’ म्हणतो. या व्यवस्थेचे जे सगळे बगलबच्चे आहेत, ते कसलेल्या ‘पाकिटमारा’सारखे आपल्या खिशात हात घालून असतात, आपल्याला ते कळत नाही. एकीकडे उड्डाणपूल होतायत, मॉलटॉल होतायत, विकासकामं होताना दिसतायत, पण आमच्या पगाराची पाकिटं कधी जाडजूड होताना दिसतात का?* आम्ही मात्र, अजूनही टेकड्यांवर आणि त्यांची प्रगती हिमालयाच्या उंचीएवढी. म्हणूनच, आमचं जीवन खाली-खाली घसरत चाललंय… ना आम्हाला आरोग्यसेवा परवडत, ना आम्हाला खासगी शिक्षण परवडत. शिक्षणसेवा आणि आरोग्यसेवा या खासगी असूच कशा शकतात?’’ असा प्रश्न उपस्थित करीत, राजे पुढे म्हणाले, *’’ज्याला आम्ही ‘कल्याणकारी राज्य’ म्हणावं, त्याचा अगदी उलट हा कारभार सुरु आहे. आरोग्य व शिक्षण या सकस, दर्जेदार सेवा सरकारतर्फेच पुरविल्या गेल्या पाहिजेत. जोपर्यंत, आपल्या देशात ‘कल्याणकारी राज्य’ संकल्पनेची धारणा व धोरणं होती, तोपर्यंत, मूलभूत सुविधा सर्वसामान्यांना समाधानकारक मिळत होत्या, पण आता भाजपा-नरेंद्र मोदी सरकारच्या बेलगाम खाजगीकरणाच्या, खरं म्हणजे ‘अदानी-अंबानीकरणा’च्या, गेल्या दहा वर्षांच्या लोकशाहीविरोधी कालखंडात सगळंच बदललंय. मी तुम्हाला ठामपणे सांगतो, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले काय, फडणवीस झाले काय आणि पवार झाले काय, आपले मूलभूत प्रश्न कधिही सुटणे नाही… ही व्यवस्थाच आपल्याला मुळातून आमूलाग्र बदलायला हवी. तुम्ही सुशिक्षित आहात, तुम्ही स्वतःच तपासून पाहा, अमेरिकेत-युरोपात आता, समाजवादी-साम्यवादी चळवळी जोर धरु लागल्यात. ज्याला आपण समाजवाद व साम्यवादाचा विचार म्हणतो, तो पुन्हा जोरकसपणे पुढे यायला लागलाय. आता फक्त आंदोलनापुरते सीमित न राहता, राजकीयदृष्ट्या सुशिक्षित होणे गरजेचे आहे. तुम्ही आम्ही एकाच चळवळीतील लोकं आहोत, आपण वेळीच जागे झालो नाही तर, राजकीयदृष्ट्या अज्ञानी माणसाला, या पुढारलेल्या आणि विज्ञानवादी जगात कुठलाही थारा मिळणार नाही !’’* अशा रोखठोक भाषेत, उपस्थित शेतकरी आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना राजन राजे यांनी, आवाहन केले. या आंदोलनाचे नेतृत्व महाराष्ट्र किसान सभेचे अध्यक्ष कॉ. मधुकर पाटील यांनी केले. यावेळी किसान सभेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष कॉ. आत्माराम विशे, सचिव कॉ. रमेश जाधव, कार्याध्यक्ष कॉ. विलास शेलार, कॉ. भास्कर पाटील, कॉ. जयराम चंदे, कॉ. प्रकाश काठोळे, भिवंडी तालुका अध्यक्ष कॉ. बाळाराम भोईर, शहापूर तालुका अध्यक्ष भगवान दळवी, मुरबाड तालुका अध्यक्ष कॉ. नारायण पाटोळे, कल्याण तालुका अध्यक्ष कॉ. आदम शेख आदी पदाधिकाऱ्यांसह, ‘धर्मराज्य पक्षा’चे ठाणे लोकसभा उपाध्यक्ष व ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे महासचिव महेशसिंग ठाकूर, लोकसभा उपाध्यक्ष नरेंद्र पंडित, सचिन शेट्टी, कामगार प्रतिनिधी समीर चव्हाण इ. मान्यवर यावेळी उपस्थित होते.

मराठी राजभाषा दिनानिमित्त राजन राजे यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी वनभोजनाचे आयोजन !

, , , ,

मराठी राजभाषा दिनानिमित्त राजन राजे यांच्या वतीने मुरबाड तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी वनभोजनाचे आयोजन ! ● सेंद्रिय शेती, निसर्गरक्षण आणि पर्यावरणाच्या संवर्धनाबाबत केले मार्गदर्शन.
वि.वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त २७ फेब्रुवारी हा दिवस ‘मराठी राजभाषा दिन’ म्हणून अवघ्या महाराष्ट्रदेशी साजरा करण्यात येतो. याच अभिमानास्पद दिवसाचे औचित्य साधून ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष व ज्येष्ठ कामगारनेते मा. श्री. राजन राजे यांनी ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात असलेल्या साखरे-साजगाव येथील त्यांच्या शेतघराच्या प्रशस्त आणि निसर्गरम्य ठिकाणी सहलीसाठी आलेल्या शेकडो शालेय विद्यार्थी-विद्यार्थीनींसाठी वनभोजनाचे आयोजन केले होते. याप्रसंगी जिल्हापरिषद प्राथमिक शाळा, किसळ या विद्यालयातील शिक्षकवृंददेखील उपस्थित होता. विद्यार्थीवर्गाला शालेय जीवनापासूनच निसर्गरक्षण व पर्यावरण संवर्धनाचे महत्व कळावे, यासाठीच या वनभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मा. श्री. राजन राजे यांनी विद्यार्थ्यांना स्वतःहून शेतघर परिसरातील विविध झाडे, वनस्पतींची माहिती दिली. यामध्ये सेंद्रिय पद्धतीने शेती कशी करावी, याबरोबरच ऊस, द्राक्ष, फळभाज्या आणि पालेभाज्यांच्या लागवडीचे शास्त्रशुद्ध मार्गदर्शन करून त्यांच्या ज्ञानात मोलाची भर घालण्यात आली.
दरम्यान, जिल्हापरिषद प्राथमिक शाळा, किसळ या विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी ही सहल फक्त मनोरंजनात्मकच नव्हे, तर त्यांच्या ज्ञानाची कवाडे उघडणारी ठरली. यानिमित्ताने शेती कशी करावी? सेंद्रिय शेती म्हणजे काय? निसर्गाचे रक्षण व पर्यावरणाचे संवर्धन म्हणजे नक्की काय, त्याचे मानवी जीवनातील नेमके महत्व किती? याची सखोल माहिती मा. श्री. राजन राजे यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिली. भारतातील पहिलावहिला पर्यावरणवादी पक्ष अशी ओळख असणारा ‘धर्मराज्य पक्ष’ फक्त निवडणुकांचेच राजकारण करीत नसून, तर तो सातत्याने पर्यावरणच्या माध्यमातून ‘निसर्गकारण’ करीत असतो, हेच मराठी राजभाषा दिनाच्या माध्यमातून व शालेय सहलीच्या निमित्ताने अधोरेखित झाले. वनभोजनाचा मनमुराद आस्वाद घेतल्यानंतर मा. श्री. राजन राजे यांनी प्रत्येक विद्यार्थी-विद्यार्थिनी व शिक्षकांना सेंद्रिय पद्धतीने तयार केलेल्या गुळाची प्रत्येकी १ किलोची ढेप भेट म्हणून दिली. यावेळी विद्यार्थीवर्गाच्या चेहऱ्यावरील आनंद आणि त्यांचा टवटवीतपणा स्पष्टपणे दिसत होता. “शालेय विद्यार्थ्यांसाठी असलेली ही सहल खऱ्या अर्थाने सार्थकी लागली. जी गोष्ट आम्ही शाळेत पुस्तकीरुपात शिकवतो, तीच आमच्या विद्यार्थ्यांना आज प्रत्यक्षात शिकायला मिळाली.” अशा भावना व्यक्त करून शिक्षकवृंदाने मा. श्री. राजन राजे यांचे आभार मानले. याप्रसंगी राजे यांच्या सुकन्या ऋचा राजे आवर्जूनउपस्थित होत्या. त्याचबरोबर तुकाराम हलपतराव, धनाजी हलपतराव, विश्वनाथ मोरे आदी मंडळी उपस्थित होती.

‘‘धर्मराज्य पक्ष’’ व ‘‘सिव्हील रूग्णालय, ठाणे’’ यांच्या संयुक्त विद्यमाने ठाण्यात रक्तदान शिबीर संपन्न

, , , , ,

‘‘धर्मराज्य पक्ष’’ व ‘‘सिव्हील रूग्णालय, ठाणे’’ यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे येथे खोपट विभागतर्फे ‘रक्तदान शिबीर’ संपन्न झाले. या शिबीरात ऐच्छिक ६० रक्तदात्यांनी रक्तदान केले. सिव्हील रूग्णालयाचे डाॅ. मनोजकुमार मोहन, शिल्पा कुलकर्णी (स्टाफ नर्स), अमृत झोमरे (टेक्निशिएन), रूपाली कदम (टेक्निकल सुपरवायझर), पल्लवी कैतकर (पी.आर.ओ.), दया सुतार (स्टुडन्ट नर्स), कोमल हुंडारे (स्टुडन्ट नर्स), वत्सला राठोड (अटेन्डन्ट), राधा मखवाना (अटेन्डन्ट), उमेश वाघचैरे (ब्लड आॅन काॅल बाॅय) यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदानपूर्वी तपासण्या व रक्तदान घेण्यात आले. यावेळी ऐच्छिक ६० रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी रक्तदात्यांना ‘सिव्हील रूग्णालया’तर्फे रक्तदान कार्ड व प्रमाणपत्र देण्यात आले. सदर ‘रक्तदान शिबीर’ रविवार, दि. ८ फेब्रुवारी-२०१५ रोजी, सकाळी १०.०० ते दुपारी २.०० यावेळेत संपन्न झाले.

या शिबीराचे आयोजन ‘धर्मराज्य पक्षा’चे ठाण्यातील खोपट प्रभागातर्फे प्रभाग अध्यक्ष राजू षिंदे व उथळसर प्रभाग समिती अध्यक्ष सुनिल घाणेकर यांनी केले होते. यावेळी ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे, महासचिव राजू फणसे, उपाध्यक्ष नितीन देषपांडे, ‘धर्मराज्य महिला संघटना’ अध्यक्षा जयश्री पंडित, ठाणे जिल्हा समन्वयक राजेश गडकर, ठाणे जिल्हा सचिव नरेंद्र पंडित, ठाणे शहर अध्यक्ष सचिन शेट्टी, ठाणे शहर सचिव समीर चव्हाण, सहसचिव विजय भोसले, ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे महासचिव महेषसिंग ठाकूर, सचिव रूपेष पवार  आदी मान्यवर उपस्थित होते.

error: Content is protected !!