गिरणी कामगार आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी, परवडणाऱ्या दरात हक्काची घरे मिळावीत यासाठी, येत्या नागपूर हिवाळी अधिवेशनात, गिरणी कामगारांच्या हक्काच्या घरांसाठी मोर्चा काढण्यात येणार असून, त्याचीच माहिती देण्यासाठी ‘घर हक्क परिषदे’च्या वतीने, दि. १७ नोव्हेंबर-२०२५ रोजी, गांधी भवन (कुलाबा, मुंबई) येथे, एक पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष तथा ज्येष्ठ कामगार नेते मा. राजन राजे, काँग्रेसच्या अर्थशास्त्र विभागाचे अध्यक्ष मा. विश्वास उटगी, सर्व श्रमिक संघाचे नेते कॉ. शिशिर ढवळे आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, संविधानातील अधिकारानुसार जमिनीची मालकी ही, जनतेची असते. याच अनुषंगाने, सर्व बंद कारखान्यांच्या जमिनी, त्या कारखान्यांत काम करणारे कामगार व सर्वसामान्य जनतेच्याच असल्याने, त्या जमिनींवर गिरणी कामगार व जनतेसाठी परवडणारी घरे बांधावीत, अशी मागणी पत्रकार परिषदेत करुन, दि. १ ऑगस्ट-२०१९ रोजीचा जीआर रद्द करण्यात यावा, अशीही मागणी, नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाच्या मोर्चात करण्यात येणार असल्याचे मा. विश्वास उटगी यांनी सांगितले. “आमच्या जमिनीवर, आमच्या घराचा हक्क” या घोषणेनुसारच, यापुढे ‘घर हक्क परिषद’ आपला लढा सुरु ठेवणार असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, उप-मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे व श्री. अजित पवार आणि संबंधित मंत्र्यांना, दि. १७ नोव्हेंबर-२०२५ रोजी निवेदन देण्यात येऊन, आगामी हिवाळी अधिवेशनात गिरणी कामगार आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी परवडणाऱ्या घरांसंदर्भात ‘लक्षवेधी’ आणण्याबाबत आग्रह धरण्याची मागणी, निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आलीआहे. तसेच, गिरणी कामगार व लोकांमध्ये याबाबत जनजागृती होण्यासाठी मुंबईसह, महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांमध्ये सार्वजनिक सभा आयोजित करण्यात येतील, अशी माहिती मा. विश्वास उटगी यांनी, यावेळी पत्रकार परिषदेत दिली.