Blog

महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त दि. ३० जानेवारी २०२६ रोजी महात्मा गांधीच्या जीवन-चरित्रावर परिसंवादाचे आयोजन

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या ७७व्या पुण्यतिथीनिमित्त, येत्या ३० जानेवारी-२०२६ रोजी, ‘धर्मराज्य पक्ष’प्रणित ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’च्या वतीने, ठाणे शहरातील मराठी ग्रंथ संग्रहालय येथे सायंकाळी ४ ते रात्रौ ८ वा.पर्यंत, महात्मा गांधींच्या जीवन-चरित्रावर एका परिसंवादाचे आयोजन करण्यात आले असून, ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष तथा ज्येष्ठ कामगार-नेते मा. राजन राजे या कार्यक्रमाचे आयोजक आहेत. याच अनुषंगाने ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत डॉ. विवेक कोर्डे व डॉ. सुरेश पंडित यांनी, पक्षाच्या ठाणे कार्यालयात मा. राजन राजे यांची सदिच्छा भेट घेऊन, नियोजित कार्यक्रमासंदर्भात सविस्तर चर्चा केली. परिसंवादाच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने, ‘धर्मराज्य पक्षा’च्या कार्यालयापासून ते मराठी ग्रंथ संग्रहालयापर्यंत महात्मा गांधींच्या विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने एक फेरी काढण्यात येणार असल्याचे यावेळी चर्चेअंती ठरविण्यात आले. या कार्यक्रमात डॉ. विवेक कोर्डे हे, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जीवन-चरित्रावर मार्गदर्शन करणार आहेत. दरम्यान, या बैठकीला ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे उपाध्यक्ष श्री. रमाकांत नेवरेकर, ‘धर्मराज्य पक्षा’चे सचिव श्री. नरेंद्र पंडित आणि प्रवक्ते श्री. समीर चव्हाण उपस्थित होते.

ठाणे येथील धर्मराज्य पक्ष कार्यालयात दि. २९ डिसेंबर २०२५ रोजी ‘वृत्तमानस’ दिनदर्शिकेचे मा. राजन राजे यांच्या शुभहस्ते प्रकाशन

मराठी अस्मितेचा बुलंद आवाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, मुंबईतील प्रतिष्ठीत वर्तमानपत्र असलेल्या ‘वृत्तमानस’ या दैनिकाचे मुद्रक/प्रकाशक श्री. भूषण म्हात्रे यांनी, ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष तथा ज्येष्ठ कामगार-नेते मा. राजन राजे यांची, पक्षाच्या ठाणे कार्यालयात सोमवार, दि. २९ डिसेंबर-२०२५ रोजी सदिच्छा भेट घेतली. यावेळी ‘वृत्तमानस’च्या नवीन वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन मा. राजन राजे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी श्री. भूषण म्हात्रे यांनी, ‘धर्मराज्य पक्ष’ आणि ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’च्या माध्यमातून जो लढा लोकशाही व सनदशीरमार्गाने सुरु आहे, त्याचे कौतुक केले. ‘धर्मराज्य पक्षा’चे कार्य हे, इतर कोणत्याही राजकीय पक्षापेक्षा अधिक प्रामाणिक आणि ठोस असते, म्हणूनच ‘वृत्तमानस’ दैनिकात त्याबाबतची बातमी प्रकाशित करताना आम्हाला जास्त आनंद होतो, असे त्यांनी प्रांजळपणे कबूल केले. याच अनुषंगाने देशातील राजकीय सद्यस्थिती, भाजपप्रणीत केंद्र सरकारकडून लादण्यात आलेले काळे कामगार कायदे. देशातील काढता धार्मिकविद्वेष, मराठी माणसाची होणारी गळचेपी, भूमिपुत्र शेतकऱ्यांवरील अन्याय, यावर मा. राजन राजे यांनी सविस्तर विवेचन केले. याप्रसंगी ‘धर्मराज्य पक्षा’चे प्रवक्ते श्री. समीर चव्हाण, पक्षाचे सचिव नरेंद्र पंडित, पक्षाचे ठाणे लोकसभा उपाध्यक्ष श्री. महेशसिंग ठाकूर, प्रसिद्धीप्रमुख श्री. संजय दळवी आणि ‘वृत्तमानस’चे जाहिरात विभागातील कर्मचारी श्री. राजेंद्र शिर्के आदी मंडळी उपस्थित होती.

रोहा, धाटाव एमआयडीसी | रविवार, दि. २८.१२.२०२५ : कामगारांच्या बैठकीत राजन राजेंचे सडेतोड प्रतिपादन

कामगारांनी ‘कामगारधर्म’ जोपासून, आपलं आत्मभान जागं केलं; तर, शोषक-अन्यायी भांडवली व्यवस्थेला शरण येण्यावाचून गत्यंतर नाही!
रोह्यातील कामगारांच्या बैठकीत, राजन राजे यांचे रोखठोक प्रतिपादन…
“कामगारांना आपली ताकद कळली पाहिजे… कारण, “कामगार हाच खरा संपत्तीचा निर्माता आहे”. कामगारांनी ‘कामगारधर्म’ पाळला, एकमेकांशी स्नेहभाव जोपासून आपलं आत्मभान जागं केलं; तर, प्रस्थापित रक्तपिपासू-निर्मम-शोषक भांडवली-व्यवस्थेला (Vampire-State System) शरण येण्यावाचून गत्यंतर राहणार नाही!” असे रोखठोक प्रतिपादन ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष तथा ज्येष्ठ कामगार-नेते राजन राजे यांनी रायगड जिल्ह्यातील रोहा इथे केले. रविवार, दि. २८ डिसेंबर-२०२५ रोजी, रोहा तालुक्यातील धाटाव एमआयडीसीमधील, ‘डीआरटी अँथिया’ आणि ‘अंशुल इनोवेटिव्ह’ या कंपनीतील कामगार सभासदांच्या बैठकीत संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, “केंद्र सरकारने ४४ कामगार कायद्यांच्या जागी ११ ने भाग धेऊन ४ काळे कामगार कायदे आणले आणि कामगारांच्या जगण्याचाच अवघा ‘भागाकार’ केलाय!त्याविरोधात आम्ही आवाज उठवतोय.
महाराष्ट्रातील मराठी-तरुण मोठ्याप्रमाणात नासवला गेलाय…तो क्रिकेटच्या, धर्मसंप्रदायांच्या आणि संध्याकाळच्या बाटलीच्या नादाने…एका बाटलीने आमची शिवबा-संतांची मराठी-संस्कृती बाटली, ही दुर्दैवी अवस्था आहे! यापुढे आपण काय खाणार, कुठलं पाणी पिणार, कुठल्या हवेत श्वास घेणार, हे हाताच्या बोटावर मोजता येतील एवढे मोजकेच भांडवलदार ठरवणार आहेत. लोकशाही ही फक्त, आता मतांपुरती मर्यादित राहिलीय…आपल्या कामाच्या ठिकाणी लोकशाही असते का? तिथे तुमच्यावर सीसीटीव्हीचा वॉच असतो. आयुष्यातला सर्वात मोठा काळ आपण कारखान्यात घालवतो, याला कारण आपणच आहोत… कारण, आपण झोपलेलो आहोत. आपली कामगार संघटना ही, फक्त तुमचे पगार-बोनस याकरिता अजिबात नाही; तर, तुमची मानसिकता बदलण्यासाठी आणि तुम्हाला गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी आहे. भांडवलदारशाहीची कंत्राटी-कामगार पद्धत, तुम्हाला गुलामगिरीत ढकलण्यासाठी, चारही बाजूंनी पराकोटीचे प्रयत्न करत असते; पण, एकमेव ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघ’ या आपल्या युनियनने ती प्राणपणाने मोडीत काढलीय. क्रिकेटचे सामने, सार्वजनिक महापूजा, गणेशोत्सव, भंडारे आणि निवडणुकांच्या काळात येणारा दारुचा पूर आणि मटणाच्या मेजवान्या यातून तुम्हाला आधी बाहेर पडावं लागेल… याच चंगळवादी गुलामी अवस्थेतून बाहेर काढण्यासाठी आपली संघटना आहे. जर कामगारांनी एकजुटीने काम करणं नाकारलं; तर, मग सरकारने कुठलेही व कितीही काळे-कायदे आणले तरी, ही सगळी भांडवली-व्यवस्था कोलमडून पडेल…त्यासाठीच, कामगारांना आपली ताकद कळली पाहिजे!” अशा शब्दांत राजन राजे यांनी, कामगारांमध्ये स्फुल्लिंग चेतवले. दरम्यान, रोह्याच्या धाटाव एमआयडीसीमधील, ‘डीआरटी अँथिया’ या बहुराष्ट्रीय रासायनिक कंपनीतील, ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे सदस्य असलेल्या कामगारांना, कंपनी व्यवस्थापननाने तुटपुंज्या वेतनमानावर गेल्या अनेक वर्षांपासून झुलवत ठेवले आहे. त्यांना सन्मानजनक वेतन मिळावे, कामगारांचे हक्क मिळावेत यासाठी ‘डीआरटी अँथिया’चे कामगार संघर्ष करीत असून, त्याच पार्श्वभूमीवर या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. “माझ्या रोह्यातल्या कामगारांनी जर एकजूट दाखवली तर, कंपनी व्यवस्थापनाला शरण आणल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. तुम्हाला बजावून ठेवतो, हा संघर्ष तुम्ही शंभर टक्के जिंकणार आहात… १५ हजारांच्या खाली एक रुपयाचीही पगारवाढ मी घेणार नाही आणि तीदेखील थेट पगारवाढ, सी.टी.सी. नव्हे…C.T.C. ही फक्त एकप्रकारची ‘चहा पावडर’ आहे, एवढंच आम्हाला माहिती आहे, त्याचा आमच्या पगाराशी संबंध नाही… तुमच्या आतले दिवे पेटले की, बाहेरच्या सूर्याची तुम्हाला गरजच भासणार नाही!” अशा ज्वलंत वक्तव्यांनी राजन राजे यांनी, कामगारांना त्यांच्या अस्तित्वाची आणि ताकदीची जाणीव आपल्या भाषणाच्या शेवटी करुन दिली. याप्रसंगी ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे सचिव समीर चव्हाण, ‘धर्मराज्य पक्षा’चे ठाणे लोकसभा अध्यक्ष राजेश गडकर, पक्षाचे माहिती अधिकार कक्षप्रमुख अनिल महाडिक, प्रसिद्धीप्रमुख संजय दळवी या पदाधिकाऱ्यांसह, ‘डीआरटी अँथिया’चे युनिट कमिटी अध्यक्ष प्रमोद जंगम, उपाध्यक्ष निखील वरणकर, सेक्रेटरी मयूर कोंडे, कार्यकारिणी सदस्य विनोद मगर, रामदास साखीळकर तसेच, कंपनीतील कामगार सभासद मोठ्यासंख्येने उपस्थित होते. यावेळी धाटाव एमआयडीसीमधील ‘अंशुल इनोवेटिव्ह’ या कंपनीच्या कामगार सदस्यांचीही लक्षणीय उपस्थिती होती.

मराठी शाळांच्या आंदोलनात, राजन राजे यांचे रोखठोक प्रतिपादन… भैय्ये आणि गुजराथी भांडवलदार यांच्यात, मराठी माणसाचं सॅन्डविच झालंय!

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात, मराठी शाळा बंद करण्याचा सपाटा महाराष्ट्र शासनाने सुरु केला असून, मराठी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्याचे कारण देत, मराठी शाळा बंद करुन, त्याठिकाणची जागा भांडवलदारांच्या घशात घालण्याचा मराठीद्रोही कट रचला जात आहे. याच पार्श्वभूमीवर भ्रष्ट पालिका प्रशासन, भुमाफिया आणि कणाहीन राजकारणी यांच्या अभद्र युतीविरोधात, मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉ. दीपक पवार यांच्या नेतृत्वाखाली, मराठी शाळांसाठी दि. १८ डिसेंबर-२०२५ रोजी, हुतात्मा स्मारक ते मुंबई महानगरपालिका मुख्यालय अशा मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष तथा ज्येष्ठ कामगार-नेते राजन राजे, मुंबई विद्यापिठाचे माजी कुलगुरु भालचंद्र मुणगेकर, मराठी अभिनेत्री चिन्मयी सुमित, कम्युनिष्ट नेते प्रकाश रेड्डी, डाव्या चळवळीतील विचारवंत अजित अभ्यंकर, पत्रकार युवराज मोहिते, पर्यावरणवादी कार्यकर्त्या प्रणाली राऊत, काँग्रेसच्या रोजगार विभागाचे महाराष्ट्र अध्यक्ष धनंजय शिंदे, मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख, महाराष्ट्र संरक्षण संघटनेचे विवेक भुरके आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती. याप्रसंगी मराठी शाळांसाठीच्या या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारुन दडपशाही सुरु केली. याचसंदर्भात प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना राजन राजे म्हणाले, “मराठी शाळांचे हे आंदोलन राजकीय नव्हे; तर, सामाजिक आहे. पोलिसांनी नियम व न्यायालयीन आदेश इतर राजकीय मंडळींनाही दाखवावेत, तेव्हा कुठे पोलिसांची दंडुकेशाही पेंड खायला जाते?” असा थेट प्रश्न उपस्थित करुन ते पुढे म्हणाले, “पोलीस-कर्मचारी जरी मराठी असले; तरी, बहुतांशी आयपीएस-आयएएस अधिकारी हे अमराठी असतात. त्यांच्याच आदेशावर खालचे लोक चालतात. पोलिसांच्या या फक्त काठ्याच नाहीत तर, भैय्यांच्या लाठ्या असून, खालच्या बाजूला परप्रांतीय भैय्ये आणि वरच्या बाजूला गुजराथी भांडवलदार यांच्यात मराठी माणसाचं सॅन्डविच झालेलं आहे… त्याच विरोधातला हा एल्गार आहे, तो रोखण्याचा प्रयत्न कशाला? काही हिंसक घडणार आहे का? असा सवाल विचारुन, रोखठोक प्रतिपादन केलं. दरम्यान, हुतात्मा स्मारक ते मुंबई महापालिका मुख्यालयापर्यंतच्या या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर, काहीवेळ कार्यकर्ते व पोलिसांमध्ये वाद निर्माण झाला. मोर्चा मुंबई महापालिका मुख्यालयाजवळ पोहोचल्यावर, पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेत, आझाद मैदानात आणल्यावर मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. यावेळी सर्व वक्त्यांनी मराठी शाळा वाचविण्यासाठी शेवटपर्यंत एकत्रितपणे संघर्ष करण्याचा निर्धार व्यक्त केला. या मोर्चाला ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष तथा ज्येष्ठ कामगार-नेते राजन राजे यांच्यासह, पक्षाचे प्रवक्ते समीर चव्हाण, सचिव नरेंद्र पंडित, प्रसिद्धीप्रमुख संजय दळवी, पक्षाचे माहिती अधिकार कक्षप्रमुख अनिल महाडिक, अविनाश सावंत, सचिन उगले आदी पदाधिकारी आणि ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे कामगार सदस्य उपस्थित होते.
          

दि. ५ डिसेंबर २०२५, रात्री ११ वाजता : महापरिनिर्वाणदिनाच्या पूर्वसंध्येला बाबासाहेबांना अभिवादन, मा. राजन राजे यांची उपस्थिती

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ७०व्या महापरिनिर्वाणदिनाच्या पूर्वसंध्येला, दि. ५ डिसेंबर-२०२५ रोजी, रात्रौ ११ वाजताच्या सुमारास ठाणे शहरातील पंचगंगा सोसायटी-राबोडी येथील ‘संजीवनी बहुउद्देशीय प्रतिष्ठान’ यांच्या वतीने आणि त्यानंतर कोर्टनाका येथे, आंबेडकरी-नेते सुनील खांबे यांनी आयोजित केलेल्या, महापरिनिर्वाणदिनाच्या कार्यक्रमानिमित्त महामानवास अभिवादन करण्यात आले. या दोन्ही कार्यक्रमांस ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष तथा ज्येष्ठ कामगार-नेते मा. राजन राजे यांनी उपस्थित राहुन, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्रस्मृतींस विनम्र अभिवादन केले. याप्रसंगी पक्षाचे प्रवक्ते समीर चव्हाण उपस्थित होते. यावेळी उपस्थित भीमसैनिकांना संबोधित करताना मा. राजन राजे म्हणाले की, “आजच्या महापरिनिर्वाणदिनी बाबासाहेबांना ‘राज्यघटनेचे शिल्पकार’ या भूमिकेच्या पलीकडे जाऊन, ‘समतेच्या संदेशा’तून ‘सामाजिक व आर्थिक’ न्याय देऊ पहाणारा ‘महामानव’ म्हणून पहाणे अधिक गरजेचं असून, ‘राज्यघटनेचे शिल्पकार’ किंवा ‘दलितांचा मसीहा’ या तुलनात्मकदृष्ट्या काहीशा मर्यादित भूमिकेत त्यांना पहाणं म्हणजे, ‘कोहिनूर हिऱ्या’ला अंगठीत कोंडून टाकण्यासारखे आहे. शिवछत्रपती असोत वा बाबासाहेब असोत, त्यांचा प्रामुख्याने भर, संपूर्ण समाजाचं ‘आर्थिक-उन्नयन’ करण्यावर व तळागाळातील समाजघटकांसाठी, शक्य तेवढं सन्मानजनक जीवनमान निश्चित करण्यावर होता. ‘तलवारधारी’ शिवछत्रपतींपेक्षा, ‘नांगरधारी’ शिवछत्रपती जे, न्याय-समतापूर्ण प्रशासकीय व्यवस्था लावणारे होते. हे जेवढे महात्त्वाचे; तितकेच, ‘राज्यघटना’ हाती घेतलेल्या बाबासाहेबांपेक्षाही, ‘समतेचा संदेश’ देणारे बाबासाहेब जनसामान्यांसाठी अधिक महात्त्वाचे आहेत!” अशा शब्दांत त्यांनी आपल्या परखड भावना व्यक्त केल्या. यावेळी आपल्या भाषणात मा. राजन राजे यांनी, कंत्राटी-कामगार पद्धत व केंद्र सरकारने लागू केलेल्या ‘काळ्या-कामगार संहिते’वर एकच शरसंधान साधून, कामगारद्रोही भाजप सरकार आणि भांडवलधारी प्रस्थापित व्यवस्थेवर सडकून टीका केली. या अभिवादन कार्यक्रमाला पंचगंगा-राबोडी परिसरातील शेकडो आंबेडकरी अनुयायी तसेच, कोर्टनाका येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णकृती पुतळ्याजवळ मोठ्यासंख्येने भीमसैनिक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन आंबेडकरी चळवळीतील नेते सुनील खांबे आणि संदीप खांबे यांनी केले होते.

संविधान दिनी कामगारविरोधी कायद्यांविरुद्ध देशव्यापी आंदोलन; ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’सह विविध संघटनांचे ठाण्यात राष्ट्रपतींना निवेदन

कामगारांच्या हिताचे कायदे रद्दबातल ठरवून, त्याठिकाणी कामगारविरोधी व मालकधार्जिणे चार काळे-कायदे लादून, देशभरातील श्रमिकांना गुलामगिरीत ढकलण्याचं महापातक, केंद्र सरकारकडून घडलेलं असून, त्याचाच निषेध व्यक्त करण्यासाठी ‘संविधान दिना’चे औचित्य साधून, देशभरातील कामगार संघटनांनी, दि. २६ नोव्हेंबर-२०२५ रोजी, संपूर्ण भारतात निदर्शने/आंदोलने केली. त्याच पार्श्वभूमीवर, ‘महाराष्ट्र राज्य कामगार संघटना संयुक्त कृती समिती’च्या वतीने, भारताच्या राष्ट्रपतींना, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून, दि. २६ नोव्हेंबर-२०२५ रोजी, निवेदन देण्यात आले. सदर निवेदन ठाण्याचे अपर-जिल्हाधिकारी श्री. हरिश्चंद्र पाटील यांनी स्विकारले. याप्रसंगी ‘सर्व श्रमिक संघा’चे अध्यक्ष रवी नायर, ‘टीयूसीआय’चे अध्यक्ष रवी जोशी, ‘भारतीय महिला फेडरेशन’च्या कार्याध्यक्षा निर्मला पवार, ‘आयटक’चे कार्याध्यक्ष उदय चौधरी, ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे कार्यालय-प्रमुख संजय दळवी, ‘सीमेन्स वर्कर्स युनियन’चे अध्यक्ष मनोज बोडके, ‘श्रमिक जनता संघा’चे अध्यक्ष जगदीश खैरालिया, ‘ठाणे जिल्हा मध्यवर्ती शासकीय कर्मचारी महासंघा’च्या अध्यक्षा श्रीमती पुजारी, ‘महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी युनियन’चे कार्याध्यक्ष राजेश सिंग आणि ‘राज्य सहकारी मध्यवर्ती संघटने’चे अध्यक्ष भास्कर गवळी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

‘लोकसत्ते’च्या प्रक्षोभक संपादकीयाविरोधात ठाण्यात ‘धर्मराज्य पक्षा’चा धगधगता निषेध

ज्वालामुखी धगधगतो आहे….
‘लोकसत्ते’चे बनावट व प्रक्षोभक संपादकीय, कामगारांनी प्रतिकात्मकरित्या ठाण्यात गोखले रस्त्यावरील ‘लोकसत्ता’ कार्यालयासमोरच जाळले…
कामगारविश्वावर ‘४ काळ्या कामगार-संहितां’चा बुलडोझर फिरवणाऱ्या भाजप-संघीय NDA सरकारचा आणि गिरीश कुबेरांसारख्या, प्रसारमाध्यमातील त्यांच्या मेंदूविक्या ‘बोलक्या बाहुल्यां’चा…’धर्मराज्य पक्षा’तर्फे व कामगारवर्गाकडून ठाण्यात तीव्र निषेध!
—————————-
सोमवार, दि. २४ नोव्हेंबर-२०२५च्या लोकसत्ता-‘संपादकीय लेखाला जाणिवपूर्वक “तळपत्या तलवारीचे म्यान”, असं शीर्षक देत, पद्मश्री कामगार-कवी कै. नारायण सुर्वे यांचा, आपल्या बुद्धीकौशल्याने ‘अवमान’ करणाऱ्या आणि त्या लेखातून “कामगार नेते, हे नेते कमी आणि खंडणीखोर अधिक असेच आहेत”, असं समस्त ‘कामगार-चळवळी’बाबत अपप्रचार करणारं, अत्यंत बेजबाबदार व संतापजनक वक्तव्य करणाऱ्या ‘भांडवली-दलाल’ गिरीश कुबेर यांचा कामगारांकडून लोकसत्तेचे अंक जाळून तीव्र निषेध करण्यात आला!
…तत्पूर्वी, लोकसत्तेसारख्या वृत्तपत्रीय ‘गोदी-मिडीया’ने, ‘अस्पृश्य’ मानलेले…धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष व महाराष्ट्रभरातील संपूर्ण कामगारविश्वात ज्यांचं नाव दीर्घकाळ दुमदुमतंय, असे झुंजार कामगार नेते ‘राजन राजे’ यांनी, ‘लोकसत्ते’च्या हिणकस संपादकियावर संतप्त प्रतिक्रिया नोंदवणारा, एक खरमरीत लेख समाजमाध्यमातून प्रसारीत करत, पत्रकार-जगतातील या दलाली-ढोंगी प्रवृत्तीचा जाहीर निषेध केला होता, ज्याला सगळ्या कामगार जगतातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला! त्यातच, कामगारविश्वातील संतप्त भावनेला सनदशीर मोकळी वाट करुन देणारा, लोकसत्ता-संपादकीय-दहनाचा जाहीर कार्यक्रम ठाण्यात काल, दि. २५ नोव्हेंबर-२०२५ रोजी सायंकाळी पार पडला.
राजन राजे यांच्या खांद्याला खांदा लावून सदर निषेधाच्या कार्यक्रमात…काँग्रेसच्या अर्थविभागाचे प्रमुख व नेते विश्वास उटगी, समतेच्या चळवळीतील एक अग्रणी ॲड. नाना अहिरे, आंबेडकरी चळवळीतील जाज्वल्य विचारवंत-कार्यकर्ते आनंदा ओव्हाळ व धर्मराज्य पक्षाचे उपाध्यक्ष नितीन देशपांडे, धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघाचे सचिव समीर चव्हाण व पदाधिकारी सचिन शेट्टी; तसेच, विविध कंपन्यांतील कामगारांनी हिरिरीने सहभाग घेतला.
“तळागाळातील जनतेला कायम लुबाडणाऱ्या व श्रमिकांच्या रक्तघामाचं ‘वरकड-मूल्य’ ओरपणार्या भांडवलशाहीचे निर्लज्ज समर्थन करत भांडवलदारांच्या चरणांवर आपला मेंदू अर्पण करणाऱ्या व त्या व्यवस्थेचे मोठे ‘लाभार्थी’ असणाऱ्या गिरीश कुबेरांना…खुशाल, राष्ट्रीय संपत्तीच्या निर्मात्याची तळपती तलवार ‘म्यान’ होण्याची स्वप्न पडू द्यात; पण, टोकाच्या अन्याय-अत्याचार-शोषणाने कामगारविश्वातला ज्वालामुखी आतून धगधगतो आहे आणि तो कुठल्याही क्षणी प्रस्फुटीत होण्याचा देशाला मोठा धोका आहे”, असा इशारा देत…राजन राजे यांनी तासाभराच्या आपल्या तडफदार भाषणातून, गिरीश कुबेर बनावट अग्रलेख लिहिल्याबद्दल यांच्यावर अतिशय जळजळीत शब्दात टीका केली. शिवाय, भाषणातून आपल्या भांडवली-हितसंबंधांची जपणूक करणाऱ्या व ‘संपादकीय-हक्का’चा सर्रास गैरवापर करत जनतेची फसवणूक, दिशाभूल करणाऱ्या ‘कुबेरी-प्रवृत्ती’चा मुखवटाही टराटरा फाडला.
ते पुढे म्हणाले की, “४ काळ्या कामगार-संहितांद्वारे कायम नोकऱ्या संपवण्यातून, कामगार-चळवळ साफ कमकुवत करण्यातून…सगळ्या कामगार-कर्मचारीवर्गावर ‘गुलामगिरी’ लादण्याच्या भाजप-संघीय सरकारी-धोरणाचं, ‘आता नव्या कायद्यांतून कामगारांचं चांगभलं होणार’, असं बनावट-विसंवादी ‘कुबेरी’ समर्थन म्हणजे, ‘दहशत-जबरदस्तीने बलात्काराला सामोरं जावं लागणाऱ्या स्त्री संदर्भात, बलात्कार ‘एन्जॉय’ करण्याची संधीच तिला उपलब्ध होतेय’, असं म्हणण्यासारखं, ते एक भयंकर गुन्हेगारी-प्रतिपादन आहे. गिरीश कुबेर, जर कामगार नेत्यांना खंडणीखोर’ म्हणत असतील; तर, त्यांना आव्हान आहे की, अशांना त्यांनी कायद्यासमोर आणून त्यांना कडक शासन करावच; त्यात एखादा जरी डाव्या चळवळीतला पुढारी आढळतो, का ते बघावंच!”
राजन राजे यांनी आपल्या शब्दांच्या अंगारातून लोकभावनेला प्रकट करताना ज्या लोकसत्तेतून नारायण सुर्वेंचा अवमान करण्यात आला, त्याच्या संपादक कुबेरांसह, अवघ्या भांडवल-व्यवस्थेला…पुन्हा एकवार नारायण सुर्वेंचा जाणिवपूर्वक ज्वलंत परिचय व जागर करुन देताना म्हटलं, “कुसुमाग्रज प्रतिष्ठानातर्फे २००४ साली नारायण सुर्वेंना ‘जनस्थान-पुरस्कार’ देताना त्यांच्या गौरवार्थ निवेदकाने जी प्रदीर्घ कविता म्हटली होती, त्यातील चार ओळी आठवतात…आणि, आठवतात ते नारायण सुर्वेंचे पाण्यात बुडून गेलेले डोळे!
‘आठवतं का रे तुला नारायणा, याच हमरस्त्यावर वाळत घातली होतीस तू स्वतःची आतडी कितीकदा…आणि, हिशोब केला होतास, एवढी आतडी पुरतील का, हे जग करकचून बांधायला आणि एकदा बांधल्यावर ते बदलायला’… असा हा, ‘Poet of the Proletariat’ कुठे आणि गिरीश कुबेर नावाचा भांडवली-व्यवस्थेच्या हातातला मिठू मिठू बोलणारा ‘पोपट’ कुठे? अनैतिकरित्या गलेलठ्ठ पगार घेत, भांडवली-व्यवस्थेचे लाभ ‘स्वांतसुखाय’ ओरपणारे, गिरीश कुबेर हे एक भांडवली-दलाल; तर, नारायण सुर्वे म्हणजे, कार्ल मार्क्सच्याच पावलावर पाऊल ठेऊन उन्हापावसात तडफडत, वणवण करत शोषितांचं जग बदलायला निघालेला अवलिया! कविवर्य नारायण सुर्वे यांचे महाराष्ट्राच्या कामगार-चळवळीवर थोर उपकार आहेत…आम्ही ४०-४५ वर्षांपूर्वी त्यांच्याच ‘भाकरीचा चंद्र’, ‘कामगार, एक तळपती तलवार’ वगैरे कविता, बॅनरवर छापून कामगार-चळवळीची मुहूर्तमेढ रोवली होती.”
भाषणाच्या ओघात राजन राजे पुढे गरजले, “आपला ‘EVM-जादुगरी’मधून निवडून आलेला पंतप्रधान, आईबापाशी असलेला आपला जैविक-संबंध नाकारतो आणि स्वतःला ‘नाॅन-बायाॅलाॅजिकल’ घोषित करतो; तर, तिथे मुंबईच्या गिरणगावात कुणी जैविक-आईबापच पोटच्या पोराला नाकारतात आणि एका गिरणीसमोरच्या कचराकुंडीत फेकून देतात… असं ते ‘अनाथ’ पोरं, गंगाराम व काशीबाई नावाचं सुर्वे-दांपत्य
‘सनाथ’ बनवून वाढवतात; पुढे हाच ‘नारायण’, कामगार म्हणून ‘आत्मभान’ जागृत झाल्यावर, एखादा मातीचा घडा फुटावा आणि आतला अंधार मोकळा व्हावा, ‘अवघा प्रकाशू व्हावा’… तसा त्या प्रकाशात भूतकाळाविषयी कुठलाही आकस न बाळगता, कुठलीही तक्रार न करता; आपला भवताल ‘लाल बावटे की जय’ म्हणत, चळवळ आणि साहित्याच्या माध्यमातून बदलायला बाहेर पडतो… जसं अमेरिकेतल्या नवनिर्वाचित डेमोक्रॅटिक-सोशॅलिस्ट महापौर जोहरान ममदानींसाठी एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभापासून युजिन डेब्ज आणि वर्ष-२०१५ पासून बर्नी सँडर्स, ‘डेमाॅक्रसी ॲट वर्क’चे रिचर्ड वोल्फ, अलेक्झांड्रा ओकॅसिओ काॅर्टेझ (AOC) आणि त्यांचा पुरोगामी विचारसरणीचा U.S. House of Representatives मधला सोशालिस्ट-डेमोक्रॅटिक विचारसरणीचा “The Squad” हा गट वगैरेंनी, पार्श्वभूमी तयार करुन ठेवली होती; तशीच, वामनराव दादा कर्डक, शाही अमर शेख, अण्णाभाऊ साठे यांच्याकरवी नारायण सुर्वेंसाठी तयार करुन ठेवली होती; असं म्हटलं तर वावगं ठरु नये…पण, सुर्व्यांचा नारायण, त्यापलिकडे निघून गेला… त्यांच्या काव्यलेखन-शैलीची तुलना जगविख्यात आंग्ल कवी ‘राॅबर्ट फ्राॅस्ट’शी केली जाते. तशीचं संभाषणात्मक, अगदी बोलीभाषेसारखी शैली; पण, थेट भस्सकन आत जाऊन हृदयाचा ठाव घेणारी, कुणाच्या कुठल्या पूर्वपरवानगीविनाच अंतःकरणाला सरळ भिडणारी…म्हणून, मला वाटतं, तेव्हा जर आजच्या सारखं एकनाथ शिंदे, अजित पवार मिळून ‘फडणविशी ट्रिपल-इंजिन’ सरकार महाराष्ट्रात आणि मोदी-शाहांचं रासवट सरकार दिल्लीत असतं; तर, ते ‘पद्मश्री’ वगैरे नागरी-सन्मान मिळणं सोडाच; उलट सरकार-दप्तरी नारायण सुर्वेंचं नाव, ‘शहरी नक्षलवादी’ किंवा ‘अर्बन नक्सलाईट’ म्हणून समाविष्ट झालं असतं. तुकारामांच्या गाथेसारखी ग्रामीण रांगडी काव्यभाषा…तळागाळातील जगण्यातल्या व्यथा-वेदनांचा वेध घेणारी; म्हणून, त्यांचं काव्य तुकारामांच्या गाथेसारखंच अक्षय/अक्षर काव्य ठरलं… म्हणूनच असेल कदाचित, एके प्रसंगी बोलताना, लक्ष लक्ष मराठमोळ्या मनांमध्ये ‘सांस्कृतिक-पूल’ बांधणारे, महाराष्ट्राचे लाडके साहित्यिक पु. ल. देशपांडे म्हणाले होते, ‘अरे, केशवसुत कशाला इकडेतिकडे शोधताय? तुमचा केशवसुत, तिकडे परळमध्ये राहतोय!’
इस्लामिक काळात वर्णव्यवस्थेला छेद देऊन कबीर, सेना न्हावी, सावता माळी, गोरा कुंभार, नामदेव शिंपी आणि तुकाराम वाणी यासारखे बहुजनसमाजातले संत कवी जोरकसपणे पुढे आले खरे… पण, जसं अमेरिकेतही जागतिक-महामंदीच्या पार्श्वभुमीवर आर्थिक-विषमता, बेरोजगारी दूर करणारं व कल्याणकारी-राज्य अथवा welfare state संकल्पना राबवणारं फ्रँकलिन रुझवेल्ट यांचं ‘न्यू-डील’ आलं…मात्र, पुढील काही दशकातच ‘भांडवली-व्यवस्थे’नं पुन्हा उचल खात ‘न्यू डील’ मोडून काढलं. आणि, त्यानंतर, आजतागायत Neoliberalism किंवा नवउदारमतवाद नावाच्या नववसाहतवादाच्या नावाखाली खाजगीकरण, आपल्याकडच्या ‘४ काळ्या कामगार-संहितां’सारखे ‘कामगारविरोधी कायदे’ करुन कामगारवर्गाचं खच्चीकरण व आर्थिक-विषमते’चा नंगानाच, अमेरिका-भारतासह जगभर चालूच ठेवलाय…तशीच, मुस्लिम-राजवटीतील बहुजन-साहित्याच्या सुवर्ण-काळानंतर आपल्याकडच्या वर्चस्ववादी वर्णव्यवस्थेनं पुन्हा उचल खाल्ली आणि ती सगळी साहित्यिक काव्य-व्यवस्था सवर्णांच्या बेड्यात अडकून पडली; ती थेट नारायण सुर्वे यांनी २०व्या शतकाच्या उत्तरार्धात मोकळी करेपर्यंत. त्यांनी फक्त, कृत्रिम रंगांसोबत गिरणीतल्या वस्त्राला आपल्या घामाचाही रंग देणार्या गिरणी-कामगारांचीच व्यथा मांडली नाही; तर, पोटाची खळगी भरण्यासाठी वस्त्रहीन अवस्थेत गिऱ्हाईकाच्या घामाचा रंग आणि गंध, आपल्या देहावर चढवणार्या वेश्यांचाही ‘श्रमिक’ म्हणून वेगळा विचार केला… ‘कामगार’ या नात्याने, वेश्यांचेही प्रश्न सोडवण्याचा व त्यांचा यातनामय प्रवास सुकर करण्याचा प्रयत्न केला होता… कुबेरांच्या गिरीशासारखे सांपत्तिक ‘कुबेरी’ व पत्रकारितेतली ‘सुभेदारी’ उभारण्याच्या स्वार्थकार्यात ते मग्न नव्हते!”
राजन राजेंच्या या घणाघाती भाषणानंतर, लोकसत्ते’चं दि. २४ नोव्हेंबरचं बनावट व प्रक्षोभक संपादकीय, कामगारांनी मिळून ठाण्यातील ‘लोकसत्ता’ कार्यालयासमोरच जाळले…विशेष म्हणजे, या ‘लोकसत्ते’च्या प्रतिकात्मक दहनानंतर गोखले रस्त्यावर पडलेली राख, सुसंस्कृत-नागरिक, या नात्याने सगळ्या कामगारांनी गोळा करुन रस्ता पूर्वीसारखाच स्वच्छ करुन ठेवला!

आगरी-कराडी कामोठे महोत्सवात मा. राजन राजे यांची प्रमुख उपस्थिती

‘कै. बळीराम राघो पावणेकर सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय’ आणि ‘झेंडा सामाजिक संस्था’ यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या “आगरी-कराडी कामोठ्याचा महोत्सव-२०२५” या कार्यक्रमाचे सालाबादप्रमाणे याहीवर्षी, दि. २३ नोव्हेंबर-२०२५ रोजी, कामोठे (ता. पनवेल) येथे मोठ्या जल्लोषात आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला ‘धर्मराज्य पक्षा’चे संस्थापक अध्यक्ष तसेच, ज्येष्ठ कामगार-नेते मा. राजन राजे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपस्थित जनसमुदायला संबोधित करताना मा. राजन राजे यांनी, “आगरी-कोळी-कराडी समाज हा, मुंबई आणि नवी मुंबईसह, संपूर्ण रायगड जिह्याचा मूळ रहिवाशी असून, फक्त आपल्या जिल्ह्याचेच नव्हे; तर, संपूर्ण महाराष्ट्राच्या अस्मितेचे व मराठी-भूमिपुत्रांचे रक्षण करण्याची तुमच्यावर आहे. ‘धर्मराज्य पक्ष’ आणि ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’च्या माध्यमातून आम्ही रक्तपिपासू शोषक-व्यवस्था (Vampire State System) असलेल्या, धनदांडग्या भांडवलदारांविरोधात अविरत संघर्ष करीत आहोतच… तुम्हीही ‘भूमिपुत्र’ म्हणून सावध राहिलेच पाहिजे!” अशा शब्दांत आवाहन करुन, या आगरी-कराडी महोत्सवाच्या, १४व्या वर्षानिमित्त आयोजित केलेल्या सांस्कृतिक-सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले. महोत्सवाच्या या कार्यक्रमाला, ‘धर्मराज्य पक्षा’चे प्रवक्ते श्री. समीर चव्हाण, पक्षाचे माहिती अधिकार ठाणे कक्षप्रमुख श्री. अनिल महाडिक, ‘धर्मराज्य पक्ष’प्रणित ‘स्थानिक भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त रिक्षाचालक-मालक संघटने’चे श्री. महेंद्र म्हात्रे, श्री. राजू म्हात्रे, श्री. आत्माराम म्हसकर, श्री. सदाभाऊ भोईर आणि ‘धर्मराज्य पक्षा’चे पनवेल तालुका अध्यक्ष श्री. गोपीनाथ भगत आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

राजमाता जिजाऊंचे वंशज प्रा. नामदेवराव जाधव यांची राजन राजेंना सदिच्छा भेट

राजमाता जिजाऊ माँसाहेबांचे थेट चौदावे वंशज तसेच, ‘सनय छत्रपती शासन पक्षा’चे संस्थापक/अध्यक्ष प्रा. नामदेवराव जाधव यांनी, ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष तथा ज्येष्ठ कामगार-नेते मा. राजन राजे यांची, दि. २१ नोव्हेंबर-२०२५ रोजी, ‘धर्मराज्य पक्षा’च्या ठाणे कार्यालयात सदिच्छा भेट घेतली. यावेळी मा. राजन राजे यांनी, प्रा. नामदेवराव जाधव यांचे, शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. उल्लेखनीय बाब म्हणजे, संयुक्त महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृतीदिनानिमित्त, ‘धर्मराज्य पक्षा’च्या कार्यालयातील हुतात्मा स्मारकाच्या प्रतिकृतीला मा. राजन राजे व प्रा. नामदेवराव जाधव यांनी पुष्पहार अर्पण करुन, अभिवादन केले. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात, मोराराजी देसाई या मराठीद्वेष्ट्या-महाराष्ट्रद्रोही नरराक्षसाने दि. २१ नोव्हेंबर-१९५६ रोजी, फ्लोरा-फाउंटन (आताचा हुतात्मा चौक) येथे केलेल्या अमानुष गोळीबारात मृत्यूमुखी पडलेल्या, १०६ हुतात्म्यांना यावेळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. दरम्यान, या भेटीत सद्य राजकीय परिस्थिती व मराठी तरुणांच्या सामाजिक प्रश्नांवर दोघांमध्ये सखोल चर्चा झाली. कंत्राटी-कामगारपद्धतीमुळे मराठी तरुण गुलामगिरीत ढकलला गेलेला असून, प्रस्थापित राजकारणी आणि भांडवलशाही व्यवस्थेने, महाराष्ट्राचा मूळ भूमिपुत्र उध्वस्त केला असल्याचे रोखठोक प्रतिपादन मा. राजन राजे यांनी यावेळी केले. यादरम्यान, प्रा. नामदेवराव जाधव यांनी, मा. राजन राजे यांची “एक दुकान, एक मकान” ही संकल्पना उचलून धरत, आपल्या पक्षाच्या माध्यमातून आपणही यासंदर्भात लोकशाहीमार्गाने चळवळ उभी करु, असे आश्वस्त केले. ‘धर्मराज्य पक्ष’ आणि ‘सनय छत्रपती शासन पक्ष’ या दोन्ही पक्षांची विचारसरणी ही, मराठी माणसाच्या अस्तित्वाशी निगडित असल्याने, भविष्यात ‘मराठी-माणूस’ व ‘महाराष्ट्रधर्मा’साठी आपण नक्कीच एकत्र येऊ, असे आवाहन प्रा. नामदेवराव जाधव यांनी करताच, “जोपर्यंत तुमच्या हातून सत्कर्म घडतंय, तोपर्यंत आम्ही तुमच्या सोबत असू… कारण, मी व्यक्तीच्या नव्हे; तर, प्रवृत्तीच्या प्रेमात पडणारा माणूस आहे!” अशी आपली थेट भूमिका मा. राजन राजे यांनी स्पष्टपणे बोलून दाखवली. याप्रसंगी प्रा. नामदेवराव जाधव यांनी लिहिलेली, “शिवाजी द मॅनेजमेंट गुरु” (भाग-२), “जिजाऊ द मदर ऑफ ऑल गुरुज्” आणि “सनय” ही तीन पुस्तके, मा. राजन राजे यांना सप्रेम भेट दिली. या सदिच्छा भेटीवेळी ‘धर्मराज्य पक्षा’चे सचिव श्री. नरेंद्र पंडित, प्रवक्ते श्री. समीर चव्हाण, ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे महासचिव श्री. महेशसिंग ठाकूर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!