“अंधश्रद्धा स्वतःच एक ‘व्यवस्था’ असते; जी आतून मुठभरांच्या वर्चस्वाला चांगलीच आधारभूत होत रहाते… आणि, आजच्या भांडवली-व्यवस्थेत अशा अनेक अंधश्रद्धांना, ‘व्यवस्था’ चालवणारे जाणिवपूर्वक, याच कारणामुळे पुढावा देत असतात. म्हणूनच तर, आपल्या महाराष्ट्रात, दिवसागणिक खोल गर्तेत जात चाललेल्या मराठी-माणसाला, विविध धर्मसंप्रदायात व्यवस्थेकरवी कौशल्याने अडकवलं जातं. परिणामी, धार्मिक अंधश्रद्धा, जेवढं समाजाचं नुकसान करतात; त्याच्यापेक्षा कैकपटीने अधिक ‘राजकीय-अंधश्रद्धा’ समाजाचं नुकसान करतात!” असे रोखठोक भाष्य ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष आणि ज्येष्ठ कामगारनेते, तथा राजकीय व सामाजिक विचारवंत राजन राजे यांनी नुकतेच ठाण्यात केले. ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’च्या राज्य कार्याध्यक्षपदी संजय बनसोडे यांची नियुक्ती झाल्याबद्दल, समितीच्या ठाणे शहर शाखा आणि ठाण्यातील सर्व परिवर्तनवादी संघटनांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या, नागरी सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी, उपस्थितांना संबोधित करताना, राजन राजे पुढे म्हणाले की, “कुणी बुलंद आवाजात भाषणं ठोकत, आपलं प्रतिनिधित्व करणारा अमकातमका राजकीय पुढारी (जो कधि ‘जाणता राजा’ म्हणून मिरवत असतो; तर, कधि कुठलं ‘सम्राटपद’ भूषवत असतो), आपल्या समाजाचं पुनरुत्थान करेल, आपल्यावर चारही बाजुंनी होत असलेला अन्याय दूर करेल, अशी थेट ‘अवतार-संकल्पने’ला जाऊन भिडणारी आपली अंधश्रद्धा असते; जेव्हा, तो नेता बोलत एक असतो आणि करत वेगळंच असतो… तो व्यवस्थेचा लाभार्थी तर असतोच; पण, व्यवस्थेच्या बळकट पाठिंब्यावरच त्याचं ‘नेतेपद’ अवलंबून असल्यामुळे, ही ‘राजकीय-नौटंकी’ तो तहहयात करत रहतो आणि लोकं त्या ‘राजकीय-अंधश्रद्धे’ला बळी पडत रहातात. उदाहरणच द्यायचं झालं तर, ‘कंत्राटी-कामगार पद्धती’चं निर्मूलन व ‘किमान-वेतन’ सन्मानजनक झाल्याखेरीज, उत्तरेचं नोकरपेशातलं आक्रमण थोपवल्याखेरीज आणि शहरं-उपनगरांतून प्रत्येक प्रौढ व्यक्तिमागे “एक दुकान, एक मकान” धोरण राबवून धनदांडग्या गुजराथी-भाषिक भांडवलदारवर्गाला रोखल्याखेरीज… ‘मराठी-माणसां’चं (जे महागड्या शहरांमधून निवासाची व व्यवसायाची संधि उपलब्ध नसल्यामुळे, बहुतांश दूरवर रहाणारे कामगार आहेत) भलं होणं शक्यच नाही, हे एखादं गल्लीतलं शेबडं पोरं पण जाणतं…पण, मी मी म्हणणारा कुठलाही मराठी-नेता (ज्यांच्याविषयी मराठी भाबडी जनता ‘राजकीय-अंधश्रद्धा’ बाळगून असते), असल्या व्यवस्थेच्या गाभ्यातील अथवा ‘मराठी-जगण्या’च्या आसाला भिडलेल्या मुद्द्यांवर चुकूनही काम करणं तर सोडाच; साधा उच्चारही करताना दिसणार नाहीत. तेव्हा, या राजकीय-अंधश्रद्धांना जोवर आपण मराठी-माणसं ‘मूठमाती’ देत नाही व स्वतःला सक्षम बनवत नाही, तोवर मराठी-माणसांचं पिढ्यानपिढ्या नुकसान होतच रहाणार आहे, मराठी-माणसं गुलामीत ढकलली जातच रहाणार आहेत… मराठी-माणसानं स्वतःला सक्षम बनवणं म्हणजे, “व्यक्ति आधारित कमी आणि धोरण आधारित जास्त राजकारण करणं!” अशा परखड शब्दांत आपलं मनोगत व्यक्त केलं. यावेळी व्यसपीठावर, प्रमुख पाहुणे म्हणून ‘एनपीएम’चे राष्ट्रीय संयोजक डॉ. संजय मं.गो., ‘यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान’चे विश्वस्त दत्ता बाळसराफ, प्रा. मच्छिंद्र मुंडे उपस्थित होते. दरम्यान, समितीच्या ठाणे शहर शाखेचे कार्याध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार अनिल ठाणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ‘अंनिस’च्या केंद्रीय सदस्या सुशीला मुंडे यांनी केले. याप्रसंगी ‘धर्मराज्य पक्षा’चे संजय दळवी, अनिल महाडिक, नरेंद्र शिंदे, रामसकल भर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
