Month: March 2025

हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेटच्या विरोधात, ‘धर्मराज्य पक्षा’ची ठाणे आरटीओ कार्यालयाबाहेर निदर्शने!

केंद्र सरकारच्या आदेशानुसार, महाराष्ट्र शासनाने राज्यातील वर्ष-२०१९ पूर्वी खरेदी केलेल्या जुन्या वाहनांना, अत्याधुनिक अशी उच्च सुरक्षा असणारी, हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट (HSRP) दि. ३० एप्रिल-२०२५ रोजीपर्यंत बसविणे अनिवार्य केलेले आहे. त्यासाठी राज्य सरकारकडून तीन कंपन्यांना वाढीव दराने टेंडर्स देण्यात आलेली आहेत. मात्र, भारतातील इतर राज्यातील दर आणि महाराष्ट्रातील दर यामध्ये फार मोठी तफावत असल्याचे आढळून आलेले आहे. यातून वाहनधारक नागरिकांची फार मोठी लूट होऊन, त्यांची आर्थिक फसवणूक होऊ घातलेली आहे. याचाच निषेध करण्यासाठी ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने, दि. ६ मार्च-२०२५ रोजी, आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारच्या सुचनेनुसार, महाराष्ट्र शासनाने जारी केलेले दर हे दुचाकीकरीता, ४५०रु. तर, चारचाकी वाहनांकरीता ७४५रु. इतके आहेत. परंतु, शेजारच्या गोवा आणि गुजरात राज्यात मात्र, अनुक्रमे दुचाकीकरीता, १५५रु. आणि ३००रु. तर, चारचाकी वाहनांकरीता, २०३रु. आणि ४६०रु. इतके ठेवण्यात आलेले आहेत. दरम्यान, संपूर्ण भारतातील राज्यांच्या तुलनेत, महाराष्ट्र राज्य हे, करांच्या माध्यमातून, सर्वात जास्त निधी, केंद्र शासनाच्या तिजोरीत जमा करीत असतानादेखील, महाराष्ट्रातील वाहनधारक नागरिकांना मात्र, हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन (HSRP) नंबरप्लेटच्या माध्यमातून आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार असल्याने, ‘धर्मराज्य पक्षा’ने तीव्र शब्दांत आपला निषेध व्यक्त केला आहे. शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या दरपत्रकानुसार, भारतातील इतर राज्यांना झुकते माप देऊन, महाराष्ट्र राज्यातील नागरिकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचाच हा प्रकार असून, याबाबत ‘धर्मराज्य पक्षा’च्या भावना अतिशय तीव्र असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. याचसंदर्भात, ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने, प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या उपायुक्तांना यावेळी निवेदन देण्यात येऊन, हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन (HSRP) नंबरप्लेटच्या वाढीव आणि अन्यायकारक दरपत्रकाचा लोकशाही व सनदशीरमार्गाने निषेध व्यक्त केलेला असून, आपण आमच्या भावना, महाराष्ट्र शासनापर्यंत पोहोचवाव्यात अशी विनंती ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने, प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या उपायुक्तांना निवेदनामार्फत करण्यात आली. यावेळी पक्षाचे सहसचिव नरेंद्र पंडित, ठाणे लोकसभा उपाध्यक्ष महेशसिंग ठाकूर, प्रवक्ते समीर चव्हाण, प्रसिद्धीप्रमुख संजय दळवी, कार्यालय-प्रमुख सोपान चौधरी, ‘धर्मराज्य रिक्षा-टॅक्सी संघटने’चे रमेश रेड्डी, सुशीलकुमार चंद्रा, रवी मिश्रा आदी पदाधिकाऱ्यांसह, ‘धर्मराज्य पक्षा’चे कार्यकर्ते मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
https://www.facebook.com/share/v/14LnKAAuq5/

रायगड जिल्ह्यात ‘धर्मराज्य पक्षा’चा अश्वमेध उधळला… रोह्यातील डीआरटी अँथिया कंपनीत, राजन राजेंच्या ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’ची स्थापना

“भारतातील पहिलावहिला पर्यावरणवादी हरित-पक्ष” अशी सर्वमान्य ओळख असणाऱ्या ‘धर्मराज्य पक्षा’चा अश्वमेध आता, शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि हिंदवी-स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड जिल्ह्यात उधळला असून, रोहा तालुक्यातील धाटाव एमआयडीसीमधील डीआरटी अँथिया अरोमा केमिकल्स प्रा. लि. या कंपनीतील सर्वच्या सर्व कामगारांनी कामगार हृदयसम्राट मा. राजन राजे यांच्या अध्यक्षतेखालील ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे सदस्यत्व स्विकारले आहे. यासंदर्भात, कंपनीच्या युनिट-१ आणि युनिट-२ या दोन्ही ठिकाणच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ युनियनच्या नामफलकाचे अनावरण शनिवार, दि. १ मार्च-२०२५ रोजी, मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाले. यावेळी डीआरटी अँथिया कंपनीतील सर्व कामगार सदस्यांसोबत, व्यवस्थापनाचे आशिष दगडे आणि व्ही.पी. जोजी हे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे महासचिव महेशसिंग ठाकूर, सचिव समीर चव्हाण, खजिनदार अजित सावंत, ‘धर्मराज्य पक्षा’चे सहसचिव नरेंद्र पंडित, ऐरोली विधानसभा सचिव सिद्धेश सावंत-भोसले आदी मान्यवर पदधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, युनियनच्या नामफलकांचे अनावरण झाल्यानंतर, ‘आर.आय.आर.सी’ सभागृहात संपन्न झालेल्या कामगार मार्गदर्शन मेळाव्यात, उपस्थित कामगार सदस्यांना संबोधित करताना मा. राजन राजे म्हणाले की, “सद्यस्थितीत सर्वात जास्त शोषण कोण करीत असेल आणि कॉर्पोरेट टेरिरीझम कोण माजवत असेल तर, त्या आहेत बहुराष्ट्रीय कंपन्या. कामगार चळवळीचं सामर्थ्य कधीच लयाला गेलंय, कारण आम्ही आपापसांत हेवेदावे मांडायला लागलो आहोत. संघटना चांगली चालायला लागली की, त्यात मोडता घालायचा, आम्ही आमच्याच हिताबद्दल उदासीन रहायला लागलो. मराठी माणूस हा, ८० ते ९० टक्के कामगार-शेतकरी असतो. मात्र, सरकारच्या ‘खाउजा’ धोरणामुळेच कामगार आणि शेतकरी एकाचवेळी उध्वस्त झालेत. कामगार निवृत्त झाल्यानंतर अक्षरशः उघड्यावर पडतो. म्हणून मी नेहमी म्हणतो, तुम्ही स्वतःला संघर्षात गुंतवलं नाहीत तर, म्हातारपणी तुम्हाला लाचारीचा सामना करावा लागेल!” असा इशारा देत, मा. राजन राजे उपस्थित कामगारांना संबोधित करताना पुढे म्हणाले की, तुमच्या रोह्याने १५ वर्षे आणि ठाण्याने २५ वर्षे वाया घालवली. एव्हाना शेकड्याने नव्हे; तर, हजारो कंपन्यांमध्ये आपण पसरायला हवं होतं. आहे का कोणी, या राजन राजेसारखा जातीवंत आणि जाज्ज्वल्य विचारांचा कामगार नेता? असा सवालदेखील त्यांनी यावेळी उपस्थित केला.
“संपूर्ण जगात ‘कामगार-पुढारी’ ही महत्त्वाची व्यक्ती मानली जाते व तेच प्रामुख्याने राजकारण चालवतात…आणि इथे सच्च्या कामगार पुढार्यांना राजकारणात काळ कुत्र देखील विचारत नाही…भक्कम आधारसाठी राजकीय आधारवड नसेल; तर, कामगार-चळवळीची लतावेल जमिनीवरच खुरडून, तुडवली जाऊन उध्वस्त होईल. हे समजत नाही म्हणूनच दुर्दैवाने आज मराठी माणसाची अवस्था अतिशय बिकट झालीय…मराठी माणसाइतका मूर्ख माणूस आज जगाच्या पाठीवर शोधूनही सापडणार नाही. एवढे महान संत, शिवछत्रपती-बाबासाहेब आंबेडकरांसारखे महापुरुष आमच्या महाराष्ट्रात होऊन गेले; तरी आमच्या जगण्यात, आमच्या आचारविचारात ते उतरत नाहीत. फक्त, “जय शिवाजी, जय भीम” म्हटलं की, आमची जबाबदारी संपली! शिवछत्रपती म्हणजे, “केवळ तलवारबाजी नव्हे; तर, उच्चकोटीच्या जीवनमुल्यांसाठी लावलेली प्राणांची बाजी” होय. पण, आम्ही कसली प्राणांची बाजी लावणार? छत्रपती शिवाजी महाराज यासाठी महत्त्वाचे आहेत की, त्यांनी रयतेच्या आयुष्यात स्थैर्य आणि सन्मान निर्माण केला…भूहिनांना कसायला हक्काचे जमिनीचे पट्टे दिले; म्हणजे, आजच्या परिभाषेत *”कंत्राटी-कामगारांना कायम केलं” आणि तुमच्याकडचे कारखाने, इथल्या राजकारण्यांच्या आशिर्वादाने कंत्राटी-कामगार नावाच्या गुलामांच्या घामावरच मोठ्याप्रमाणावर चालतात. शिवबा-संतांचं हिंदुत्व जाज्वल्य होतं आणि आताचं सगळंच बोगस-ढोंगी हिंदुत्व! राममंदिर बांधून झालंय, नुकताच दंभमेळा संपन्न झाला, हा कसला कुंभमेळा? ती तर, मतं मिळविण्यासाठी व देशाचा घसरलेला रुपया आणि कोसळलेला शेअरबाजार लपविण्यासाठी चाललेली केविलवाणी धडपडच. ठाण्यातील आले; तसेच काही नव्याने प्रदूषणकारी रासायनिक-कारखाने तुमच्या रोह्यामध्ये आलेत आणि त्यामुळे तुमच्यासकट तुमच्या पुढील पिढ्या कर्करोगासारख्या (कॅन्सर) अनेक दुर्धर रोगांनी पिडीत होऊन ‘अल्पजिवी’ ठरणार आहेत…त्या तिथे फार मोठी गरज असताना उच्चदर्जाच्या सार्वजनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहेत का? दिल्लीसारख्या उत्तम सार्वजनिक शाळांचा तर पत्ताच नाही! शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला भाव आहे का? तुमच्याकडे आहे तरी काय, तुमच्याकडे कंपनीचं भागभांडवल तरी आहे का? निवृत्तीनंतर तुटपुंज्या ग्रॅच्युइटी आणि प्राॅ. फंडामुळे अक्षरशः उघड्यावर पडाल!” असा गर्भित इशारा ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष मा. राजन राजे यांनी उपस्थित कामगारांना शेवटी दिला.
error: Content is protected !!