Day: March 1, 2025

रायगड जिल्ह्यात ‘धर्मराज्य पक्षा’चा अश्वमेध उधळला… रोह्यातील डीआरटी अँथिया कंपनीत, राजन राजेंच्या ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’ची स्थापना

“भारतातील पहिलावहिला पर्यावरणवादी हरित-पक्ष” अशी सर्वमान्य ओळख असणाऱ्या ‘धर्मराज्य पक्षा’चा अश्वमेध आता, शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि हिंदवी-स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड जिल्ह्यात उधळला असून, रोहा तालुक्यातील धाटाव एमआयडीसीमधील डीआरटी अँथिया अरोमा केमिकल्स प्रा. लि. या कंपनीतील सर्वच्या सर्व कामगारांनी कामगार हृदयसम्राट मा. राजन राजे यांच्या अध्यक्षतेखालील ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे सदस्यत्व स्विकारले आहे. यासंदर्भात, कंपनीच्या युनिट-१ आणि युनिट-२ या दोन्ही ठिकाणच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ युनियनच्या नामफलकाचे अनावरण शनिवार, दि. १ मार्च-२०२५ रोजी, मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाले. यावेळी डीआरटी अँथिया कंपनीतील सर्व कामगार सदस्यांसोबत, व्यवस्थापनाचे आशिष दगडे आणि व्ही.पी. जोजी हे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे महासचिव महेशसिंग ठाकूर, सचिव समीर चव्हाण, खजिनदार अजित सावंत, ‘धर्मराज्य पक्षा’चे सहसचिव नरेंद्र पंडित, ऐरोली विधानसभा सचिव सिद्धेश सावंत-भोसले आदी मान्यवर पदधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, युनियनच्या नामफलकांचे अनावरण झाल्यानंतर, ‘आर.आय.आर.सी’ सभागृहात संपन्न झालेल्या कामगार मार्गदर्शन मेळाव्यात, उपस्थित कामगार सदस्यांना संबोधित करताना मा. राजन राजे म्हणाले की, “सद्यस्थितीत सर्वात जास्त शोषण कोण करीत असेल आणि कॉर्पोरेट टेरिरीझम कोण माजवत असेल तर, त्या आहेत बहुराष्ट्रीय कंपन्या. कामगार चळवळीचं सामर्थ्य कधीच लयाला गेलंय, कारण आम्ही आपापसांत हेवेदावे मांडायला लागलो आहोत. संघटना चांगली चालायला लागली की, त्यात मोडता घालायचा, आम्ही आमच्याच हिताबद्दल उदासीन रहायला लागलो. मराठी माणूस हा, ८० ते ९० टक्के कामगार-शेतकरी असतो. मात्र, सरकारच्या ‘खाउजा’ धोरणामुळेच कामगार आणि शेतकरी एकाचवेळी उध्वस्त झालेत. कामगार निवृत्त झाल्यानंतर अक्षरशः उघड्यावर पडतो. म्हणून मी नेहमी म्हणतो, तुम्ही स्वतःला संघर्षात गुंतवलं नाहीत तर, म्हातारपणी तुम्हाला लाचारीचा सामना करावा लागेल!” असा इशारा देत, मा. राजन राजे उपस्थित कामगारांना संबोधित करताना पुढे म्हणाले की, तुमच्या रोह्याने १५ वर्षे आणि ठाण्याने २५ वर्षे वाया घालवली. एव्हाना शेकड्याने नव्हे; तर, हजारो कंपन्यांमध्ये आपण पसरायला हवं होतं. आहे का कोणी, या राजन राजेसारखा जातीवंत आणि जाज्ज्वल्य विचारांचा कामगार नेता? असा सवालदेखील त्यांनी यावेळी उपस्थित केला.
“संपूर्ण जगात ‘कामगार-पुढारी’ ही महत्त्वाची व्यक्ती मानली जाते व तेच प्रामुख्याने राजकारण चालवतात…आणि इथे सच्च्या कामगार पुढार्यांना राजकारणात काळ कुत्र देखील विचारत नाही…भक्कम आधारसाठी राजकीय आधारवड नसेल; तर, कामगार-चळवळीची लतावेल जमिनीवरच खुरडून, तुडवली जाऊन उध्वस्त होईल. हे समजत नाही म्हणूनच दुर्दैवाने आज मराठी माणसाची अवस्था अतिशय बिकट झालीय…मराठी माणसाइतका मूर्ख माणूस आज जगाच्या पाठीवर शोधूनही सापडणार नाही. एवढे महान संत, शिवछत्रपती-बाबासाहेब आंबेडकरांसारखे महापुरुष आमच्या महाराष्ट्रात होऊन गेले; तरी आमच्या जगण्यात, आमच्या आचारविचारात ते उतरत नाहीत. फक्त, “जय शिवाजी, जय भीम” म्हटलं की, आमची जबाबदारी संपली! शिवछत्रपती म्हणजे, “केवळ तलवारबाजी नव्हे; तर, उच्चकोटीच्या जीवनमुल्यांसाठी लावलेली प्राणांची बाजी” होय. पण, आम्ही कसली प्राणांची बाजी लावणार? छत्रपती शिवाजी महाराज यासाठी महत्त्वाचे आहेत की, त्यांनी रयतेच्या आयुष्यात स्थैर्य आणि सन्मान निर्माण केला…भूहिनांना कसायला हक्काचे जमिनीचे पट्टे दिले; म्हणजे, आजच्या परिभाषेत *”कंत्राटी-कामगारांना कायम केलं” आणि तुमच्याकडचे कारखाने, इथल्या राजकारण्यांच्या आशिर्वादाने कंत्राटी-कामगार नावाच्या गुलामांच्या घामावरच मोठ्याप्रमाणावर चालतात. शिवबा-संतांचं हिंदुत्व जाज्वल्य होतं आणि आताचं सगळंच बोगस-ढोंगी हिंदुत्व! राममंदिर बांधून झालंय, नुकताच दंभमेळा संपन्न झाला, हा कसला कुंभमेळा? ती तर, मतं मिळविण्यासाठी व देशाचा घसरलेला रुपया आणि कोसळलेला शेअरबाजार लपविण्यासाठी चाललेली केविलवाणी धडपडच. ठाण्यातील आले; तसेच काही नव्याने प्रदूषणकारी रासायनिक-कारखाने तुमच्या रोह्यामध्ये आलेत आणि त्यामुळे तुमच्यासकट तुमच्या पुढील पिढ्या कर्करोगासारख्या (कॅन्सर) अनेक दुर्धर रोगांनी पिडीत होऊन ‘अल्पजिवी’ ठरणार आहेत…त्या तिथे फार मोठी गरज असताना उच्चदर्जाच्या सार्वजनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहेत का? दिल्लीसारख्या उत्तम सार्वजनिक शाळांचा तर पत्ताच नाही! शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला भाव आहे का? तुमच्याकडे आहे तरी काय, तुमच्याकडे कंपनीचं भागभांडवल तरी आहे का? निवृत्तीनंतर तुटपुंज्या ग्रॅच्युइटी आणि प्राॅ. फंडामुळे अक्षरशः उघड्यावर पडाल!” असा गर्भित इशारा ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष मा. राजन राजे यांनी उपस्थित कामगारांना शेवटी दिला.
error: Content is protected !!