‘कै. बळीराम राघो पावणेकर सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय’ आणि ‘झेंडा सामाजिक संस्था’ यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या “आगरी-कराडी कामोठ्याचा महोत्सव-२०२५” या कार्यक्रमाचे सालाबादप्रमाणे याहीवर्षी, दि. २३ नोव्हेंबर-२०२५ रोजी, कामोठे (ता. पनवेल) येथे मोठ्या जल्लोषात आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला ‘धर्मराज्य पक्षा’चे संस्थापक अध्यक्ष तसेच, ज्येष्ठ कामगार-नेते मा. राजन राजे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपस्थित जनसमुदायला संबोधित करताना मा. राजन राजे यांनी, “आगरी-कोळी-कराडी समाज हा, मुंबई आणि नवी मुंबईसह, संपूर्ण रायगड जिह्याचा मूळ रहिवाशी असून, फक्त आपल्या जिल्ह्याचेच नव्हे; तर, संपूर्ण महाराष्ट्राच्या अस्मितेचे व मराठी-भूमिपुत्रांचे रक्षण करण्याची तुमच्यावर आहे. ‘धर्मराज्य पक्ष’ आणि ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’च्या माध्यमातून आम्ही रक्तपिपासू शोषक-व्यवस्था (Vampire State System) असलेल्या, धनदांडग्या भांडवलदारांविरोधात अविरत संघर्ष करीत आहोतच… तुम्हीही ‘भूमिपुत्र’ म्हणून सावध राहिलेच पाहिजे!” अशा शब्दांत आवाहन करुन, या आगरी-कराडी महोत्सवाच्या, १४व्या वर्षानिमित्त आयोजित केलेल्या सांस्कृतिक-सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले. महोत्सवाच्या या कार्यक्रमाला, ‘धर्मराज्य पक्षा’चे प्रवक्ते श्री. समीर चव्हाण, पक्षाचे माहिती अधिकार ठाणे कक्षप्रमुख श्री. अनिल महाडिक, ‘धर्मराज्य पक्ष’प्रणित ‘स्थानिक भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त रिक्षाचालक-मालक संघटने’चे श्री. महेंद्र म्हात्रे, श्री. राजू म्हात्रे, श्री. आत्माराम म्हसकर, श्री. सदाभाऊ भोईर आणि ‘धर्मराज्य पक्षा’चे पनवेल तालुका अध्यक्ष श्री. गोपीनाथ भगत आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
