‘धर्मराज्य पक्ष’तर्फे ठाण्यात ‘४ काळ्या कामगार-संहितां’विरोधात भव्य आक्रोश मोर्चा; मान्यवरांची उपस्थिती

आंतरराष्ट्रीय कामगार दिन व महाराष्ट्र दिनानिमित्त ‘धर्मराज्य पक्ष’ व ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघ’ यांच्या वतीने ठाण्यात ‘राष्ट्रीय संपत्ती-निर्मात्या’ कामगारांचा भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला. सायं. ४.३० वाजता सुरू झालेल्या या मोर्चात विविध औद्योगिक क्षेत्रांतील कामगार, कर्मचारी, पदाधिकारी व ठाणेकर जनता मोठ्या संख्येने सहभागी झाली होती.
केंद्र सरकारने लागू केलेल्या ‘४ काळ्या कामगार-संहितां’विरोधात हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. या संहितांमुळे कामगारांचे मूलभूत हक्क धोक्यात येऊन शोषण, असुरक्षितता व कंत्राटीकरण वाढणार असल्याची वस्तुस्थितीवर यावेळी जनतेसमोर मांडण्यात आली. कामगार संघटनांची ताकद कमी करणे, नोकरीतील स्थैर्य नष्ट करुन ‘‘Hire & Fire’’ धोरणाला चालना देणे, अशा विविध मुद्द्यांवर तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.
मोर्चादरम्यान कामगारांनी घोषणाबाजी करत आपल्या मागण्या प्रखरपमे मांडल्या. ‘४ कामगार संहितां’ची तत्काळ रद्दबातल करावी, कामगारांचे हक्क अबाधित ठेवावेत; तसेच, कंत्राटी-कामगार पद्धतीचं निर्मूलन करावे, अशा प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या.
या मोर्चात विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती लाभली, त्यामध्ये ॲड. विजय कुर्ले, ॲड. नाना अहिरे, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष (ग्रामीण) चेतनसिंह पवार, काँग्रेस ठाणे जिल्हा पदाधिकारी राहुल पिंगळे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ज्येष्ठ नेत्या वंदनाताई शिंदे व कॉ. उदय चौधरी, आनंदा होवाळ यांचा समावेश होता.
त्याचप्रमाणे या मोर्चात धर्मराज्य कामगार कर्मचारी महासंघ महासचिव महेशसिंग ठाकूर, उपाध्यक्ष रमाकांत नेवरेकर, सचिव समीर चव्हाण, धर्मराज्य पक्षाचे सचिव नरेंद्र पंडित, ठाणे लोकसभा अध्यक्ष राजेश गडकर, उपाध्यक्ष सचिन शेट्टी, पोर्णिमा सातपुते, जगन्नाथ सलगर आदी पदाधिकारी व इतर कार्यकर्ते तसेच कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे यांनी कामगारांच्या एकजुटीचे महत्त्व अधोरेखित करत, ‘४ काळ्या कामगार-संहितां’मुळे जसा आपत्कालीन अवस्थेत विमानाचा वैमानिक, ‘मे डे’ (May Day) असा वाचविण्यासाठी संदेश (SOS) पाठवतो; तशीच अवस्था ‘कामगारां’ची झालीय…पण, लक्षात कोण घेतो? कामगार-चळवळ संपवून कामगारांना कंत्राटी-कामगार किंवा ‘मुदतबंद-कामगार’ (FTE…Fixed Term Employee) या नात्याने ‘गुलाम’ बनवणं सुरु आहे…
म्हणूनच यासारखे लढे, कामगारांच्या हक्कांसाठी निर्णायक ठरणार असल्याने, महाराष्ट्रातील सर्व कामगारांनी ‘धर्मराज्य पक्षा’च्या झेंड्याखाली एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले.
मोर्चा अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला व भविष्यातही या प्रश्नावर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा धर्मराज्य पक्षाने दिला आहे.
No comments
Leave Your Comment

error: Content is protected !!