‘धर्मराज्य पक्ष’तर्फे ठाणे मनपाच्या प्रस्तावित करवाढीविरोधात शांततामय आंदोलन; लेखापरीक्षण अहवाल, नियोजनबद्ध वाहनतळाची मागणी; ‘ठाणे क्लस्टर विकास कंपनी’च्या प्रस्तावावरही सवाल!

ठाणे महानगरपालिकेच्या प्रस्तावित मालमत्ता कर व मालमत्ता हस्तांतरण शुल्कवाढीविरोधात तसेच सन २०२४-२५ व २०२५-२६ चे लेखापरीक्षण अहवाल जाहीर करावेत, थकीत महसुलाची प्रभावी व कालबद्ध वसुली करावी, विकास आराखड्यातील वाहनतळासाठी सुविधा भूखंडांचा वापर करून नियोजनबद्ध वाहनतळ निर्माण करावेत आणि रस्त्यावरील धोकादायक पार्किंगसंदर्भातील ठराव रद्द करावा, या मागण्यांसाठी ‘धर्मराज्य पक्षातर्फे’ सोमवार, दि. १७ ऑगस्ट रोजी ठाणे महानगरपालिकेच्या महासभेच्या दिवशी परमार्थ निकेतनजवळ शांततामय आंदोलन करण्यात आले.
महानगरपालिकेने सन २०२६-२७ चा अर्थसंकल्प सादर करताना करवाढ न करता GIS तंत्रज्ञानाद्वारे मालमत्ता शोधून महसूल वाढविण्याची भूमिका मांडली होती. मात्र, त्यानंतर मालमत्ता करासह हस्तांतरण शुल्कवाढीचा प्रस्ताव पुढे आल्याने आधी थकीत महसूल वसूल करा, महसूल गळती रोखा आणि त्यानंतरच करवाढीचा विचार करा, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली. “करवाढ नको, न्याय हवा! आर्थिक बोजा नको, पारदर्शक कारभार हवा! टॅक्स आमचा, पैसा आमचा! हिशोबही आम्हालाच हवा!” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
यावेळी सन २०२४-२५ व २०२५-२६ चे लेखापरीक्षण अहवाल तातडीने जाहीर करून अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करावेत, तसेच महसूल थकबाकीची अद्ययावत, अधिकृत व विभागनिहाय आकडेवारी जाहीर करावी, अशी मागणी करण्यात आली. “थकबाकी वसूल करण्याची हिंमत दाखवा; करवाढीचा सोपा मार्ग सोडा!” असा इशाराही देण्यात आला.
ठाणे शहरातील वाढती वाहनसंख्या आणि अपुऱ्या पार्किंग सुविधांमुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी व नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेता, विकास आराखड्यातील वाहनतळासाठी आरक्षित/निर्धारित सुविधा भूखंडांवर बहुमजली व नियोजनबद्ध वाहनतळ उभारावेत आणि रस्त्यावरील धोकादायक पार्किंगला प्रोत्साहन देणारा ठराव रद्द करावा, अशी मागणी करण्यात आली.
‘ठाणे क्लस्टर विकास कंपनी’च्या प्रस्तावावर सवाल
किसन नगर परिसरातील क्लस्टर-प्रकल्पाच्या कामकाजाच्या पार्श्वभूमीवर ‘ठामपा’च्या नियंत्रणाखाली ‘ठाणे क्लस्टर विकास कंपनी’ स्थापन करून त्यासाठी महासभेची मंजुरी घेण्याच्या घाईमागे नेमके कोणाचे हित आहे?, असा सवाल धर्मराज्य पक्षाने उपस्थित केला.
ठाणे शहरात पाणी, वीज, मलनि:स्सारण, अग्निसुरक्षा, आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, सार्वजनिक वाहतूक व पार्किंग यांसारख्या मूलभूत सुविधांची कमतरता असताना, वाढत्या बांधकामामुळे शहरावर आणखी भार टाकण्यापूर्वी या कंपनीच्या माध्यमातून एकूण किती चटईक्षेत्राचे क्लस्टर प्रकल्प हाती घेण्यात येणार आहेत, त्यासाठी किती चटई निर्देशांक देण्यात येणार आहे आणि एवढा चटई निर्देशांक शहराच्या सध्याच्या पायाभूत सुविधांना झेपणारा आहे का, याचा संपूर्ण व पारदर्शक खुलासा करावा, अशी मागणी करण्यात आली.
“महापालिका कोणाची? जनतेची की कंपन्यांची? क्लस्टरच्या नावाखाली कंपनी कोणासाठी? ठाणेकरांसाठी की बिल्डरांसाठी?” असा सवाल करत, कोणत्याही मोठ्या विकास प्रकल्पापूर्वी शहराची वहनक्षमता, पायाभूत सुविधांची क्षमता आणि भविष्यातील परिणामांचा शास्त्रशुद्ध अभ्यास सार्वजनिक करावा, अशी मागणी करण्यात आली.
आंदोलनादरम्यान ठाणे महानगरपालिका आयुक्त मा. सौरभ राव यांना धर्मराज्य पक्षाच्या वतीने मागण्यांचे निवेदन सादर करून तातडीने कार्यवाहीची मागणी करण्यात आली. प्रशासनाने या मागण्यांवर सकारात्मक निर्णय न घेतल्यास ठाणेकर नागरिकांच्या हितासाठी यापुढेही अधिक तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा धर्मराज्य पक्षाने दिला.
यावेळी धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष मा. राजन राजे यांच्यासह, काँग्रेस पक्षाचे ठाणे जिल्हाअध्यक्ष राहुल पिंगळे, सचिव महेंद्र म्हात्रे, संभाजी ब्रिगेडचे श्री. चंद्रशेखर पवार, जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वयचे श्री. संजय मं.गो., ठाणे मतदाता जागरण अभियानचे उन्मेष बागवे व राजेंद्र चव्हाण (भारत जोडो अभियान), आम आदमी पक्षाचे ठाण्यातील पदाधिकारी, तसेच धर्मराज्य पक्षाचे सचिव नरेंद्र पंडित, प्रवक्ता समीर चव्हाण, ठाणे लोकसभा उपाध्यक्ष सचिन शेट्टी, धर्मराज्य कामगार कर्मचारी महासंघाचे खजिनदार अजित सावंत, जगन्नाथ सल्लागार, हनुमंत किणी, शरद भोईर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच ठाणे रिक्षा संघटनेचे सुशीलकुमार चंद्रा, रवी मिश्रा, महासंघाचे कामगार सदस्य तुषार बर्डे व अन्य कामगार सदस्य आणि ठाणेकर नागरिक सहभागी झाले होते.
No comments
Leave Your Comment

error: Content is protected !!