भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ७०व्या महापरिनिर्वाणदिनाच्या पूर्वसंध्येला, दि. ५ डिसेंबर-२०२५ रोजी, रात्रौ ११ वाजताच्या सुमारास ठाणे शहरातील पंचगंगा सोसायटी-राबोडी येथील ‘संजीवनी बहुउद्देशीय प्रतिष्ठान’ यांच्या वतीने आणि त्यानंतर कोर्टनाका येथे, आंबेडकरी-नेते सुनील खांबे यांनी आयोजित केलेल्या, महापरिनिर्वाणदिनाच्या कार्यक्रमानिमित्त महामानवास अभिवादन करण्यात आले. या दोन्ही कार्यक्रमांस ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष तथा ज्येष्ठ कामगार-नेते मा. राजन राजे यांनी उपस्थित राहुन, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्रस्मृतींस विनम्र अभिवादन केले. याप्रसंगी पक्षाचे प्रवक्ते समीर चव्हाण उपस्थित होते. यावेळी उपस्थित भीमसैनिकांना संबोधित करताना मा. राजन राजे म्हणाले की, “आजच्या महापरिनिर्वाणदिनी बाबासाहेबांना ‘राज्यघटनेचे शिल्पकार’ या भूमिकेच्या पलीकडे जाऊन, ‘समतेच्या संदेशा’तून ‘सामाजिक व आर्थिक’ न्याय देऊ पहाणारा ‘महामानव’ म्हणून पहाणे अधिक गरजेचं असून, ‘राज्यघटनेचे शिल्पकार’ किंवा ‘दलितांचा मसीहा’ या तुलनात्मकदृष्ट्या काहीशा मर्यादित भूमिकेत त्यांना पहाणं म्हणजे, ‘कोहिनूर हिऱ्या’ला अंगठीत कोंडून टाकण्यासारखे आहे. शिवछत्रपती असोत वा बाबासाहेब असोत, त्यांचा प्रामुख्याने भर, संपूर्ण समाजाचं ‘आर्थिक-उन्नयन’ करण्यावर व तळागाळातील समाजघटकांसाठी, शक्य तेवढं सन्मानजनक जीवनमान निश्चित करण्यावर होता. ‘तलवारधारी’ शिवछत्रपतींपेक्षा, ‘नांगरधारी’ शिवछत्रपती जे, न्याय-समतापूर्ण प्रशासकीय व्यवस्था लावणारे होते. हे जेवढे महात्त्वाचे; तितकेच, ‘राज्यघटना’ हाती घेतलेल्या बाबासाहेबांपेक्षाही, ‘समतेचा संदेश’ देणारे बाबासाहेब जनसामान्यांसाठी अधिक महात्त्वाचे आहेत!” अशा शब्दांत त्यांनी आपल्या परखड भावना व्यक्त केल्या. यावेळी आपल्या भाषणात मा. राजन राजे यांनी, कंत्राटी-कामगार पद्धत व केंद्र सरकारने लागू केलेल्या ‘काळ्या-कामगार संहिते’वर एकच शरसंधान साधून, कामगारद्रोही भाजप सरकार आणि भांडवलधारी प्रस्थापित व्यवस्थेवर सडकून टीका केली. या अभिवादन कार्यक्रमाला पंचगंगा-राबोडी परिसरातील शेकडो आंबेडकरी अनुयायी तसेच, कोर्टनाका येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णकृती पुतळ्याजवळ मोठ्यासंख्येने भीमसैनिक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन आंबेडकरी चळवळीतील नेते सुनील खांबे आणि संदीप खांबे यांनी केले होते.
संविधान दिनी कामगारविरोधी कायद्यांविरुद्ध देशव्यापी आंदोलन; ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’सह विविध संघटनांचे ठाण्यात राष्ट्रपतींना निवेदन
कामगारांच्या हिताचे कायदे रद्दबातल ठरवून, त्याठिकाणी कामगारविरोधी व मालकधार्जिणे चार काळे-कायदे लादून, देशभरातील श्रमिकांना गुलामगिरीत ढकलण्याचं महापातक, केंद्र सरकारकडून घडलेलं असून, त्याचाच निषेध व्यक्त करण्यासाठी ‘संविधान दिना’चे औचित्य साधून, देशभरातील कामगार संघटनांनी, दि. २६ नोव्हेंबर-२०२५ रोजी, संपूर्ण भारतात निदर्शने/आंदोलने केली. त्याच पार्श्वभूमीवर, ‘महाराष्ट्र राज्य कामगार संघटना संयुक्त कृती समिती’च्या वतीने, भारताच्या राष्ट्रपतींना, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून, दि. २६ नोव्हेंबर-२०२५ रोजी, निवेदन देण्यात आले. सदर निवेदन ठाण्याचे अपर-जिल्हाधिकारी श्री. हरिश्चंद्र पाटील यांनी स्विकारले. याप्रसंगी ‘सर्व श्रमिक संघा’चे अध्यक्ष रवी नायर, ‘टीयूसीआय’चे अध्यक्ष रवी जोशी, ‘भारतीय महिला फेडरेशन’च्या कार्याध्यक्षा निर्मला पवार, ‘आयटक’चे कार्याध्यक्ष उदय चौधरी, ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे कार्यालय-प्रमुख संजय दळवी, ‘सीमेन्स वर्कर्स युनियन’चे अध्यक्ष मनोज बोडके, ‘श्रमिक जनता संघा’चे अध्यक्ष जगदीश खैरालिया, ‘ठाणे जिल्हा मध्यवर्ती शासकीय कर्मचारी महासंघा’च्या अध्यक्षा श्रीमती पुजारी, ‘महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी युनियन’चे कार्याध्यक्ष राजेश सिंग आणि ‘राज्य सहकारी मध्यवर्ती संघटने’चे अध्यक्ष भास्कर गवळी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
‘लोकसत्ते’च्या प्रक्षोभक संपादकीयाविरोधात ठाण्यात ‘धर्मराज्य पक्षा’चा धगधगता निषेध
ज्वालामुखी धगधगतो आहे….आगरी-कराडी कामोठे महोत्सवात मा. राजन राजे यांची प्रमुख उपस्थिती
‘कै. बळीराम राघो पावणेकर सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय’ आणि ‘झेंडा सामाजिक संस्था’ यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या “आगरी-कराडी कामोठ्याचा महोत्सव-२०२५” या कार्यक्रमाचे सालाबादप्रमाणे याहीवर्षी, दि. २३ नोव्हेंबर-२०२५ रोजी, कामोठे (ता. पनवेल) येथे मोठ्या जल्लोषात आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला ‘धर्मराज्य पक्षा’चे संस्थापक अध्यक्ष तसेच, ज्येष्ठ कामगार-नेते मा. राजन राजे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपस्थित जनसमुदायला संबोधित करताना मा. राजन राजे यांनी, “आगरी-कोळी-कराडी समाज हा, मुंबई आणि नवी मुंबईसह, संपूर्ण रायगड जिह्याचा मूळ रहिवाशी असून, फक्त आपल्या जिल्ह्याचेच नव्हे; तर, संपूर्ण महाराष्ट्राच्या अस्मितेचे व मराठी-भूमिपुत्रांचे रक्षण करण्याची तुमच्यावर आहे. ‘धर्मराज्य पक्ष’ आणि ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’च्या माध्यमातून आम्ही रक्तपिपासू शोषक-व्यवस्था (Vampire State System) असलेल्या, धनदांडग्या भांडवलदारांविरोधात अविरत संघर्ष करीत आहोतच… तुम्हीही ‘भूमिपुत्र’ म्हणून सावध राहिलेच पाहिजे!” अशा शब्दांत आवाहन करुन, या आगरी-कराडी महोत्सवाच्या, १४व्या वर्षानिमित्त आयोजित केलेल्या सांस्कृतिक-सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले. महोत्सवाच्या या कार्यक्रमाला, ‘धर्मराज्य पक्षा’चे प्रवक्ते श्री. समीर चव्हाण, पक्षाचे माहिती अधिकार ठाणे कक्षप्रमुख श्री. अनिल महाडिक, ‘धर्मराज्य पक्ष’प्रणित ‘स्थानिक भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त रिक्षाचालक-मालक संघटने’चे श्री. महेंद्र म्हात्रे, श्री. राजू म्हात्रे, श्री. आत्माराम म्हसकर, श्री. सदाभाऊ भोईर आणि ‘धर्मराज्य पक्षा’चे पनवेल तालुका अध्यक्ष श्री. गोपीनाथ भगत आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

राजमाता जिजाऊंचे वंशज प्रा. नामदेवराव जाधव यांची राजन राजेंना सदिच्छा भेट
राजमाता जिजाऊ माँसाहेबांचे थेट चौदावे वंशज तसेच, ‘सनय छत्रपती शासन पक्षा’चे संस्थापक/अध्यक्ष प्रा. नामदेवराव जाधव यांनी, ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष तथा ज्येष्ठ कामगार-नेते मा. राजन राजे यांची, दि. २१ नोव्हेंबर-२०२५ रोजी, ‘धर्मराज्य पक्षा’च्या ठाणे कार्यालयात सदिच्छा भेट घेतली. यावेळी मा. राजन राजे यांनी, प्रा. नामदेवराव जाधव यांचे, शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. उल्लेखनीय बाब म्हणजे, संयुक्त महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृतीदिनानिमित्त, ‘धर्मराज्य पक्षा’च्या कार्यालयातील हुतात्मा स्मारकाच्या प्रतिकृतीला मा. राजन राजे व प्रा. नामदेवराव जाधव यांनी पुष्पहार अर्पण करुन, अभिवादन केले. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात, मोराराजी देसाई या मराठीद्वेष्ट्या-महाराष्ट्रद्रोही नरराक्षसाने दि. २१ नोव्हेंबर-१९५६ रोजी, फ्लोरा-फाउंटन (आताचा हुतात्मा चौक) येथे केलेल्या अमानुष गोळीबारात मृत्यूमुखी पडलेल्या, १०६ हुतात्म्यांना यावेळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. दरम्यान, या भेटीत सद्य राजकीय परिस्थिती व मराठी तरुणांच्या सामाजिक प्रश्नांवर दोघांमध्ये सखोल चर्चा झाली. कंत्राटी-कामगारपद्धतीमुळे मराठी तरुण गुलामगिरीत ढकलला गेलेला असून, प्रस्थापित राजकारणी आणि भांडवलशाही व्यवस्थेने, महाराष्ट्राचा मूळ भूमिपुत्र उध्वस्त केला असल्याचे रोखठोक प्रतिपादन मा. राजन राजे यांनी यावेळी केले. यादरम्यान, प्रा. नामदेवराव जाधव यांनी, मा. राजन राजे यांची “एक दुकान, एक मकान” ही संकल्पना उचलून धरत, आपल्या पक्षाच्या माध्यमातून आपणही यासंदर्भात लोकशाहीमार्गाने चळवळ उभी करु, असे आश्वस्त केले. ‘धर्मराज्य पक्ष’ आणि ‘सनय छत्रपती शासन पक्ष’ या दोन्ही पक्षांची विचारसरणी ही, मराठी माणसाच्या अस्तित्वाशी निगडित असल्याने, भविष्यात ‘मराठी-माणूस’ व ‘महाराष्ट्रधर्मा’साठी आपण नक्कीच एकत्र येऊ, असे आवाहन प्रा. नामदेवराव जाधव यांनी करताच, “जोपर्यंत तुमच्या हातून सत्कर्म घडतंय, तोपर्यंत आम्ही तुमच्या सोबत असू… कारण, मी व्यक्तीच्या नव्हे; तर, प्रवृत्तीच्या प्रेमात पडणारा माणूस आहे!” अशी आपली थेट भूमिका मा. राजन राजे यांनी स्पष्टपणे बोलून दाखवली. याप्रसंगी प्रा. नामदेवराव जाधव यांनी लिहिलेली, “शिवाजी द मॅनेजमेंट गुरु” (भाग-२), “जिजाऊ द मदर ऑफ ऑल गुरुज्” आणि “सनय” ही तीन पुस्तके, मा. राजन राजे यांना सप्रेम भेट दिली. या सदिच्छा भेटीवेळी ‘धर्मराज्य पक्षा’चे सचिव श्री. नरेंद्र पंडित, प्रवक्ते श्री. समीर चव्हाण, ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे महासचिव श्री. महेशसिंग ठाकूर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

गिरणी कामगार व सर्वसामान्यांसाठी परवडणारी घरे : ‘घर हक्क परिषदे’ची पत्रकार परिषद
गिरणी कामगार आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी, परवडणाऱ्या दरात हक्काची घरे मिळावीत यासाठी, येत्या नागपूर हिवाळी अधिवेशनात, गिरणी कामगारांच्या हक्काच्या घरांसाठी मोर्चा काढण्यात येणार असून, त्याचीच माहिती देण्यासाठी ‘घर हक्क परिषदे’च्या वतीने, दि. १७ नोव्हेंबर-२०२५ रोजी, गांधी भवन (कुलाबा, मुंबई) येथे, एक पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष तथा ज्येष्ठ कामगार नेते मा. राजन राजे, काँग्रेसच्या अर्थशास्त्र विभागाचे अध्यक्ष मा. विश्वास उटगी, सर्व श्रमिक संघाचे नेते कॉ. शिशिर ढवळे आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, संविधानातील अधिकारानुसार जमिनीची मालकी ही, जनतेची असते. याच अनुषंगाने, सर्व बंद कारखान्यांच्या जमिनी, त्या कारखान्यांत काम करणारे कामगार व सर्वसामान्य जनतेच्याच असल्याने, त्या जमिनींवर गिरणी कामगार व जनतेसाठी परवडणारी घरे बांधावीत, अशी मागणी पत्रकार परिषदेत करुन, दि. १ ऑगस्ट-२०१९ रोजीचा जीआर रद्द करण्यात यावा, अशीही मागणी, नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाच्या मोर्चात करण्यात येणार असल्याचे मा. विश्वास उटगी यांनी सांगितले. “आमच्या जमिनीवर, आमच्या घराचा हक्क” या घोषणेनुसारच, यापुढे ‘घर हक्क परिषद’ आपला लढा सुरु ठेवणार असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, उप-मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे व श्री. अजित पवार आणि संबंधित मंत्र्यांना, दि. १७ नोव्हेंबर-२०२५ रोजी निवेदन देण्यात येऊन, आगामी हिवाळी अधिवेशनात गिरणी कामगार आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी परवडणाऱ्या घरांसंदर्भात ‘लक्षवेधी’ आणण्याबाबत आग्रह धरण्याची मागणी, निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आलीआहे. तसेच, गिरणी कामगार व लोकांमध्ये याबाबत जनजागृती होण्यासाठी मुंबईसह, महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांमध्ये सार्वजनिक सभा आयोजित करण्यात येतील, अशी माहिती मा. विश्वास उटगी यांनी, यावेळी पत्रकार परिषदेत दिली.
१५ नोव्हेंबर २०२५ : गिरणी कामगारांच्या घरहक्कासाठी परळ-भोईवाड्यात मा. राजन राजे व विविध पक्षांचे नेते एकत्र
गिरणी कामगार आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी, परवडणाऱ्या दरात हक्काची घरे मिळावीत यासाठी ‘घर हक्क परिषदे’च्या वतीने, मोर्चेबांधणी सुरु झालेली असून, त्याच पार्श्वभूमीवर शनिवार, दि. १५ नोव्हेंबर-२०२५ रोजी, ‘राष्ट्रीय मिल मजदूर संघा’च्या परळ-भोईवाडा येथील कार्यालयात एक महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष मा. राजन राजे, काँग्रेसच्या अर्थशास्त्र विभागाचे अध्यक्ष श्री. विश्वास उटगी, राष्ट्रीय मिल मजदूर संघांचे कार्याध्यक्ष श्री. गोविंदराव मोहिते, काँग्रेसचे श्री. गजानन देसाई, श्री. मोहन तिवारी, श्रीमती छाया थोरात, डाव्या पक्षांचे नेते कॉ. शिशिर ढवळे, कॉ. सुकुमार दामले, श्री. विजय कुलकर्णी, रेमण्ड कामगार संघर्ष समितीचे श्री. अनिल महाडिक आणि ‘धर्मराज्य पक्षा’चे प्रवक्ते श्री. समीर चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, उप-मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे व श्री. अजित पवार आणि संबंधित मंत्र्यांना, दि. १७ नोव्हेंबर-२०२५ रोजी निवेदन देण्याचे बैठकीत ठरले असून, आगामी हिवाळी अधिवेशनात गिरणी कामगार आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी परवडणाऱ्या घरांसंदर्भात ‘लक्षवेधी’ आणण्याबाबत आग्रह धरण्याची मागणी, निवेदनाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर, गिरणी कामगार व लोकांमध्ये याबाबत जनजागृती होण्यासाठी मुंबईसह, महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांमध्ये सार्वजनिक सभा आयोजित करण्यात येतील, असे या बैठकीत सर्वानुमते ठरविण्यात आले.
नेहरू जयंतीनिमित्त ठाण्यात ‘धर्मराज्य पक्षा’ची भव्य सांजफेरी; राजन राजेंच्या नेतृत्वात ममदानींच्या विजयानंदाच्या घोषणा, धर्मविद्वेषी राजकारणावर जोरदार प्रहार
स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान, भारतरत्न पं. जवाहरलाल नेहरु यांच्या, १३७व्या जयंतीनिमित्त धर्मराज्य पक्षाच्या वतीने शुक्रवार, दि. १४ नोव्हेंबर-२०२५ रोजी, ठाणे शहरातील मुख्य रस्त्यांवरुन एका सांजफेरीचे आयोजन करण्यात आले होते. ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष तथा ज्येष्ठ कामगार-नेते मा. राजन राजे यांच्या यांच्या नेतृत्वाखाली, पक्षाच्या ठाणे-नौपाडा येथील मुख्यालयापासून, सायंकाळी ५ वाजता सुरु झालेली ही सांजफेरी, मीनाताई ठाकरे चौक (कॅसल मिल नाका) येथील, पं. जवाहरलाल नेहरु यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ समाप्त करण्यात आली. सुमारे दीड ते दोन किलोमीटर अंतराच्या या सांजफेरीत मा. राजन राजे यांच्या समवेत, पक्षाचे उपाध्यक्ष श्री. नितीन देशपांडे, ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे उपाध्यक्ष श्री. रमाकांत नेवरेकर, महासचिव श्री. महेशसिंग ठाकूर, पक्षाचे प्रवक्ते श्री. समीर चव्हाण, सचिव श्री. नरेंद्र पंडित, प्रसिद्धीप्रमुख श्री. संजय दळवी, श्री. सोपान चौधरी, श्री. निलेश सावंत, श्री. सुमित कदम, सौ. मनीषा सांडभोर, सौ. भावना ओरपे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह, काँग्रेसच्या अर्थशास्त्र विभागाचे अध्यक्ष व ज्येष्ठ विचारवंत मा. विश्वास उटगी, ठाणे काँग्रेसचे प्रवक्ते श्री. राहुल पिंगळे, सरचिटणीस श्री. महेंद्र म्हात्रे, पर्यावरण विभागाचे जिल्हाध्यक्ष श्री. मनोज डाकवे, सांस्कृतिक जिल्हाध्यक्ष श्री. स्वप्नील कोळी, प्रभाग क्र. ८चे राबोडी ब्लॉक अध्यक्ष श्री. जावेद शेख, डाव्या चळवळीतील नेते कॉ. उदय चौधरी आणि डॉ. विवेक कोर्डे इत्यादी मान्यवर मंडळी उपस्थित होती.
तसेच, या सांजफेरीत ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे कामगार सभासद व कमिटी सदस्य मोठ्यासंख्येने उपस्थित होते. दरम्यान, या सांजफेरीचे वैशिष्ट्य म्हणजे, जोहरान ममदानी या भारतीय वंशाच्या ‘मुस्लिम-समाजवादी’ विचारसरणीचे, अमेरिकेतल्या न्यूयॉर्क शहराचे नवनिर्वाचित महापौरांच्या निवडीबाबत, त्यांच्या अभिनंदनाच्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी मुंबईतील वरळीजवळील, मेट्रो स्टेशनला (जिथे जगविख्यात ‘नेहरु सेंटर’ असतानाही) पं. नेहरुंबद्दल आकस बाळगून, जाणूनबुजून ‘सायन्स सेंटर’ असे नाव देत, नेहरुंचे नावं पुसण्याच्या प्रस्थापित राजकीय नेतृत्वाचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करण्यात आला. याप्रसंगी, “गांधी-नेहरु का नाम लेगा, वो ही देश पे राज करेगा”, “वोट चोर… गद्दी छोड” यांसारख्या गगनभेदी घोषणा देण्यात आल्या. त्याचप्रमाणे ‘बालदिना’निमित्त, “भारतीय-बालकांचा आवडता नेहरु चाचा” असा गौरवपूर्ण उल्लेख करीत, मतांची चोरी करुन सत्ताधीश झालेल्या, नरेंद्र मोदींचा ‘डिजिटल-चाचा’ असा उल्लेख करुन, भाजपच्या धर्मविद्वेशी व बेबंदशाही राजकारणाविरोधात, या सांजफेरीत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पं. जवाहरलाल नेहरु यांच्या १३७व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या, ‘धर्मराज्य पक्षा’च्या या सांजफेरीला ठाणेकर नागरिकांकडून उदंड प्रतिसाद मिळाला. सांजफेरीच्या समाप्तीवेळी मा. राजन राजे यांनी, पं. जवाहरलाल नेहरु यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करताना, एका लहानग्या बालकाच्या सोबतीने, देशाच्या पहिल्या पंतप्रधानांना विनम्र अभिवादन केल्याने, त्यांची ही कृती समस्त ठाणेकर नागरिकांसाठी कौतुकाचा विषय ठरली.
पं. जवाहरलाल नेहरू यांच्या १३७व्या जयंतीनिमित्त ‘धर्मराज्य पक्षा’ची सांजफेरी
पं. जवाहरलाल नेहरु यांच्या १३७व्या जयंतीनिमित्त, ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने, १४ नोव्हेंबर-२०२५ रोजी, एका सांजफेरीचे आयोजन करण्यात आले होते. ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष तथा ज्येष्ठ कामगार-नेते मा. राजन राजे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या सांजफेरीत, ठाणे शहरातील काँग्रेस पक्ष, डाव्या चळवळीतील नेत्यांसह, समविचारी संघटनांचे पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता. याप्रसंगी ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे कामगार सभासद व कार्यकारिणी सदस्य मोठ्यासंख्येने उपस्थित होते. याच अनुषंगाने वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेले वृत्त…

१३ नोव्हेंबर २०२५ : ‘जोहरान ममदानी’ यांच्या ऐतिहासिक विजयानिमित्त परळ येथे डाव्या पक्षांचा संयुक्त विजयोत्सव; ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे प्रमुख वक्ते
याच अनुषंगाने, जोहरान ममदानी यांचा विजय साजरा करण्यासाठी, ‘भारतीय कम्युनिस्ट पक्षा’च्या परळ (पू.) येथील दळवी बिल्डिंगमध्ये गुरुवार, दि. १३ नोव्हेंबर-२०२५ रोजी, एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ममदानी यांच्या विजयोत्सवाच्या या कार्यक्रमाला ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे, कॉ. मिलिंद रानडे, कॉ. शैलेंद्र कांबळे, कॉ. अजित पाटील आणि कॉ. फिरोज मिठीबोरवाला आदी मान्यवर मंडळी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होती. हा कार्यक्रम सीपीआय, सीपीआय (एम), सीपीआय-एमएल (लिबरेशन) आणि ‘हम भारत के लोग’ या डाव्या विचारसरणीच्या पक्ष/संघटनांनी आयोजित केला होता. याप्रसंगी सर्व प्रमुख वक्त्यांनी अमेरिकेच्या आणि एकंदरीतच जागतिक भांडवलशाहीविरोधात जोरदार टीकास्त्र सोडले. दरम्यान, ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे यांनी, आपल्या घणाघाती भाषणात, गेल्या शतकभरातील अमेरिकन भांडवली-इतिहासाचा मागोवा घेत ममदानी यांच्या पुढ्यात उभ्या ठाकलेल्या आव्हानांचा आढावा घेतला व त्यातून डाव्या चळवळीने कुठल्या पद्धतीने व किती सावधगिरीने आपली भविष्यकालीन वाटचाल करायला हवी…याबाबत, रोखठोक प्रतिपादन केलं.