Blog

१४ ऑक्टोबर-२०२५ : आठ-साडेआठ वर्षांच्या संघर्षानंतर ‘रेप्रो इंडिया लिमिटेड’च्या कामगारांचा विजय सोहळा

नवी मुंबईच्या महापे एमआयडीसीमधील ‘रेप्रो इंडिया लिमिटेड’ या कंपनीतील ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’च्या कामगार सभासदांचा ‘आनंद-मेळावा’ मंगळवार, दि. १४ ऑक्टोबर-२०२५ रोजी, ठाण्यातील मॉडेला चेकनाका येथील ‘आर नेस्ट’ या वातानुकुलीत सभागृहात मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाला. ‘धर्मराज्य पक्ष’ आणि ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे अध्यक्ष तथा ज्येष्ठ कामगारनेते मा. राजन राजे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. दरम्यान, पगारवाढ आणि आपल्या न्याय्य-हक्कांसाठी लोकशाही व सनदशीरमार्गाने ‘रेप्रो’च्या २८७ कामगार सभासदांनी, दि. ६ मार्च-२०१७ रोजीपासून, व्यवस्थापनाविरोधात बेमुदत संप पुकारला होता. त्यासंदर्भात, मा. औद्योगिक न्यायालय, ठाणे येथे कंपनी व्यवस्थापनाविरोधात दावा दाखल करण्यात आला होता. अखेर साडेआठ वर्षांच्या संघर्षानंतर, व्यवस्थापनाने सामंजस्याची भूमिका घेत, सर्व संपकरी कामगारांची कायदेशीर देणी, या सोहळ्याच्या निमित्ताने धनादेशाद्वारे मा. राजन राजे यांच्या शुभहस्ते अदा केली. ‘रेप्रो इंडिया लिमिटेड’ या कंपनीतील कामगार सभासदांचा कायदेशीर लढा, युनियनचे वकील के. टी. विश्वनाथन यांनी मोठ्या नेटाने लढवला आणि त्याला तेवढीच खंबीर साथ, ‘धर्मराज्य’च्या कामगार सभासदांनी दिली. या कालावधीत ‘राजन राजे’ नावाचा पंचाक्षरी मंत्र सदैव कामगारांना प्रेरणा देत राहिल्यामुळेच, तब्बल आठ-साडेआठ वर्षे, कामगार सभासद आपल्या निर्णयापासून तसूभरही ढळले नाहीत, ही सर्वात उल्लेखनीय बाब होय… याच पार्श्वभूमीवर या ‘आनंद-मेळाव्या’चे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला व्यवस्थापनाच्या वतीने, कंपनीच्या लीगल हेड व कंपनी सेक्रेटरी अलमिना शेख आणि कंपनीचे अकाऊंटंट समीर चौगुले उपस्थित होते. यावेळी ‘रेप्रो’च्या कामगारांचे कुटुंबीयदेखील आवर्जून उपस्थित होते. याच सोहळ्याचे औचित्य साधून, मा. राजन राजे यांनी उपस्थित कामगारांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे मन;पूर्वक अभिनंदन करुन, त्यांच्या भविष्यातील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. “सध्या देशातील कामगार-कष्टकरीवर्गाची अवस्था अत्यंत बिकट असून, केंद्र सरकारपुरस्कृत येऊ घातलेल्या काळ्या कामगार-संहितेमुळे, भविष्यात कामगारांना आपल्या हक्कासाठी संप, उपोषण आणि आंदोलने करता येणार नाहीत. ज्या भाजपला तुम्ही निवडून दिलंत, त्याच पक्षाने कामगार देशोधडीला लावायला घेतलाय. तुम्हाला गणेशोत्सव-नवरात्रौत्सव, दहीहंड्या, जातीय व धार्मिक विद्वेष यातच गुंतवून ठेवत, सर्वसामान्य जनतेचा बुद्धिभेद करण्याचे कारस्थान, भारतीय जनता पक्षाने हाती घेतलेले आहे… वेळीच सावध झाला नाहीत; तर, तुमच्या पुढच्या पिढीचे भविष्य अंधकारमय होणार हे निश्चित!” अशा परखड शब्दांत मा. राजन राजे यांनी, उपस्थित कामगारांना मर्गदर्शन केले. दरम्यान, याप्रसंगी ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे महासचिव महेशसिंग ठाकूर, उपाध्यक्ष रमाकांत नेवरेकर, सचिव समीर चव्हाण आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

 

१२ ऑक्टोबर-२०२५ : ‘घर हक्क परिषदे’त राजन राजे यांची ज्वलंत भूमिका — “कुणी घर देता का घर?

मराठी माणसाच्या अस्तित्वाचा प्रश्न फक्त, मुंबई आणि उपनगरांपुरता नाहीये; तर, मुंबईसह ठाणे, नाशिक, रायगड, पुणे, नागपूर या सगळ्या शहरांमधून तुम्ही-आम्ही सगळेजण विस्थापित झालेलो आहोत किंवा हळूहळू होत आहोत. करोना-काळात वन्यप्राण्यांनी जशा आपापल्या जागा माणसांकडून पुन्हा ताब्यात घेतल्या होत्या; तशा, आता महाराष्ट्रातल्या सामान्य मराठी-माणसांच्या ताब्यात देण्यासाठी, धनदांडग्यांकडून ‘जागा रिकाम्या’ करुन घ्याव्या लागतील!
वि. वा. शिरवाडकरांच्या ‘नटसम्राट’ नाटकातील, गणपतराव बेलवलकरांचं, “कुणी घर देता का घर”, हे जे स्वगत आहे, अगदी तशीच अवस्था मराठी माणसाची झालेली आहे. अशी ‘घरघर’ लागूच कशी शकते, मराठी माणसाला आपल्याच हक्काच्या महाराष्ट्रात? “माणसांना घरं नाहीत आणि घरांना माणसं नाहीत”, असा विलक्षण विपरीत काळ “घराच्या-दुकानांच्या साठेबाजीतून सध्या मराठी-माणसांवर येऊन ठेपलाय”, अशा रोखठोक शब्दांत ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष आणि ज्येष्ठ कामगार नेते राजन राजे यांनी आपले मनोगत व्यक्त केले…ते दादर येथील महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या, टिळक भवन येथील सभागृहात बोलत होते.
गिरणी कामगार आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हक्काच्या परवडणाऱ्या घरांसंदर्भात, दि. १२ ऑक्टोबर-२०२५ रोजी, आयोजित केलेल्या ‘घर हक्क परिषदे’च्या मेळाव्यात राजन राजे उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना ते पुढे म्हणाले की, “बारा तासांसाठी बारा हजार रुपये” अशी महाराष्ट्रातील भयानक परिस्थिती आहे. मुंबई सोडाच, ठाण्यासारख्या शहरात पाचशे-साडेपाचशे चौरसफुटांचा वन बीएचके फ्लॅट, ५० लाखांत येतो. नोकरी साधारण पस्तीस वर्षांची धरली तरी, कामगाराचा सगळा पगार दरमहा हप्ते फेडण्यात गेल्यावरच, त्याची नोकरी संपताना तो फ्लॅट खऱ्याअर्थाने त्याच्या मालकीचा होणार… या काळात तुम्ही भोजन-खानपान, कपडालत्ता, मुलाचं शिक्षण-आरोग्य कशाकशावर म्हणून खर्च करायचा नाही, हौसमौज तर विसरुनच जा…फक्त, एका हाताने पगार घ्यायचा आणि दुसऱ्या हाताने तो बँकेत भरायचा आणि शहरातल्या प्रदूषित हवेवर घरात कोंडून जगायचं… आहे शक्य कोटीतलं हे भयंकर आक्रित? एवढी केविलवाणी परिस्थिती मराठी सामान्य जनांची आपल्याच महाराष्ट्रात झालीच कशी??
…जर, अजूनही तुम्ही या जैन-गुज्जू-मारवाडी भांडवलदारांना आणि त्यांना साथ देणाऱ्या मराठी राजकारणी-दलालांना आवरलं नाहीत…वेळीच जागे झाला नाहीत; तर, लक्षात ठेवा, एकदिवस वेळ अशी येईल की, जसा तुम्ही जमिनीवर-पाण्यावर कर भरता; तसाच, तो उद्या सूर्य-किरणांवर ते कर भरायला लावतील…सूर्यकिरणांचा ‘सातबारा’च त्यांच्या नावावर करुन घेतील, इतकी गंभीर परिस्थिती आहे.
वर्ष १९७०पर्यंत प्रत्येक प्रौढ व्यक्तिला जास्तीतजास्त एकच फ्लॅट खरेदी करता येत होता; पण, बिल्डर राजकारण्यांनी आणि राजकारणातून बिल्डर बनलेल्यांनी घरांचं बांधकाम, हा ‘उद्योग’ बनवला व आपल्या नफेखोरीतल्या सगळ्या अडचणी, अटीशर्ती काढून टाकल्या; त्यामुळे फ्लॅट व दुकाने खरेदी, हा बक्कळ परतावा देणारा गुंतवणुकीचा मार्ग व त्यातूनच, काळ्या पैशाचा मोठा स्त्रोत बनला!
“अन्न, वस्त्र, निवारा म्हणजे घर”, हा माणसाचा नैसर्गिक व मूलभूत अधिकार असताना…१९७०नंतर घरांची प्रचंड साठेबाजी व काळाबाजार सुरु होऊन भाव गगनाला भिडायला लागले व त्यातच मराठी कामगार-कर्मचारीवर्ग कायमच पिचला जायला लागला!
…तेव्हा, लक्षात ठेवा, सुदैवाने वर्ष १९७७-७८च्या राज्यघटनेतील ४४व्या घटनादुरुस्तीमुळे सुदैवाने ‘संपत्तीचा-अधिकार’, हा आता ‘मूलभूत-अधिकार’ राहिलेला नाही. तो आता फक्त, कायदेशीर-अधिकार आहे; म्हणूनच कायदा करुनच ‘संपत्तीचं फेरवाटप’ व्हायला हवं! त्याकामी, शहरं-उपनगरांमधून प्रत्येक प्रौढ व्यक्तिमागे “एक मकान, एक दुकान”असा कायदा व्हायला हवा…तो झाल्याशिवाय, गगनाला भिडलेले फ्लॅटस् आणि दुकानांचे भाव पत्त्याच्या बंगल्यासारखे कोसळणार नाहीत!
…जसं भूदान-चळवळीतून विनोबा भावेंनी “सब भूमी गोपाल की” गर्जना करत, लाखो हेक्टर जमीन फेरवाटपासाठी मिळवली; तसेच, हे अतिरिक्त लाखो फ्लॅट्स व दुकाने…सिंगापूरच्या धर्तीवर, महाराष्ट्र-सरकारने ताब्यात घेऊन सुशिक्षित मराठी-तरुणाईला, वाजवी भाड्याने उपलब्ध करुन द्यायला हवीत…तरच, मराठी माणूस मुंबई-महाराष्ट्रात सन्मानाने व सुखासमाधानाने अस्तित्वात राहील…अन्यथा मुंबई, ठाणे, पुणे, रायगड, नाशिक-नागपूर (मुंठापुराना) शहरांतून त्यांचं साफ उच्चाटन होईल व वाघांसाठी जशी चंद्रपुरच्या ताडोबासारखी अभयारण्ये राखावी लागलीयत; तशी सामान्य मराठी-माणसांसाठी ‘अभयारण्ये’ निर्माण करावी लागतील!
…या परिषदेच्या निमित्ताने विविध २७ पक्ष-संघटना एकत्र आलेत, ही फार चांगली गोष्ट आहे. पण, एवढ्यावर थांबून चालणार नाही, हर्षवर्धन सपकाळ यांच्यासारखे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आपल्याला लाभलेले आहेत, जे खरंतर चळवळीतून आलेले आहेत. *ते कुठल्या बड्या श्रीमंत घराण्यातून आलेले नाहीत की, एखाद्या बड्या राजकारण्याच्या घरात पाळणा हलला, म्हणून ते नेते झालेले नाहीत, म्हणूनच त्यांच्याकडून आमच्या खूप अपेक्षा असल्याच्या भावनादेखील राजन राजे यांनी बोलून दाखवल्या. यावेळी राहुल गांधी यांचं कौतुक करताना, ते पुढे म्हणाले, मला महात्मा गांधी आणि पं. जवाहरलाल, या दोन्ही व्यक्तित्वांचा ‘संगम’ राहुल गांधीमध्ये दिसतो… आज ही माणसं काँग्रेसमध्ये आहेत, म्हणून आशा करायला काही जागा आहे… राष्ट्रीयस्तरावर राहुल गांधी तर, राज्यस्तरावर हर्षवर्धन सपकाळांसारखी नेतेमंडळी आहेत, म्हणून आम्ही कॉंग्रेससोबत आहोत. राहुल गांधींसोबत महाराष्ट्राचे ‘भीष्माचार्य’ कुमार केतकर आहेत आणि हर्षवर्धन सपकाळांसोबत महाराष्ट्राचे ‘द्रोणाचार्य’ विश्वास उटगी आहेत, अशा ओघवत्या शैलीत राजन राजे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं.
…याप्रसंगी, व्यासपीठावर परिषदेचे अध्यक्ष तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, ज्येष्ठ पत्रकार आणि माजी खासदार कुमार केतकर, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे अर्थशास्त्र विभागाचे अध्यक्ष विश्वास उटगी, सर्व श्रमिक संघाचे अध्यक्ष शिशिर ढवळे, आयटकचे सुकुमार दामले, कम्युनिस्ट पक्षाचे मिलिंद रानडे, गिरणी कामगारांच्या वकील गायत्री सिंग यांच्यासह, ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे कामगार-सभासद तसेच, कामगारक्षेत्रातील व डाव्या चळवळीतील मान्यवर मंडळी मोठ्यासंख्येने उपस्थित होती.

मा. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा ठाण्यात निषेध : ‘धर्मराज्य पक्ष’ाचा सहभाग

भारताचे सरन्यायाधीश मा. भूषण गवई यांच्यावर, सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरात, मनुवादी विचारसरणीच्या वकिलाकडून झालेल्या बूटफेकीच्या भ्याड हल्ल्याचा प्रयत्न केल्याच्या निषेधार्थ, ठाणे शहरातील कोर्टनाका परिसरातील, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ, ‘संविधानप्रिय समता-मूलक समाज’ आणि आंबेडकरी चळवळीतील नेते व कार्यकर्त्यांकडून गुरुवार, दि. ९ ऑक्टोबर-२०२५ रोजी, आंदोलन पुकारण्यात आले होते. या निषेध आंदोलनात ‘धर्मराज्य पक्षा’चे सहसचिव श्री. नरेंद्र पंडित, पक्षाचे प्रवक्ते तथा ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे सचिव श्री. समीर चव्हाण, ‘धर्मराज्य पक्षा’चे प्रसिद्धीप्रमुख श्री. संजय दळवी आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मनुवादी मानसिकता तसेच, जातीयवादी कृत्ये करणाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या, प्रस्थापित ब्राह्मणी व राजकीय व्यवस्थेचा जाहीर निषेध करण्यात आला. “भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, यांसारख्या जात्यंध आणि धर्मांध शक्तींविरोधात, देशातील बहुजन समाजाने एकत्र येऊन प्राणपणाने लढा दिल्याशिवाय, अशा प्रवृत्ती नष्ट होणार नाहीत. त्यासाठी, सामाजिक-राजकीय-जातीय मतभेद विस

रुन, लोकशाही व सनदशीरमार्गानेच संविधानाचे रक्षण करणे हे आपले आद्यकर्तव्य आहे!” असे विधान ‘धर्मराज्य पक्षा’चे सहसचिव श्री. नरेंद्र पंडित यांनी, प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना केले. दरम्यान, याप्रसंगी आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते व ऐक्यवादी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष श्री. नानासाहेब इंदिसे, श्री. जितेंद्रकुमार इंदिसे, श्री. भैय्यासाहेब इंदिसे, श्री. संदीप खांबे, ज्येष्ठ समाजवादी विचारवंत प्रा. संजय मं.गो., श्री. पंढरीनाथ गायकवाड, श्री. भास्कर वाघमारे, श्री. प्रमोद इंगळे, श्री. संजय भालेराव आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती.

‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष मा. राजन राजे यांची ‘घर हक्क परिषद’ बैठकीत उपस्थिती

मुंबईतील गिरणी कामगारांसाठी लढा देणाऱ्या ‘घर हक्क परिषद’ या संघटनेची बैठक शुक्रवार, दि. ३ ऑक्टोबर-२०२५ रोजी, ‘इंटक’चे जनरल सेक्रेटरी श्री. गोविंदराव मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय मिल मजदूर संघ, परळ-भोईवाडा, मुंबई येथील कार्यालयात संपन्न झाली. यावेळी गिरणी कामगार व नागरिकांसाठीच्या जाहीरनाम्यावर सखोल चर्चा करण्यात आली. या परिषदेत ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष मा. राजन राजे, ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे सचिव व ‘धर्मराज्य पक्षा’चे प्रवक्ते श्री. समीर चव्हाण, पक्षाचे माहिती अधिकार ठाणे कक्षप्रमुख श्री. अनिल महाडिक, गिरणी कामगारांचे प्रतिनिधी व ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ श्री. विश्वास उटगी, ज्येष्ठ विचारवंत श्री. शिशिर ढवळे, रेमण्ड कंपनीच्या कामगारांचे प्रतिनिधी श्री. विलास घाग, श्री. प्रदीप साळसकर आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती. दरम्यान, ‘घर हक्क परिषदे’ची आगामी बैठक रविवार, दि. १२ ऑक्टोबर-२०२५ रोजी, टिळक भवन, दादर-मुंबई दुपारी ३ वा. आयोजित करण्यात आल्याची माहिती, यावेळी आयोजकांकडून देण्यात आली.

‘वालमेट फ्लो-कंट्रोल प्रा. लि.’त दसरा साजरा : मा. राजन राजे यांची उपस्थिती

‘धर्मराज्य पक्ष’प्रणित ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’ची युनियन असलेल्या, ‘वालमेट फ्लो-कंट्रोल प्रा. लि.’ या कंपनीतील, डोंबिवली आणि अंबरनाथ या युनिटमधील कामगार सभासदांनी, दसरा व विजयादशमीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाप्रसंगी, ‘धर्मराज्य पक्ष’ आणि ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे अध्यक्ष मा. राजन राजे यांनी उपस्थित राहून, सर्व कामगार सभासद तसेच, कंपनी व्यवस्थापनास दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी श्री सत्यनारायणाच्या पूजेचे मा. राजन राजे यांनी, मनोभावे दर्शन घेतले. दरम्यान, ‘वालमेट फ्लो-कंट्रोल प्रा. लि.’ या कंपनीच्या व्यवस्थापनाच्या वतीने, मा. राजन राजे यांचे शाल-श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी, ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे उपाध्यक्ष रमाकांत नेवरेकर, महासचिव श्री. महेशसिंग ठाकूर व सचिव श्री. समीर चव्हाण उपस्थित होते.

“धार्मिक अंधश्रद्धेपेक्षा, ‘राजकीय-अंधश्रद्धा’ समाजाचं अधिक नुकसान करतात!” -राजन राजे

“अंधश्रद्धा स्वतःच एक ‘व्यवस्था’ असते; जी आतून मुठभरांच्या वर्चस्वाला चांगलीच आधारभूत होत रहाते… आणि, आजच्या भांडवली-व्यवस्थेत अशा अनेक अंधश्रद्धांना, ‘व्यवस्था’ चालवणारे जाणिवपूर्वक, याच कारणामुळे पुढावा देत असतात. म्हणूनच तर, आपल्या महाराष्ट्रात, दिवसागणिक खोल गर्तेत जात चाललेल्या मराठी-माणसाला, विविध धर्मसंप्रदायात व्यवस्थेकरवी कौशल्याने अडकवलं जातं. परिणामी, धार्मिक अंधश्रद्धा, जेवढं समाजाचं नुकसान करतात; त्याच्यापेक्षा कैकपटीने अधिक ‘राजकीय-अंधश्रद्धा’ समाजाचं नुकसान करतात!” असे रोखठोक भाष्य ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष आणि ज्येष्ठ कामगारनेते, तथा राजकीय व सामाजिक विचारवंत राजन राजे यांनी नुकतेच ठाण्यात केले. ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’च्या राज्य कार्याध्यक्षपदी संजय बनसोडे यांची नियुक्ती झाल्याबद्दल, समितीच्या ठाणे शहर शाखा आणि ठाण्यातील सर्व परिवर्तनवादी संघटनांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या, नागरी सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी, उपस्थितांना संबोधित करताना, राजन राजे पुढे म्हणाले की, “कुणी बुलंद आवाजात भाषणं ठोकत, आपलं प्रतिनिधित्व करणारा अमकातमका राजकीय पुढारी (जो कधि ‘जाणता राजा’ म्हणून मिरवत असतो; तर, कधि कुठलं ‘सम्राटपद’ भूषवत असतो), आपल्या समाजाचं पुनरुत्थान करेल, आपल्यावर चारही बाजुंनी होत असलेला अन्याय दूर करेल, अशी थेट ‘अवतार-संकल्पने’ला जाऊन भिडणारी आपली अंधश्रद्धा असते; जेव्हा, तो नेता बोलत एक असतो आणि करत वेगळंच असतो… तो व्यवस्थेचा लाभार्थी तर असतोच; पण, व्यवस्थेच्या बळकट पाठिंब्यावरच त्याचं ‘नेतेपद’ अवलंबून असल्यामुळे, ही ‘राजकीय-नौटंकी’ तो तहहयात करत रहतो आणि लोकं त्या ‘राजकीय-अंधश्रद्धे’ला बळी पडत रहातात. उदाहरणच द्यायचं झालं तर, ‘कंत्राटी-कामगार पद्धती’चं निर्मूलन व ‘किमान-वेतन’ सन्मानजनक झाल्याखेरीज, उत्तरेचं नोकरपेशातलं आक्रमण थोपवल्याखेरीज आणि शहरं-उपनगरांतून प्रत्येक प्रौढ व्यक्तिमागे “एक दुकान, एक मकान” धोरण राबवून धनदांडग्या गुजराथी-भाषिक भांडवलदारवर्गाला रोखल्याखेरीज… ‘मराठी-माणसां’चं (जे महागड्या शहरांमधून निवासाची व व्यवसायाची संधि उपलब्ध नसल्यामुळे, बहुतांश दूरवर रहाणारे कामगार आहेत) भलं होणं शक्यच नाही, हे एखादं गल्लीतलं शेबडं पोरं पण जाणतं…पण, मी मी म्हणणारा कुठलाही मराठी-नेता (ज्यांच्याविषयी मराठी भाबडी जनता ‘राजकीय-अंधश्रद्धा’ बाळगून असते), असल्या व्यवस्थेच्या गाभ्यातील अथवा ‘मराठी-जगण्या’च्या आसाला भिडलेल्या मुद्द्यांवर चुकूनही काम करणं तर सोडाच; साधा उच्चारही करताना दिसणार नाहीत. तेव्हा, या राजकीय-अंधश्रद्धांना जोवर आपण मराठी-माणसं ‘मूठमाती’ देत नाही व स्वतःला सक्षम बनवत नाही, तोवर मराठी-माणसांचं पिढ्यानपिढ्या नुकसान होतच रहाणार आहे, मराठी-माणसं गुलामीत ढकलली जातच रहाणार आहेत… मराठी-माणसानं स्वतःला सक्षम बनवणं म्हणजे, “व्यक्ति आधारित कमी आणि धोरण आधारित जास्त राजकारण करणं!” अशा परखड शब्दांत आपलं मनोगत व्यक्त केलं. यावेळी व्यसपीठावर, प्रमुख पाहुणे म्हणून ‘एनपीएम’चे राष्ट्रीय संयोजक डॉ. संजय मं.गो., ‘यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान’चे विश्वस्त दत्ता बाळसराफ, प्रा. मच्छिंद्र मुंडे उपस्थित होते. दरम्यान, समितीच्या ठाणे शहर शाखेचे कार्याध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार अनिल ठाणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ‘अंनिस’च्या केंद्रीय सदस्या सुशीला मुंडे यांनी केले. याप्रसंगी ‘धर्मराज्य पक्षा’चे संजय दळवी, अनिल महाडिक, नरेंद्र शिंदे, रामसकल भर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

गुरुपौर्णिमेचा श्रध्दावंत सागर – कामगारहृदयसम्राट राजन राजेंना निष्ठेचा वंदन!

भारतातील पहिलावहिला पर्यावरणस्नेही हरित-पक्ष अशी सर्वमान्य ओळख असलेला ‘धर्मराज्य पक्ष’ आणि कष्टकऱ्यांची लढाऊ संघटना असलेल्या ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे संस्थापक/अध्यक्ष मा. राजन राजे यांना गुरुपौर्णिमेनिमित्त शुभेच्छा देण्यासाठी व त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी, पक्षाच्या ठाणे कार्यालयात गुरुवार, दि. १० जुलै-२०२५ रोजी ‘धर्मराज्य पक्षा’चे कार्यकर्ते, पदाधिकारी, कामगार सदस्य आणि हितचिंतकांनी एकच गर्दी केली होती. मुसळधार पाऊस कोसळत असतानाही, “राजन राजे” या पंचाक्षरी मंत्रावर श्रध्दा असणाऱ्या निष्ठवंतांचा ओघ मात्र, आपल्या गुरुला शुभेच्छा देण्यासाठी दिवसभर सुरुच होता. कार्यकर्ते, पदाधिकारी आणि कामगार सदस्यांच्या या प्रेमाने, ‘कामगारहृदयसम्राट’ अशी ओळख असणाऱ्या मा. राजन राजे यांचे हृदयदेखील भारावून गेले होते. गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्या प्रत्येकाची, त्याच्या कुटुंबीयांची आपुलकीने विचारपूस करुन, भरभरुन आशीर्वाद देत, मा. राजन राजे यांनी, प्रस्थापित राजकीय व्यवस्था आणि धनदांडग्या-भांडवलदारी प्रवृत्तीविरोधात लढण्यासाठी, सर्वांनी एकत्र येऊन संघर्षरत झाल्याशिवाय पर्याय नसल्याचे सूतोवाच यानिमित्ताने केले. कामगार आणि शेतकरी हे भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा तर आहेतच; परंतु, त्याचबरोबर हे दोन्ही घटक म्हणजे, देशाची सामाजिक व सांस्कृतिक ओळख असल्याची जाणीव मा. राजन राजे यांनी, आपल्या निष्ठावान कार्यकर्ते, पदाधिकारी आणि कामगार सदस्यांना यावेळी करुन दिली. दरम्यान, गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून, मा. राजन राजे यांच्या अध्यक्षतेखालील, ‘सेऊ’ कामगार संघटनेच्या उपाध्यक्षपदी श्रीमती मीनल मल्ल्या यांची निवड करण्यात येऊन, कामगार संघटनेत महिलांनादेखील सन्मानाचे स्थान देण्यात येत असल्याचे, यानिमित्ताने अभिमानास्पदरित्या अधोरेखित झाले.

तिसऱ्या भाषेच्या लबाडीविरोधात एल्गार – ‘मराठीकारण’ासाठी आझाद मैदानात हुंकार!

प्राथमिक अभ्यासक्रमात तिसरी भाषा म्हणून, हिंदीभाषा सक्तीचा समावेश जरी, राज्य शासनाने तूर्तास रद्द केला असला तरी, सरकारची ही शासकीय लबाडी असून, “लबाडी अजून थांबलेली नाही, तर लढाई कशी थांबेल?” या घोषणेखाली, ‘शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समिती’चे आयोजक प्रा. डॉ. दीपक पवार यांच्या नेतृत्वाखाली सोमवार, दि. ७ जुलै-२०२५ रोजी, मुंबईच्या आझाद मैदानात एकदिवसीय धरणे आंदोलन पुकारण्यात आले होते. या आंदोलनाला ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष मा. राजन राजे, पक्षाचे प्रवक्ते श्री. समीर चव्हाण, ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे महासचिव श्री. महेशसिंग ठाकूर, काँग्रेसचे रोजगार विभाग प्रदेश संयोजक श्री. धनंजय शिंदे आणि ठाण्यातील मराठीप्रेमी वकील श्री. रशिकांत थोरवे आदी मान्यवरांसह, श्री. अविनाश सावंत, श्री. सुमित कदम, श्री. निलेश सावंत हे ‘धर्मराज्य पक्षा’चे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी पाचवीपर्यंत कोणतीही तिसरी भाषा नको, डॉ. नरेंद्र जाधव समिती तत्काळ रद्द करण्यात यावी, बालभारतीची शैक्षणिक स्वायत्तता अबाधित ठेवण्यात यावी, शिक्षणमंत्री दादा भुसे आणि SCERT संचालक राहुल रेखावार यांची हकालपट्टी करण्यात यावी, १५ मार्च २०२४चे नवीन संचमान्यता धोरण रद्द करावे, या मागण्या करण्यात आल्या. याप्रसंगी प्रा. डॉ. दीपक पवार आणि मा. राजन राजे यांच्यात महाराष्ट्रात शिक्षणाचे ‘मराठीकारण’ व मराठी भाषेच्या संरक्षण-संवर्धन चळवळीसंदर्भात सखोल चर्चा करण्यात आली.

मराठीचं अस्तित्व, महाराष्ट्रधर्माचं रक्षण – हिंदीसक्तीविरोधात वैचारिक एल्गार!

राज्यशासनाच्या हिंदीसक्तीविरोधात, मराठी अभ्यास केंद्र यांच्या वतीने, दि. २९ जून-२०२५ रोजी, मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात, शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धवजी ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा. हर्षवर्धन सपकाळ, माकपचे मा. अनिल नवले आणि ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष मा. राजन राजे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मा. राजन राजे यांनी, आपल्या ओघवत्या शैलीत आपले विचार आक्रमकपणे उपस्थितांसमोर मांडले…
———————————-
मराठी ही जगातील एकमेव निसर्ग-पर्यावरणस्नेही भाषा!
‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे यांचे मातृभाषेप्रती गौरवोद्गार…
———————————-
आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसह, ठाणे आणि नवी मुंबईसोबतच, महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या शहरांतील येऊ घातलेल्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, भारतीय जनता पक्षाने, राज्यातील हिंदी-भाषिकांना चुचकारण्याचे प्रयत्न सुरु केले असून, परप्रांतीयांची एकगठ्ठा मतं भाजपाच्या पारड्यात पाडून, मुंबई महानगरपालिकेवर सत्ता स्थापन करण्याचा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणविसांचा मनसुबा आता लपून राहिलेला नाही. मराठी माणसाचा सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय हक्क डावलण्याचे कारस्थान, दिल्ली-दरबारी शिजल्यानंतर महाराष्ट्रद्रोही भाजपाने आता, त्यासाठी कंबर कसून, आपले मराठीद्वेष्टे राजकारण सुरु केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून, राज्यभरातील शाळांमध्ये पहिलीपासूनच तिसरी भाषा म्हणून, हिंदीसक्तीचा निर्णय राज्यशासनाकडून जाहीर करण्यात आला होता. यामाध्यमातून मराठीची गळचेपी करुन, महाराष्ट्राच्या अधिकृत राजभाषेला दुय्यम दर्जा देण्याचा कट आखला जात असतानाच, महाराष्ट्रातील समविचारी पक्ष आणि संघटनांनी आक्रमक भूमिका घेत, या निर्णयाला कडाडून विरोध केला. ‘मराठी अभ्यास केंद्रा’चे निमंत्रक प्रा. डॉ. दीपक पवार यांच्या पुढाकाराने, प्राथमिक शिक्षणातील तिसऱ्या, पर्यायाने हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात मराठीप्रेमी नागरी समाज आणि राजकीय नेत्यांच्या उपस्थितीत अन्याय्य शासननिर्णयाची प्रतीकात्मक होळी आणि जाहीर सभेचे रविवार, दि. २९ जून-२०२५ रोजी, मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजन करण्यात आले होते. या सभेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, माकपचे अजित नवले आणि ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष, ज्येष्ठ कामगारनेते राजन राजे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना राजन राजे यांनी, ‘धर्मराज्य पक्षा’ची मराठीवादी भूमिका प्रकर्षाने मांडली. “संयुक्त महाराष्ट्रानंतर… आता, ‘स्वायत्त महाराष्ट्र’ ….राष्ट्रांतर्गत राष्ट्र ‘स्वायत्त महाराष्ट्र’…. ‘शिवछत्रपती-राष्ट्र’ !!!” हीच आमची महाराष्ट्र-धर्माची खरीखुरी व्याख्या असून, राजकीयदृष्ट्या आमची ताकद कमी असली तरी, मराठी भाषा आणि मराठी माणूस या दोन गोष्टींबाबत, आम्ही कमालीचे कडवट आहोत, असे त्यांनी आवर्जून सांगितले. यावेळी बोलताना राजन राजे पुढे म्हणाले की, ‘मराठी अभ्यास केंद्रा’च्या वतीने आपण सगळ्या अत्यंत उचित मागण्या मांडलेल्या आहेत. त्याला आमचा पूर्वी पाठिंबा होता, आजही आहे आणि यापुढेही राहील. आपला महत्त्वाचा मुद्दा भाषा संवर्धनाचा होता. भाषा संवर्धनाचा का? मराठी भाषेचं संवर्धन करायचं आणि कसं करायचं असे दोन मुद्दे होते. मला इथे सांगायला अभिमान वाटतोय, मराठी भाषा ही, आजच्या जागतिक-तापमानवाढीच्या पर्यावरणीय महासंकटाच्या काळात, एकमेव अशी निसर्ग आणि पर्यावर-स्नेही अशी भाषा आहे. कारण, याच भाषेत आपण “वृक्षवल्ली आम्हा सोयरी, वनचरे” असं म्हणतो. आपले सणदेखील प्राणी, वनस्पती यांच्याशीच निगडीत आहेत. मग ती नागपंचमी असेल, बैलपोळा असेल, तुळशी-विवाह असेल, वटपौर्णिमा असेल… मला नाही वाटत, असे नैसर्गिक संस्कार इतर कुठल्या संस्कृतीत असतील. त्यामुळे मराठी भाषेच्या सक्तीसोबतच, आता तिची पर्यावरणीय महासंकटांच्या पार्श्वभुमीवर ‘भक्ती’ होण्याची खरी गरज आहे. जगभरात तिची दखल घेतली गेली पाहिजे, असे गौरवोद्गार राजन राजे यांनी उपस्थितांशी संवाद साधताना काढले.
दरम्यान, आपल्या ओघवत्या शैलीत ‘धर्मराज्य पक्षा’ची भूमिका अधिक ठळकपणे विषद करताना, राजन राजे पुढे म्हणाले, मराठी भाषेवर वेगवेगळ्या भाषांचे आक्रमण होतंय, संक्रमण होतंय… ते, का आणि कशासाठी होतंय हे आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे. मुलांवरील अभ्यासाचं दडपण आपण कमी केलं पाहिजे, गणित आणि विज्ञान हे विषय अत्यंत गुंतागुंतीचे होत चाललेत. त्यातच रेशीम बागेतून आमचा इतिहासदेखील त्यात खोटेपणा घुसडवून गुंतागुंतीचा केला जातोय…खोटेपणा घुसवून इतिहास तर बदललाच; पण, आमचा भूगोलही बदलला…लडाखच्या गलवान खोऱ्यातला आमचा चार हजार चौरस किलोमीटरचा प्रदेश, चीनला दान देऊन! त्यातच आणखी तिसऱ्या भाषेचं दडपण, आमच्या मुलांच्या बालमनावर बिलकुल येता कामा नये. हिंदीचं शिक्षण घ्यायचं असेल; तर, काळजी करायची गरज नाही, सक्ती तर अजिबात करायची नाही… कारण, त्याची काळजी ‘बॉलिवूड’ घेत आहे. मुलं आपसूकच हिंदी शिकतील ना, त्यासाठी शाळेतून सक्ती कशाला? शिवाय, महाराष्ट्रात घुसलेले करोडो उत्तर भारतीय आहेतच ती काळजी घ्यातला, अशा उपरोधिकपणे त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मराठी भाषेचं बाजारपेठेतील महत्त्व घसरत चाललंय… पण, आपल्याला ही बाजारपेठेतील किंमत कशी वाढेल हे पाहणं अत्यंत गरजेचं असून, त्यासाठी भांडवली व्यवस्थेला हादरे द्यावे लागतील. हा प्रश्न फक्त हिंदीभाषिक म्हणून उत्तर-भारतीयांपुरता मर्यादित नाहीये; तर, गुजराती आणि मारवाडी यांच्या भांडवली-व्यवस्थेला हादरा देण्याचा सुद्धा आहे आणि म्हणूनच, अनेक गोष्टींसोबत कंत्राटी-कामगारपद्धतीचं उच्चाटन हे प्रामुख्याने व्हायला पाहिजे. देशासोबतच, प्रामुख्याने महाराष्ट्रासमोरील हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. या गुजराथी-भाषिकांच्या भांडवली व्यवस्थेला हादरे दिलेत, तरच तुमची मराठी भाषा आणि मराठी माणूस सुरक्षित राहील, नाहीतर त्याचं महाराष्ट्रातून उच्चाटन होईल. अनेक आंदोलनं करताना, पर्यावरणीय महासंकटाच्या संदर्भात आम्हाला सांगितलं जातं की, कोण कुठे जन्माला येतो हा अपघात असतो. कोण कोकणात जन्माला येतो तर, कोण आणखी कुठे जन्माला येतो; मग, आमच्या सगळ्यांचा महाराष्ट्रातला जन्मसुद्धा एकदाचा अपघात ठरवा आणि आम्हाला अरबी समुद्रात ढकला… नाहीतरी, आमच्या महापुरुषांचा पुतळा तुम्ही अरबी समुद्रात उभारत आहातच. मराठी तरुणतरुणींचे संसार आणि व्यवसाय फुलण्यासाठी (मुं.ठा.पु.रा.ना. म्हणजेच, मुंबई, ठाणे, पुणे, रायगड, नाशिक अन् नागपूर) शहरं मोकळी करुन घ्यावी लागतील….आपल्याला पुढे भविष्यात दरडोई प्रौढ व्यक्तिमागे “एक दुकान-एक मकान” अशी कडक धोरणं राबवावी लागतील…तरच आणि तरच महाराष्ट्रात मराठी माणसाचा बोलबाला होईल, मराठी भाषेला पुन्हा एकदा कायमस्वरुपी महत्त्व प्राप्त होईल. गुजराथी माणसं हिंदी बोलतात, गुजराथी माणसं इंग्लिश बोलायला लागले तरी, गुजरातचे महत्त्व कमी होणार नाही… कारण, भारताची संपूर्ण अर्थव्यवस्थाच त्यांच्या ताब्यात आहे. आम्ही पाचवीपासून इंग्लिश शिकलो. पण, उत्तम इंग्लिश बोलू शकतो, भाषण करू शकतो, उत्तम लिखाण करू शकतो. थोडं इकडे तिकडे होईल, काही फरक पडत नाही. सध्याच्या AI गुगल-भाषांतराच्या तंत्रज्ञानाने इंग्रजीसह विविध भाषांमधील भाषांतरं सोपी झालेली आहेत…त्यामुळे, आपण जी सगळी धोरणं घेतलेली आहेत, ती अनुपम आहेत, योग्य आहेत आणि त्याला आमचा सदैव पाठिंबा राहील, हे या व्यासपीठावरून आम्ही जाहीर करतो, अशा शब्दांत राजन राजे यांनी, आपले मनोगत व्यक्त करुन, भविष्यातील मराठी भाषेच्या आणि महाराष्ट्रधर्माच्या रक्षणासाठी तत्पर असल्याचे स्पष्टपणे अधोरेखित केले.

ठाणे महानगरपालिका प्रशासन आणि राज्य शासनाच्या भोंगळ कारभाराचा निषेध

ठाणे शहरात विकासकामांच्या नावाखाली, सर्वसामान्य करदात्या ठाणेकर नागरिकांची होणारी कुचंबणा, मेट्रो कामातील दिरंगाई, रस्त्यावरील खड्डे आणि त्यातून निर्माण होणारी प्रचंड वाहतूक कोंडी, यामुळे ठाणेकर जनता गेल्या काही वर्षांपासून हाल सहन करीत असून, याचाच निषेध करण्यासाठी ठाणे (शहर) जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने, जिल्हाध्यक्ष श्री. विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्त्वाखाली शुक्रवार, दि. २७ जून-२०२५ रोजी, घोडबंदर येथील आनंदनगर नाका, कासारवडवली येथे एकदिवसीय ‘लक्षवेधी-आंदोलन’ पुकारण्यात आले होते. या आंदोलनाला ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष मा. राजन राजे यांनी उपस्थित राहून, ठाणे महानगरपालिका प्रशासन आणि राज्य शासनाच्या भोंगळ कारभाराचा निषेध केला. गेल्या कित्येक वर्षांपासून ठाणे शहरातील मेट्रो प्रकल्प रखडलेला असल्याने, त्यामुळे घोडबंदर रस्त्यावर रोजचीच वाहतूक कोंडी निर्माण होत असते. त्यातच अत्यंत निकृष्ट दर्जाचे बांधकाम साहित्य वापरुन तयार केलेले रस्ते म्हणजे, अपघाताला निमंत्रण ठरत आहेत. या संपूर्ण कामात मोठ्याप्रमाणात भ्रष्टाचार झाल्यानेच, ठाणेकर नागरिक ‘करदाता’ असूनही, त्यांना त्यांच्या हक्काची नागरी-सुविधा मिळत नाही. याप्रकरणी ‘धर्मराज्य पक्षा’च्या माध्यमातून सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरवा करण्यात येऊनही, ठाणे महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासन अक्षरशः गेंड्याच्या कातडीसारखे बनून राहिलेले आहे. संबंधित प्रशासकीय अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि ठेकेदार यांच्या अभद्र युतीमुळेच, आज ठाणेकरांच्या वाट्याला ही वेळ आली असल्याची टीका मा. राजन राजे यांनी यावेळी केली. दरम्यान, आगामी ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत, सर्वसामान्य नागरिकांनी खऱ्याखुऱ्या ‘मतदार-राजा’ची भूमिका डोळसपणे बजावावी, असे आवाहनदेखील त्यांनी यावेळी बोलताना केले.

error: Content is protected !!