Blog

मतपत्रिकेद्वारे निवडणुकीसाठी ‘धर्मराज्य पक्ष’ आक्रमक…

, , , ,

१९४७ पूर्वी आपण स्वातंत्र्याची पहिली लढाई लढलो, आता मिळालेलं स्वातंत्र्य आपल्याला वाचवायचे असेल तर, मतपत्रिकेद्वारे मतदान करण्यावाचून आपल्याला गत्यंतर नाही. त्यानंतर, भाजपाला अगदी दोन तृतीयांश जरी मतं मिळाली तरी, आमची हरकत नाही; मात्र, अशी बनावटगिरी आणि भोंदुगिरी आम्ही यापुढे खपवून घेणार नाही. आमच्या जनमताचा अनादर चालवून न घेण्यासाठीच ‘धर्मराज्य पक्षा’ने नो “बॅलेट पेपर… नो इलेक्शन” या घोषणेखाली, स्वातंत्र्याची दुसरी लढाई सुरु केली असल्याचे उद्गार पक्षाध्यक्ष राजन राजे यांनी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना काढले. आगामी सर्व प्रकारच्या निवडणुका यापुढे ‘ईव्हीएम’ऐवजी मतपत्रिकेद्वारे घेण्यात याव्यात यासाठी, ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने जनजागृती मोहीम सुरु करण्यात आली असून, ठाणे शहराच्या विविध भागात राजन राजे यांच्या नेतृत्त्वाखाली ही मोहीम राबविण्यात येणार असल्याचे राजे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. दरम्यान पत्रकार परिषदेनंतर, लगेचच ठाणे रेल्वे स्थानक परिसरात घेण्यात आलेल्या जनजागृती मोहिमेला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत, मतपत्रिकेद्वारे निवडणुका घेण्यात याव्यात यासाठी आपले मत नोंदवले. या जनजागृती मोहिमेअंतर्गत, पक्षाच्या वतीने मतपेटी तयार करण्यात आली असून, त्यात नागरिकांकडून आपले मत कोणाला… ईव्हीए की, मतपत्रिकेला? यासाठी प्रतीकात्मक मतदान घेण्यात आले. नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालात, भाजपा-महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले. जर, त्यांचा विजय इतकाच “न भूतो” व ऐतिहासिक होता; तर, त्यांच्या तथाकथित कार्यकर्त्यांखेरीज, रस्तोरस्ती सर्वसामान्य जनतेचा उत्स्फूर्त आनंदोत्सव का दिसला नाही? असा परखड सवाल उपस्थित करुन, ही तर सर्वसामान्य जनतेच्या मतांची थेट चोरी असून, आपली फसवणूक होतेय आणि हीच फसवणूक भविष्यात पुन्हा होऊ द्यायची नसेल तर, दिलीश्वरांना आणि गुजराथी लॉबीला धडका देण्यासाठी ईव्हीएम मशीन अरबी समुद्रात फेकून देण्याशिवाय गत्यंतर नसल्याचा जोरदार घणाघात राजन राजे यांनी पत्रकार परिषदेत केला.
दरम्यान, ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे यावेळी पत्रकारांशी बोलताना पुढे म्हणाले की, यासंदर्भात आम्ही विविध राजकीय पक्षांच्या बड्या नेत्यांना भेटून, ही संकल्पना त्यांच्या गळी उतरवणार आहोत. ज्यांना पटेल ते आमच्यासोबत येतील, न पेक्षा आम्ही “एकला चालो रे” याप्रमाणे, भारतीय स्वातंत्र्याच्या आणि लोकशाहीच्या दृष्टीने जपणूक करण्यासाठी अधिक आक्रमकपणे ‘ईव्हीएम’ला प्राणपणाने विरोध करु. “नो बॅलेट पेपर… नो इलेक्शन” ही आमची घोषणा असून, मतपत्रिकेवरील मतदानाचा हक्क पुन्हा मिळवण्यासाठी, येत्या २६ जानेवारी-२०२५ रोजी, प्रजासत्ताक दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त, रात्री ठीक ९ वाजता, फक्त पाच मिनिटांसाठी सर्वांनी आपल्या घरातले अथवा कार्यालयातले लाईट्स बंद ठेवून, ‘ईव्हीएम’वरील मतदानाचा तीव्र निषेध व्यक्त करण्याचे आवाहनदेखील राजन राजे यांनी यावेळी केले. निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालय, देशातील नागरिकांची अत्यंत लाजिरवाणी व क्रूर चेष्टा करतायेत. दिलेली मतं ‘ईव्हीएम’मध्ये दीडत नव्हती म्हणून, ‘व्हीव्हीपॅट’ आणलं; परंतु, मतं मोजली कुठली? तर, ‘ईव्हीएम’मध्ये न दिसणारी. मतपत्रिका मोजणे हे, एव्हरेस्ट शिखर चढण्याएवढे किंवा एखादा भलामोठा डोंगर खोदण्याएवढे अवघड काम आहे का? असा थेट प्रश्नदेखील राजन राजे यांनी यावेळी उपस्थित केला. उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय हे, राज्यघटनेचे रक्षक असताना, ही न्यायपीठे मात्र, सत्ताधाऱ्यांच्या ताटाखालची मांजरं झालीयेत, अशी जोरदार टीकादेखील ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे यांनी शेवटी पत्रकार परिषदेत केली.

‘धर्मराज्य पक्षा’चा १३वा वर्धापनदिन उत्साहात संपन्न

भारतातील पहिलावहिला पर्यावरणवादी पक्ष अशी सर्वमान्य ओळख असलेला आणि कामगार-कष्टकरीवर्गाचा बुलंद आवाज असणाऱ्या ‘धर्मराज्य पक्षा’चा १३वा वर्धापनदिन, दि. १६ नोव्हेंबर-२०२४ रोजी, पक्षाच्या ठाणे कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी वर्धापनदिनाचे औचित्य साधून, ‘धर्मराज्य दिनदर्शिका-२०२५’ या नवीन वर्षाच्या कॅलेंडरचे प्रकाशनदेखील राजन राजे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. दरम्यान, विधानसभेच्या निवडणुका अवघ्या काही तासांवर येवून ठेपलेल्या असताना, उपस्थित पदाधिकारी-कार्यकर्त्यांना संबोधित करताना राजन राजे म्हणाले की, गेल्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये, भाजपला निसटता विजय मिळालेला असल्यामुळे, त्यांचा ‘चारशे पार’चा बार फुसका निघालेला आहे. मोदी-शहा यांच्या रासवट-राजकीय प्रवृत्तीविरोधात, भारतीय जनतेमध्ये उसळलेला जनक्षोभ उसळल्यामुळेच भाजपला त्यांची जागा दाखविण्यात काही अंशी यश आलेले असले तरी, येत्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत, महायुती सरकारला राज्यातून संपूर्ण नेस्तनाबूत करावेच लागणार आहे. ज्यापद्धतीने भारतीय जनता पक्षाने, शिवसेनेचे ४० आमदार फोडून, एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदाच्या नावाखाली आपले ‘मिंधे’ बनवून, उद्धवजींच्या पाठीत खंजीर खुपसला, हा महाराष्ट्रद्रोही आणि महाराष्ट्रधर्म बुडविणाऱ्या गद्दारांना, आपल्या ताटाखालची पोकळ सत्ताधारी मांजरं बनविणाऱ्या ‘गुजराथी-लॉबी’नेच घडविलेला हा, संतापजनक आणि अश्लाघ्य प्रकार असल्यामुळेच, निव्वळ महाराष्ट्रहित जोपासण्यासाठी व महाराष्ट्रधर्म राखण्यासाठीच, ‘धर्मराज्य पक्षा’ने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला पाठींबा दिला असल्याचे राजन राजे यांनी यावेळी स्पष्ट केले. मालवणात शिवरायांचा तकलादू पुतळा उभारुन, समस्त मराठी जनतेच्या अस्मितेच्या केलेल्या, घनघोर श्रेणीतल्या अपमानाचा सूड, येत्या विधानसभा निवडणुकांच्या निकालात, जनता-जानार्दनाकडून नक्कीच उगवला जाईल, असा प्रखर आशावाद ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे यांनी यावेळी बोलून दाखवला. दरम्यान, ‘धर्मराज्य पक्षा’च्या १३व्या वर्धापनदिनाच्या या कार्यक्रमाप्रसंगी पक्षाचे उपाध्यक्ष नितीन देशपांडे, सचिव जयेंद्र जोग, सहसचिव नरेंद्र पंडित, खजिनदार अजित सावंत, ठाणे लोकसभा अध्यक्ष राजेश गडकर, उपाध्यक्ष महेशसिंग ठाकूर, सचिन शेट्टी, ठाणे लोकसभा सचिव विनोद मोरे यांच्यासह, ‘धर्मराज्य पक्ष’प्रणित ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे उपाध्यक्ष रमाकांत नेवरेकर, सचिव समीर चव्हाण; तसेच, पक्षाचे पदाधिकारी-कार्यकर्ते आणि कामगार संघटनेचे कामगार सदस्य व कामगार युनिट प्रतिनिधी मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

वाल्मेट इंडिया प्रा. लि. (फ्लो कंट्रोल युनिट) या आस्थापनेच्या, डोंबिवली-अंबरनाथ एमआयडीसी या दोन्ही युनिटमधील, कामगार सदस्यांच्या पगारवाढीच्या त्रैवार्षिक कराराच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त

‘धर्मराज्य पक्ष’प्रणित ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’ची युनियन असलेल्या वाल्मेट इंडिया प्रा. लि. (फ्लो कंट्रोल युनिट) या आस्थापनेच्या, डोंबिवली एमआयडीसी आणि अंबरनाथ एमआयडीसी या दोन्ही युनिटमधील, कामगार सदस्यांच्या पगारवाढीच्या त्रैवार्षिक कराराच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त, डोंबिवली (पू.) येथील ब्लॉसम इंटरनॅशनल स्कूल येथे येथे, वाल्मेट युनियन युनिटच्या वतीने रविवार, दि. ६ ऑक्टोबर-२०२४ रोजी, एका स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. ‘धर्मराज्य पक्ष’ आणि ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे संस्थापक/अध्यक्ष मा. राजन राजे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. वाल्मेट इंडिया प्रा. लि. (फ्लो कंट्रोल युनिट) या आस्थापनेतील कामगारांनी, ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे सदस्यत्व स्वीकारल्यानंतर, वर्षभरातच मा. राजन राजे यांच्या सक्षम व प्रखर नेतृत्त्वाखाली, पगारवाढीचा पहिलावहिला त्रैवार्षिक करार यशस्वीपणे संपन्न झाला होता. याच कराराच्या वर्षपूर्तीनिमित्त, या दिमाखदार स्नेहसंमेलनाचे आयोजित करण्यात आले

होते. यावेळी कामगार सदस्यांच्या वतीने मा. राजन राजे यांना शाल-श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देतानाच, शिवछत्रपती महाराजांचे स्मृतिचिन्ह प्रदान करुन, त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे उपाध्यक्ष श्री. रमाकांत नेवरेकर, महासचिव श्री. महेशसिंग ठाकूर, सचिव श्री. समीर चव्हाण, धर्मराज्य पक्षाचे सहसचिव नरेंद्र पंडित आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. स्नेहसंमेलनाचा हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी, श्री. कमलेश कोल्हे, श्री. अविनाश बढे, श्री. लोटन येलवे, श्री. संदीप पवार, श्री. मिलिंद जोशी, श्री. निलेश जगताप, श्री. सुभाष देशमुख, श्री. लक्ष्मण शिंदे या युनिट कार्यकारिणी सभासदांसह, ‘वाल्मेट’च्या डोंबिवली आणि अंबरनाथ आस्थापनेतील कामगार सदस्य मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाईसाठी ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने निषेध आंदोलन

, , ,

बदलापूर येथील ‘आदर्श विद्यामंदिर’ या शाळेतील दोन चिमुरड्या बालिकांवर, शाळेचा सफाई कर्मचाऱ्याने नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर, बदलापूर शहरात मोठा जनक्षोभ उसळला होता. दरम्यान, याप्रकरणी स्थानिक पोलीस प्रशासनाने शाळा प्रशासनाला पाठीशी घालण्याचा प्रकार समोर आल्यावर, या संपूर्ण घटनाक्रमात राजकीय हस्तक्षेप झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय, बदलापूर लैंगिक अत्याचारप्रकरणी दोषींवर कारवाई करण्यासाठी चालढकल करुन, गुन्हेगारांना पाठीशी घातले गेले असल्याचे स्पष्टपणे अधोरेखित होत असल्याने, दोषींवर ताबडतोब कठोर-कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने गुरुवार दि. २२ ऑगस्ट-२०२४ रोजी, पक्षाध्यक्ष मा. राजन राजे यांच्या नेतृत्त्वाखाली, सायंकाळी ४:०० वा.पासून ते सायंकाळी ५:०० वा.पर्यंत, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ, शासकीय विश्रागृहाबाहेर निषेध आंदोलन करण्यात आले.

राजन राजे लिखित, ‘इंडिया एक आयडिया’ पुस्तिकेचं उद्धव ठाकरेंच्या हस्ते दिमाखदार प्रकाशन.

, , ,

“लोकसभा निवडणुकीनंतर, या संपूर्ण भारतातील सगळ्यात महत्त्वाची निवडणूक कुठली असेल तर, ती आता येऊ घातलेली महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आहे. लोकसभा निवडणूक तुम्ही-आम्ही पाहिली, ‘इंडिया आघाडी’ म्हणून आपण सगळे एकत्र लढलो. त्यावेळी या सगळ्यांच्या कानाजवळून तीर गेला. इलेक्टोरल बाँड, इलेक्शन कमिशन आणि इडी या सगळ्यांच्या मेहेरबानीमुळे ते फक्त धाराशाही झाले नाहीत, थोडक्यात वाचले; पण, त्यांची लाज गेली. एवढं सगळं करुन आज सगळे राजकीय तज्ज्ञ सांगतायेत की, सत्तर ते ऐंशी जागा यांनी लाटलेल्या आहेत आणि आता, ‘अबकी बार मोदी सरकार’ म्हणणाऱ्यांचा अहंकार धुळीला मिळाला. पण, ते संपलेत असं नव्हे. आपल्याला हे विसरुन चालणार नाही की, या ठाण्यातून दगाफटका झालेला आहे. ठाण्यातूनच सुरत ते गुवाहाटी असं गलिच्छ राजकारण झालेय. काळ्या पैशांतून आमदार विकत घेतले गेले. ज्याला आपण खोके सरकार म्हणतो, आजही घटनात्मकदृष्ट्या ते बेकायदेशीर आहे. तत्कालीन राज्यपालांचा कारभारही बेकायदेशीरच होता. त्यामुळे ज्या गद्दारीची सुरुवात ठाण्यातून झाली, त्या गद्दारांची तटबंदी येत्या विधानसभा निवडणुकीत ठाण्यातूनच सर्वप्रथम उध्वस्त करा!” असा जोरदार घणाघात करीत, ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे यांनी, ठाण्यातील शिवसैनिकांना साद घातली. शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या माध्यमातून महाराष्ट्रभरात ‘भगवा-सप्ताह’ आयोजित करण्यात आला आहे. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवार, दि. १० ऑगस्ट-२०२४ रोजी, सायंकाळी ७ वा. घेण्यात आलेल्या सभेत, राजन राजे बोलत होते. यावेळी आपल्या धडाकेबाज भाषणातून, उपस्थित शिवसैनिकांशी संवाद साधताना राजे पुढे म्हणाले की, आपल्या महाराष्ट्रधर्माचा आणि या संपूर्ण सज्जनशक्तीचा, या गद्दारांकडून जो काही अवमान करण्यात आलाय, तो आपल्याला विसरून चालणार नाही. यानिमित्ताने मला आपल्याला एवढंच सांगायचंय, ज्या महाशक्तीच्या इशाऱ्यावर या लोकांनी उद्धवजींचं सरकार पाडलं, त्यांना धडा शिकवायची वेळ आता आलेली आहे आणि ही संधी विधानसभेच्या निवडणुकीत आपल्याला गमावून चालणार नाही. ज्याप्रकारे महाभारतात दुर्योधन आणि दु:शासनाच्या इशाऱ्यावर शकुनी फासे टाकत होता, त्याचपद्धतीने इथे गलिच्छ राजकारणाचे फासे टाकले गेले. इथे मला आवर्जून सांगायचंय की, उद्धवजी ठाकरे महाराष्ट्रात आणि भारतात राहुलजी गांधी हे जे कोदंडधारी धनुष्य हातात घेऊन उभे आहेत, त्यांच्या धनुष्यातून असे शकुनीचे फासे फेकले जात नाहीत तर, त्यांच्या धनुष्यातून तीक्ष्ण बाण रोरावत बाहेर पडतात. ते रामबाण आहेत, अशा शब्दांत राजन राजे यांनी, शिवसैनिकांमध्ये स्फुल्लिंग चेतवले. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे यांनी, जे काही सलग १८ लेख लिहिले होते, त्या लेखांचा संग्रह असलेल्या ‘इंडिया एक आयडिया’ या पुस्तिकेचं प्रकाशन शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या शुभहस्ते दिमाखात संपन्न झाले. यावेळी गडकरी रंगयातनमध्ये उपस्थित असलेल्या हजारो शिवसैनिकांना या पुस्तिकेचं वाटप करण्यात आले. आगामी विधानसभा विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने, या पुस्तिकेतील प्रासंगिक मुद्द्यांचा संदर्भ घेत, लोकांशी बोलताना, भाषणं करताना आणि मतदारांशी संपर्क साधताना, त्यातील लेख मार्गदर्शक ठरतील, असा आशावाद राजन राजे यांनी, शेवटी बोलून दाखवला.

नवी मुंबईस्थित (Rabale TTC) ‘प्रोटेगो इंडिया’ या, जर्मन बहुराष्ट्रीय कंपनीत…’धर्मराज्य पक्ष’प्रणित “धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा”चा…अगदी टोकाच्या प्रतिकूल परिस्थितीतही कामगारांमध्ये सनसनाटी व थरार पैदा करणारा करार!

ऑईल-गॅस, औषधे, रासायनिक खते उत्पादक कंपन्यांना, ‘फ्लेम-ॲरेस्टर, ब्रीदर-व्हाॅल्व्ह’सारख्या औद्योगिक-सुरक्षा उपकरणांचा पुरवठा करणाऱ्या, नवी मुंबईस्थित (Rabale TTC) ‘प्रोटेगो इंडिया’ या, जर्मन बहुराष्ट्रीय कंपनीत…’धर्मराज्य पक्ष’प्रणित “धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा”चा…अगदी टोकाच्या प्रतिकूल परिस्थितीतही कामगारांमध्ये सनसनाटी व थरार पैदा करणारा करार!
…संबंधित कामगारवर्गामध्ये आनंदोत्साहाचं एकच उधाण!!
‘हिवा-इंडिया’च्या पाठोपाठ ‘प्रोटेगो इंडिया’ या बहुराष्ट्रीय कंपनीत, पगार/बोनस वाढीच्या त्रैवार्षिक-करारांचं ‘पंचक’ पूर्ण करणारा…’राजन राजे’कृत ‘धर्मराज्य’चा ऐतिहासिक सलग ‘पाचवा करार’…!!!
या कराराचा तपशील डोळ्याखालून घालण्यापूर्वी, हा करार कुठल्या परिस्थितीत झाला हे पहाणं, समस्त कामगारांसाठी व संबंधितांसाठी फारच उद्बोधक ठरावं…
कोविड-१९ काळाचा घंभीर परिणाम म्हणून, कंपनीची मागील चार वर्षांची उलाढाल खालीलप्रमाणे घसरणीला लागलेली असतानाच….
२०१९/२०…. रु.५० कोटी
२०२०/२१…. रु.४० करोड
२०२१/२२…. रु.३८ करोड
२०२२/२३….रु.३९ करोड
…पोलादी ‘कामगार-एकजुटी’च्या बळावर व कंपनीच्या भविष्यकालीन वाटचालीत ‘धर्मराज्य’ संघटनेच्या बिरुदाखाली कामगारवर्गाकडून मनापासून मिळू शकणार्या सकारात्मक योगदानाची व कडक शिस्तीची पुरेपूर खात्री, प्रोटेगो-व्यवस्थापनाला (MD डाॅ. लँडीस, HR/IR व्यवस्थापक श्रीमती पूजा विजन, उत्पादनविभाग प्रमुख श्री. उमेशजी पवार) असल्यामुळेच सदरहू करार संपन्न झालेला आहे….
वर्ष २०२४ ते २०२७ या त्रैवार्षिक कालावधिच्या नवीन करारान्वये….
१) दरडोई किमान थेट वेतनवाढ…. रु.१०,५००/-
२) कमाल थेट वेतनवाढ…. रु.१२,९००/-
३) सरासरी थेट वेतनवाढ…. रु.११,६००/-
(थेट वेतनवाढ म्हणजे, C.T.C. वगैरे सारख्या, अलिकडच्या काळातील “व्यवस्थापकीय फसव्या संकल्पने’नुसार फुगवून सांगितलेली बिलकूल नव्हे; तर, थेट महिनाअखेर पगाराद्वारे हातात पडणारी अधिकची रक्कम होय)
४) ‘सहा आकडी’ म्हणजेच, रु. एक लाखाहून अधिक रकमेचा वार्षिक-बोनस करारान्वये मिळणार… वर्ष २०२४-२५ मध्ये,
किमान बोनस….रु.१,०५,०००/-
कमाल बोनस….रु.१,१५,०००/-
(वर्ष २०२४-२५च्या पुढे, २०% सूत्रानुसार बोनस प्रतिवर्षी वाढत्या पगारानुसार वर्धिष्णू होत जाणार)
५) कराराद्वारे थेट हातात येणारा एकूण पगार,
किमान रु.६५,०००/-
कमाल रु.८०,०००/-
६) पगारातील ७०% वाढ ही, मूळ पगार व महागाई भत्त्यात (PF-Base मध्ये) समाविष्ट*, त्यामुळे, भरभक्कम भविष्यनिर्वाह निधी (PF), ग्रॅच्युईटी, बोनस रुपाने कामगार-कर्मचारीवर्गाचं नोकरीतील जीवनमान; तसेच, निवृत्तीपश्चात भविष्य सुरक्षित व सुखीसमाधानी राखणारा करार….
७) श्रेणीनिहाय (Grade-Wise), भरभक्कम ENTRY-LEVELS चा; तसेच, महागाई-निर्देशांकावर आधारित बदलत्या महागाईभत्त्याचा (Variable D.A.) अंतर्भाव करुन…संपूर्ण वेतनश्रेणी शास्त्रीय-पायावर (Scientific Base) रचण्यात आलेली* व त्याद्वारे, आजमितीस कामावर असलेल्या कामगारांसोबतच, भविष्यात कंपनी सेवेत येऊन नोकरीत ‘कायम’ होणाऱ्या, पुढील नवतरुण पिढ्यांचंही आर्थिक-सुरक्षिततेसह ‘आर्थिक-उन्नयन’ सुनिश्चित करण्यात आलंय….
८) बव्हंशी सगळे कामगार नोकरीत ‘कायमस्वरुपी’…. (‘कंत्राटी-कामगार’ नावाचे ‘गुलाम’ अथवा ‘नवअस्पृश्य’ कोणी कामासाठी घेतलेले नव्हेतच)
९) येऊ घातलेल्या ‘काळ्या कामगार-संहिते’च्या सावटाखाली…बेरोजगारी व अर्धरोजगारीचा, कामगार-कपातीचा ‘नंगानाच’, मौजूदा ‘भांडवली-व्यवस्थे’द्वारे देशभर चाललेला असताना, अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शिवछत्रपतींच्या राजनीतिनुसार ‘तळागाळा’तील श्रमिकांची ‘तळी’ उचलणारा, हा ऐतिहासिक करार म्हणून नोंदला जावा…
“धर्मराज्य” आणि “राजन राजे”… बस्, नाम ही काफी है!
(प्रोटेगो युनिट अध्यक्ष-ज्योतिर्लिंग घोडके, उपाध्यक्ष-संजय पालकर, सचिव-संतोष देसाई, सहसचिव-श्री. दिलीप सावर्डेकर यांच्यातर्फे प्रसारित…धन्यवाद!)

केंद्र सरकारच्या लोकशाहीविरोधी कृतीबाबत ‘धर्मराज्य पक्षा’ची ठाण्यात मूकनिदर्शने.

संसदेच्या सभागृहात राहुल गांधी, विरोधी पक्षनेत्याच्या अधिकाराने नीट पेपरफुटीप्रकरणी बोलत असताना, त्यांचा माईक बंद केला गेला. त्यावर लोकसभाध्यक्ष म्हणाले की, “माईक कोणी बंद केला हे मला माहित नाही” मग, सभागृह कोण चालवतंय? लोकसभाध्यक्ष, पंतप्रधान की, राष्ट्रपती? मुळात मुद्दा असा आहे की, ओमप्रकाश बिर्ला यांना, सगळं माहित आहे, पण ते खोटं बोलत आहेत. बिर्ला हे, राजस्थानच्या कोटा लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात. याच कोटामध्ये नीट आणि इंजिनियरिंगपासून ते आयएएस, आयपीएस तसेच, राष्ट्रीय पातळीवरील ज्या स्पर्धा परीक्षा होतात, त्याचे कोचिंग क्लास चालतात. यात करोडो रुपयांचं उत्पन्न असून, यातील पैसा राजकारणी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये वाटला जातो. म्हणूनच आमच्या डोक्यात असा संशय आहे, हा एकप्रकारचा कट तर नाहीये ना? नीटच्या पेपरफुटीची पोलखोल होऊ नये, यासाठीच राहुल गांधींचा माईक बंद केला गेला. कालपरवा गुजराथमध्ये राकेश राठोड आणि दीक्षित पटेल या दोघांना याप्रकरणी अटक करण्यात आलीय. याधीही सगळेच घोटाळेबाज गुजराथमधूनच पळून गेलेत आणि तेदेखील बहुतांश ‘मोदी’ आडनाव असलेले, त्यामुळे नीट पेपरफुटीमागे गुजराथ कनेक्शन असणारच, असा थेट घणाघाती आरोप ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे यांनी, बुधवारी संध्याकाळी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना केला. नव्याने स्थापन झालेल्या लोकसभेचे पावसाळी अधिवेशन सध्या, संसदेच्या सभागृहात सुरु आहे. विद्यमान संसदेचे हे पहिलेच अधिवेशन आहे. याच पार्श्वभूमीवर शुक्रवार, दि. २८ जून-२०२४ रोजी, संसदेचे कामकाज सुरु असताना, विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे नीट परीक्षेसंदर्भातील पेपरफुटीच्या विषयावर बोलत असताना, अचानक त्यांच्यासमोरील माईक बंद झाला. त्यावेळी विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी, “माझा माईक सुरु करा” अशी विनंती लोकसभाध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांना केली असता, “मी माईक बंद केलेला नाही, त्याचे बटन माझ्याकडे नाही” असे सांगत, त्यांची विनंती धुडकावली. मुळात, पेपरफुटीच्या मुद्द्यावर सभागृहात चर्चा झाली तर, सरकार व विरोधकांकडून एकत्रितपणे योग्य तो संदेश पोहोचेल, असा सकारात्मक आशावाद विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बोलून दाखवलेला असतानाही, त्यांचा माईक बंद केल्याच्या लोकशाहीविरोधी कृत्याच्या निषेधार्थ ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने बुधवार, दि. ३ जुलै-२०२४ रोजी, ठाणे रेल्वे स्टेशनबाहेर मूकनिदर्शने करण्यात आली. यावेळी पक्षाध्यक्ष राजन राजे यांच्यासह, ‘धर्मराज्य पक्षा’चे उपाध्यक्ष नितीन देशपांडे, पक्षाचे सहसचिव नरेंद्र पंडित, ठाणे लोकसभा उपाध्यक्ष महेशसिंग ठाकूर, ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे सचिव समीर चव्हाण, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि कामगार सदस्य मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
दरम्यान, यावेळी प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना राजन राजे पुढे म्हणाले की, “सध्या देशात जे काही सुरु आहे, ते याआधी कधीही घडलेलं नाहीये. ७० वर्षे कॉंग्रेसचे सरकार होते, त्यांच्याही काळात घोटाळे झाले असतील, पण असा घोटाळा कधीच घडलेला नाही. बिहार, तेलंगणा, आसाम या राज्यांत भाजपची राजवट असताना, असेच घोटाळे झालेले आहेत. भारतातील लाखो तरुण, अशा स्पर्धा परीक्षांमधून आपलं आयुष्य पणाला लावत असतात. एकवेळ नव्हे; तर, दोन-दोन तीन-तीनवेळादेखील ही परीक्षा द्यावी लागते. नीटचे पेपर लिक करण्यासाठी, प्रत्येक परीक्षार्थीकडून १०/१० लाख घेतले गेलेले आहेत. ओमप्रकाश बिर्ला यांच्या कोटा मतदारसंघात तर, हजारो कोटी रुपयांचा शैक्षणिक घोटाळा झालेला आहे. यावर मोदी-शहा काहीही बोलत नाहीत, त्यांना फक्त राहुल गांधींचा माईक बंद करण्यातच पुरुषार्थ वाटतोय. भारतातील तरुण आज वैफल्यग्रस्त झालाय आणि हेच भारताची लोकशाही धोक्यात असल्याचे द्योतक होय!” अशा शब्दांत राजन राजे यांनी आपल्या भावना परखडपणे मांडल्या. याप्रसंगी ‘धर्मराज्य पक्षा’चे उपाध्यक्ष नितीन देशपांडे पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, “प्रत्येक लोकसभा सदस्य हा, गौरवशाली लोकशाहीतील जनसेवक असून, इतर मार्ग अस्तित्वात असताना माईक बंद राहणे किंवा करणे व त्याबाबतीत सभापतींनी विशेष दखल घेऊन, सदर असंसदीय प्रकारास उत्तेजन न देता, ते तात्काळ बंद करणे हे लोकशाहीस अपेक्षित असताना, सभापतीपदाची अवनती केल्याचे, यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे. या माईक बंद कृतीची चौकशी न करणे म्हणजे, पुढील अगदी कोणतेही सरकार त्याचा गैरफायदा घेईल व खऱ्याखुऱ्या जनतेच्या आवाजावर; म्हणजे, लोकशाहीवर बंधने आणणे हेच होय. संसदेचे अधिवेशन चालू असताना आणि थेट प्रक्षेपणाद्वारे ते, लाखो नागरिक पाहत असताना, माईक बंद करणे व त्यावर सभापतींनी दिलेले उत्तर हे, गौरवशाली भारतीय लोकशाहीची प्रतारणा करणारे आहे. सभापती आपल्या कायदेशीर कर्तव्यात कसूर करीत असून, भविष्यात भारतीय लोकशाही आम्हांस धोकादायक दिसत असल्याचे देशपांडे यावेळी पत्रकारांशी बोलताना म्हणाले. सभापतीपदाचे पावित्र्य राखण्यासाठी, सभापतींना योग्य ती समज देऊन, गौरवशाली असणारी आपली लोकशाही वैभवशाली करावी… आणि म्हणूनच, भारतीय लोकशाही अबाधित राहण्यासाठी, ‘धर्मराज्य पक्ष’ लोकशाहीमार्गाने आपले कर्तव्य पार पाडत असल्याचे, नितीन देशपांडे यांनी शेवटी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

रबाळे एमआयडीसीतील ‘हिवा इंडिया’ कंपनीतील २४२ कामगारांना तब्बल १४,५०० रुपयांची भरघोस पगारवाढ…सलग ‘पाचवा त्रैवार्षिक-करार’!

भारतातील पहिलावहिला निसर्ग-पर्यावरणस्नेही हरित पक्ष अशी मान्यता असणारा व “Zero Tolerance Towards Corruption and Exploitation Of Man and Nature”, असं ब्रीद असणाऱ्या ‘धर्मराज्य पक्षा’चे संस्थापकीय अध्यक्ष आणि अवघ्या औद्योगिकविश्वात ‘कामगार-हृदयसम्राट’ अशी ख्याती असणारे, ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे अध्यक्ष मा. राजन राजे यांनी, अतिशय प्रतिकूल परिस्थितीत (कंपनीला गेल्या दिडदोन वर्षांपूर्वी एका व्यवहारातून फार मोठा आर्थिक-फटका बसल्यानंतरही)…देशातील प्रस्थापित निर्मम-शोषक भांडवली-व्यवस्थेच्या छाताडावर पाय ठेऊन, पुन्हा एकदा आपल्या नावलौकिकाला साजेसा असा, ‘चमत्कार’ घडवून आणला आहे!
…चमत्कार असा की, ४ कामगारघातकी कायद्यांनी बनलेल्या ‘काळ्या कामगार-संहिते’अंतर्गत समस्त कामगार-कर्मचारीवर्गावर लादल्या गेलेल्या सद्यस्थितीतल्या ‘गुलामगिरी’त… जेवढा मासिक-पगार (विशेषतः, कंत्राटी-कामगारांना म्हणजेच, ‘आधुनिक-गुलामां’ना, १२ तासाला १२ हजार पगार, इतका तुटपुंजा मिळणारा पगार विचारात घेता) हल्ली मिळत नाही; तेवढी नुसती थेट वेतनवाढ ‘हिवा-कामगारां’ना मिळालेली आहे.
नवी मुंबईस्थित रबाळे एमआयडीसीमधील ‘हिवा इंडिया’ कंपनी; ही वहातूक, बांधकाम, खाणकाम, अवजडसाहित्य-हाताळणी वगैरे क्षेत्रांसाठी टीपर्स, हाॅक-लोडर्स, काँपॅक्टर्स यासारखी ‘हायड्रॉलिक-उपकरणे’ उत्पादित करणारी जगभरातील ख्यातनाम कंपनी होय.
या हिवा-कंपनीतील कामगार सदस्यांना, या त्रैवार्षिक कराराअंतर्गत, सरासरी तब्बल १४,५०० रुपयांची भरघोस पगारवाढ मिळालेली आहे. विशेष म्हणजे, ‘CTC या व्यवस्थापकीय-फसव्या संकल्पने’वर आधारित ही पगारवाढ बनावट नसून, सर्व कामगारांना समानपद्धतीने (Flat) थेट पगारवाढ देण्यात आलेली आहे…
…विशेष बाब म्हणजे, कामगार-कर्मचारीवर्गाच्या संदर्भात, या देशातील “प्रगती-समृद्धीची गंगा उलटी वहात असताना”, प्रवाहाविरुद्ध पोहून जात प्रचलित व्यवस्थेला आव्हान देणारी व कामगारविश्वाच्या हितार्थ ‘मूलगामी-बदला’चा संदेश देणारी…आपली अदम्य-साहसी परंपरा कायम राखताना, कामगार-हृदयसम्राट राजन राजे यांनी कंपनीतील उरल्यासुरल्या, हाताच्या बोटावर मोजता येणाऱ्या कंत्राटी-कामगारांना देखील (पूर्वीच्या करारांच्या माध्यमातून, याच कंपनीतील जवळपास १५० ‘कंत्राटी-कामगार’ आजवर कायम केले गेले आहेत, हे विशेषत्वाने नमूद करतो आहोत), या कराराच्या कालावधीत ‘कायमस्वरुपी’ नोकरीत सन्मानाने प्रविष्ट करुन घेतले आहे!
मंगळवार, दि. ११ जून-२०२४ रोजी, रबाळे एमआयडीसीमधील आस्थापनेत मोठ्या जल्लोषात आणि हर्षोल्हासाच्या वातावरणात संपन्न झालेल्या या ऐतिहासिक पगारवाढीत कंपनीतील एकूण २४२ कामगारांना व भविष्यात कंपनी-सेवेत ‘कायम’ होऊ शकणाऱ्या, अशा सगळ्याच कामगारांना,
* पहिल्या वर्षी *५,८०० रुपये,
* दुसऱ्या वर्षी *४,३५० रुपये तर,
* तिसऱ्या वर्षी *४,३५० रुपये पगारवाढ देण्यात आली असून, बेसिकमध्ये ६० टक्के व इतर अलाऊन्सेसमध्ये ४० टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे.
उल्लेखनीय बाब अशी की, दिवाळी-बोनस म्हणून, कमीतकमी ८० हजार व जास्तीतजास्त १ लाखाहून अधिक रुपयांची भरघोस रक्कम कामगारांना मिळणार आहे.
अशा प्रकारचा चमत्कार, कुठलंही भक्कम राजकीय-पाठबळ सोबत नसतानाही, “राजन राजे” नावाच्या, असंख्य कामगारांचं आर्थिक-उन्नयन करणाऱ्या, ‘पंचाक्षरी-मंत्रा’ने केला आहे आणि तोच ते करु जाणे!
मरगळलेल्या औद्योगिकविश्वात सनसनाटी निर्माण करणारा, आणखी एक करार म्हणून, हा करार खचितच ओळखला जाणार आहे. या ऐतिहासिक कराराच्या माध्यमातून, ‘हिवा’च्या कामगारांना सर्व्हिस अवॉर्ड म्हणून,
पाच वर्षांसाठी ५००० रुपये,
दहा वर्षांसाठी १०,००० रुपये,
पंधरा वर्षांसाठी १५,००० रुपये,
वीस वर्षांसाठी २०,००० रुपये,
पंचवीस वर्षांसाठी २५,००० रुपये; तसेच,
पुढे एखादा कामगार २६व्या वर्षी सेवानिवृत्त होत असेल तर, त्याला २६ हजार रुपये, २७व्या वर्षी सेवानिवृत्त होणार असेल तर, २७ हजार रुपये आणि कामगार जर २७ व ३०च्या दरम्यान सेवानिवृत्त होणार असेल तर, त्या कामगाराला ३० हजारांची रक्कम देण्यात येणार असल्याचे, या करारात नमूद करण्यात आले आहे.
याव्यतिरिक्त इतर, अनेक सेवासुविधा व सेवाभत्त्यांमधेही, कराराअंतर्गत भरघोस वाढ करण्यात आलेली आल्यानं, सध्याच्या पावसाळी वातावरणात, पहिल्यावहिल्या पावसाच्या आगमनाने थुईथुई नाचणार्या मोरासारखं, समस्त हिवा-कंपनी कामगारवर्गाचं मन आनंदानं थुईथुई नाचू लागलंय!
दरम्यान, या ऐतिहासिक अशा त्रैवार्षिक करारामुळे, प्रामुख्याने भूमिपुत्र असलेल्या कामगारांच्या आयुष्यात ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चा कोंबडा खणखणीत स्वरात आरवल्यामुळे, आर्थिक समृद्धीची पहाट झालेली आहे. त्यामुळेच, “केवळ एका पिढीचंच नव्हे; तर, कामगारांच्या तमाम पुढील पिढ्यापिढ्यांचंही कल्याण साधणारा नेता”, या राजन राजे यांच्या क्रांतिकारी लौकिकावर पुनश्च नव्याने शिक्कामोर्तब झालेलं आहे.
“एका कायम कामगाराच्या जागी, तीन कंत्राटी-कामगार नेमण्याचे” कामगारघातकी ‘ट्रिपल-इंजिन’ सरकारचे धोरण असताना व संपूर्ण भारतात कामगारविरोधी धोरणांचे चक्रीवादळ गरगरत असतानाच, प्रवाहाच्या विरोधात पोहून जाण्याची किमया, पोलादी कामगार-एकजुटीच्या बळावर, राजन राजे आणि त्यांच्या अध्यक्षतेखालील ‘धर्मराज्य पक्ष’ व त्याअंतर्गत असलेल्या ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघ’ नावाच्या कामगार संघटनेने, करुन दाखवलेली आहे. काळी कामगार संहिता लादून, कायम-कुशल कामगारांना अक्षरशः ‘गुलाम’ बनविण्याचे विश्वासघातकी-घृणास्पद उद्योग सुरु असताना, राजन राजे यांच्या नेतृत्त्वाखाली संपन्न झालेला, हा ऐतिहासिक करार होय!
कराराप्रसंगी समस्त हिवा-कामगारांना संबोधित करताना राजन राजे म्हणाले की, “कामगारांसाठी ‘अमृत’ नव्हे; तर, ‘विषाक्त किंवा विषा’समान ठरलेल्या, या ‘स्वातंत्र्याच्या अमृतकाळा’त…म्हणजेच, देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे होऊन गेल्यावर व पुढील वर्षी देश प्रजासत्ताक झाल्याला ७५ वर्ष पूर्ण होत असतानाच…माझा, हिवा-कंपनीचा कामगार, या करारान्वये पगाराच्या सरासरीची ‘पंचाहत्तरी’ गाठत असावा (सरासरी पगार ७५ हजार) व स्वातंत्र्याचा ‘शतकी-महोत्सव’ साजरा होण्यापूर्वीच बोनसची ‘शंभर-हजारी’ (म्हणजेच, एक लाखाहून अधिक ‘सहा आकडी’ बोनस) मजल गाठावी…हा दुर्लभ असा, दुग्धशर्करा-योग आहे आणि तो केवळ, कामगारांच्या पोलादी एकजुटीने व संघर्षासाठी कुठल्याही त्यागाला तयार असण्याच्या दृढ निर्धारानेच घडून आला आहे…राजन राजे, हा कामगार-नेता, केवळ, निमित्तमात्र आहे!”
यादरम्यान, या कराराप्रसंगी ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे उपाध्यक्ष श्री. रमाकांत नेवरेकर, महासचिव श्री. महेशसिंग ठाकूर, सचिव श्री. समीर चव्हाण यांच्यासह, ‘हिवा इंडिया’ युनिट अध्यक्ष श्री. निलेश बारोटे, उपाध्यक्ष श्री. संतोष गाडवे, सचिव श्री. संजय उघडे, उप-सचिव श्री. विजय सोनावणे, खजिनदार श्री. दादा मोरे, उप-खजिनदार श्री. गुरुनाथ पाटील, कार्यकारिणी सदस्य श्री. विनोद बावकर त्याचप्रमाणे व्यवस्थापनाच्या वतीने ऑपरेशन्स डायरेक्टर श्री. प्रशांत मानकामे, एच. आर., बिजनेस पार्टनर आणि डायरेक्टर श्री. हेमंत सुर्वे, सिनियर मॅनेजर, एच. आर. आणि इंडस्ट्रीयल रिलेशन्स श्री. संदेश मोडक, डेप्युटी मॅनेजर, एच. आर. श्री. संतोष आग्रे आदी मान्यवर मंडळी यावेळी उपस्थित होती.

आंदोलनांची पुण्याई संपल्यामुळेच, भांडवलदारी व्यवस्था फोफावली! – राजन राजे

, , , , ,

‘‘या महाराष्ट्रात कंत्राटी-कामगारपद्धतीविरुद्ध, मी गेली २५/३० वर्षे लढतोय. ‘कंत्राटी-कामगार पद्धत’ ही गुलामगिरी तर आहेच, पण ती एकप्रकारची नव-अस्पृश्यतादेखील आहे. अस्पृश्यता म्हणजे, एका विशिष्ट समाज-घटकाने समाजाच्या दुसर्‍या मोठ्या हिश्श्याला विकासाच्या परिघाबाहेर ढकलून देत, त्याला जगण्याचा सन्मान आणि त्याला विकासाचे मूलभूत फायदे नाकारणे… ‘कंत्राटी-कामगार पद्धत’, ही नव-अस्पृश्यता यासाठी की, या प्रकारच्या अस्पृश्यतेत जन्माची जात गुंतलेली नसली; तरी, जन्माचं पोट गुंतलेलं आहे आणि तो कंत्राटी-कामगार अर्धपोटी आहे, त्याला माणुसपणाचे हक्क कामाच्या ठिकाणी नाकारलेले आहेत! मी, गेली तीन दशकं एकहाती या व्यवस्थेविरोधात ‘धर्मयुद्ध’ पुकारुन संघर्ष करतोय. लोकचळवळीकडून, डाव्या चळवळीकडून याबाबतीत काही मोठ्या त्रुटी राहून गेल्या. डाव्या विचारसरणीच्या कम्युनिस्टांनी ‘नागरी आण्विक दायित्व कायदा-123’ (Civil Nuclear Liability Bill-123) साठी बंगाल-केरळ मधील आपले ४३ खासदार संसदेत पणाला लावले; पण, भारतातील सर्वात मोठी समस्या असलेल्या ‘कंत्राटी-कामगार पद्धती’विरोधात त्यांना अंशानेही तसं काही करावसं वाटलं नाही, हे देशाचं आणि एकूणच डाव्या चळवळीचं फार मोठं दुर्दैव आहे. एकांडी शिलेदारी करीत ‘कंत्राटी-कामगार पद्धती’विरोधात आम्ही बेंबीच्या देठापासून बोंबलून-बोंबलून थकलो, मोठमोठी आंदोलनं केली, संपासारखे टोकाचे संघर्ष केले, बड्या बड्या राजकीय नेत्यांना भेटलो, सर्वपक्षीय प्रमुखांच्याही भेटीगाठी घेतल्या…पण, आमच्या हाती ‘राजकीय ताकद’ नसल्याने कंत्राटीकरणाची विषवल्ली अधिकाधिक फोफावली. मी, ‘धर्मराज्य पक्षा’ची स्थापना यासाठीच केली. कारण, चळवळीतील नेत्यांनी, कंत्राटी-पद्धतीचा विषय लावूनच धरला नाही. दुर्दैवाने, आंदोलनांची पुण्याई आता संपलेली आहे. तुम्ही आमरण उपोषणाला बसलात, चक्री-उपोषणाला बसलात; तरी, शंभर टक्के सांगतो, तुमचे प्रश्न सुटणार नाहीत; त्यासाठी, तुम्हाआम्हाला निवडणुका जिंकून विधिमंडळात, संसदेत धडक द्यावी लागेल. कष्टकऱ्यांच्या अपरिमित शोषणातून चाललेली ही संपूर्ण भांडवलदारी व्यवस्था, देशात साम्यवाद-समाजवाद आणूनच संपवावी लागेल…इतर कुठलाही राजकीय पर्याय नाही’’, अशा घणाघाती शब्दांत ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे यांनी, प्रस्थापित राजकीय व्यवस्थेविरोधात जोरदार शरसंधान साधले. महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने, मंगळवार, दि. २८ नोव्हेंबर-२०२३ रोजी, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ शेतकरी आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन करण्यात आले, त्यावेळी राजन राजे बोलत होते. केंद्र सरकारने जाहीर केलेला भाताचा हमीभाव अत्यंत तुटपुंजा असल्याने, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार, उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा धरुन, भाताला प्रति क्विंटल किमान चार हजारांचा हमीभाव देऊन, तसा कायदा करण्यात यावा, भातखरेदी केंद्रे पूर्ववत सुरु करण्यात यावीत, शेतकऱ्यांना वीजपंपासाठी मोफत वीजपुरवठा करण्यात यावा, शेतकरी-शेतमजूर व असंघटित बांधकाम कामगार आणि महिलांना, वयाच्या ६० वर्षांनंतर मासिक पाच हजारांची पेन्शन सुरु करण्यात यावी, सरकारी (जिल्हा परिषद) शाळांचे खासगीकरण थांबवून, कंत्राटी नोकरभरतीचा कायदा रद्द करण्यात यावा, आरोग्यसेवेचे खासगीकरण थांबवा आणि आरोग्यसेवेत आमूलाग्र सुधारणा करुन, सर्वसामान्य जनतेला मोफत सेवा देण्यात याव्यात, या आणि अशा अनेक मागण्यांसाठी, महाराष्ट्र राज्य किसान सभा, ठाणे जिल्हा यांच्या वतीने, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून, संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने, मंत्रालयावर धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले असून, त्याच पार्श्वभूमीवर, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ ही प्रखर निदर्शने करण्यात आली होती.

यावेळी उपस्थित आंदोलनकर्त्यांना संबोधित करताना, ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे पुढे म्हणाले की, ‘‘ज्याप्रमाणे उंदीर, सारखं काही ना काही कुरतडत असतो, तसेच या व्यवस्थेचे हात तुमच्या खिशाला, तुमच्या पैशाच्या पाकिटाला कुरतडत, ओरबाडत असतात… आणि, म्हणूनच या व्यवस्थेला मी ‘रक्तपिपासू शोषक-व्यवस्था’ म्हणतो. या व्यवस्थेचे जे सगळे बगलबच्चे आहेत, ते कसलेल्या ‘पाकिटमारा’सारखे आपल्या खिशात हात घालून असतात, आपल्याला ते कळत नाही. एकीकडे उड्डाणपूल होतायत, मॉलटॉल होतायत, विकासकामं होताना दिसतायत, पण आमच्या पगाराची पाकिटं कधी जाडजूड होताना दिसतात का?* आम्ही मात्र, अजूनही टेकड्यांवर आणि त्यांची प्रगती हिमालयाच्या उंचीएवढी. म्हणूनच, आमचं जीवन खाली-खाली घसरत चाललंय… ना आम्हाला आरोग्यसेवा परवडत, ना आम्हाला खासगी शिक्षण परवडत. शिक्षणसेवा आणि आरोग्यसेवा या खासगी असूच कशा शकतात?’’ असा प्रश्न उपस्थित करीत, राजे पुढे म्हणाले, *’’ज्याला आम्ही ‘कल्याणकारी राज्य’ म्हणावं, त्याचा अगदी उलट हा कारभार सुरु आहे. आरोग्य व शिक्षण या सकस, दर्जेदार सेवा सरकारतर्फेच पुरविल्या गेल्या पाहिजेत. जोपर्यंत, आपल्या देशात ‘कल्याणकारी राज्य’ संकल्पनेची धारणा व धोरणं होती, तोपर्यंत, मूलभूत सुविधा सर्वसामान्यांना समाधानकारक मिळत होत्या, पण आता भाजपा-नरेंद्र मोदी सरकारच्या बेलगाम खाजगीकरणाच्या, खरं म्हणजे ‘अदानी-अंबानीकरणा’च्या, गेल्या दहा वर्षांच्या लोकशाहीविरोधी कालखंडात सगळंच बदललंय. मी तुम्हाला ठामपणे सांगतो, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले काय, फडणवीस झाले काय आणि पवार झाले काय, आपले मूलभूत प्रश्न कधिही सुटणे नाही… ही व्यवस्थाच आपल्याला मुळातून आमूलाग्र बदलायला हवी. तुम्ही सुशिक्षित आहात, तुम्ही स्वतःच तपासून पाहा, अमेरिकेत-युरोपात आता, समाजवादी-साम्यवादी चळवळी जोर धरु लागल्यात. ज्याला आपण समाजवाद व साम्यवादाचा विचार म्हणतो, तो पुन्हा जोरकसपणे पुढे यायला लागलाय. आता फक्त आंदोलनापुरते सीमित न राहता, राजकीयदृष्ट्या सुशिक्षित होणे गरजेचे आहे. तुम्ही आम्ही एकाच चळवळीतील लोकं आहोत, आपण वेळीच जागे झालो नाही तर, राजकीयदृष्ट्या अज्ञानी माणसाला, या पुढारलेल्या आणि विज्ञानवादी जगात कुठलाही थारा मिळणार नाही !’’* अशा रोखठोक भाषेत, उपस्थित शेतकरी आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना राजन राजे यांनी, आवाहन केले. या आंदोलनाचे नेतृत्व महाराष्ट्र किसान सभेचे अध्यक्ष कॉ. मधुकर पाटील यांनी केले. यावेळी किसान सभेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष कॉ. आत्माराम विशे, सचिव कॉ. रमेश जाधव, कार्याध्यक्ष कॉ. विलास शेलार, कॉ. भास्कर पाटील, कॉ. जयराम चंदे, कॉ. प्रकाश काठोळे, भिवंडी तालुका अध्यक्ष कॉ. बाळाराम भोईर, शहापूर तालुका अध्यक्ष भगवान दळवी, मुरबाड तालुका अध्यक्ष कॉ. नारायण पाटोळे, कल्याण तालुका अध्यक्ष कॉ. आदम शेख आदी पदाधिकाऱ्यांसह, ‘धर्मराज्य पक्षा’चे ठाणे लोकसभा उपाध्यक्ष व ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे महासचिव महेशसिंग ठाकूर, लोकसभा उपाध्यक्ष नरेंद्र पंडित, सचिन शेट्टी, कामगार प्रतिनिधी समीर चव्हाण इ. मान्यवर यावेळी उपस्थित होते.

error: Content is protected !!