नवी मुंबईच्या महापे एमआयडीसीमधील ‘रेप्रो इंडिया लिमिटेड’ या कंपनीतील ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’च्या कामगार सभासदांचा ‘आनंद-मेळावा’ मंगळवार, दि. १४ ऑक्टोबर-२०२५ रोजी, ठाण्यातील मॉडेला चेकनाका येथील ‘आर नेस्ट’ या वातानुकुलीत सभागृहात मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाला. ‘धर्मराज्य पक्ष’ आणि ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे अध्यक्ष तथा ज्येष्ठ कामगारनेते मा. राजन राजे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. दरम्यान, पगारवाढ आणि आपल्या न्याय्य-हक्कांसाठी लोकशाही व सनदशीरमार्गाने ‘रेप्रो’च्या २८७ कामगार सभासदांनी, दि. ६ मार्च-२०१७ रोजीपासून, व्यवस्थापनाविरोधात बेमुदत संप पुकारला होता. त्यासंदर्भात, मा. औद्योगिक न्यायालय, ठाणे येथे कंपनी व्यवस्थापनाविरोधात दावा दाखल करण्यात आला होता. अखेर साडेआठ वर्षांच्या संघर्षानंतर, व्यवस्थापनाने सामंजस्याची भूमिका घेत, सर्व संपकरी कामगारांची कायदेशीर देणी, या सोहळ्याच्या निमित्ताने धनादेशाद्वारे मा. राजन राजे यांच्या शुभहस्ते अदा केली. ‘रेप्रो इंडिया लिमिटेड’ या कंपनीतील कामगार सभासदांचा कायदेशीर लढा, युनियनचे वकील के. टी. विश्वनाथन यांनी मोठ्या नेटाने लढवला आणि त्याला तेवढीच खंबीर साथ, ‘धर्मराज्य’च्या कामगार सभासदांनी दिली. या कालावधीत ‘राजन राजे’ नावाचा पंचाक्षरी मंत्र सदैव कामगारांना प्रेरणा देत राहिल्यामुळेच, तब्बल आठ-साडेआठ वर्षे, कामगार सभासद आपल्या निर्णयापासून तसूभरही ढळले नाहीत, ही सर्वात उल्लेखनीय बाब होय… याच पार्श्वभूमीवर या ‘आनंद-मेळाव्या’चे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला व्यवस्थापनाच्या वतीने, कंपनीच्या लीगल हेड व कंपनी सेक्रेटरी अलमिना शेख आणि कंपनीचे अकाऊंटंट समीर चौगुले उपस्थित होते. यावेळी ‘रेप्रो’च्या कामगारांचे कुटुंबीयदेखील आवर्जून उपस्थित होते. याच सोहळ्याचे औचित्य साधून, मा. राजन राजे यांनी उपस्थित कामगारांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे मन;पूर्वक अभिनंदन करुन, त्यांच्या भविष्यातील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. “सध्या देशातील कामगार-कष्टकरीवर्गाची अवस्था अत्यंत बिकट असून, केंद्र सरकारपुरस्कृत येऊ घातलेल्या काळ्या कामगार-संहितेमुळे, भविष्यात कामगारांना आपल्या हक्कासाठी संप, उपोषण आणि आंदोलने करता येणार नाहीत. ज्या भाजपला तुम्ही निवडून दिलंत, त्याच पक्षाने कामगार देशोधडीला लावायला घेतलाय.
तुम्हाला गणेशोत्सव-नवरात्रौत्सव, दहीहंड्या, जातीय व धार्मिक विद्वेष यातच गुंतवून ठेवत, सर्वसामान्य जनतेचा बुद्धिभेद करण्याचे कारस्थान, भारतीय जनता पक्षाने हाती घेतलेले आहे… वेळीच सावध झाला नाहीत; तर, तुमच्या पुढच्या पिढीचे भविष्य अंधकारमय होणार हे निश्चित!” अशा परखड शब्दांत मा. राजन राजे यांनी, उपस्थित कामगारांना मर्गदर्शन केले. दरम्यान, याप्रसंगी ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे महासचिव महेशसिंग ठाकूर, उपाध्यक्ष रमाकांत नेवरेकर, सचिव समीर चव्हाण आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

मराठी माणसाच्या अस्तित्वाचा प्रश्न फक्त, मुंबई आणि उपनगरांपुरता नाहीये; तर, मुंबईसह ठाणे, नाशिक, रायगड, पुणे, नागपूर या सगळ्या शहरांमधून तुम्ही-आम्ही सगळेजण विस्थापित झालेलो आहोत किंवा हळूहळू होत आहोत. करोना-काळात वन्यप्राण्यांनी जशा आपापल्या जागा माणसांकडून पुन्हा ताब्यात घेतल्या होत्या; तशा, आता महाराष्ट्रातल्या सामान्य मराठी-माणसांच्या ताब्यात देण्यासाठी, धनदांडग्यांकडून ‘जागा रिकाम्या’ करुन घ्याव्या लागतील!
गिरणी कामगार आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हक्काच्या परवडणाऱ्या घरांसंदर्भात, दि. १२ ऑक्टोबर-२०२५ रोजी, आयोजित केलेल्या ‘घर हक्क परिषदे’च्या मेळाव्यात राजन राजे उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना ते पुढे म्हणाले की, “बारा तासांसाठी बारा हजार रुपये” अशी महाराष्ट्रातील भयानक परिस्थिती आहे. मुंबई सोडाच, ठाण्यासारख्या शहरात पाचशे-साडेपाचशे चौरसफुटांचा वन बीएचके फ्लॅट, ५० लाखांत येतो. नोकरी साधारण पस्तीस वर्षांची धरली तरी, कामगाराचा सगळा पगार दरमहा हप्ते फेडण्यात गेल्यावरच, त्याची नोकरी संपताना तो फ्लॅट खऱ्याअर्थाने त्याच्या मालकीचा होणार… या काळात तुम्ही भोजन-खानपान, कपडालत्ता, मुलाचं शिक्षण-आरोग्य कशाकशावर म्हणून खर्च करायचा नाही, हौसमौज तर विसरुनच जा…फक्त, एका हाताने पगार घ्यायचा आणि दुसऱ्या हाताने तो बँकेत भरायचा आणि शहरातल्या प्रदूषित हवेवर घरात कोंडून जगायचं… आहे शक्य कोटीतलं हे भयंकर आक्रित? एवढी केविलवाणी परिस्थिती मराठी सामान्य जनांची आपल्याच महाराष्ट्रात झालीच कशी??
…तेव्हा, लक्षात ठेवा, सुदैवाने वर्ष १९७७-७८च्या राज्यघटनेतील ४४व्या घटनादुरुस्तीमुळे सुदैवाने ‘संपत्तीचा-अधिकार’, हा आता ‘मूलभूत-अधिकार’ राहिलेला नाही. तो आता फक्त, कायदेशीर-अधिकार आहे; म्हणूनच कायदा करुनच ‘संपत्तीचं फेरवाटप’ व्हायला हवं! त्याकामी, शहरं-उपनगरांमधून प्रत्येक प्रौढ व्यक्तिमागे “एक मकान, एक दुकान”असा कायदा व्हायला हवा…तो झाल्याशिवाय, गगनाला भिडलेले फ्लॅटस् आणि दुकानांचे भाव पत्त्याच्या बंगल्यासारखे कोसळणार नाहीत!
भारताचे सरन्यायाधीश मा. भूषण गवई यांच्यावर, सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरात, मनुवादी विचारसरणीच्या वकिलाकडून झालेल्या बूटफेकीच्या भ्याड हल्ल्याचा प्रयत्न केल्याच्या निषेधार्थ, ठाणे शहरातील कोर्टनाका परिसरातील, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ, ‘संविधानप्रिय समता-मूलक समाज’ आणि आंबेडकरी चळवळीतील नेते व कार्यकर्त्यांकडून गुरुवार, दि. ९ ऑक्टोबर-२०२५ रोजी, आंदोलन पुकारण्यात आले होते. या निषेध आंदोलनात ‘धर्मराज्य पक्षा’चे सहसचिव श्री. नरेंद्र पंडित, पक्षाचे प्रवक्ते तथा ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे सचिव श्री. समीर चव्हाण, ‘धर्मराज्य पक्षा’चे प्रसिद्धीप्रमुख श्री. संजय दळवी आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मनुवादी मानसिकता तसेच, जातीयवादी कृत्ये करणाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या, प्रस्थापित ब्राह्मणी व राजकीय व्यवस्थेचा जाहीर निषेध करण्यात आला. “भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, यांसारख्या जात्यंध आणि धर्मांध शक्तींविरोधात, देशातील बहुजन समाजाने एकत्र येऊन प्राणपणाने लढा दिल्याशिवाय, अशा प्रवृत्ती नष्ट होणार नाहीत. त्यासाठी, सामाजिक-राजकीय-जातीय मतभेद विस
‘धर्मराज्य पक्ष’प्रणित ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’ची युनियन असलेल्या, ‘वालमेट फ्लो-कंट्रोल प्रा. लि.’ या कंपनीतील, डोंबिवली आणि अंबरनाथ या युनिटमधील कामगार सभासदांनी, दसरा व विजयादशमीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाप्रसंगी, ‘धर्मराज्य पक्ष’ आणि ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे अध्यक्ष मा. राजन राजे यांनी उपस्थित राहून, सर्व कामगार सभासद तसेच, कंपनी व्यवस्थापनास दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी श्री सत्यनारायणाच्या पूजेचे मा. राजन राजे यांनी, मनोभावे दर्शन घेतले. दरम्यान, ‘वालमेट फ्लो-कंट्रोल प्रा. लि.’ या कंपनीच्या व्यवस्थापनाच्या वतीने, मा. राजन राजे यांचे शाल-श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी, ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे उपाध्यक्ष रमाकांत नेवरेकर, महासचिव श्री. महेशसिंग ठाकूर व सचिव श्री. समीर चव्हाण उपस्थित होते.



आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसह, ठाणे आणि नवी मुंबईसोबतच, महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या शहरांतील येऊ घातलेल्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, भारतीय जनता पक्षाने, राज्यातील हिंदी-भाषिकांना चुचकारण्याचे प्रयत्न सुरु केले असून, परप्रांतीयांची एकगठ्ठा मतं भाजपाच्या पारड्यात पाडून, मुंबई महानगरपालिकेवर सत्ता स्थापन करण्याचा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणविसांचा मनसुबा आता लपून राहिलेला नाही. मराठी माणसाचा सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय हक्क डावलण्याचे कारस्थान, दिल्ली-दरबारी शिजल्यानंतर महाराष्ट्रद्रोही भाजपाने आता, त्यासाठी कंबर कसून, आपले मराठीद्वेष्टे राजकारण सुरु केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून, राज्यभरातील शाळांमध्ये पहिलीपासूनच तिसरी भाषा म्हणून, हिंदीसक्तीचा निर्णय राज्यशासनाकडून जाहीर करण्यात आला होता. यामाध्यमातून मराठीची गळचेपी करुन, महाराष्ट्राच्या अधिकृत राजभाषेला दुय्यम दर्जा देण्याचा कट आखला जात असतानाच, महाराष्ट्रातील समविचारी पक्ष आणि संघटनांनी आक्रमक भूमिका घेत, या निर्णयाला कडाडून विरोध केला. ‘मराठी अभ्यास केंद्रा’चे निमंत्रक प्रा. डॉ. दीपक पवार यांच्या पुढाकाराने, प्राथमिक शिक्षणातील तिसऱ्या, पर्यायाने हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात मराठीप्रेमी नागरी समाज आणि राजकीय नेत्यांच्या उपस्थितीत अन्याय्य शासननिर्णयाची प्रतीकात्मक होळी आणि जाहीर सभेचे रविवार, दि. २९ जून-२०२५ रोजी, मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजन करण्यात आले होते. या सभेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, माकपचे अजित नवले आणि ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष, ज्येष्ठ कामगारनेते राजन राजे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना राजन राजे यांनी, ‘धर्मराज्य पक्षा’ची मराठीवादी भूमिका प्रकर्षाने मांडली. “संयुक्त महाराष्ट्रानंतर… आता, ‘स्वायत्त महाराष्ट्र’ ….राष्ट्रांतर्गत राष्ट्र ‘स्वायत्त महाराष्ट्र’…. ‘शिवछत्रपती-राष्ट्र’ !!!” हीच आमची महाराष्ट्र-धर्माची खरीखुरी व्याख्या असून, राजकीयदृष्ट्या आमची ताकद कमी असली तरी, मराठी भाषा आणि मराठी माणूस या दोन गोष्टींबाबत, आम्ही कमालीचे कडवट आहोत, असे त्यांनी आवर्जून सांगितले. यावेळी बोलताना राजन राजे पुढे म्हणाले की, ‘मराठी अभ्यास केंद्रा’च्या वतीने आपण सगळ्या अत्यंत उचित मागण्या मांडलेल्या आहेत. त्याला आमचा पूर्वी पाठिंबा होता, आजही आहे आणि यापुढेही राहील. आपला महत्त्वाचा मुद्दा भाषा संवर्धनाचा होता. भाषा संवर्धनाचा का? मराठी भाषेचं संवर्धन करायचं आणि कसं करायचं असे दोन मुद्दे होते. मला इथे सांगायला अभिमान वाटतोय, मराठी भाषा ही, आजच्या जागतिक-तापमानवाढीच्या पर्यावरणीय महासंकटाच्या काळात, एकमेव अशी निसर्ग आणि पर्यावर-स्नेही अशी भाषा आहे. कारण, याच भाषेत आपण “वृक्षवल्ली आम्हा सोयरी, वनचरे” असं म्हणतो. आपले सणदेखील प्राणी, वनस्पती यांच्याशीच निगडीत आहेत. मग ती नागपंचमी असेल, बैलपोळा असेल, तुळशी-विवाह असेल, वटपौर्णिमा असेल… मला नाही वाटत, असे नैसर्गिक संस्कार इतर कुठल्या संस्कृतीत असतील. त्यामुळे मराठी भाषेच्या सक्तीसोबतच, आता तिची पर्यावरणीय महासंकटांच्या पार्श्वभुमीवर ‘भक्ती’ होण्याची खरी गरज आहे. जगभरात तिची दखल घेतली गेली पाहिजे, असे गौरवोद्गार राजन राजे यांनी उपस्थितांशी संवाद साधताना काढले.