रोहा, धाटाव एमआयडीसी | रविवार, दि. २८.१२.२०२५ : कामगारांच्या बैठकीत राजन राजेंचे सडेतोड प्रतिपादन

कामगारांनी ‘कामगारधर्म’ जोपासून, आपलं आत्मभान जागं केलं; तर, शोषक-अन्यायी भांडवली व्यवस्थेला शरण येण्यावाचून गत्यंतर नाही!
रोह्यातील कामगारांच्या बैठकीत, राजन राजे यांचे रोखठोक प्रतिपादन…
“कामगारांना आपली ताकद कळली पाहिजे… कारण, “कामगार हाच खरा संपत्तीचा निर्माता आहे”. कामगारांनी ‘कामगारधर्म’ पाळला, एकमेकांशी स्नेहभाव जोपासून आपलं आत्मभान जागं केलं; तर, प्रस्थापित रक्तपिपासू-निर्मम-शोषक भांडवली-व्यवस्थेला (Vampire-State System) शरण येण्यावाचून गत्यंतर राहणार नाही!” असे रोखठोक प्रतिपादन ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष तथा ज्येष्ठ कामगार-नेते राजन राजे यांनी रायगड जिल्ह्यातील रोहा इथे केले. रविवार, दि. २८ डिसेंबर-२०२५ रोजी, रोहा तालुक्यातील धाटाव एमआयडीसीमधील, ‘डीआरटी अँथिया’ आणि ‘अंशुल इनोवेटिव्ह’ या कंपनीतील कामगार सभासदांच्या बैठकीत संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, “केंद्र सरकारने ४४ कामगार कायद्यांच्या जागी ११ ने भाग धेऊन ४ काळे कामगार कायदे आणले आणि कामगारांच्या जगण्याचाच अवघा ‘भागाकार’ केलाय!त्याविरोधात आम्ही आवाज उठवतोय.
महाराष्ट्रातील मराठी-तरुण मोठ्याप्रमाणात नासवला गेलाय…तो क्रिकेटच्या, धर्मसंप्रदायांच्या आणि संध्याकाळच्या बाटलीच्या नादाने…एका बाटलीने आमची शिवबा-संतांची मराठी-संस्कृती बाटली, ही दुर्दैवी अवस्था आहे! यापुढे आपण काय खाणार, कुठलं पाणी पिणार, कुठल्या हवेत श्वास घेणार, हे हाताच्या बोटावर मोजता येतील एवढे मोजकेच भांडवलदार ठरवणार आहेत. लोकशाही ही फक्त, आता मतांपुरती मर्यादित राहिलीय…आपल्या कामाच्या ठिकाणी लोकशाही असते का? तिथे तुमच्यावर सीसीटीव्हीचा वॉच असतो. आयुष्यातला सर्वात मोठा काळ आपण कारखान्यात घालवतो, याला कारण आपणच आहोत… कारण, आपण झोपलेलो आहोत. आपली कामगार संघटना ही, फक्त तुमचे पगार-बोनस याकरिता अजिबात नाही; तर, तुमची मानसिकता बदलण्यासाठी आणि तुम्हाला गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी आहे. भांडवलदारशाहीची कंत्राटी-कामगार पद्धत, तुम्हाला गुलामगिरीत ढकलण्यासाठी, चारही बाजूंनी पराकोटीचे प्रयत्न करत असते; पण, एकमेव ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघ’ या आपल्या युनियनने ती प्राणपणाने मोडीत काढलीय. क्रिकेटचे सामने, सार्वजनिक महापूजा, गणेशोत्सव, भंडारे आणि निवडणुकांच्या काळात येणारा दारुचा पूर आणि मटणाच्या मेजवान्या यातून तुम्हाला आधी बाहेर पडावं लागेल… याच चंगळवादी गुलामी अवस्थेतून बाहेर काढण्यासाठी आपली संघटना आहे. जर कामगारांनी एकजुटीने काम करणं नाकारलं; तर, मग सरकारने कुठलेही व कितीही काळे-कायदे आणले तरी, ही सगळी भांडवली-व्यवस्था कोलमडून पडेल…त्यासाठीच, कामगारांना आपली ताकद कळली पाहिजे!” अशा शब्दांत राजन राजे यांनी, कामगारांमध्ये स्फुल्लिंग चेतवले. दरम्यान, रोह्याच्या धाटाव एमआयडीसीमधील, ‘डीआरटी अँथिया’ या बहुराष्ट्रीय रासायनिक कंपनीतील, ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे सदस्य असलेल्या कामगारांना, कंपनी व्यवस्थापननाने तुटपुंज्या वेतनमानावर गेल्या अनेक वर्षांपासून झुलवत ठेवले आहे. त्यांना सन्मानजनक वेतन मिळावे, कामगारांचे हक्क मिळावेत यासाठी ‘डीआरटी अँथिया’चे कामगार संघर्ष करीत असून, त्याच पार्श्वभूमीवर या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. “माझ्या रोह्यातल्या कामगारांनी जर एकजूट दाखवली तर, कंपनी व्यवस्थापनाला शरण आणल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. तुम्हाला बजावून ठेवतो, हा संघर्ष तुम्ही शंभर टक्के जिंकणार आहात… १५ हजारांच्या खाली एक रुपयाचीही पगारवाढ मी घेणार नाही आणि तीदेखील थेट पगारवाढ, सी.टी.सी. नव्हे…C.T.C. ही फक्त एकप्रकारची ‘चहा पावडर’ आहे, एवढंच आम्हाला माहिती आहे, त्याचा आमच्या पगाराशी संबंध नाही… तुमच्या आतले दिवे पेटले की, बाहेरच्या सूर्याची तुम्हाला गरजच भासणार नाही!” अशा ज्वलंत वक्तव्यांनी राजन राजे यांनी, कामगारांना त्यांच्या अस्तित्वाची आणि ताकदीची जाणीव आपल्या भाषणाच्या शेवटी करुन दिली. याप्रसंगी ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे सचिव समीर चव्हाण, ‘धर्मराज्य पक्षा’चे ठाणे लोकसभा अध्यक्ष राजेश गडकर, पक्षाचे माहिती अधिकार कक्षप्रमुख अनिल महाडिक, प्रसिद्धीप्रमुख संजय दळवी या पदाधिकाऱ्यांसह, ‘डीआरटी अँथिया’चे युनिट कमिटी अध्यक्ष प्रमोद जंगम, उपाध्यक्ष निखील वरणकर, सेक्रेटरी मयूर कोंडे, कार्यकारिणी सदस्य विनोद मगर, रामदास साखीळकर तसेच, कंपनीतील कामगार सभासद मोठ्यासंख्येने उपस्थित होते. यावेळी धाटाव एमआयडीसीमधील ‘अंशुल इनोवेटिव्ह’ या कंपनीच्या कामगार सदस्यांचीही लक्षणीय उपस्थिती होती.
No comments
Leave Your Comment

error: Content is protected !!