कामगार सन्मानाने जगला तरच, कारखाना जगेल…अन्यथा नव्हे!
रोह्यातील विजयी सभेत, राजन राजे यांचा ‘भांडवली-व्यवस्थे’वर घणाघाती प्रहार….
“मराठी माणसाचं नाव घेऊन पक्ष काढायचे, राजकारण करायचं आणि त्याच मराठी कामगाराची फसवणूक करायची, त्याचे संप फोडायचे! मराठी-माणसांच्या हातात दगड द्यायचे, कामगारांना एकमेकांची डोकी फोडायला लावायची…आणि, तेच ‘दगड’ गोळा करत, त्या मराठी-नेत्यांनी आपले ‘गड’ बांधायचे… हा उफराटा उत्पात, महाराष्ट्राच्या कामगारविश्वात अजून कितीकाळ चालणार आहे? मराठी माणसांनो, म्हणजे अर्थातच मराठी-कामगारांनो, लक्षात घ्या की, “फेकला तर दगड, रचला तर गड” याच मराठी-मराठी करणाऱ्या नेत्यांनी, “कारखाना जगला तरच, कामगार जगेल’ अशी मालकवर्गाची ‘दलाली’ करणारी आणि आपल्याच श्रमिक मराठी-जमातीला मुळातूनच भेदरवून टाकणारी घोषणा दिली…कुठल्याही जातिवंत नेत्याने आपल्या समाजाला, विजिगिषू प्रेरणा व चेतना द्यायची असते; अकारण घाबरवून सोडायचं नसतं. या देशातला एक ‘बाबासाहेब’, शेकडो-हजारो वर्षे गुलामीत खितपत पडलेल्या पददलित ‘मृण्मय’ मनांना ‘चिन्मय’ करण्यासाठी आपलं आयुष्य पणाला लावतो; तर, आमचे मराठी राजकारणी ‘दुकानदारसाहेब’, आपल्याचं जमातीचं खच्चीकरण करु पहातात? ‘भाषा आणि भाषण’ यावरील अंगभूत प्रभुत्वाचा गैरवापर करत, मराठी-कामगाराला ‘भांडवली-गुलामी’कडे कौशल्याने ढकलत नेणाऱ्या घृणास्पद राजकीय-डावपेचांना छेद देण्यासाठीच, “कामगार सन्मानाने जगला; तरच, कारखाना जगेल…अन्यथा नव्हे”, ही गेली चार दशकं आम्ही भीमगर्जना करत आलोत! ‘धर्मराज्य’सारखं ‘सहकार्य आणि संघर्ष’ इतर कोणी करु शकत नाही…तेव्हा, यातलं नेमकं काय निवडायचं; ते संबंधित व्यवस्थापनांनी व भांडवलदारांनी ठरवावं!” असं रोखठोक प्रतिपादन ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष तथा ज्येष्ठ कामगार नेते राजन राजे यांनी, रोह्यात केले.
धाटाव एमआयडीसीमधील, ‘डीआरटी अँथिया अरोमा केमिकल्स प्रा. लि.’ या कंपनीतील ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’च्या कामगार सभासदांना नुकतीच ऐतिहासिक स्वरुपाची रु. १४ हजारांची ‘थेट’ (‘C.T.C.’सारखी तद्दन फसवी पगारवाढ नव्हे) पगारवाढ त्रैवार्षिक कराराद्वारे करण्यात आली, त्याप्रसंगी, झालेल्या विजयी-सभेत राजन राजे बोलत होते.
यावेळी, ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे सचिव समीर चव्हाण, ‘धर्मराज्य पक्षा’चे सचिव नरेंद्र पंडित, पक्षाचे खजिनदार अजित सावंत, प्रसिद्धीप्रमुख संजय दळवी, श्रमिक संघाचे नेते शिशिर ढवळे, आंबेडकरी विचारवंत आनंदा होवाळ, सामाजिक कार्यकर्ते ॲड. नाना अहिरे, कामगार प्रतिनिधी निरंजन म्हात्रे, दिलीप राणे, विनोद गायकवाड आदी मान्यवरांसह, ‘डीआरटी अँथिया’ कंपनीतील कामगार सभासद मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
दरम्यान, आपल्या तासाभराच्या तडाखेबंद भाषणात कामगारांना संबोधित करताना राजन राजे यांनी सुरुवातीलाच, १४ हजारांची भरघोस पगारवाढ झाल्याबद्दल उपस्थित कामगारांचे अभिनंदन केले. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले, “माझ्या प्रत्येक कामगाराचे आर्थिक-उन्नयन व्हावे; यासाठी, मी गेली चार दशकं ‘भांडवली-व्यवस्थे’शी संघर्ष करत आलोय. कामगारांनी ‘श्रीमंत’ जरुर व्हायला हवं; पण, त्याआधी ‘नितीमंत’ होणे गरजेचे आहे… “आधी नितीमंत, मगच श्रीमंत! ‘फोडा आणि झोडा’, या कपटी-दुष्ट भांडवली-नितीने, कृत्रिमरित्या निर्माण केलेले… ‘कंत्राटी / कायम / मुदतबंद कामगार’ वगैरे कामगारभेदांना ‘फाट्यावर मारुन’, प्रत्येक कामगाराच्या जगण्यात श्रीकृष्णाचं आनंदी ‘गोकुळ’ निर्माण व्हावं, ही माझी जीवन-प्रेरणा आहे… तुमच्या डोळ्यांच्या पापण्यांवर बांधलेलं समाधानाचे-सुरक्षिततेचं ‘पैंजण’; हेच, माझ्या जगण्याचं ‘इंधन’ आहे…ते कुठलं वनस्पती तेल अथवा आखाती खनिज तेलस्वरुप इंधन नव्हे! संकटं सर्वांवर येतात, ती सज्जनांवर येतात; तशी दुर्जनांवरही येतात…पण, शंभर संकटं कोसळूनही सज्जन ठाम उभा राहू शकतो: पण, एखाद्या संकटानेही, आतून पोकळ डोलारा असलेला दुर्जन कोसळू शकतो, हे लक्षात ठेवा. ‘आळशी-उद्धट कामगार राष्ट्राला भार…नितीमान कामगार राष्ट्राला आधार’, ही आपली ‘धर्मराज्य-घोषणा’ कधिही विसरु नका; आपल्या चुकीच्या वागणुकीमुळे कधी संकट ओढवून घेऊ नका…संकटं यायचीच असतील, तर त्यांना त्यांच्याच पावलांनी येऊ द्यात…तुमची पाऊले वा तुमच्या पादुका, त्यांना बहाल करु नका”, असा वडीलकीचा सल्लादेखील राजन राजे यांनी यावेळी कामगारांना दिला.
राजन राजे भाषणाचा ओघ पुढे न थांबता सुरुच होता….”डाॅ दत्ता सामंतांसारखे लढवय्ये कामगार-नेते आणि ‘FERA’सारखे कायदे होते; तोपर्यंतच, बहुराष्ट्रीय कंपन्यांमधून कामगारांना उत्तम वेतन-सुविधा मिळत होत्या; पण, आता बहुराष्ट्रीय कंपन्याच कामगारांचं शोषण करण्यात व काॅर्पोरेटीय क्षेत्रात ‘कंपनी-दहशतवाद’ (Corporate Terrorism) माजवण्यात आघाडीवर आहेत. निष्ठावंत कामगार हा, कामगार चळवळीच्या ‘पायाचा दगड’ असतो, दहीहंडीच्या सगळ्यात खालच्या थरासारखा संघटनेचा तो मजबूत आधार असतो; जोडीला शिस्त व एकजुटीचं कसोशीनं पालन करा. वाढीव पगाराचा पैसा अत्यंत खुबीने कुटुंबाच्या हितासाठीच वापरा, नवीन चकचकित चारचाकी गाडी घेतल्यादिवसापासूनच म्हातारी व्हायला सुरुवात होते; म्हणून त्यावर पैसे उडवण्यापेक्षा आपली ‘काळी आई’ असणाऱ्या जमिनीत पैसे गुंतवा, योग्य ठिकाणी विचारपूर्वक गुंतवणूक करा…पुढील काळाचा भरवसा नाही; म्हणून भविष्यातील संकटे वा संघर्षासाठी पगारातले ठराविक पैसे राष्ट्रीयीकृत बँकेतील मुदतठेवीत राखून ठेवा, चंगळवादाच्या नादी लागू नका…येणाऱ्या कठीण काळाची पाऊले वेळीच ओळखा, यश मिळवणे सोपं असतं; पण, ते टिकवणे आणि वाढवणे कठीण असते. केवळ, तुमचंच नव्हे; तर, रोह्यातील प्रत्येक कामगाराचं चांगभलं व्हायलाच पाहिजे, या दिशेने प्रयत्नरत रहा…फक्त पगार/बोनस वाढीसाठी नव्हे; तर, कामगारांच्या सन्मानासाठी ‘राजन राजे’ हा ‘पंचाक्षरी-मंत्र’ आहे, हे विसरु नका!” अशा शब्दांत धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजन राजे यांनी कामगारांमध्ये स्फुल्लिंग चेतवले.
…या आनंदोत्सवा समयी, ‘डीआरटी अँथिया’च्या कामगारांनी, संपूर्ण रोहा शहर आणि धाटाव एमआयडीसीतून बाईक रॅली काढत, राजन राजे यांचे अभूतपूर्व स्वागत केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युनिट अध्यक्ष प्रमोद जंगम, उपाध्यक्ष निखिल वरणकर, सेक्रेटरी मयुर कोंडे, कार्यकारिणी सदस्य विनोद मगर आणि रामदास साखीळकर आदी पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
“आयोध्येत राम मंदिर बांधणारे; पण, कामगार-चळवळीला स्मशानभूमी दाखवणारे मोदी-शहा सरकार हे, श्रमिकांच्या विरोधात असून, कामगारांच्या जीवावर आणि त्यांच्या रक्ताघामाच्या लुटीवर, मस्तवाल झालेल्या धनदांडग्या-भांडवलदारी मालकशाहीचे तारणहार असलेल्या भारतीय जनता पक्षाला रान मोकळं सोडू नका… यातून केंद्र सरकारचा, श्रमिकवर्गाला उध्वस्त करण्याचा कुटील डाव आखला गेलाय!” असा जोरदार घणाघात ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष तथा ज्येष्ठ कामगार-नेते राजन राजे यांनी, ठाण्यात केला. केंद्र सरकारने लागू केलेल्या चार काळ्या कामगार कायद्यांचा निषेध करण्यासाठी, ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ गुरुवार, दि. १२ फेब्रुवारी-२०२६ रोजी जोरदार निदर्शने करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. तीन शेतकरी काळ्या कायद्यांप्रमाणेच, केंद्र सरकारने या चार काळ्या कामगार कायद्यांच्या माध्यमातून श्रमिकवर्गाचं शोषण करण्याचा कट रचला असून, कामगारवर्ग व कामगार-चळवळ उध्वस्त करु पाहणाऱ्या मोदी-शहा सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठीच ही निदर्शने करण्यात आली असल्याचे स्पष्ट प्रतिपादन राजन राजे यांनी यावेळी केले. एकीकडे नव-अस्पृश्यता म्हणून ओळखली जाणारी कंत्राटी-कामगारपद्धत ही, कामगारांना गुलामगिरीत ढकलत असतानाच, या चार काळ्या कामगार कायद्यांमुळे अवघे कामगारजगत उध्वस्त होणार आहे. त्यामुळे काळ्या कामगार कायद्यांचा नायनाट, हीच कामगारांच्या स्वातंत्र्याची पहाट ठरणार असून, काँग्रेसचे नेते व इंडिया-आघाडीचे अध्वर्यू राहुल गांधी यांनीदेखील या चार काळ्या कामगार कायद्याला कडाडून विरोध केला आहे. काँग्रेस सत्तेवर येताच, हे काळे कायदे रद्द करु, असं वक्तव्य राहुल गांधी यांनी नुकतेच लोकसभेत केले होते, त्याबद्दलही राजन राजे यांनी, आपल्या भाषणात राहुल गांधींचे जाहीर कौतुक करुन, त्यांचे आभार मानले. दरम्यान, आपल्या तडाखेबंद भाषणात राजे यांनी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा खरपूस समाचार घेतला. अहिल्यानगर येथील सुपा-पारनेर औद्योगिक वसाहतीत बोलताना त्यांनी, कारखानदारांची बाजू घेत, “उद्योगजकांना त्रास देणाऱ्यांना ठोकून काढू” अशी भाषा वापरली होती. दावोस परिषदेच्या माध्यमातून, महाराष्ट्रात कोट्यवधी डॉलर्सचे उद्योगधंदे आणण्याची भाषा करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळातच, मराठी कामगार देशोधडीला लागला, त्यांच्याच सरकारने कंत्राटीपद्धतीमुळे नोकऱ्या असुरक्षित केल्या, महाराष्ट्रातील उद्योग याच भाजपने राज्याबाहेर नेले आणि तेच मुख्यमंत्री, उद्योजकांची बाजू घेत, आपल्या न्याय्य-हक्कांसाठी आंदोलन करणाऱ्यांना ठोकून काढण्याची भाषा करतात, हे संतापजनक असल्याचा हल्लाबोल राजन राजे यांनी यावेळी केला. याप्रसंगी डावे पक्ष आणि कामगार संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी संपाला पाठिंबा देण्यासाठी, ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने, ही जोरदार निदर्शने करण्यात आली होती. यावेळी कॉ. शिशिर ढवळे, कॉ. उदय चौधरी, समाजवादी नेते जगदीश खैरालिया, संजय मंगला गोपाळ, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या वंदना शिंदे, ‘धर्मराज्य पक्षा’चे सचिव नरेंद्र पंडित, प्रवक्ते समीर चव्हाण, ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे महासचिव महेशसिंग ठाकूर, प्रसिद्धीप्रमुख संजय दळवी आदी पदाधिकाऱ्यांसह, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स यांच्यासोबतच विविध क्षेत्रातील कंत्राटी व कायम कामगार तसेच, ‘धर्मराज्य पक्ष’ आणि ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे कामगार सभासद मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या ७८व्या पुण्यतिथीनिमित्त, धर्मराज्य पक्ष, ठाणे काँग्रेस आणि मूलभूत अधिकार संघर्ष समिती यांच्या संयुक्त विद्यमाने, दि. ३० जानेवारी-२०२६ रोजी, ठाण्यातील मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या सभागृहात ‘हुतात्मा दिन’ साजरा करण्यात आला. ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत डॉ. विवेक कोरडे व डाव्या चळवळीतील विद्रोही नेते कॉ. आनंद तेलतुंबडे यांनी, “गांधीहत्या आणि आपण…” या विषयावर आपले मनोगत व्यक्त करुन, उपस्थितांना मार्गदर्शन केले. ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष तथा ज्येष्ठ कामगार नेते मा. राजन राजे यांच्या पुढाकाराने संपन्न झालेल्या या कार्यक्रमासाठी काँग्रेसच्या अर्थ विभागाचे अध्यक्ष विश्वास उटगी, आयटकचे काॅ. उदय चौधरी, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नेत्या वंदनाताई शिंदे, मूलभूत अधिकार संघर्ष समितीचे डॉ. जावळे, समाजवादी नेते संजय मं. गो., जगदीश खैरालिया, आंबेडकरवादी विचारवंत आनंदा होवाळ, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ठाणे उपजिल्हाप्रमुख प्रदीप शिंदे, काँग्रेसचे ठाणे जिल्हा सरचिटणीस महेंद्र म्हात्रे, काँग्रेस ठाणे सचिव राहुल पिंगळे, ॲड. नाना अहिरे आदी मान्यवर मंडळींची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान, कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ. विवेक कोरडे यांनी, आपल्या भाषणात उपस्थितांना संबोधित करताना, गांधीहत्येमागील कारणे विषद करताना तथाकथित हिंदुत्ववादी व आरएसएसवर एकच शरसंधान साधले. महात्मा गांधी हे कधीही देशाची फाळणी व्हावी या विचाराचे नव्हते, उलट त्यांचा देशाच्या फाळणीला विरोधच होता. ज्या आरएसएसने कधीही राष्ट्रध्वज स्विकारला नाही, त्यांचाच द्विराष्ट्रवादाला पाठिंबा होता आणि विनायक दामोदर सावरकर हे त्यांचे म्होरके होते. गांधीजी हे हिंदू-मुस्लिम ऐक्याचे एकमेव पुरस्कर्ते होते, अहिंसेचे पुजारी होते, अशा शब्दांत डॉ. विवेक कोरडे यांनी आपले परखड मत मांडले. यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात कॉ. आनंद तेलतुंबडे यांनीदेखील आरएसएसच्या विचारांवर एकच प्रहार केला. सद्यस्थितीत भारतातील जी राजकीय व सामाजिकव्यवस्था ढासळलेली आहे, त्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाची जातीयवादी विचारसरणीच कारणीभूत असल्याचे स्पष्ट करुन ते पुढे म्हणाले की, “पुढील एकहजार वर्षे तरी भारतातून भाजपची सत्ता जाणार नाही, जोपर्यंत ते ठरवत नाहीत”, असा अपप्रचार होत असला; तरी त्यात बिलकूल तथ्य नाही…आपण सारे एकत्र आलो आणि त्यांचं सगळं साम्राज्य, हे फक्त आणि फक्त, खोटारडेपणाच्याच पायावर उभारलेलं आहे, हे ध्यानात घेऊन त्यावर एकत्रित व सनदशीर मार्गाने प्रहार केला; तर, ते सहजशक्य आहे. आज त्यांनी सर्व शासकीय व प्रशासकीय व्यवस्था ताब्यात घेतलेल्या आहेत. राजन राजे यांच्यासारखी जी काही हाताच्या बोटावर काम करणारी मोजकी माणसं समाजात आहेत, त्यामुळेच भाजप-आरएसएससारख्या धर्मविद्वेशीशक्तींवर काही प्रमाणात का होईना, अंकुश आहे यातच समाधान असल्याचे प्रतिपादन कॉ. आनंद तेलतुंबडे यांनी यावेळी केले. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे, विद्रोही शाहीर संभाजी भगत यांनी खास उपस्थिती लावून आपल्या पहाडी आवाजात कविता सादर केळी. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॉ. शिरीष ढवळे यांनी केले तर, कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

मराठी भाषेचे संवर्धन आणि मराठी समाजाच्या हितासाठी, ‘मराठी अभ्यास केंद्रा’चे डॉ. दीपक पवार हे, गेल्या अनेक वर्षांपासून आंदोलन व चळवळींच्या माध्यमातून, प्रस्थापित मराठीद्वेष्ट्या-महाराष्ट्रद्रोही, भांडवली-राजकीय व्यवस्थेविरोधात, लोकशाही आणि सनदशीरमार्गाने संघर्ष करीत आहेत. याचाच पुढचा भाग म्हणून, डॉ. दीपक पवार यांनी, दि. २ जानेवारी-२०२६ रोजी, ‘मुंबई मराठी पत्रकार संघ’ येथे पत्रकार परिषद घेऊन, “मराठीनामा आणि मराठीकारण” ही चळवळ नव्या जोमाने सुरु करण्यामागची आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांच्या या भूमिकेचे ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष तथा ज्येष्ठ कामगार-नेते मा. राजन राजे यांनी समर्थन करुन, त्यांना आपला जाहीर पाठींबा व्यक्त केला आहे. त्याबाबतचे एक पत्रदेखील डॉ. दीपक पवार यांना लिहिले आहे. “महाराष्ट्रात निर्माण झालेली संपत्तीच, महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या मुळावर येऊन, त्याला त्याच्या हक्काच्या महाराष्ट्रात दुय्यम नागरिकत्वाचा शाप भोगावा लागत आहे!” असे रोखठोक प्रतिपादन करुन, “आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या निमित्ताने, आपण तयार केलेला ‘मराठीनामा’ हा केवळ एका निवडणुकीपुरता जाहीरनामा न राहता, तो मराठी माणसाच्या अस्मितेचा आणि सर्वांगीण प्रगतीचा महामार्ग व्हावा!” अशी अपेक्षा व्यक्त करीत, मा. राजन राजे यांनी आपल्या पत्रातून, डॉ. दीपक पवार यांना, त्यांच्या पुढील वाटचालीस व ‘मराठीकारणा’च्या चळवळीस अनेकोत्तम शुभेच्छा आणि संपूर्ण पाठींबा जाहीर केला आहे.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या ७७व्या पुण्यतिथीनिमित्त, येत्या ३० जानेवारी-२०२६ रोजी, ‘धर्मराज्य पक्ष’प्रणित ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’च्या वतीने, ठाणे शहरातील मराठी ग्रंथ संग्रहालय येथे सायंकाळी ४ ते रात्रौ ८ वा.पर्यंत, महात्मा गांधींच्या जीवन-चरित्रावर एका परिसंवादाचे आयोजन करण्यात आले असून, ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष तथा ज्येष्ठ कामगार-नेते मा. राजन राजे या कार्यक्रमाचे आयोजक आहेत. याच अनुषंगाने ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत डॉ. विवेक कोर्डे व डॉ. सुरेश पंडित यांनी, पक्षाच्या ठाणे कार्यालयात मा. राजन राजे यांची सदिच्छा भेट घेऊन, नियोजित कार्यक्रमासंदर्भात सविस्तर चर्चा केली. परिसंवादाच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने, ‘धर्मराज्य पक्षा’च्या कार्यालयापासून ते मराठी ग्रंथ संग्रहालयापर्यंत महात्मा गांधींच्या विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने एक फेरी काढण्यात येणार असल्याचे यावेळी चर्चेअंती ठरविण्यात आले. या कार्यक्रमात डॉ. विवेक कोर्डे हे, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जीवन-चरित्रावर मार्गदर्शन करणार आहेत. दरम्यान, या बैठकीला ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे उपाध्यक्ष श्री. रमाकांत नेवरेकर, ‘धर्मराज्य पक्षा’चे सचिव श्री. नरेंद्र पंडित आणि प्रवक्ते श्री. समीर चव्हाण उपस्थित होते.
मराठी अस्मितेचा बुलंद आवाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, मुंबईतील प्रतिष्ठीत वर्तमानपत्र असलेल्या ‘वृत्तमानस’ या दैनिकाचे मुद्रक/प्रकाशक श्री. भूषण म्हात्रे यांनी, ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष तथा ज्येष्ठ कामगार-नेते मा. राजन राजे यांची, पक्षाच्या ठाणे कार्यालयात सोमवार, दि. २९ डिसेंबर-२०२५ रोजी सदिच्छा भेट घेतली. यावेळी ‘वृत्तमानस’च्या नवीन वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन मा. राजन राजे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी श्री. भूषण म्हात्रे यांनी, ‘धर्मराज्य पक्ष’ आणि ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’च्या माध्यमातून जो लढा लोकशाही व सनदशीरमार्गाने सुरु आहे, त्याचे कौतुक केले. ‘धर्मराज्य पक्षा’चे कार्य हे, इतर कोणत्याही राजकीय पक्षापेक्षा अधिक प्रामाणिक आणि ठोस असते, म्हणूनच ‘वृत्तमानस’ दैनिकात त्याबाबतची बातमी प्रकाशित करताना आम्हाला जास्त आनंद होतो, असे त्यांनी प्रांजळपणे कबूल केले. याच अनुषंगाने देशातील राजकीय सद्यस्थिती, भाजपप्रणीत केंद्र सरकारकडून लादण्यात आलेले काळे कामगार कायदे. देशातील काढता धार्मिकविद्वेष, मराठी माणसाची होणारी गळचेपी, भूमिपुत्र शेतकऱ्यांवरील अन्याय, यावर मा. राजन राजे यांनी सविस्तर विवेचन केले. याप्रसंगी ‘धर्मराज्य पक्षा’चे प्रवक्ते श्री. समीर चव्हाण, पक्षाचे सचिव नरेंद्र पंडित, पक्षाचे ठाणे लोकसभा उपाध्यक्ष श्री. महेशसिंग ठाकूर, प्रसिद्धीप्रमुख श्री. संजय दळवी आणि ‘वृत्तमानस’चे जाहिरात विभागातील कर्मचारी श्री. राजेंद्र शिर्के आदी मंडळी उपस्थित होती.
“कामगारांना आपली ताकद कळली पाहिजे… कारण, “कामगार हाच खरा संपत्तीचा निर्माता आहे”. कामगारांनी ‘कामगारधर्म’ पाळला, एकमेकांशी स्नेहभाव जोपासून आपलं आत्मभान जागं केलं; तर, प्रस्थापित रक्तपिपासू-निर्मम-शोषक भांडवली-व्यवस्थेला (Vampire-State System) शरण येण्यावाचून गत्यंतर राहणार नाही!” असे रोखठोक प्रतिपादन ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष तथा ज्येष्ठ कामगार-नेते राजन राजे यांनी रायगड जिल्ह्यातील रोहा इथे केले. रविवार, दि. २८ डिसेंबर-२०२५ रोजी, रोहा तालुक्यातील धाटाव एमआयडीसीमधील, ‘डीआरटी अँथिया’ आणि ‘अंशुल इनोवेटिव्ह’ या कंपनीतील कामगार सभासदांच्या बैठकीत संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, “केंद्र सरकारने ४४ कामगार कायद्यांच्या जागी ११ ने भाग धेऊन ४ काळे कामगार कायदे आणले आणि कामगारांच्या जगण्याचाच अवघा ‘भागाकार’ केलाय!त्याविरोधात आम्ही आवाज उठवतोय.
मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात, मराठी शाळा बंद करण्याचा सपाटा महाराष्ट्र शासनाने सुरु केला असून, मराठी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्याचे कारण देत, मराठी शाळा बंद करुन, त्याठिकाणची जागा भांडवलदारांच्या घशात घालण्याचा मराठीद्रोही कट रचला जात आहे. याच पार्श्वभूमीवर भ्रष्ट पालिका प्रशासन, भुमाफिया आणि कणाहीन राजकारणी यांच्या अभद्र युतीविरोधात, मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉ. दीपक पवार यांच्या नेतृत्वाखाली, मराठी शाळांसाठी दि. १८ डिसेंबर-२०२५ रोजी, हुतात्मा स्मारक ते मुंबई महानगरपालिका मुख्यालय अशा मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष तथा ज्येष्ठ कामगार-नेते राजन राजे, मुंबई विद्यापिठाचे माजी कुलगुरु भालचंद्र मुणगेकर, मराठी अभिनेत्री चिन्मयी सुमित, कम्युनिष्ट नेते प्रकाश रेड्डी, डाव्या चळवळीतील विचारवंत अजित अभ्यंकर, पत्रकार युवराज मोहिते, पर्यावरणवादी कार्यकर्त्या प्रणाली राऊत, काँग्रेसच्या रोजगार विभागाचे महाराष्ट्र अध्यक्ष धनंजय शिंदे, मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख, महाराष्ट्र संरक्षण संघटनेचे विवेक भुरके आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती. याप्रसंगी मराठी शाळांसाठीच्या या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारुन दडपशाही सुरु केली. याचसंदर्भात प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना राजन राजे म्हणाले, “मराठी शाळांचे हे आंदोलन राजकीय नव्हे; तर, सामाजिक आहे. पोलिसांनी नियम व न्यायालयीन आदेश इतर राजकीय मंडळींनाही दाखवावेत, तेव्हा कुठे पोलिसांची दंडुकेशाही पेंड खायला जाते?” असा थेट प्रश्न उपस्थित करुन ते पुढे म्हणाले, “पोलीस-कर्मचारी जरी मराठी असले; तरी, बहुतांशी आयपीएस-आयएएस अधिकारी हे अमराठी असतात. त्यांच्याच आदेशावर खालचे लोक चालतात. पोलिसांच्या या फक्त काठ्याच नाहीत तर, भैय्यांच्या लाठ्या असून, खालच्या बाजूला परप्रांतीय भैय्ये आणि वरच्या बाजूला गुजराथी भांडवलदार यांच्यात मराठी माणसाचं सॅन्डविच झालेलं आहे… त्याच विरोधातला हा एल्गार आहे, तो रोखण्याचा प्रयत्न कशाला? काही हिंसक घडणार आहे का? असा सवाल विचारुन, रोखठोक प्रतिपादन केलं. दरम्यान, हुतात्मा स्मारक ते मुंबई महापालिका मुख्यालयापर्यंतच्या या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर, काहीवेळ कार्यकर्ते व पोलिसांमध्ये वाद निर्माण झाला. मोर्चा मुंबई महापालिका मुख्यालयाजवळ पोहोचल्यावर, पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेत, आझाद मैदानात आणल्यावर मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. यावेळी सर्व वक्त्यांनी मराठी शाळा वाचविण्यासाठी शेवटपर्यंत एकत्रितपणे संघर्ष करण्याचा निर्धार व्यक्त केला. या मोर्चाला ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष तथा ज्येष्ठ कामगार-नेते राजन राजे यांच्यासह, पक्षाचे प्रवक्ते समीर चव्हाण, सचिव नरेंद्र पंडित, प्रसिद्धीप्रमुख संजय दळवी, पक्षाचे माहिती अधिकार कक्षप्रमुख अनिल महाडिक, अविनाश सावंत, सचिन उगले आदी पदाधिकारी आणि ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे कामगार सदस्य उपस्थित होते.

