अंनिसच्या ३७व्या वर्धापन दिनी विवेक, विज्ञान आणि सामाजिक परिवर्तनाचा जागर ठाणे शहर शाखेच्या कार्यक्रमात राजन राजे व कुमार केतकर प्रमुख वक्ते; लोकशाहीर संभाजी भगत यांचा जाहीर सत्कार

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ३७व्या वर्धापन दिनानिमित्त महा. अंनिस – ठाणे शहर शाखेच्या वतीने रविवार, दि. ०९ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता आयोजित विशेष कार्यक्रमास धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष मा. राजन राजे तसेच ज्येष्ठ पत्रकार व माजी खासदार कुमार केतकर प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.
या कार्यक्रमात १५व्या विद्रोही साहित्य-संस्कृती संमेलनाचे सातारा येथील नवनिर्वाचित अध्यक्ष व लोकशाहीर साथी संभाजी भगत यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
अंधश्रद्धा निर्मूलन, वैज्ञानिक दृष्टिकोन, विवेकनिष्ठ विचार आणि सामाजिक परिवर्तनाच्या व्यापक चळवळीच्या संदर्भात मान्यवरांनी मार्गदर्शन केले. यावेळी साहित्य, कला, लोकशाही आणि सामाजिक परिवर्तन यांचा परस्परांशी असलेला संबंध यावरही विचारमंथन झाले.
मा. राजन राजे यांच्या भाषणातील महत्त्वपूर्ण विचार —
“ज्ञान-विद्वत्ता, व्यासंग आणि अनुभवसिद्धता…याचा अर्थाअर्थी ‘आकलनशक्ति’शी थेट सबंध असतोच असं नाही! आकलन, ही काव्यप्रतिभेसारखी किंवा अन्य तर्हेच्या प्रतिभेच्या आविष्कारासारखी जन्मसिद्ध असते का…ते तुमच्या DNA मध्येच वसलेलं असतं का; नक्की समीकरण मांडणं, तसं कठीण आहे…पण, ‘आकलन’ म्हणजे, एरव्ही आपण समजतो तसं इंग्रजीत Assessment नव्हे; तर, Comprehension होय. जगण्याच्या प्रश्नांची यशस्वीरित्या सोडवणूक करण्यासाठी लागणारा अत्यावश्यक घटक! समज, समजूतदारपणा, व्यवहारज्ञान, परिस्थितीचं भान आणि ज्ञान…हे त्याच्या जवळपास जाणारे अर्थ. समस्यांचं मुळातून आकलन झाल्याखेरीज त्यातून सुटकेचा मार्ग कसा समजणार?
कार्ल मार्क्स, म. गांधी हे राजकारण-समाजकारणाच्या दृष्टीकोनातून…गौतम बुद्धांपासून सुरुवात केली की, आपली संत ज्ञानेश्वर, एकनाथ, नामदेव, जनाबाई, तुकाराम, तुकडोजीमहाराज, गाडगेबाबा ही सगळी आध्यात्मिक अंगाने आणि शिवछत्रपती महाराज, पं. नेहरु, डाॅ . बाबासाहेब आंबेडकर हे राजकीय व प्रशासकीय अशा दोन्ही दृष्टीकोनातून अत्युच्च दर्जाचं ‘आकलन’ असलेली, सर्वसाधारणपणे आपल्याला माहीत असलेली मंडळी!
बाबासाहेबांनी काळाची पावलं अचूक ओळखून आपल्या जमातीला “शिका, संघटीत व्हा, संघर्ष करा”, असा अमोघ संदेश दिला!
स्वातंत्र्य-चळवळ उभारताना….बहुजनांना, महिलांना, वंचित वर्गाला समाविष्ट करुन घेतलं आणि जशी आजच्या -जेन-झी’ने जुलमी सत्ताधाऱ्यांबाबतची जनतेच्या मनातील भिती नष्ट केली; हे त्यांच्या उत्तुंग आकलनाचेच दर्शन होय.
कार्ल मार्क्स, अतिशय महत्त्वपूर्ण प्रतिपादन करुन गेला, “The philosophers have only interpreted the world, in various ways; the point is to change it.” तेव्हा, मला कधि कधि वाटतं की, लंडनच्या हायगेट स्मशानभूमीत असंच अवचित कधि उठून कार्ल मार्क्सने, आमच्या पोरसवदा वयाच्या ‘संभाजी भगत’च्या डोक्यावर हात ठेवला असेल आणि त्यातूनच, ‘शाहीर संभाजी भगत’ घडला असणार…कारण, हाच “जग बदलण्याचा” विचार तहहयात त्यांचा पिच्छा पुरवतोय!
पण, कार्ल मार्क्स फक्त, जाणिवेच्या पातळीवर काम करत होता; तर, गौतम बुद्ध, म. गांधी जाणिवा आणि नेणिवा अशा दोन्ही पातळ्यांवर काम करु पहात होते आणि तोच मार्ग शाहीर संभाजी भगतांनी अनुसरलेला दिसतो. सांस्कृतिक-कार्यक्रमांच्या माध्यमातून समाजाच्या ‘जाणिवा आणि नेणिवा’ विकसित केल्याखेरीज कल्याणकारी ‘शाश्वत-परिवर्तन’ होणार नाही; ही त्यांची ठाम असलेली धारणा, अगदी योग्यच होय!
माझी तशी त्यांच्याशी ओळख अलिकडचीच…साधारण वर्षभरापूर्वी निवर्तलेले, कामगार-चळवळीचे आधारस्तंभ, काॅ. संजय संघवींचे, यांचे ते जिगरी दोस्त…हे ही आम्हाला अलीकडेच समजलेलं! बायबलमध्ये म्हटलंय… “By their fruit you will recognize them…Do people pick grapes from thornbushes, or figs from thistles?” अगदी तसंच, “त्यांच्या कृती आणि त्यांच्या अस्तित्वाचे भवतीच्या समाजावर झालेले परिणाम” पाहिल्यानंतर…अगदी थोडक्या परिचयात, मी त्यांच्या एकूण व्यक्तित्वाचा धांडोळा घेऊ शकलो, ते माझ्यासाठी, एकूणच समाजासाठी व कामगार-चळवळीसाठी खूपच महत्त्वाचं आहे.
शाहीर संभाजी भगतांच्या हातून समाजात कल्याणकारी परिवर्तन होवो आणि त्याकामी आमचं ‘योगदान’ खर्ची पडो…हीच, साताऱ्याच्या ‘विद्रोही साहित्य-संमेलनाच्या अध्यक्षपदी’ निवड झाल्याबद्दलच्या सत्कार-समारंभाप्रसंगी आमची मनोकामना, धन्यवाद… ॥ जय महाराष्ट्र, जय हिंद ॥”
अंधश्रद्धेच्या अंधारातून विवेकाच्या प्रकाशाकडे, अज्ञानातून विज्ञानाकडे आणि अन्यायातून समता-न्यायाच्या दिशेने समाजाला घेऊन जाण्याचा हा लढा अधिक व्यापक करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
No comments
Leave Your Comment

error: Content is protected !!