Day: June 22, 2026

रोहा येथील अंशुल इनोव्हेटिव्ह कंपनीतील संपाला ७३ दिवस पूर्ण; धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघाकडून संपकरी कामगारांना आर्थिक मदत

रोहा (जि. रायगड) : मे. अंशुल इनोव्हेटिव्ह केमिस्ट्री प्रा. लि. येथील कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी आदरणीय राजन राजे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या बेमुदत संपाला आज ७३ दिवस पूर्ण झाले. गेल्या ७३ दिवसांपासून सुरू असलेला हा संघर्ष कामगारांच्या एकजुटीने आणि निर्धाराने सुरू असून, या पार्श्वभूमीवर “धर्मराज्य पक्ष” प्रणित धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघाच्या वतीने संपकरी कामगारांना आर्थिक व नैतिक पाठिंबा देण्यात आला.

संपकरी कामगारांना संघर्षकाळात आर्थिक आधार मिळावा या उद्देशाने महासंघाच्या वतीने प्रत्येक संपकरी कामगारास ₹१०,००० ची आर्थिक मदत धनादेशाच्या स्वरूपात प्रदान करण्यात आली. ही मदत केवळ आर्थिक स्वरूपाची नसून, संपूर्ण धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघ आणि त्याच्याशी संलग्न विविध युनिटमधील कामगार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, हा विश्वासही यानिमित्ताने व्यक्त करण्यात आला.

या प्रसंगी महासंघाचे महासचिव महेशसिंग ठाकूर, उपाध्यक्ष रमाकांत नेवरेकर, सचिव समीर चव्हाण, खजिनदार अजित सावंत, सुल्झर पंप युनिटचे सरचिटणीस विनोद मोरे, निरंजन म्हात्रे, जगन्नाथ सलगर, महेश पवार तसेच विविध युनिटमधील पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. वॉलमेट फ्लो कंट्रोल युनिटमधील कमलेश कोल्हे, अविनाश बडे, लोटन येलवे, निलेश घरत, दिनेश पाटील यांच्यासह हिवा इंडिया नितीन भुरे, विनोद गायकवाड, दिपक जाधव, हेमंत कदम, इडिकॉनचे राजेश कदम, राकेश म्हात्रे आणि अन्य कंपन्यांतील कमिटी सदस्यांनीही उपस्थिती लावली.

कार्यक्रमादरम्यान विविध युनिटमधील पदाधिकाऱ्यांनी व कामगार प्रतिनिधींनी आपली मनोगते व्यक्त केली. सुल्झर पंप युनिटचे सरचिटणीस विनोद मोरे यांनी आपल्या भाषणात, “धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघ केवळ कामगारांचा पगार वाढवण्यासाठीच कार्य करत नाही, तर प्रत्येक कामगाराने स्वाभिमानाने आणि सन्मानाने जगावे यासाठी संघटना सातत्याने कार्यरत आहे,” असे मत व्यक्त केले.

यावेळी महासचिव महेशसिंग ठाकूर यांनी संघटनेच्या कार्यपद्धतीविषयी माहिती देताना सांगितले की, करार झालेल्या कामगारांकडून संघटनेकडे जमा होणारे निधीचे स्रोत हे केवळ कामगारांच्या हितासाठी आणि कल्याणासाठीच वापरले जातात. संपकरी कामगारांना देण्यात आलेली आर्थिक मदत हे त्याचेच एक उदाहरण असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच अंशुल इनोव्हेटिव्हमधील संघर्ष हा केवळ एका कंपनीपुरता मर्यादित नसून संपूर्ण कामगार चळवळीशी संबंधित असल्याने महासंघाच्या सर्व युनिट्सनी संपकरी कामगारांचे मनोबल उंचावण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.

उपस्थित सदस्यांनी संपकरी कामगारांनी गेल्या ७३ दिवसांत दाखविलेली जिद्द, चिकाटी आणि एकजूट यांचे कौतुक केले. कामगारांच्या प्रलंबित मागण्यांबाबत व्यवस्थापन आणि कामगार प्रतिनिधी यांच्यात सकारात्मक चर्चा होऊन लवकरच समाधानकारक तोडगा निघावा, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. संपकरी कामगार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी परस्परांशी संवाद साधत संघर्षाच्या पुढील वाटचालीबाबत चर्चा केली.

“मा. राजन राजे (भाई) यांचे मार्गदर्शन, त्यांचा प्रदीर्घ संघटनात्मक अनुभव, विषयांचा सखोल अभ्यास आणि कामगार चळवळीप्रती असलेली निष्ठावान बांधिलकी यांमुळे या संघर्षाला योग्य दिशा व बळ मिळत आहे. त्यांच्या नेतृत्वावर असलेल्या दृढ विश्वासाच्या बळावर कामगार आपले न्याय्य ध्येय निश्चितपणे साध्य करतील, याबाबत कोणतीही शंका नाही.”

दरम्यान, संबंधित मागण्यांवर न्याय्य तोडगा निघेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका संपकरी कामगारांनी पुन्हा एकदा स्पष्ट केली. संघर्ष कितीही काळ चालला तरी अंतिम विजय कामगारांचाच होईल, असा विश्वास यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.

error: Content is protected !!