आज धर्मराज्य पक्षासह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), तसेच विविध सामाजिक, कामगार, विद्यार्थी व राजकीय संघटनांच्या संयुक्त वतीने ठाणे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत केंद्र सरकारला निवेदन सादर करण्यात आले.NEET पेपरफुटी प्रकरणामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यावर निर्माण झालेल्या संकटाबाबत, तसेच लेह-लडाखच्या पर्यावरण संरक्षणासाठी दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या जनआंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने तातडीने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी या निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली.
यावेळी धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष श्री. राजन राजे म्हणाले, “लोकशाहीत जनतेच्या प्रश्नांना उत्तर देण्याचा मार्ग दडपशाही नव्हे, तर संवाद आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित प्रश्न असो किंवा पर्यावरण संरक्षणाचा विषय असो, केंद्र सरकारने आंदोलनकर्त्यांशी तात्काळ चर्चा करून त्यांच्या न्याय्य मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा. विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित ठेवणे आणि देशाच्या पर्यावरणाचे संरक्षण करणे ही सरकारची संविधानिक जबाबदारी आहे.”धर्मराज्य पक्षाचा स्पष्ट विश्वास आहे की, विद्यार्थ्यांना न्याय, पर्यावरणाचे संरक्षण आणि लोकशाही मूल्यांचे जतन ही कोणत्याही सरकारची सर्वोच्च जबाबदारी आहे. आंदोलनकर्त्यांच्या न्याय्य मागण्यांकडे दुर्लक्ष न करता केंद्र सरकारने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, हीच आमची ठाम भूमिका आहे.
या निवेदनावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), धर्मराज्य पक्ष, कॉंग्रेस, राष्ट्रवादी (शप), जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय (NAPM), भारत जोडो अभियान, श्रमिक जनता संघ, आयटक, बहुजन विकास संघ, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, कायद्याने वागा लोकचळवळ, अन्न अधिकार अभियान, भारतीय कम्युनिस्ट पार्टी (CPI), डॉ. बाबासाहेब आंबेडकर रायटर्स असोसिएशन, गावठाण-कोळीवाडे-पाडे संवर्धन समिती तसेच अंगणवाडी व आशा वर्कर संघ यांच्या प्रतिनिधींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
