Day: August 15, 2026

भर पावसात तिरंगा रॅली… पावसात भिजत उत्साहात साजरा झाला भारताचा ८०वा स्वातंत्र्यदिन!

भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त, ठाणे जिल्हा शिवसेनेच्या वतीने शहरातील चंदनवाडी शिवसेना शाखेत १४ ऑगस्टच्या मध्यरात्री स्वातंत्र्यदिनाचा सोहळा मोठ्या दिमाखात आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला भर पावसात तिरंगा रॅली काढण्यात आली. मुसळधार पावसाची तमा न बाळगता शिवसैनिक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उत्साहाने या रॅलीत सहभागी झाले. पावसात भिजत, हातात तिरंगा घेऊन आणि ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’च्या जयघोषात निघालेल्या या रॅलीने परिसरात राष्ट्रभक्तीचे उत्साहपूर्ण वातावरण निर्माण केले.
या विशेष सोहळ्यास ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष मा. राजन राजे यांची विशेष पाहुणे म्हणून उपस्थिती लाभली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी खासदार श्री. राजन विचारे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली या स्वातंत्र्यदिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी ठाणे जिल्हाप्रमुख श्री. केदार दिघे, श्री. नरेश मणेरा, ज्येष्ठ पत्रकार श्री. हेमंत देसाई, तसेच अनेक माजी सैनिक उपस्थित होते. ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने प्रवक्ता श्री. समीर चव्हाण, लोकसभा उपाध्यक्ष व ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे महासचिव श्री. महेशसिंग ठाकूर, पक्षाचे सचिव श्री. नरेंद्र पंडित आणि श्री. अनिल महाडिक यांचीही उपस्थिती होती.
याप्रसंगी देशाच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या माजी सैनिकांचा तसेच वीरपत्नींचा मा. राजन राजे आणि श्री. केदार दिघे यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.
पावसाची पर्वा न करता स्वातंत्र्यदिनाचा उत्सव साजरा करण्यासाठी एकवटलेला शिवसैनिकांचा उत्साह, तिरंग्याप्रती असलेला अभिमान आणि देशभक्तीची भावना या संपूर्ण सोहळ्यात प्रकर्षाने जाणवत होती.
या दिमाखदार स्वातंत्र्यदिन सोहळ्यास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शेकडो शिवसैनिक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
error: Content is protected !!