Blog

आंदोलनांची पुण्याई संपल्यामुळेच, भांडवलदारी व्यवस्था फोफावली! – राजन राजे

, , , , ,

‘‘या महाराष्ट्रात कंत्राटी-कामगारपद्धतीविरुद्ध, मी गेली २५/३० वर्षे लढतोय. ‘कंत्राटी-कामगार पद्धत’ ही गुलामगिरी तर आहेच, पण ती एकप्रकारची नव-अस्पृश्यतादेखील आहे. अस्पृश्यता म्हणजे, एका विशिष्ट समाज-घटकाने समाजाच्या दुसर्‍या मोठ्या हिश्श्याला विकासाच्या परिघाबाहेर ढकलून देत, त्याला जगण्याचा सन्मान आणि त्याला विकासाचे मूलभूत फायदे नाकारणे… ‘कंत्राटी-कामगार पद्धत’, ही नव-अस्पृश्यता यासाठी की, या प्रकारच्या अस्पृश्यतेत जन्माची जात गुंतलेली नसली; तरी, जन्माचं पोट गुंतलेलं आहे आणि तो कंत्राटी-कामगार अर्धपोटी आहे, त्याला माणुसपणाचे हक्क कामाच्या ठिकाणी नाकारलेले आहेत! मी, गेली तीन दशकं एकहाती या व्यवस्थेविरोधात ‘धर्मयुद्ध’ पुकारुन संघर्ष करतोय. लोकचळवळीकडून, डाव्या चळवळीकडून याबाबतीत काही मोठ्या त्रुटी राहून गेल्या. डाव्या विचारसरणीच्या कम्युनिस्टांनी ‘नागरी आण्विक दायित्व कायदा-123’ (Civil Nuclear Liability Bill-123) साठी बंगाल-केरळ मधील आपले ४३ खासदार संसदेत पणाला लावले; पण, भारतातील सर्वात मोठी समस्या असलेल्या ‘कंत्राटी-कामगार पद्धती’विरोधात त्यांना अंशानेही तसं काही करावसं वाटलं नाही, हे देशाचं आणि एकूणच डाव्या चळवळीचं फार मोठं दुर्दैव आहे. एकांडी शिलेदारी करीत ‘कंत्राटी-कामगार पद्धती’विरोधात आम्ही बेंबीच्या देठापासून बोंबलून-बोंबलून थकलो, मोठमोठी आंदोलनं केली, संपासारखे टोकाचे संघर्ष केले, बड्या बड्या राजकीय नेत्यांना भेटलो, सर्वपक्षीय प्रमुखांच्याही भेटीगाठी घेतल्या…पण, आमच्या हाती ‘राजकीय ताकद’ नसल्याने कंत्राटीकरणाची विषवल्ली अधिकाधिक फोफावली. मी, ‘धर्मराज्य पक्षा’ची स्थापना यासाठीच केली. कारण, चळवळीतील नेत्यांनी, कंत्राटी-पद्धतीचा विषय लावूनच धरला नाही. दुर्दैवाने, आंदोलनांची पुण्याई आता संपलेली आहे. तुम्ही आमरण उपोषणाला बसलात, चक्री-उपोषणाला बसलात; तरी, शंभर टक्के सांगतो, तुमचे प्रश्न सुटणार नाहीत; त्यासाठी, तुम्हाआम्हाला निवडणुका जिंकून विधिमंडळात, संसदेत धडक द्यावी लागेल. कष्टकऱ्यांच्या अपरिमित शोषणातून चाललेली ही संपूर्ण भांडवलदारी व्यवस्था, देशात साम्यवाद-समाजवाद आणूनच संपवावी लागेल…इतर कुठलाही राजकीय पर्याय नाही’’, अशा घणाघाती शब्दांत ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे यांनी, प्रस्थापित राजकीय व्यवस्थेविरोधात जोरदार शरसंधान साधले. महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने, मंगळवार, दि. २८ नोव्हेंबर-२०२३ रोजी, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ शेतकरी आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन करण्यात आले, त्यावेळी राजन राजे बोलत होते. केंद्र सरकारने जाहीर केलेला भाताचा हमीभाव अत्यंत तुटपुंजा असल्याने, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार, उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा धरुन, भाताला प्रति क्विंटल किमान चार हजारांचा हमीभाव देऊन, तसा कायदा करण्यात यावा, भातखरेदी केंद्रे पूर्ववत सुरु करण्यात यावीत, शेतकऱ्यांना वीजपंपासाठी मोफत वीजपुरवठा करण्यात यावा, शेतकरी-शेतमजूर व असंघटित बांधकाम कामगार आणि महिलांना, वयाच्या ६० वर्षांनंतर मासिक पाच हजारांची पेन्शन सुरु करण्यात यावी, सरकारी (जिल्हा परिषद) शाळांचे खासगीकरण थांबवून, कंत्राटी नोकरभरतीचा कायदा रद्द करण्यात यावा, आरोग्यसेवेचे खासगीकरण थांबवा आणि आरोग्यसेवेत आमूलाग्र सुधारणा करुन, सर्वसामान्य जनतेला मोफत सेवा देण्यात याव्यात, या आणि अशा अनेक मागण्यांसाठी, महाराष्ट्र राज्य किसान सभा, ठाणे जिल्हा यांच्या वतीने, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून, संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने, मंत्रालयावर धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले असून, त्याच पार्श्वभूमीवर, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ ही प्रखर निदर्शने करण्यात आली होती.

यावेळी उपस्थित आंदोलनकर्त्यांना संबोधित करताना, ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे पुढे म्हणाले की, ‘‘ज्याप्रमाणे उंदीर, सारखं काही ना काही कुरतडत असतो, तसेच या व्यवस्थेचे हात तुमच्या खिशाला, तुमच्या पैशाच्या पाकिटाला कुरतडत, ओरबाडत असतात… आणि, म्हणूनच या व्यवस्थेला मी ‘रक्तपिपासू शोषक-व्यवस्था’ म्हणतो. या व्यवस्थेचे जे सगळे बगलबच्चे आहेत, ते कसलेल्या ‘पाकिटमारा’सारखे आपल्या खिशात हात घालून असतात, आपल्याला ते कळत नाही. एकीकडे उड्डाणपूल होतायत, मॉलटॉल होतायत, विकासकामं होताना दिसतायत, पण आमच्या पगाराची पाकिटं कधी जाडजूड होताना दिसतात का?* आम्ही मात्र, अजूनही टेकड्यांवर आणि त्यांची प्रगती हिमालयाच्या उंचीएवढी. म्हणूनच, आमचं जीवन खाली-खाली घसरत चाललंय… ना आम्हाला आरोग्यसेवा परवडत, ना आम्हाला खासगी शिक्षण परवडत. शिक्षणसेवा आणि आरोग्यसेवा या खासगी असूच कशा शकतात?’’ असा प्रश्न उपस्थित करीत, राजे पुढे म्हणाले, *’’ज्याला आम्ही ‘कल्याणकारी राज्य’ म्हणावं, त्याचा अगदी उलट हा कारभार सुरु आहे. आरोग्य व शिक्षण या सकस, दर्जेदार सेवा सरकारतर्फेच पुरविल्या गेल्या पाहिजेत. जोपर्यंत, आपल्या देशात ‘कल्याणकारी राज्य’ संकल्पनेची धारणा व धोरणं होती, तोपर्यंत, मूलभूत सुविधा सर्वसामान्यांना समाधानकारक मिळत होत्या, पण आता भाजपा-नरेंद्र मोदी सरकारच्या बेलगाम खाजगीकरणाच्या, खरं म्हणजे ‘अदानी-अंबानीकरणा’च्या, गेल्या दहा वर्षांच्या लोकशाहीविरोधी कालखंडात सगळंच बदललंय. मी तुम्हाला ठामपणे सांगतो, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले काय, फडणवीस झाले काय आणि पवार झाले काय, आपले मूलभूत प्रश्न कधिही सुटणे नाही… ही व्यवस्थाच आपल्याला मुळातून आमूलाग्र बदलायला हवी. तुम्ही सुशिक्षित आहात, तुम्ही स्वतःच तपासून पाहा, अमेरिकेत-युरोपात आता, समाजवादी-साम्यवादी चळवळी जोर धरु लागल्यात. ज्याला आपण समाजवाद व साम्यवादाचा विचार म्हणतो, तो पुन्हा जोरकसपणे पुढे यायला लागलाय. आता फक्त आंदोलनापुरते सीमित न राहता, राजकीयदृष्ट्या सुशिक्षित होणे गरजेचे आहे. तुम्ही आम्ही एकाच चळवळीतील लोकं आहोत, आपण वेळीच जागे झालो नाही तर, राजकीयदृष्ट्या अज्ञानी माणसाला, या पुढारलेल्या आणि विज्ञानवादी जगात कुठलाही थारा मिळणार नाही !’’* अशा रोखठोक भाषेत, उपस्थित शेतकरी आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना राजन राजे यांनी, आवाहन केले. या आंदोलनाचे नेतृत्व महाराष्ट्र किसान सभेचे अध्यक्ष कॉ. मधुकर पाटील यांनी केले. यावेळी किसान सभेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष कॉ. आत्माराम विशे, सचिव कॉ. रमेश जाधव, कार्याध्यक्ष कॉ. विलास शेलार, कॉ. भास्कर पाटील, कॉ. जयराम चंदे, कॉ. प्रकाश काठोळे, भिवंडी तालुका अध्यक्ष कॉ. बाळाराम भोईर, शहापूर तालुका अध्यक्ष भगवान दळवी, मुरबाड तालुका अध्यक्ष कॉ. नारायण पाटोळे, कल्याण तालुका अध्यक्ष कॉ. आदम शेख आदी पदाधिकाऱ्यांसह, ‘धर्मराज्य पक्षा’चे ठाणे लोकसभा उपाध्यक्ष व ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे महासचिव महेशसिंग ठाकूर, लोकसभा उपाध्यक्ष नरेंद्र पंडित, सचिन शेट्टी, कामगार प्रतिनिधी समीर चव्हाण इ. मान्यवर यावेळी उपस्थित होते.

आरे कॉलनीमधील वृक्षतोडीविरोधात ‘धर्मराज्य पक्षा’ची तीव्र निदर्शने !

,

मुंबईचे ‘फुप्फुस’ अशी ओळख असलेल्या आरे कॉलनीतील प्रस्तावित मेट्रो कारशेडसाठी सुमारे २७०० झाडांच्या कत्तलीविरोधात ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने शनिवार, दि. १४ सप्टेंबर-२०१९ रोजी येथील बिरसा मुंडा चौकात सनदशीरमार्गाने निदर्शने करण्यात आली. या वृक्षतोडीमुळे आरे कॉलनी परिसरातील जैवविविधता पूर्णतः नष्ट होण्याचा धोका असून, इथल्या जंगलात अधिवास असणारे बिबटे, रानमांजर आणि इतर पक्षी-प्राण्यांचे अस्तित्वच कायमस्वरूपी संपुष्टात येऊ शकते. शिवाय अतिपर्जन्यवृष्टीच्या काळात मिठी नदीच्या पुराचा धोकादेखील वाढू शकतो. यासंदर्भात विविध पर्यावरणवादी संस्था-संघटना, तसेच ‘आरे’मधील मूळ भूमिपुत्र असणाऱ्या आदिवासी बांधवांनी संघर्ष उभा केला होता. याच पार्श्वभूमीवर मुळातच भारतातील पहिलावहिला पर्यावरणवादी पक्ष अशी मान्यता असलेल्या ‘धर्मराज्य पक्षा’नेदेखील या मेट्रो प्रकल्पांतर्गत उभारण्यात येणाऱ्या प्रस्तावित कारशेडविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून, पक्षाध्यक्ष राजन राजे यांच्या आदेशानुसार ही निदर्शने शनिवारी सकाळी ११ ते दुपारी १ वा.च्या दरम्यान करण्यात आली. “विनाशकारी विकासाच्या नावाने, बेभान झालेले आसुरी ‘विकास-विचारवंत’ हिरव्यागार जंगलाने वेढलेल्या आरे कॉलनीत ‘रखरखीत वाळवंट’ निर्माण करू पाहत असतील, तर ‘धर्मराज्य पक्ष’ स्वस्थ बसणार नाही !” असा थेट इशारा राजन राजे यांनी आपल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे प्रस्थापित धनदांडगे व भांडवलदारी प्रवृत्तीच्या सत्ताधाऱ्यांना दिला आहे. “स्मार्टसिटीच्या नावाखाली होऊ घातलेला विनाशकारी विकास आणि काँक्रीटच्या निष्प्राण जंगलांऐवजी, आम्हाला हिरवंगार जिवंत जंगल, प्राणी-पक्षी व निसर्गाने नटलेली घनदाट वृक्षराजी हवी आहे, त्यासाठी प्रसंगी आम्ही आमच्या प्राणांचीही बाजी लावू !” अशा शब्दांत राजे यांनी आपल्या रोखठोक भावना व्यक्त केल्या आहेत.
दरम्यान, आरे कॉलनीतील बिरसा मुंडा चौकात पार पडलेल्या या निदर्शनाच्या कार्यक्रमाप्रसंगी ठाणे लोकसभा अध्यक्ष राजेश गडकर, उपाध्यक्ष महेशसिंग ठाकूर, ठाणे शहर विधानसभा अध्यक्ष जगन्नाथ सलगर, ‘धर्मराज्य महिला संघटने’च्या महाराष्ट्र राज्य समन्वयक रेश्मा पवार, नवी मुंबई महिला अध्यक्षा शीतल कोळी, बेलापूर विधानसभा महिला अध्यक्षा रेखा साळुंखे, ठाणे लोकसभा महिला अध्यक्षा पौर्णिमा सातपुते, प्रीती क्षीरसागर, मनीषा सांडभोर, जयश्री पारकर, कोपरी-पाचपाखाडी विधानसभा अध्यक्ष मिलिंद कुवळेकर, ऐरोली विधानसभा अध्यक्ष रत्नदीप कांबळे आदी पदाधिकाऱ्यांसमवेत नरेंद्र पारकर, नितीन उगले, शरद साळुंखे, सुमित कदम, सुशांत पंडा, दत्तु पाटील, संतोष मोरे, किशोर गवळी, संकेत गाडे, हेमंत पाटणकर, सुनील सांडभोर, जगदीश जाधव, नरेंद्र शिंदे, उमेश यादव, उमेश मोरे, खंडेराव जाधव, प्रवीण तांबट, प्रकाश नलावडे, सचिन पडवळ, विरेंद्र मोरे, आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यादरम्यान, आरे कॉलनीतील छोटा काश्मीर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षिका नूतन पवार, पोलीस निरीक्षक विनोद पाटील, पोलीस उप-निरीक्षक प्रमोद सावंत, गोपनीय शाखेचे व्ही.के. सिंग, पोलीस नाईक संजय शिंदे आणि मुंबईतील पर्यावरणवादी कार्यकर्ते वसंत पाटील या मान्यवरांनी या निदर्शनाच्या कार्यक्रमाप्रसंगी बहुमूल्य सहकार्य केले.

मराठी राजभाषा दिनानिमित्त राजन राजे यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी वनभोजनाचे आयोजन !

, , , ,

मराठी राजभाषा दिनानिमित्त राजन राजे यांच्या वतीने मुरबाड तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी वनभोजनाचे आयोजन ! ● सेंद्रिय शेती, निसर्गरक्षण आणि पर्यावरणाच्या संवर्धनाबाबत केले मार्गदर्शन.
वि.वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त २७ फेब्रुवारी हा दिवस ‘मराठी राजभाषा दिन’ म्हणून अवघ्या महाराष्ट्रदेशी साजरा करण्यात येतो. याच अभिमानास्पद दिवसाचे औचित्य साधून ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष व ज्येष्ठ कामगारनेते मा. श्री. राजन राजे यांनी ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात असलेल्या साखरे-साजगाव येथील त्यांच्या शेतघराच्या प्रशस्त आणि निसर्गरम्य ठिकाणी सहलीसाठी आलेल्या शेकडो शालेय विद्यार्थी-विद्यार्थीनींसाठी वनभोजनाचे आयोजन केले होते. याप्रसंगी जिल्हापरिषद प्राथमिक शाळा, किसळ या विद्यालयातील शिक्षकवृंददेखील उपस्थित होता. विद्यार्थीवर्गाला शालेय जीवनापासूनच निसर्गरक्षण व पर्यावरण संवर्धनाचे महत्व कळावे, यासाठीच या वनभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मा. श्री. राजन राजे यांनी विद्यार्थ्यांना स्वतःहून शेतघर परिसरातील विविध झाडे, वनस्पतींची माहिती दिली. यामध्ये सेंद्रिय पद्धतीने शेती कशी करावी, याबरोबरच ऊस, द्राक्ष, फळभाज्या आणि पालेभाज्यांच्या लागवडीचे शास्त्रशुद्ध मार्गदर्शन करून त्यांच्या ज्ञानात मोलाची भर घालण्यात आली.
दरम्यान, जिल्हापरिषद प्राथमिक शाळा, किसळ या विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी ही सहल फक्त मनोरंजनात्मकच नव्हे, तर त्यांच्या ज्ञानाची कवाडे उघडणारी ठरली. यानिमित्ताने शेती कशी करावी? सेंद्रिय शेती म्हणजे काय? निसर्गाचे रक्षण व पर्यावरणाचे संवर्धन म्हणजे नक्की काय, त्याचे मानवी जीवनातील नेमके महत्व किती? याची सखोल माहिती मा. श्री. राजन राजे यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिली. भारतातील पहिलावहिला पर्यावरणवादी पक्ष अशी ओळख असणारा ‘धर्मराज्य पक्ष’ फक्त निवडणुकांचेच राजकारण करीत नसून, तर तो सातत्याने पर्यावरणच्या माध्यमातून ‘निसर्गकारण’ करीत असतो, हेच मराठी राजभाषा दिनाच्या माध्यमातून व शालेय सहलीच्या निमित्ताने अधोरेखित झाले. वनभोजनाचा मनमुराद आस्वाद घेतल्यानंतर मा. श्री. राजन राजे यांनी प्रत्येक विद्यार्थी-विद्यार्थिनी व शिक्षकांना सेंद्रिय पद्धतीने तयार केलेल्या गुळाची प्रत्येकी १ किलोची ढेप भेट म्हणून दिली. यावेळी विद्यार्थीवर्गाच्या चेहऱ्यावरील आनंद आणि त्यांचा टवटवीतपणा स्पष्टपणे दिसत होता. “शालेय विद्यार्थ्यांसाठी असलेली ही सहल खऱ्या अर्थाने सार्थकी लागली. जी गोष्ट आम्ही शाळेत पुस्तकीरुपात शिकवतो, तीच आमच्या विद्यार्थ्यांना आज प्रत्यक्षात शिकायला मिळाली.” अशा भावना व्यक्त करून शिक्षकवृंदाने मा. श्री. राजन राजे यांचे आभार मानले. याप्रसंगी राजे यांच्या सुकन्या ऋचा राजे आवर्जूनउपस्थित होत्या. त्याचबरोबर तुकाराम हलपतराव, धनाजी हलपतराव, विश्वनाथ मोरे आदी मंडळी उपस्थित होती.

अण्णा हजारेंच्या बेमुदत आंदोलनाच्या समर्थनार्थ ‘धर्मराज्य पक्षा’चे साखळी उपोषण सुरू !

देशातील भ्रष्टाचार समूळ निपटून काढण्याबरोबरच लोकपाल, लोकायुक्त आणि शेतकऱ्यांच्या समस्यांसाठीच आंदोलन -राजन राजे
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी लोकपाल, लोकायुक्त आणि शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी ३० जानेवारीपासून राळेगणसिद्धी येथे पुकारलेल्या आंदोलनाला ‘धर्मराज्य पक्षा’ने जाहीर पाठिंबा दिला असून, पक्षाच्या वतीने अण्णांच्या समर्थनार्थ कोपरी-पाचपाखाडी विधानसभा अध्यक्ष मिलिंद कुवळेकर यांच्या नेतृत्वाखाली २ फेब्रुवारीपासून ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. देशातील बोकाळलेला भ्रष्टाचार आणि त्याला उत्तेजन देणारी भ्रष्ट राजकीय व प्रशासकीय व्यवस्था यामुळेच देशापुढे सर्वच मूलभूत प्रश्न निर्माण झाले असून, अण्णा हजारेंच्या या बेमुदत उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी, तसेच देशातील भ्रष्टाचार समूळ निपटून काढण्याबरोबरच लोकपाल, लोकायुक्त आणि शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी ‘धर्मराज्य पक्षा’ने लोकशाहीमार्गाने लढा उभारला असून, त्यासाठी आम्हीदेखील साखळी उपोषण सुरू केल्याचे पक्षाध्यक्ष राजन राजे यांनी यावेळी प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना सांगितले. याप्रसंगी सामाजिक पर्यावरणवादी कार्यकर्ते विक्रांत कर्णिक, पक्षाचे ठाणे लोकसभा अध्यक्ष राजेश गडकर, उपाध्यक्ष महेशसिंग ठाकूर, ठाणे शहर विधानसभा अध्यक्ष जगन्नाथ सलगर, सचिव सुनील घाणेकर, कोपरी-आनंदनगर विभाग अध्यक्ष नितीन वायदंडे, माहिती अधिकार ठाणे कक्षप्रमुख अनिल महाडिक, अंजुर गावचे सरपंच मनीष तर, आगरी युवक संघटनेचे अध्यक्ष गोविंद भगत या पदाधिकाऱ्यांसोबत नरेंद्र शिंदे, मनोज बेर्डे, सुशांत भोईर, संदीप सोनखेडे, गौरव गोरे, किशोर वाडकर, नरेंद्र पारकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान, “देशातील भ्रष्टाचार समूळ उपटून काढायचा असेल, तर करसंरचना आणि अर्थकारणात आमूलाग्र बदल करावे लागतील” असे नमूद करून राजन राजे पुढे म्हणाले की, “अर्थक्रांती विधेयक खऱ्या अर्थाने भ्रष्ट राजकारणी आणि सरकारी अधिकाऱ्यांना सत्तेतील खुर्चीच्या उबेपासून तुरुंगातील मिरचीच्या धुरापर्यंत नेण्यास कारणीभूत ठरेल, त्यासाठी जन-लोकपाल कायदा त्वरित अंमलात आणला गेलाच पाहिजे, हीच आमची आग्रही मागणी आहे” असे ठाम प्रतिपादन राजे यांनी यावेळी बोलताना केले. २०११ साली अण्णा हजारेंच्या राष्ट्रव्यापी जनआंदोलनापुढे तत्कालीन सरकार नमले व त्यांनी जन-लोकपाल कायदा पारित केला. मात्र राष्ट्रपतींची स्वाक्षरी होऊनही आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरदेखील या कायद्याची अद्यापपर्यंत अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ करण्यात आली. गेल्या काही वर्षांत देशभरात हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत, दुर्दैवाने त्यात महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक आहे. नापिकी, शेतीमालाला न मिळणारा हमीभाव आणि कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक यातच बळीराजा पार पिचून गेलेला आहे. याच पार्श्वभूमीवर झोपी गेलेल्या सरकारला खडबडून जागे करण्यासाठी ‘धर्मराज्य पक्षा’ने साखळी उपोषण सुरू केले असल्याचे पक्षाचे ठाणे लोकसभा अध्यक्ष राजेश गडकर यांनी शेवटी बोलताना म्हटले. यादरम्यान, ठाणे शहराच्या कोपरी परिसरातदेखील पक्षाच्या वतीने ठाणे लोकसभा सचिव विनोद मोरे यांच्या नेतृत्वाखाली धरणे धरून, शासनाच्या धोरणांचा निषेध करण्यात आला.

‘हिवा इंडिया’ कंपनीत भव्यदिव्य त्रैवार्षिक करार !

, , , ,

“ऐतिहासिक कराराद्वारे नव-अस्पृश्यतारुपी कंत्राटी-कामगारपद्धत संपुष्टात……”
राजन राजेंच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा इतिहास रचला…!!!

एकीकडे नवी मुंबईतील दिघा येथील ‘सुल्झर पंप्स’ कंपनीतील कामगारांना ऐन गणेशोत्सवात दीड ते दोन लाखांच्या दरम्यान बोनस देऊन त्यांची दिवाळी साजरी झालेली असतानाच, नुकत्याच साजऱ्या झालेल्या दिवाळसणाच्या पहिल्याच दिवशी, अर्थात धनत्रयोदशीचा मुहूर्त साधून नवी मुंबईस्थित महापे येथील ‘हिवा इंडिया’ कंपनीतदेखील भव्यदिव्य असा, तब्बल १२ हजार १०० रुपये पगारवाढीचा त्रैवार्षिक करार ‘धर्मराज्य पक्ष’ आणि ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे अध्यक्ष तथा ज्येष्ठ कामगारनेते मा. श्री. राजन राजे यांच्या नेतृत्वाखाली संपन्न होऊन पुन्हा एकदा इतिहास रचला गेला. महत्वाची व उल्लेखनीय बाब म्हणजे, या ऐतिहासिक कराराद्वारे नव-अस्पृश्यतारुपी कंत्राटी-कामगारपद्धत संपुष्टात येऊन कंपनीतील एकूण ७२ कंत्राटी कामगार कायम झाले आहेत. या करारामुळे गेली अनेक वर्षे गुलामगिरीत खितपत पडलेल्या कामगारांना हक्काच्या कायमस्वरूपी नोकरीचा लाभ मिळून, त्यांना आर्थिक सुरक्षितता प्राप्त झाली आहे. या त्रैवार्षिक करारानुसार कामगारांना कमीतकमी ५० हजार, तर जास्तीतजास्त ६५ हजार इतकी दरमहा पगारवाढ झाली असून, बोनस म्हणून कमीतकमी ६० हजार, तर जास्तीतजास्त ८० हजार रुपयांची रक्कम सानुग्रह अनुदानासहित कामगारांना मिळणार आहे. या ऐतिहासिक करारामुळे ‘हिवा इंडिया’ कंपनीतील कामगारांमध्ये आनंदाचे व जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. गेली अनेक वर्षे कंत्राटी नोकरीच्या गुलामगिरीत खितपत पडलेले कामगार आज खऱ्या अर्थाने ‘सुरक्षित’ झालेले असून, आम्हाला स्वाभिमानाचा मार्ग दाखविण्याचे श्रेय फक्त आणि फक्त मा. श्री. राजन राजे साहेबांनाच जाते, अशा शब्दांत कामगारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

दरम्यान, गेल्या ३६ वर्षांपासून कामगारक्षेत्रात कार्यरत असलेल्या राजन राजे यांनी, तीन दशकांहून अधिकच्या कार्यकाळात हजारो कामगारांना समृद्धीचा मार्ग दाखवलाय. कामगारांच्या न्याय्य-हक्कांसाठी व्यवस्थापनाशी आणि भांडवलदारी व्यवस्थेशी त्यांनी प्राणपणाने संघर्ष केलाय. गुलामगिरीचे प्रतीक असलेली कंत्राटीपद्धती ही कामगारक्षेत्रातील नव-अस्पृश्यता असल्यामुळे राजे यांनी सुरुवातीपासूनच या प्रथेविरुद्ध लढा उभारला व तो यशस्वीही करून दाखवला. ‘हिवा इंडिया’ कंपनीचा भव्यदिव्य त्रैवार्षिक करार हा उल्लेखनीय असला, तरी या कंपनीतील ७२ कंत्राटी-कामगार गुलामगिरीच्या विळख्यातून मुक्त झाले, हेच माझ्या आतापर्यंतच्या संघर्षाचं फलित असल्याची प्रतिक्रिया राजन राजे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. ऐन दिवाळीच्या निमित्ताने, धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोमवार, दि. ५ नोव्हेंबर-२०१८ रोजी पार पडलेल्या या काराराप्रसंगी ‘हिवा इंडिया’ कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर आनंद गांगुली हेदेखील उपस्थित होते. यावेळी ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे महासचिव महेशसिंग ठाकूर, उपाध्यक्ष रमाकांत नेवरेकर आणि खजिनदार अण्णा साळुंखे या पदाधिकाऱ्यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या ऐतिहासिक करारान्वये १२ हजार १०० रुपयांची भरघोस पगारवाढ झाल्याने कामगारांचे वेतनमान उंचावले असून, याबाबत ‘हिवा इंडिया’च्या समस्त कामगारांनी ‘धर्मराज्य पक्ष’ आणि ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे अध्यक्ष, तसेच ज्येष्ठ कामगारनेते राजन राजे जाहीर आभार व्यक्त करून एकच जल्लोष केला.

विनाशकारी प्रकल्पाविरोधात ‘धर्मराज्य पक्षा’चा कोकण रिफायनरी विरोधी संघर्ष समितीस पाठिंबा…!

अतिप्रदूषणकारी अशा रिफायनरी (तेल शुद्धीकरण कारखाना) प्रकल्पाविरोधात ‘कोकण रिफायनरी विरोधी संघर्ष समिती’च्या वतीने शुक्रवार, दि. ८ डिसेंबर-२०१७ रोजी मुंबईतील आझाद मैदानात निदर्शने करण्यात आली. यावेळी समितीचे अध्यक्ष श्री. अशोक वालम यांच्या नेतृत्त्वाखाली रत्नागिरी, राजापूर आणि देवगडमधील शेकडो मुंबईकर चाकरमानी उपस्थित होते.

याप्रसंगी, भारतातील पहिलावहिला पर्यावरणवादी पक्ष अशी समाजमान्यता असलेल्या ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष आणि ज्येष्ठ कामगार नेते मा. श्री. राजन राजे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच पर्यावरणवादी कार्यकर्ते श्री. राजेंद्र फातर्पेकर, ठाण्यातील सामाजिक कार्यकर्ते श्री. विक्रांत कर्णिक, सत्यजित चव्हाण आदी मंडळींनीदेखील निदर्शनात सहभाग घेतला होता.

राजापूर तालुक्यातील नाणार येथे हा रिफायनरी प्रकल्प उभारण्याचा आग्रह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धरला असून, कोकणी जनतेने संघटितपणे या प्रकल्पाला केलेला विरोध कौतुकास्पद असल्याचे मा. श्री. राजन राजे यांनी स्पष्ट करून, माझा ‘धर्मराज्य पक्ष’ व माझ्या पक्षातील प्रत्येक कार्यकर्ता कोकणी जनतेच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याची ग्वाही राजे यांनी यावेळी बोलताना दिली. या प्रसंगी पक्षाध्यक्ष राजन राजे यांनी ‘कोकण रिफायनरी विरोधी संघर्ष समिती’स १ लाख ११ हजार १११ रुपयांची मदतनिधी जाहीर करून, समितीचे अध्यक्ष श्री. अशोक वालम यांना धनादेशाद्वारे सुपूर्द केली.

दरम्यान, यावेळी आपल्या भाषणात बोलताना मा. श्री. राजन राजे म्हणाले, “कोकणासारख्या देवभूमीला भकास करण्याचा हा डाव असून, कोकणातील नैसर्गिक संपत्तीला नष्ट करू पाहणाऱ्या या राक्षसी प्रकल्पाला गाडल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. कोकणी माणूस कधीही या आणि अशा कोणत्याही विनाशकारी प्रकल्पाची मागणी करायला शासनाकडे गेला नव्हता, मात्र दलालीत रस असणाऱ्या काही ठराविक राजकारणी, उद्योजक आणि धनदांडग्या भांडवलदारांनीच हा विनाशकारी प्रकल्प कोकणी जनतेवर लादला आहे.” असा जबरदस्त घणाघात राजे यांनी आपल्या भाषणात बोलताना केला.

यावेळी ‘धर्मराज्य महिला संघटने’च्या महाराष्ट्र राज्य समन्वयक स्वप्नाली पवार, ठाणे विधानसभा महिला सचिव दर्शना पाटील, महिला संघटनेच्या प्रतिनिधी पौर्णिमा सातपुते आणि ‘धर्मराज्य पक्षा’चे युवा कार्यकर्ते नितीन उगले हेदेखील उपस्थित होते.

‘धर्मराज्य पक्षा’चा ५वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न !

भारतातील एकमेव पहिलावहिला पर्यावरणवादी पक्ष अशी ओळख निर्माण झालेल्या ‘धर्मराज्य पक्षा’चा ५ वा वर्धापन दिन बुधवार, दि. १६ नोव्हेंबर ठाण्याच्या शिवाजी मैदानात उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला.
आगामी ठाणे आणि मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाध्यक्ष राजन राजे यांनी प्रस्थापित भांडवलदारी राजकारण्यांवर शाब्दिक शरसंधान साधत त्यांच्यावर तोफ डागली.
वर्धापन दिनाच्या या कार्यक्रमासाठी मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉ. दीपक पवार, झोपडपट्टी पुनर्वसन तसेच भाडेकरु कृती समितीचे मुंबई उपनगर अध्यक्ष कॉ. मदन नाईक, टोलविषयीचे अभ्यासक व टोलचा झोल उघड करणारे माहिती अधिकार कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा खराखुरा राजकीय इतिहास पुराव्यानिशी पटवून देणारे प्रख्यात शिवव्याख्याते किमंतु ओंबळे या मान्यवरांनी सहभागी होऊन आपले विचार मांडले. यावेळी ‘धर्मराज्य पक्षा’चे कोकण, विदर्भ-मराठवाड्यासहित राज्यभरातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

केंद्र सरकारच्या दडपशाहीविरोधात ‘धर्मराज्य पक्षा’ची निदर्शने…!

लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या प्रसिद्धीमाध्यमांची गळचेपी कशी केली जाते, हे ‘एन.डि.टी.व्ही. इंडिया’ या प्रख्यात वृत्तवाहिनीच्या एकदिवसीय बंदीप्रकरणावरून स्पष्ट झालेले असताना, याचाच निषेध करण्यासाठी, केंद्र सरकारच्या दडपशाहीविरोधात ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष आदरणीय राजन राजे यांच्या आदेशानुसार मंगळवार, दि. ८ नोव्हेंबर रोजी ठाणे रेल्वे स्थानकाबाहेरील सॅटिस पुलाखाली पक्षाच्यावतीने तीव्र निदर्शने करण्यात आली.
शिवाय कामगार कायद्यातील बदलामुळे कामगारांच्या, जमीन अधिग्रहण विधेयकाच्या माध्यमातून शेतक-यांच्या आणि ‘वन रँक वन पेन्शन’च्या फसव्या घोषणेच्या माध्यमातून निवृत्त सैनिकांच्या झालेल्या आत्महत्यांबाबतही यावेळी मोदी सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला.
याप्रसंगी, ‘धर्मराज्य पक्षा’चे महासचिव रामभाऊ कोंढाळकर, सल्लागार आनंदा होवाळ, ठाणे लोकसभा अध्यक्ष राजेश गडकर, उपाध्यक्ष सचिन शेट्टी, सचिव विनोद मोरे, ठाणे विधानसभा उपाध्यक्ष सुनील घाणेकर, नौपाडा विभाग अध्यक्ष समीर कालगुडे, कोपरी-आनंदनगर प्रभाग अध्यक्ष नितीन वायदंडे, पाचपाखडी विभाग अध्यक्ष अमित लिबे, ‘धर्मराज्य महिला संघटने’च्या महाराष्ट्र राज्य समन्वयक रेश्मा पवार, ठाणे लोकसभा महिला अध्यक्षा जयश्री पंडित, उपाध्यक्षा साक्षी शिंदे, सचिव दर्शना पाटील, कोपरी विभाग महिला अध्यक्षा भारती सावंत, वंदना गायकवाड तसेच युवा कार्यकर्ते नितीन उगले, रॉजर सायमन यांच्यासोबत सुधन सावंत, महेश पवार, मनोज बेर्डे, राकेश पवार, भरत राणे, शरद साळुंखे, सचिन कदम आणि प्रकाश डोंगरे आदी मान्यवर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
error: Content is protected !!