Blog

१३ नोव्हेंबर २०२५ : ‘जोहरान ममदानी’ यांच्या ऐतिहासिक विजयानिमित्त परळ येथे डाव्या पक्षांचा संयुक्त विजयोत्सव; ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे प्रमुख वक्ते

भारतीय वंशाचे जोहरान ममदानी हे, डोनाल्ड ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून, अमेरिकन भांडवलशाहीच्या अड्ड्यात न्यूयॉर्कचे महापौर म्हणून निवडून आले. भारताच्या आणि भारतीयांच्या विरोधात सातत्याने गरळ ओकणाऱ्या, डोनाल्ड ट्रम्प यांचा हा पराभव आहे. ममदानी स्वतःला अभिमानाने लोकशाहीवादी-समाजवादी म्हणवतात. अर्थातच, जागतिक भांडवली-साम्राज्यवाद्यांना ही एकप्रकारची चपराक आहे. परिणामी, जागतिक पुरोगामी लोकशाही चळवळींना, हा मोठा हुरुप देणारा विजय आहे.
याच अनुषंगाने, जोहरान ममदानी यांचा विजय साजरा करण्यासाठी, ‘भारतीय कम्युनिस्ट पक्षा’च्या परळ (पू.) येथील दळवी बिल्डिंगमध्ये गुरुवार, दि. १३ नोव्हेंबर-२०२५ रोजी, एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ममदानी यांच्या विजयोत्सवाच्या या कार्यक्रमाला ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे, कॉ. मिलिंद रानडे, कॉ. शैलेंद्र कांबळे, कॉ. अजित पाटील आणि कॉ. फिरोज मिठीबोरवाला आदी मान्यवर मंडळी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होती. हा कार्यक्रम सीपीआय, सीपीआय (एम), सीपीआय-एमएल (लिबरेशन) आणि ‘हम भारत के लोग’ या डाव्या विचारसरणीच्या पक्ष/संघटनांनी आयोजित केला होता. याप्रसंगी सर्व प्रमुख वक्त्यांनी अमेरिकेच्या आणि एकंदरीतच जागतिक भांडवलशाहीविरोधात जोरदार टीकास्त्र सोडले. दरम्यान, ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे यांनी, आपल्या घणाघाती भाषणात, गेल्या शतकभरातील अमेरिकन भांडवली-इतिहासाचा मागोवा घेत ममदानी यांच्या पुढ्यात उभ्या ठाकलेल्या आव्हानांचा आढावा घेतला व त्यातून डाव्या चळवळीने कुठल्या पद्धतीने व किती सावधगिरीने आपली भविष्यकालीन वाटचाल करायला हवी…याबाबत, रोखठोक प्रतिपादन केलं.
हे प्रतिपादन करताना, “अमेरिकेचे ३२वे अध्यक्ष फ्रँकलिन रुझवेल्ट यांनी तत्कालीन ढासळती अमेरिकन अर्थव्यवस्था व टोकाला पोहोचलेली ‘आर्थिक-विषमता’ सावरताना जोहरान ममदानींप्रमाणेच ‘न्यू डील’द्वारे कशा व कुठल्या उपाययोजना केल्या होत्या व त्यांचं पुढे काय झालं…याचा ओघवता मार्गदर्शनपर धांडोळा घेतला.
“महाराष्ट्राच्या महानगरांतील सार्वजनिक वहातूक-व्यवस्थेसह महाराष्ट्राच्या खेडोपाडी पसरलेली एसटीची सेवा कशी विनामूल्य करता येईल व त्यातून, कार्बनचं ऊत्सर्जन कमी होऊन ‘जागतिक-तापमानवाढ’ रोखण्यास कसा हातभार लावता येईल…याची डाव्या चळवळीने ‘जोहरान ममदानी’ व ‘सिंगापूर’च्या धर्तीवर संगतवार मांडणी करत…वर्ष-२०२९च्या पुढील लोकसभा-विधानसभा निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे”, अशी लाखमोलाची सूचना केली.
विजयोत्सवाच्या या कार्यक्रमाचे आयोजन कॉ. चारुल जोशी, कॉ. विवेक मॉन्टेरो, कॉ. श्याम गोहील, कॉ. गुड्डी एस. एल., कॉ. अमीर काझी आणि कॉ. अली भोजानी यांनी यशस्वीपणे केले.

१० नोव्हेंबर २०२५ : असीम सरोदे यांच्या सनद रद्दीकरणाच्या निषेधार्थ ‘धर्मराज्य पक्षा’तर्फे ठाण्यात मूक-निदर्शने

महाराष्ट्राच्या सार्वजनिक हिताच्या खटल्यांचे कामकाज पाहणारे व पीडितांसाठी न्यायालयीन लढाई लढणारे निर्भीड वकील असीम सरोदे यांची सनद, महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिल यांनी, राजकीय दबावापोटी सुडबुद्धीने आणि आकस बाळगून, तीन महिन्यांसाठी रद्द केल्याच्या निषेधार्थ, ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने सोमवार, दि. १० नोव्हेंबर-२०२५ रोजी, सायंकाळी ५ वा. पासून ते ७ वा. पर्यंत, ठाणे रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्र. १च्या बाहेर, सॅटीस पुलाखाली मूक-निदर्शने आयोजित करण्यात आली होती. ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष तथा ज्येष्ठ कामगारनेते मा. राजन राजे यांच्या आदेशानुसार आणि पक्षाचे सचिव नरेंद्र पंडित यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या मूक-निदर्शनाच्या या कार्यक्रमासाठी ‘धर्मराज्य पक्षा’चे प्रवक्ते समीर चव्हाण, पक्षाचे खजिनदार अजित सावंत, ठाणे लोकसभा महिला समन्वयक पौर्णिमा सातपुते, नवी मुंबई सचिव नरेंद्र शिंदे, ठाणे शहरातील सामाजिक कार्यकर्ते गजानन पाठारे आदी मान्यवर पदाधिकाऱ्यांसह, संजय दळवी, सोपान चौधरी, संजय उघडे, दादा मोरे, रामचंद्र गावडे, विकास पाटील इत्यादी कार्यकर्ते आणि कामगार सभासद उपस्थित होते.

गिरणी कामगारांसाठी ‘घर हक्क परिषद’ची मोर्चेबांधणी : परळ-भोईवाड्यात २९ पक्ष-संघटनांची महत्वपूर्ण बैठक

गिरणी कामगार आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी, परवडणाऱ्या दरात हक्काची घरे मिळावीत यासाठी ‘घर हक्क परिषदे’च्या वतीने, मोर्चेबांधणी सुरु झालेली असून, त्याच पार्श्वभूमीवर सोमवार, दि. २७ ऑक्टोबर-२०२५ रोजी, मुंबईतील परळ-भोईवाडा येथील ‘राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या कार्यालया’त एक महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला सुमारे २९ पक्ष-संघटनांचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आगामी महापालिका निवडणुकांच्या माध्यमातून, ठाणे, मुंबई, उपनगरे आणि महाराष्ट्रातील महात्त्वाच्या ठिकाणी सार्वजनिक सभा घेऊन जनजागृती करण्यात येणार आहे. याच अनुषंगाने या बैठकीत चर्चा करण्यात येऊन, एक मसुदा तयार करण्याचे एकमताने ठरविण्यात आले. दरम्यान, या बैठकीला ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष तथा ज्येष्ठ कामगारनेते राजन राजे, मुंबई काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी डॉ. गजानन देसाई, काँग्रेसच्या अर्थ विभागाचे अध्यक्ष विश्वास उटगी, काँग्रेसचे रोजगार विभागाचे अध्यक्ष धनंजय शिंदे, राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे गोविंदराव मोहिते, डाव्या चळवळीतील शिशिर ढवळे, सुकुमार दामले, ‘धर्मराज्य पक्षा’चे प्रवक्ते समीर चव्हाण आणि पक्षाचे सहसचिव नरेंद्र पंडित यांच्यासह, समविचारी संघटनांचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

१४ ऑक्टोबर-२०२५ : आठ-साडेआठ वर्षांच्या संघर्षानंतर ‘रेप्रो इंडिया लिमिटेड’च्या कामगारांचा विजय सोहळा

नवी मुंबईच्या महापे एमआयडीसीमधील ‘रेप्रो इंडिया लिमिटेड’ या कंपनीतील ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’च्या कामगार सभासदांचा ‘आनंद-मेळावा’ मंगळवार, दि. १४ ऑक्टोबर-२०२५ रोजी, ठाण्यातील मॉडेला चेकनाका येथील ‘आर नेस्ट’ या वातानुकुलीत सभागृहात मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाला. ‘धर्मराज्य पक्ष’ आणि ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे अध्यक्ष तथा ज्येष्ठ कामगारनेते मा. राजन राजे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. दरम्यान, पगारवाढ आणि आपल्या न्याय्य-हक्कांसाठी लोकशाही व सनदशीरमार्गाने ‘रेप्रो’च्या २८७ कामगार सभासदांनी, दि. ६ मार्च-२०१७ रोजीपासून, व्यवस्थापनाविरोधात बेमुदत संप पुकारला होता. त्यासंदर्भात, मा. औद्योगिक न्यायालय, ठाणे येथे कंपनी व्यवस्थापनाविरोधात दावा दाखल करण्यात आला होता. अखेर साडेआठ वर्षांच्या संघर्षानंतर, व्यवस्थापनाने सामंजस्याची भूमिका घेत, सर्व संपकरी कामगारांची कायदेशीर देणी, या सोहळ्याच्या निमित्ताने धनादेशाद्वारे मा. राजन राजे यांच्या शुभहस्ते अदा केली. ‘रेप्रो इंडिया लिमिटेड’ या कंपनीतील कामगार सभासदांचा कायदेशीर लढा, युनियनचे वकील के. टी. विश्वनाथन यांनी मोठ्या नेटाने लढवला आणि त्याला तेवढीच खंबीर साथ, ‘धर्मराज्य’च्या कामगार सभासदांनी दिली. या कालावधीत ‘राजन राजे’ नावाचा पंचाक्षरी मंत्र सदैव कामगारांना प्रेरणा देत राहिल्यामुळेच, तब्बल आठ-साडेआठ वर्षे, कामगार सभासद आपल्या निर्णयापासून तसूभरही ढळले नाहीत, ही सर्वात उल्लेखनीय बाब होय… याच पार्श्वभूमीवर या ‘आनंद-मेळाव्या’चे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला व्यवस्थापनाच्या वतीने, कंपनीच्या लीगल हेड व कंपनी सेक्रेटरी अलमिना शेख आणि कंपनीचे अकाऊंटंट समीर चौगुले उपस्थित होते. यावेळी ‘रेप्रो’च्या कामगारांचे कुटुंबीयदेखील आवर्जून उपस्थित होते. याच सोहळ्याचे औचित्य साधून, मा. राजन राजे यांनी उपस्थित कामगारांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे मन;पूर्वक अभिनंदन करुन, त्यांच्या भविष्यातील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. “सध्या देशातील कामगार-कष्टकरीवर्गाची अवस्था अत्यंत बिकट असून, केंद्र सरकारपुरस्कृत येऊ घातलेल्या काळ्या कामगार-संहितेमुळे, भविष्यात कामगारांना आपल्या हक्कासाठी संप, उपोषण आणि आंदोलने करता येणार नाहीत. ज्या भाजपला तुम्ही निवडून दिलंत, त्याच पक्षाने कामगार देशोधडीला लावायला घेतलाय. तुम्हाला गणेशोत्सव-नवरात्रौत्सव, दहीहंड्या, जातीय व धार्मिक विद्वेष यातच गुंतवून ठेवत, सर्वसामान्य जनतेचा बुद्धिभेद करण्याचे कारस्थान, भारतीय जनता पक्षाने हाती घेतलेले आहे… वेळीच सावध झाला नाहीत; तर, तुमच्या पुढच्या पिढीचे भविष्य अंधकारमय होणार हे निश्चित!” अशा परखड शब्दांत मा. राजन राजे यांनी, उपस्थित कामगारांना मर्गदर्शन केले. दरम्यान, याप्रसंगी ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे महासचिव महेशसिंग ठाकूर, उपाध्यक्ष रमाकांत नेवरेकर, सचिव समीर चव्हाण आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

 

१२ ऑक्टोबर-२०२५ : ‘घर हक्क परिषदे’त राजन राजे यांची ज्वलंत भूमिका — “कुणी घर देता का घर?

मराठी माणसाच्या अस्तित्वाचा प्रश्न फक्त, मुंबई आणि उपनगरांपुरता नाहीये; तर, मुंबईसह ठाणे, नाशिक, रायगड, पुणे, नागपूर या सगळ्या शहरांमधून तुम्ही-आम्ही सगळेजण विस्थापित झालेलो आहोत किंवा हळूहळू होत आहोत. करोना-काळात वन्यप्राण्यांनी जशा आपापल्या जागा माणसांकडून पुन्हा ताब्यात घेतल्या होत्या; तशा, आता महाराष्ट्रातल्या सामान्य मराठी-माणसांच्या ताब्यात देण्यासाठी, धनदांडग्यांकडून ‘जागा रिकाम्या’ करुन घ्याव्या लागतील!
वि. वा. शिरवाडकरांच्या ‘नटसम्राट’ नाटकातील, गणपतराव बेलवलकरांचं, “कुणी घर देता का घर”, हे जे स्वगत आहे, अगदी तशीच अवस्था मराठी माणसाची झालेली आहे. अशी ‘घरघर’ लागूच कशी शकते, मराठी माणसाला आपल्याच हक्काच्या महाराष्ट्रात? “माणसांना घरं नाहीत आणि घरांना माणसं नाहीत”, असा विलक्षण विपरीत काळ “घराच्या-दुकानांच्या साठेबाजीतून सध्या मराठी-माणसांवर येऊन ठेपलाय”, अशा रोखठोक शब्दांत ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष आणि ज्येष्ठ कामगार नेते राजन राजे यांनी आपले मनोगत व्यक्त केले…ते दादर येथील महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या, टिळक भवन येथील सभागृहात बोलत होते.
गिरणी कामगार आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हक्काच्या परवडणाऱ्या घरांसंदर्भात, दि. १२ ऑक्टोबर-२०२५ रोजी, आयोजित केलेल्या ‘घर हक्क परिषदे’च्या मेळाव्यात राजन राजे उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना ते पुढे म्हणाले की, “बारा तासांसाठी बारा हजार रुपये” अशी महाराष्ट्रातील भयानक परिस्थिती आहे. मुंबई सोडाच, ठाण्यासारख्या शहरात पाचशे-साडेपाचशे चौरसफुटांचा वन बीएचके फ्लॅट, ५० लाखांत येतो. नोकरी साधारण पस्तीस वर्षांची धरली तरी, कामगाराचा सगळा पगार दरमहा हप्ते फेडण्यात गेल्यावरच, त्याची नोकरी संपताना तो फ्लॅट खऱ्याअर्थाने त्याच्या मालकीचा होणार… या काळात तुम्ही भोजन-खानपान, कपडालत्ता, मुलाचं शिक्षण-आरोग्य कशाकशावर म्हणून खर्च करायचा नाही, हौसमौज तर विसरुनच जा…फक्त, एका हाताने पगार घ्यायचा आणि दुसऱ्या हाताने तो बँकेत भरायचा आणि शहरातल्या प्रदूषित हवेवर घरात कोंडून जगायचं… आहे शक्य कोटीतलं हे भयंकर आक्रित? एवढी केविलवाणी परिस्थिती मराठी सामान्य जनांची आपल्याच महाराष्ट्रात झालीच कशी??
…जर, अजूनही तुम्ही या जैन-गुज्जू-मारवाडी भांडवलदारांना आणि त्यांना साथ देणाऱ्या मराठी राजकारणी-दलालांना आवरलं नाहीत…वेळीच जागे झाला नाहीत; तर, लक्षात ठेवा, एकदिवस वेळ अशी येईल की, जसा तुम्ही जमिनीवर-पाण्यावर कर भरता; तसाच, तो उद्या सूर्य-किरणांवर ते कर भरायला लावतील…सूर्यकिरणांचा ‘सातबारा’च त्यांच्या नावावर करुन घेतील, इतकी गंभीर परिस्थिती आहे.
वर्ष १९७०पर्यंत प्रत्येक प्रौढ व्यक्तिला जास्तीतजास्त एकच फ्लॅट खरेदी करता येत होता; पण, बिल्डर राजकारण्यांनी आणि राजकारणातून बिल्डर बनलेल्यांनी घरांचं बांधकाम, हा ‘उद्योग’ बनवला व आपल्या नफेखोरीतल्या सगळ्या अडचणी, अटीशर्ती काढून टाकल्या; त्यामुळे फ्लॅट व दुकाने खरेदी, हा बक्कळ परतावा देणारा गुंतवणुकीचा मार्ग व त्यातूनच, काळ्या पैशाचा मोठा स्त्रोत बनला!
“अन्न, वस्त्र, निवारा म्हणजे घर”, हा माणसाचा नैसर्गिक व मूलभूत अधिकार असताना…१९७०नंतर घरांची प्रचंड साठेबाजी व काळाबाजार सुरु होऊन भाव गगनाला भिडायला लागले व त्यातच मराठी कामगार-कर्मचारीवर्ग कायमच पिचला जायला लागला!
…तेव्हा, लक्षात ठेवा, सुदैवाने वर्ष १९७७-७८च्या राज्यघटनेतील ४४व्या घटनादुरुस्तीमुळे सुदैवाने ‘संपत्तीचा-अधिकार’, हा आता ‘मूलभूत-अधिकार’ राहिलेला नाही. तो आता फक्त, कायदेशीर-अधिकार आहे; म्हणूनच कायदा करुनच ‘संपत्तीचं फेरवाटप’ व्हायला हवं! त्याकामी, शहरं-उपनगरांमधून प्रत्येक प्रौढ व्यक्तिमागे “एक मकान, एक दुकान”असा कायदा व्हायला हवा…तो झाल्याशिवाय, गगनाला भिडलेले फ्लॅटस् आणि दुकानांचे भाव पत्त्याच्या बंगल्यासारखे कोसळणार नाहीत!
…जसं भूदान-चळवळीतून विनोबा भावेंनी “सब भूमी गोपाल की” गर्जना करत, लाखो हेक्टर जमीन फेरवाटपासाठी मिळवली; तसेच, हे अतिरिक्त लाखो फ्लॅट्स व दुकाने…सिंगापूरच्या धर्तीवर, महाराष्ट्र-सरकारने ताब्यात घेऊन सुशिक्षित मराठी-तरुणाईला, वाजवी भाड्याने उपलब्ध करुन द्यायला हवीत…तरच, मराठी माणूस मुंबई-महाराष्ट्रात सन्मानाने व सुखासमाधानाने अस्तित्वात राहील…अन्यथा मुंबई, ठाणे, पुणे, रायगड, नाशिक-नागपूर (मुंठापुराना) शहरांतून त्यांचं साफ उच्चाटन होईल व वाघांसाठी जशी चंद्रपुरच्या ताडोबासारखी अभयारण्ये राखावी लागलीयत; तशी सामान्य मराठी-माणसांसाठी ‘अभयारण्ये’ निर्माण करावी लागतील!
…या परिषदेच्या निमित्ताने विविध २७ पक्ष-संघटना एकत्र आलेत, ही फार चांगली गोष्ट आहे. पण, एवढ्यावर थांबून चालणार नाही, हर्षवर्धन सपकाळ यांच्यासारखे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आपल्याला लाभलेले आहेत, जे खरंतर चळवळीतून आलेले आहेत. *ते कुठल्या बड्या श्रीमंत घराण्यातून आलेले नाहीत की, एखाद्या बड्या राजकारण्याच्या घरात पाळणा हलला, म्हणून ते नेते झालेले नाहीत, म्हणूनच त्यांच्याकडून आमच्या खूप अपेक्षा असल्याच्या भावनादेखील राजन राजे यांनी बोलून दाखवल्या. यावेळी राहुल गांधी यांचं कौतुक करताना, ते पुढे म्हणाले, मला महात्मा गांधी आणि पं. जवाहरलाल, या दोन्ही व्यक्तित्वांचा ‘संगम’ राहुल गांधीमध्ये दिसतो… आज ही माणसं काँग्रेसमध्ये आहेत, म्हणून आशा करायला काही जागा आहे… राष्ट्रीयस्तरावर राहुल गांधी तर, राज्यस्तरावर हर्षवर्धन सपकाळांसारखी नेतेमंडळी आहेत, म्हणून आम्ही कॉंग्रेससोबत आहोत. राहुल गांधींसोबत महाराष्ट्राचे ‘भीष्माचार्य’ कुमार केतकर आहेत आणि हर्षवर्धन सपकाळांसोबत महाराष्ट्राचे ‘द्रोणाचार्य’ विश्वास उटगी आहेत, अशा ओघवत्या शैलीत राजन राजे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं.
…याप्रसंगी, व्यासपीठावर परिषदेचे अध्यक्ष तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, ज्येष्ठ पत्रकार आणि माजी खासदार कुमार केतकर, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे अर्थशास्त्र विभागाचे अध्यक्ष विश्वास उटगी, सर्व श्रमिक संघाचे अध्यक्ष शिशिर ढवळे, आयटकचे सुकुमार दामले, कम्युनिस्ट पक्षाचे मिलिंद रानडे, गिरणी कामगारांच्या वकील गायत्री सिंग यांच्यासह, ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे कामगार-सभासद तसेच, कामगारक्षेत्रातील व डाव्या चळवळीतील मान्यवर मंडळी मोठ्यासंख्येने उपस्थित होती.

मा. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा ठाण्यात निषेध : ‘धर्मराज्य पक्ष’ाचा सहभाग

भारताचे सरन्यायाधीश मा. भूषण गवई यांच्यावर, सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरात, मनुवादी विचारसरणीच्या वकिलाकडून झालेल्या बूटफेकीच्या भ्याड हल्ल्याचा प्रयत्न केल्याच्या निषेधार्थ, ठाणे शहरातील कोर्टनाका परिसरातील, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ, ‘संविधानप्रिय समता-मूलक समाज’ आणि आंबेडकरी चळवळीतील नेते व कार्यकर्त्यांकडून गुरुवार, दि. ९ ऑक्टोबर-२०२५ रोजी, आंदोलन पुकारण्यात आले होते. या निषेध आंदोलनात ‘धर्मराज्य पक्षा’चे सहसचिव श्री. नरेंद्र पंडित, पक्षाचे प्रवक्ते तथा ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे सचिव श्री. समीर चव्हाण, ‘धर्मराज्य पक्षा’चे प्रसिद्धीप्रमुख श्री. संजय दळवी आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मनुवादी मानसिकता तसेच, जातीयवादी कृत्ये करणाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या, प्रस्थापित ब्राह्मणी व राजकीय व्यवस्थेचा जाहीर निषेध करण्यात आला. “भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, यांसारख्या जात्यंध आणि धर्मांध शक्तींविरोधात, देशातील बहुजन समाजाने एकत्र येऊन प्राणपणाने लढा दिल्याशिवाय, अशा प्रवृत्ती नष्ट होणार नाहीत. त्यासाठी, सामाजिक-राजकीय-जातीय मतभेद विस

रुन, लोकशाही व सनदशीरमार्गानेच संविधानाचे रक्षण करणे हे आपले आद्यकर्तव्य आहे!” असे विधान ‘धर्मराज्य पक्षा’चे सहसचिव श्री. नरेंद्र पंडित यांनी, प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना केले. दरम्यान, याप्रसंगी आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते व ऐक्यवादी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष श्री. नानासाहेब इंदिसे, श्री. जितेंद्रकुमार इंदिसे, श्री. भैय्यासाहेब इंदिसे, श्री. संदीप खांबे, ज्येष्ठ समाजवादी विचारवंत प्रा. संजय मं.गो., श्री. पंढरीनाथ गायकवाड, श्री. भास्कर वाघमारे, श्री. प्रमोद इंगळे, श्री. संजय भालेराव आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती.

‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष मा. राजन राजे यांची ‘घर हक्क परिषद’ बैठकीत उपस्थिती

मुंबईतील गिरणी कामगारांसाठी लढा देणाऱ्या ‘घर हक्क परिषद’ या संघटनेची बैठक शुक्रवार, दि. ३ ऑक्टोबर-२०२५ रोजी, ‘इंटक’चे जनरल सेक्रेटरी श्री. गोविंदराव मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय मिल मजदूर संघ, परळ-भोईवाडा, मुंबई येथील कार्यालयात संपन्न झाली. यावेळी गिरणी कामगार व नागरिकांसाठीच्या जाहीरनाम्यावर सखोल चर्चा करण्यात आली. या परिषदेत ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष मा. राजन राजे, ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे सचिव व ‘धर्मराज्य पक्षा’चे प्रवक्ते श्री. समीर चव्हाण, पक्षाचे माहिती अधिकार ठाणे कक्षप्रमुख श्री. अनिल महाडिक, गिरणी कामगारांचे प्रतिनिधी व ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ श्री. विश्वास उटगी, ज्येष्ठ विचारवंत श्री. शिशिर ढवळे, रेमण्ड कंपनीच्या कामगारांचे प्रतिनिधी श्री. विलास घाग, श्री. प्रदीप साळसकर आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती. दरम्यान, ‘घर हक्क परिषदे’ची आगामी बैठक रविवार, दि. १२ ऑक्टोबर-२०२५ रोजी, टिळक भवन, दादर-मुंबई दुपारी ३ वा. आयोजित करण्यात आल्याची माहिती, यावेळी आयोजकांकडून देण्यात आली.

‘वालमेट फ्लो-कंट्रोल प्रा. लि.’त दसरा साजरा : मा. राजन राजे यांची उपस्थिती

‘धर्मराज्य पक्ष’प्रणित ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’ची युनियन असलेल्या, ‘वालमेट फ्लो-कंट्रोल प्रा. लि.’ या कंपनीतील, डोंबिवली आणि अंबरनाथ या युनिटमधील कामगार सभासदांनी, दसरा व विजयादशमीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाप्रसंगी, ‘धर्मराज्य पक्ष’ आणि ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे अध्यक्ष मा. राजन राजे यांनी उपस्थित राहून, सर्व कामगार सभासद तसेच, कंपनी व्यवस्थापनास दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी श्री सत्यनारायणाच्या पूजेचे मा. राजन राजे यांनी, मनोभावे दर्शन घेतले. दरम्यान, ‘वालमेट फ्लो-कंट्रोल प्रा. लि.’ या कंपनीच्या व्यवस्थापनाच्या वतीने, मा. राजन राजे यांचे शाल-श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी, ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे उपाध्यक्ष रमाकांत नेवरेकर, महासचिव श्री. महेशसिंग ठाकूर व सचिव श्री. समीर चव्हाण उपस्थित होते.

“धार्मिक अंधश्रद्धेपेक्षा, ‘राजकीय-अंधश्रद्धा’ समाजाचं अधिक नुकसान करतात!” -राजन राजे

“अंधश्रद्धा स्वतःच एक ‘व्यवस्था’ असते; जी आतून मुठभरांच्या वर्चस्वाला चांगलीच आधारभूत होत रहाते… आणि, आजच्या भांडवली-व्यवस्थेत अशा अनेक अंधश्रद्धांना, ‘व्यवस्था’ चालवणारे जाणिवपूर्वक, याच कारणामुळे पुढावा देत असतात. म्हणूनच तर, आपल्या महाराष्ट्रात, दिवसागणिक खोल गर्तेत जात चाललेल्या मराठी-माणसाला, विविध धर्मसंप्रदायात व्यवस्थेकरवी कौशल्याने अडकवलं जातं. परिणामी, धार्मिक अंधश्रद्धा, जेवढं समाजाचं नुकसान करतात; त्याच्यापेक्षा कैकपटीने अधिक ‘राजकीय-अंधश्रद्धा’ समाजाचं नुकसान करतात!” असे रोखठोक भाष्य ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष आणि ज्येष्ठ कामगारनेते, तथा राजकीय व सामाजिक विचारवंत राजन राजे यांनी नुकतेच ठाण्यात केले. ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’च्या राज्य कार्याध्यक्षपदी संजय बनसोडे यांची नियुक्ती झाल्याबद्दल, समितीच्या ठाणे शहर शाखा आणि ठाण्यातील सर्व परिवर्तनवादी संघटनांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या, नागरी सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी, उपस्थितांना संबोधित करताना, राजन राजे पुढे म्हणाले की, “कुणी बुलंद आवाजात भाषणं ठोकत, आपलं प्रतिनिधित्व करणारा अमकातमका राजकीय पुढारी (जो कधि ‘जाणता राजा’ म्हणून मिरवत असतो; तर, कधि कुठलं ‘सम्राटपद’ भूषवत असतो), आपल्या समाजाचं पुनरुत्थान करेल, आपल्यावर चारही बाजुंनी होत असलेला अन्याय दूर करेल, अशी थेट ‘अवतार-संकल्पने’ला जाऊन भिडणारी आपली अंधश्रद्धा असते; जेव्हा, तो नेता बोलत एक असतो आणि करत वेगळंच असतो… तो व्यवस्थेचा लाभार्थी तर असतोच; पण, व्यवस्थेच्या बळकट पाठिंब्यावरच त्याचं ‘नेतेपद’ अवलंबून असल्यामुळे, ही ‘राजकीय-नौटंकी’ तो तहहयात करत रहतो आणि लोकं त्या ‘राजकीय-अंधश्रद्धे’ला बळी पडत रहातात. उदाहरणच द्यायचं झालं तर, ‘कंत्राटी-कामगार पद्धती’चं निर्मूलन व ‘किमान-वेतन’ सन्मानजनक झाल्याखेरीज, उत्तरेचं नोकरपेशातलं आक्रमण थोपवल्याखेरीज आणि शहरं-उपनगरांतून प्रत्येक प्रौढ व्यक्तिमागे “एक दुकान, एक मकान” धोरण राबवून धनदांडग्या गुजराथी-भाषिक भांडवलदारवर्गाला रोखल्याखेरीज… ‘मराठी-माणसां’चं (जे महागड्या शहरांमधून निवासाची व व्यवसायाची संधि उपलब्ध नसल्यामुळे, बहुतांश दूरवर रहाणारे कामगार आहेत) भलं होणं शक्यच नाही, हे एखादं गल्लीतलं शेबडं पोरं पण जाणतं…पण, मी मी म्हणणारा कुठलाही मराठी-नेता (ज्यांच्याविषयी मराठी भाबडी जनता ‘राजकीय-अंधश्रद्धा’ बाळगून असते), असल्या व्यवस्थेच्या गाभ्यातील अथवा ‘मराठी-जगण्या’च्या आसाला भिडलेल्या मुद्द्यांवर चुकूनही काम करणं तर सोडाच; साधा उच्चारही करताना दिसणार नाहीत. तेव्हा, या राजकीय-अंधश्रद्धांना जोवर आपण मराठी-माणसं ‘मूठमाती’ देत नाही व स्वतःला सक्षम बनवत नाही, तोवर मराठी-माणसांचं पिढ्यानपिढ्या नुकसान होतच रहाणार आहे, मराठी-माणसं गुलामीत ढकलली जातच रहाणार आहेत… मराठी-माणसानं स्वतःला सक्षम बनवणं म्हणजे, “व्यक्ति आधारित कमी आणि धोरण आधारित जास्त राजकारण करणं!” अशा परखड शब्दांत आपलं मनोगत व्यक्त केलं. यावेळी व्यसपीठावर, प्रमुख पाहुणे म्हणून ‘एनपीएम’चे राष्ट्रीय संयोजक डॉ. संजय मं.गो., ‘यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान’चे विश्वस्त दत्ता बाळसराफ, प्रा. मच्छिंद्र मुंडे उपस्थित होते. दरम्यान, समितीच्या ठाणे शहर शाखेचे कार्याध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार अनिल ठाणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ‘अंनिस’च्या केंद्रीय सदस्या सुशीला मुंडे यांनी केले. याप्रसंगी ‘धर्मराज्य पक्षा’चे संजय दळवी, अनिल महाडिक, नरेंद्र शिंदे, रामसकल भर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

गुरुपौर्णिमेचा श्रध्दावंत सागर – कामगारहृदयसम्राट राजन राजेंना निष्ठेचा वंदन!

भारतातील पहिलावहिला पर्यावरणस्नेही हरित-पक्ष अशी सर्वमान्य ओळख असलेला ‘धर्मराज्य पक्ष’ आणि कष्टकऱ्यांची लढाऊ संघटना असलेल्या ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे संस्थापक/अध्यक्ष मा. राजन राजे यांना गुरुपौर्णिमेनिमित्त शुभेच्छा देण्यासाठी व त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी, पक्षाच्या ठाणे कार्यालयात गुरुवार, दि. १० जुलै-२०२५ रोजी ‘धर्मराज्य पक्षा’चे कार्यकर्ते, पदाधिकारी, कामगार सदस्य आणि हितचिंतकांनी एकच गर्दी केली होती. मुसळधार पाऊस कोसळत असतानाही, “राजन राजे” या पंचाक्षरी मंत्रावर श्रध्दा असणाऱ्या निष्ठवंतांचा ओघ मात्र, आपल्या गुरुला शुभेच्छा देण्यासाठी दिवसभर सुरुच होता. कार्यकर्ते, पदाधिकारी आणि कामगार सदस्यांच्या या प्रेमाने, ‘कामगारहृदयसम्राट’ अशी ओळख असणाऱ्या मा. राजन राजे यांचे हृदयदेखील भारावून गेले होते. गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्या प्रत्येकाची, त्याच्या कुटुंबीयांची आपुलकीने विचारपूस करुन, भरभरुन आशीर्वाद देत, मा. राजन राजे यांनी, प्रस्थापित राजकीय व्यवस्था आणि धनदांडग्या-भांडवलदारी प्रवृत्तीविरोधात लढण्यासाठी, सर्वांनी एकत्र येऊन संघर्षरत झाल्याशिवाय पर्याय नसल्याचे सूतोवाच यानिमित्ताने केले. कामगार आणि शेतकरी हे भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा तर आहेतच; परंतु, त्याचबरोबर हे दोन्ही घटक म्हणजे, देशाची सामाजिक व सांस्कृतिक ओळख असल्याची जाणीव मा. राजन राजे यांनी, आपल्या निष्ठावान कार्यकर्ते, पदाधिकारी आणि कामगार सदस्यांना यावेळी करुन दिली. दरम्यान, गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून, मा. राजन राजे यांच्या अध्यक्षतेखालील, ‘सेऊ’ कामगार संघटनेच्या उपाध्यक्षपदी श्रीमती मीनल मल्ल्या यांची निवड करण्यात येऊन, कामगार संघटनेत महिलांनादेखील सन्मानाचे स्थान देण्यात येत असल्याचे, यानिमित्ताने अभिमानास्पदरित्या अधोरेखित झाले.

error: Content is protected !!