Blog

‘धर्मराज्य पक्ष’तर्फे ठाण्यात ‘४ काळ्या कामगार-संहितां’विरोधात भव्य आक्रोश मोर्चा; मान्यवरांची उपस्थिती

आंतरराष्ट्रीय कामगार दिन व महाराष्ट्र दिनानिमित्त ‘धर्मराज्य पक्ष’ व ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघ’ यांच्या वतीने ठाण्यात ‘राष्ट्रीय संपत्ती-निर्मात्या’ कामगारांचा भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला. सायं. ४.३० वाजता सुरू झालेल्या या मोर्चात विविध औद्योगिक क्षेत्रांतील कामगार, कर्मचारी, पदाधिकारी व ठाणेकर जनता मोठ्या संख्येने सहभागी झाली होती.
केंद्र सरकारने लागू केलेल्या ‘४ काळ्या कामगार-संहितां’विरोधात हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. या संहितांमुळे कामगारांचे मूलभूत हक्क धोक्यात येऊन शोषण, असुरक्षितता व कंत्राटीकरण वाढणार असल्याची वस्तुस्थितीवर यावेळी जनतेसमोर मांडण्यात आली. कामगार संघटनांची ताकद कमी करणे, नोकरीतील स्थैर्य नष्ट करुन ‘‘Hire & Fire’’ धोरणाला चालना देणे, अशा विविध मुद्द्यांवर तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.
मोर्चादरम्यान कामगारांनी घोषणाबाजी करत आपल्या मागण्या प्रखरपमे मांडल्या. ‘४ कामगार संहितां’ची तत्काळ रद्दबातल करावी, कामगारांचे हक्क अबाधित ठेवावेत; तसेच, कंत्राटी-कामगार पद्धतीचं निर्मूलन करावे, अशा प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या.
या मोर्चात विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती लाभली, त्यामध्ये ॲड. विजय कुर्ले, ॲड. नाना अहिरे, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष (ग्रामीण) चेतनसिंह पवार, काँग्रेस ठाणे जिल्हा पदाधिकारी राहुल पिंगळे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ज्येष्ठ नेत्या वंदनाताई शिंदे व कॉ. उदय चौधरी, आनंदा होवाळ यांचा समावेश होता.
त्याचप्रमाणे या मोर्चात धर्मराज्य कामगार कर्मचारी महासंघ महासचिव महेशसिंग ठाकूर, उपाध्यक्ष रमाकांत नेवरेकर, सचिव समीर चव्हाण, धर्मराज्य पक्षाचे सचिव नरेंद्र पंडित, ठाणे लोकसभा अध्यक्ष राजेश गडकर, उपाध्यक्ष सचिन शेट्टी, पोर्णिमा सातपुते, जगन्नाथ सलगर आदी पदाधिकारी व इतर कार्यकर्ते तसेच कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे यांनी कामगारांच्या एकजुटीचे महत्त्व अधोरेखित करत, ‘४ काळ्या कामगार-संहितां’मुळे जसा आपत्कालीन अवस्थेत विमानाचा वैमानिक, ‘मे डे’ (May Day) असा वाचविण्यासाठी संदेश (SOS) पाठवतो; तशीच अवस्था ‘कामगारां’ची झालीय…पण, लक्षात कोण घेतो? कामगार-चळवळ संपवून कामगारांना कंत्राटी-कामगार किंवा ‘मुदतबंद-कामगार’ (FTE…Fixed Term Employee) या नात्याने ‘गुलाम’ बनवणं सुरु आहे…
म्हणूनच यासारखे लढे, कामगारांच्या हक्कांसाठी निर्णायक ठरणार असल्याने, महाराष्ट्रातील सर्व कामगारांनी ‘धर्मराज्य पक्षा’च्या झेंड्याखाली एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले.
मोर्चा अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला व भविष्यातही या प्रश्नावर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा धर्मराज्य पक्षाने दिला आहे.

शासकीय कर्मचाऱ्यांच्या ‘बेमुदत संपा’ला ‘धर्मराज्य पक्षा’तर्फे जाहीर पाठींबा

आजवर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखालील ‘NDA’ सरकारने, यापूर्वी किमान ७ वेळा झालेल्या राज्यस्तरीय आंदोलनांपश्चात, तात्पुरती खोटी आश्वासने देऊन…१७ लाख शासकीय-कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांना वाटाण्याच्या अक्षता लावल्याने; आज दि. २१ एप्रिल-२०२६ पासून सुरु झालेल्या, त्यांच्या न्याय्य ‘बेमुदत संपा’ला ‘धर्मराज्य पक्षा’तर्फे जाहीर पाठींबा दिला जातानाचे क्षणचित्र….

धर्मराज्य पक्ष”च्या पुढाकाराने ठाणे स्टेशन परिसरातील रिक्षा-टॅक्सी समस्या व वाहतूक कोंडीबाबत पोलिसांशी चर्चा

ठाणे स्टेशन येथील रिक्षा-टॅक्सी चालकांच्या तसेच वाहतूक कोंडी व इतर समस्यांच्या अनुषंगाने, आज मंगळवार, दि. २१/०४/२०२६ रोजी ठाणे शहर वाहतूक विभागाच्या सिनिअर पोलीस इन्स्पेक्टर मा. रोहिणी सोनार मॅडम व पोलीस सब-इन्स्पेक्टर मा. श्री. विजय कांबळे साहेब यांच्याबरोबर चर्चा करण्यात आली. त्यावेळी त्यांच्याकडून समस्यांवर लवकरात लवकर तोडगा काढण्याचे आश्वासन देण्यात आले.
यावेळी, धर्मराज्य पक्षाचे सचिव श्री. नरेंद्र पंडित, धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघाचे सचिव श्री. समीर चव्हाण, स्थानिक रिक्षा-टॅक्सी चालक-मालक युनियनचे श्री. सुशिलकुमार चंद्रा, श्री. रवि मिश्रा व इतर सहकारी उपस्थित होते.

नवी मुंबईच्या ‘इडिकॉन न्यूमॅटीक’ कंपनीतील ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’तर्फे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, कामगारांच्या मोठ्या पगारवाढीचा त्रैवार्षिक-करार संपन्न!

कामगार नेते मा. राजन राजे यांच्या नेतृत्त्वाखाली, सरासरी १२,५०० रुपयांची इडिकॉन-कामगारांना थेट पगारवाढ (‘CTC’सारख्या तद्दन फसव्या संकल्पनेनुसार फुगवलेली नव्हे)….
———————————-
‘ट्रंप’कृत अमेरिकी-टेरिफ युद्धाला तोंड देता देता…ज्या कंपनीचं उत्पादन, मोठ्याप्रमाणावर आजवर अमेरिकेला निर्यात होतं आलेलं आहे; त्या कंपनीच्या वार्षिक-उलाढालीत स्वाभाविक मोठी घसरण अपेक्षितच होती. *गेल्यावर्षीच्या तुलनेत जवळपास ४२ कोटींवरुन ३५ कोटींपर्यंत वार्षिक-उलाढाल घसरण्याचा प्राथमिक अंदाज असताना देखील, आजवरच्या सौहार्द्रपूर्ण औद्योगिक-संबंधांची योग्य जाण ठेवत, इडिकॉन-व्यवस्थापनाने ‘धर्मराज्य पक्ष’प्रणित ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’शी केलेला* हा आश्चर्यजनक करार होय!
“Profis are Private & Losses are Public” चा सध्या कामगारविरोधी ‘जमाना’, औद्योगिक व सेवा क्षेत्रात सर्वत्र हातपाय पसरुन असण्याच्या पार्श्वभुमीवर झालेला, हा उल्लेखनीय करार आहे.
…भरीस भर म्हणून देशात भाजप-संघीय ‘कामगारघातकी’ सरकारने लादलेल्या ‘४ काळ्या कामगार-संहितां’द्वारे (4 Black Labour-Codes) आणल्या गेलेल्या, ‘वैयक्तिक-करार’ करण्याच्या ‘फोडा-झोडी’च्या तरतुदींच्या प्रवाहाविरोधात पोहत जात केलेला हा करार आहे, हे विशेषच!
नवी मुंबई कामगारांच्या आर्थिक उन्नयनासाठी गेल्या तीन दशकांहून अधिक काळ, प्रस्थापित भांडवली व्यवस्थेविरोधात संघर्ष करणारे ज्येष्ठ कामगार-नेते, ‘धर्मराज्य पक्ष’प्रणित ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे संस्थापकीय अध्यक्ष मा. राजन राजे यांनी, आपल्या कार्यकर्तृत्त्वाला साजेसा असा, पुन्हा एकदा पगारवाढीचा ऐतिहासिक त्रैवार्षिक-करार संपन्न केला असून, नवी मुंबईस्थित रबाळे एमआयडीसी येथील, ‘इडिकॉन न्यूमॅटीक’ या बहुराष्ट्रीय कंपनीतील कामगार सभासदांना, तब्बल सरासरी १२ हजार ५०० रुपयांची (CTC वगळून) थेट पगारवाढ मिळाली आहे.
मंगळवार, दि. २४ मार्च-२०२६ रोजी, रबाळे येथील ‘विस्टा-ईन’ या हॉटेलमध्ये, औद्योगिकक्षेत्रात कामगारहिताची सळसळ निर्माण करणारा असा, त्रैवार्षिक-करार संपन्न झाला. या करारांतर्गत, ‘इडिकॉन’च्या कामगार सभासदांना, ९० हजार ते १ लाख ७३ हजार इतका भरभक्कम दिवाळी बोनसही दरवर्षी मिळणार आहे. परिणामी, या करारामुळे कामगारांचे वेतनमान कमीतकमी ६० हजार ५०० ते जास्तीतजास्त १ लाख ३ हजार इतके वाढले आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी, भारतावर लादलेल्या अन्यायकारक टेरिफला समर्थपणे तोंड देत, इडिकाॅन व्यवस्थापन व कामगार-नेते मा. राजन राजे यांच्या नेतृत्त्वाखाली हा करार संपन्न झाल्याने, नवी मुंबईच्या औद्योगिक क्षेत्रातील कामगारविश्वात मोठ्या उत्साहाचं उत्सवी वातावरण आहे. त्याचबरोबर, ‘इडिकॉन न्यूमॅटीक’ कंपनीचे मालक (एमडी/सीईओ) श्री. ऑब्री डिकून्हा साहेब व त्यांचे पुत्र आणि कंपनीचे डायरेक्टर श्री. ॲरोन डिकून्हा साहेब, यांचे मोलाचे सहकार्य व सामंजस्याची भूमिका यामुळेदेखील हा करार यशस्वी झाला आहे. मा. राजन राजे यांच्या नेतृत्वाखालील, ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघ’ या युनियनच्या परंपरेनुसार औद्योगिक शिस्त व शिरस्ता पाळत, ‘इडिकॉन’च्या कामगार सभासदांनी, आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असतानाही, उत्पादनाचा दर्जा व मात्रा सातत्याने उंचावत नेल्यानेच…कामगारांना इतर सोयीसुविधांच्या वाढीसोबतच, ही ऐतिहासिक पगारवाढ झालेली आहे.
1) करारानंतरची थेट सरासरी पगारवाढ = रु. 11,500 प्रतिमास
2) VDA सह सरासरी पगारवाढ = रु. 12,500 प्रतिमास
3) किमान पगारवाढ = रु. 10,600 प्रतिमास
4) कमाल पगारवाढ = रु. 15,600 प्रतिमास
5) सरासरी पगार = रु. 76,000 प्रतिमास
6) किमान पगार = रु. 60,500 प्रतिमास
7) कमाल पगार = रु. 1,03,000 प्रतिमास
😎 सरासरी बोनस = रु. 121500 प्रतिवर्षी
9) किमान बोनस = रु. 90,000 प्रतिवर्षी
10) कमाल बोनस = रु. 1,73,000 प्रतिवर्षी
या ऐतिहासिक कराराप्रसंगी ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे उपाध्यक्ष श्री. रमाकांत नेवरेकर, महासचिव श्री. महेशसिंग ठाकूर, सचिव श्री. समीर चव्हाण यांच्यासह कंपनी व्यवस्थापनाच्या वतीने, आसिस्टंट मॅनेजर (एच. आर.) श्री. योगेश सूर्यराव, एच. आर. मॅनेजर श्री. नंदकुमार पवार, सिनियर मॅनेजर (प्रोडक्शन) श्री. रवींद्र वर्पे, आसिस्टंट मॅनेजर (अकाउंट व फायनान्स) श्री. सचिन गोलांबडे तसेच, कमिटीच्या वतीने युनिट अध्यक्ष श्री. दिलीप राणे, सेक्रेटरी श्री. तुषार बेर्डे, खजिनदार श्री. सचिन म्हात्रे आणि कार्यकारिणी सदस्य श्री. राजेश कदम, श्री. दीपक घोले, श्री. प्रवीण वालनुस्कर, श्री. अमित पांचाळ आदी मान्यवर मंडळींनी उपस्थित राहून करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या भरघोस पगारवाढीमुळे ‘इडिकॉन न्यूमॅटीक’ कंपनीच्या कामगार सभासदांमध्ये आनंदोत्सवाचे वातावरण निर्माण झाले असून, कामगारांनी या पगारवाढीचे जल्लोषात स्वागत करत, मा. राजन राजे यांचे मन:पूर्वक आभार व्यक्त केले आहेत.

“रोहा (रायगड) | ०९.०३.२०२६ : ‘डीआरटी अँथिया अरोमा केमिकल्स’मध्ये १४ हजारांची थेट पगारवाढ – विजयी सभेत राजन राजे यांचा भांडवली व्यवस्थेवर घणाघाती प्रहार”

कामगार सन्मानाने जगला तरच, कारखाना जगेल…अन्यथा नव्हे!
रोह्यातील विजयी सभेत, राजन राजे यांचा ‘भांडवली-व्यवस्थे’वर घणाघाती प्रहार….

“मराठी माणसाचं नाव घेऊन पक्ष काढायचे, राजकारण करायचं आणि त्याच मराठी कामगाराची फसवणूक करायची, त्याचे संप फोडायचे! मराठी-माणसांच्या हातात दगड द्यायचे, कामगारांना एकमेकांची डोकी फोडायला लावायची…आणि, तेच ‘दगड’ गोळा करत, त्या मराठी-नेत्यांनी आपले ‘गड’ बांधायचे… हा उफराटा उत्पात, महाराष्ट्राच्या कामगारविश्वात अजून कितीकाळ चालणार आहे? मराठी माणसांनो, म्हणजे अर्थातच मराठी-कामगारांनो, लक्षात घ्या की, “फेकला तर दगड, रचला तर गड” याच मराठी-मराठी करणाऱ्या नेत्यांनी, “कारखाना जगला तरच, कामगार जगेल’ अशी मालकवर्गाची ‘दलाली’ करणारी आणि आपल्याच श्रमिक मराठी-जमातीला मुळातूनच भेदरवून टाकणारी घोषणा दिली…कुठल्याही जातिवंत नेत्याने आपल्या समाजाला, विजिगिषू प्रेरणा व चेतना द्यायची असते; अकारण घाबरवून सोडायचं नसतं. या देशातला एक ‘बाबासाहेब’, शेकडो-हजारो वर्षे गुलामीत खितपत पडलेल्या पददलित ‘मृण्मय’ मनांना ‘चिन्मय’ करण्यासाठी आपलं आयुष्य पणाला लावतो; तर, आमचे मराठी राजकारणी ‘दुकानदारसाहेब’, आपल्याचं जमातीचं खच्चीकरण करु पहातात? ‘भाषा आणि भाषण’ यावरील अंगभूत प्रभुत्वाचा गैरवापर करत, मराठी-कामगाराला ‘भांडवली-गुलामी’कडे कौशल्याने ढकलत नेणाऱ्या घृणास्पद राजकीय-डावपेचांना छेद देण्यासाठीच, “कामगार सन्मानाने जगला; तरच, कारखाना जगेल…अन्यथा नव्हे”, ही गेली चार दशकं आम्ही भीमगर्जना करत आलोत! ‘धर्मराज्य’सारखं ‘सहकार्य आणि संघर्ष’ इतर कोणी करु शकत नाही…तेव्हा, यातलं नेमकं काय निवडायचं; ते संबंधित व्यवस्थापनांनी व भांडवलदारांनी ठरवावं!” असं रोखठोक प्रतिपादन ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष तथा ज्येष्ठ कामगार नेते राजन राजे यांनी, रोह्यात केले.
धाटाव एमआयडीसीमधील, ‘डीआरटी अँथिया अरोमा केमिकल्स प्रा. लि.’ या कंपनीतील ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’च्या कामगार सभासदांना नुकतीच ऐतिहासिक स्वरुपाची रु. १४ हजारांची ‘थेट’ (‘C.T.C.’सारखी तद्दन फसवी पगारवाढ नव्हे) पगारवाढ त्रैवार्षिक कराराद्वारे करण्यात आली, त्याप्रसंगी, झालेल्या विजयी-सभेत राजन राजे बोलत होते.

यावेळी, ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे सचिव समीर चव्हाण, ‘धर्मराज्य पक्षा’चे सचिव नरेंद्र पंडित, पक्षाचे खजिनदार अजित सावंत, प्रसिद्धीप्रमुख संजय दळवी, श्रमिक संघाचे नेते शिशिर ढवळे, आंबेडकरी विचारवंत आनंदा होवाळ, सामाजिक कार्यकर्ते ॲड. नाना अहिरे, कामगार प्रतिनिधी निरंजन म्हात्रे, दिलीप राणे, विनोद गायकवाड आदी मान्यवरांसह, ‘डीआरटी अँथिया’ कंपनीतील कामगार सभासद मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

दरम्यान, आपल्या तासाभराच्या तडाखेबंद भाषणात कामगारांना संबोधित करताना राजन राजे यांनी सुरुवातीलाच, १४ हजारांची भरघोस पगारवाढ झाल्याबद्दल उपस्थित कामगारांचे अभिनंदन केले. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले, “माझ्या प्रत्येक कामगाराचे आर्थिक-उन्नयन व्हावे; यासाठी, मी गेली चार दशकं ‘भांडवली-व्यवस्थे’शी संघर्ष करत आलोय. कामगारांनी ‘श्रीमंत’ जरुर व्हायला हवं; पण, त्याआधी ‘नितीमंत’ होणे गरजेचे आहे… “आधी नितीमंत, मगच श्रीमंत! ‘फोडा आणि झोडा’, या कपटी-दुष्ट भांडवली-नितीने, कृत्रिमरित्या निर्माण केलेले… ‘कंत्राटी / कायम / मुदतबंद कामगार’ वगैरे कामगारभेदांना ‘फाट्यावर मारुन’, प्रत्येक कामगाराच्या जगण्यात श्रीकृष्णाचं आनंदी ‘गोकुळ’ निर्माण व्हावं, ही माझी जीवन-प्रेरणा आहे… तुमच्या डोळ्यांच्या पापण्यांवर बांधलेलं समाधानाचे-सुरक्षिततेचं ‘पैंजण’; हेच, माझ्या जगण्याचं ‘इंधन’ आहे…ते कुठलं वनस्पती तेल अथवा आखाती खनिज तेलस्वरुप इंधन नव्हे! संकटं सर्वांवर येतात, ती सज्जनांवर येतात; तशी दुर्जनांवरही येतात…पण, शंभर संकटं कोसळूनही सज्जन ठाम उभा राहू शकतो: पण, एखाद्या संकटानेही, आतून पोकळ डोलारा असलेला दुर्जन कोसळू शकतो, हे लक्षात ठेवा. ‘आळशी-उद्धट कामगार राष्ट्राला भार…नितीमान कामगार राष्ट्राला आधार’, ही आपली ‘धर्मराज्य-घोषणा’ कधिही विसरु नका; आपल्या चुकीच्या वागणुकीमुळे कधी संकट ओढवून घेऊ नका…संकटं यायचीच असतील, तर त्यांना त्यांच्याच पावलांनी येऊ द्यात…तुमची पाऊले वा तुमच्या पादुका, त्यांना बहाल करु नका”, असा वडीलकीचा सल्लादेखील राजन राजे यांनी यावेळी कामगारांना दिला.
राजन राजे भाषणाचा ओघ पुढे न थांबता सुरुच होता….”डाॅ दत्ता सामंतांसारखे लढवय्ये कामगार-नेते आणि ‘FERA’सारखे कायदे होते; तोपर्यंतच, बहुराष्ट्रीय कंपन्यांमधून कामगारांना उत्तम वेतन-सुविधा मिळत होत्या; पण, आता बहुराष्ट्रीय कंपन्याच कामगारांचं शोषण करण्यात व काॅर्पोरेटीय क्षेत्रात ‘कंपनी-दहशतवाद’ (Corporate Terrorism) माजवण्यात आघाडीवर आहेत. निष्ठावंत कामगार हा, कामगार चळवळीच्या ‘पायाचा दगड’ असतो, दहीहंडीच्या सगळ्यात खालच्या थरासारखा संघटनेचा तो मजबूत आधार असतो; जोडीला शिस्त व एकजुटीचं कसोशीनं पालन करा. वाढीव पगाराचा पैसा अत्यंत खुबीने कुटुंबाच्या हितासाठीच वापरा, नवीन चकचकित चारचाकी गाडी घेतल्यादिवसापासूनच म्हातारी व्हायला सुरुवात होते; म्हणून त्यावर पैसे उडवण्यापेक्षा आपली ‘काळी आई’ असणाऱ्या जमिनीत पैसे गुंतवा, योग्य ठिकाणी विचारपूर्वक गुंतवणूक करा…पुढील काळाचा भरवसा नाही; म्हणून भविष्यातील संकटे वा संघर्षासाठी पगारातले ठराविक पैसे राष्ट्रीयीकृत बँकेतील मुदतठेवीत राखून ठेवा, चंगळवादाच्या नादी लागू नका…येणाऱ्या कठीण काळाची पाऊले वेळीच ओळखा, यश मिळवणे सोपं असतं; पण, ते टिकवणे आणि वाढवणे कठीण असते. केवळ, तुमचंच नव्हे; तर, रोह्यातील प्रत्येक कामगाराचं चांगभलं व्हायलाच पाहिजे, या दिशेने प्रयत्नरत रहा…फक्त पगार/बोनस वाढीसाठी नव्हे; तर, कामगारांच्या सन्मानासाठी ‘राजन राजे’ हा ‘पंचाक्षरी-मंत्र’ आहे, हे विसरु नका!” अशा शब्दांत धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजन राजे यांनी कामगारांमध्ये स्फुल्लिंग चेतवले.
…या आनंदोत्सवा समयी, ‘डीआरटी अँथिया’च्या कामगारांनी, संपूर्ण रोहा शहर आणि धाटाव एमआयडीसीतून बाईक रॅली काढत, राजन राजे यांचे अभूतपूर्व स्वागत केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युनिट अध्यक्ष प्रमोद जंगम, उपाध्यक्ष निखिल वरणकर, सेक्रेटरी मयुर कोंडे, कार्यकारिणी सदस्य विनोद मगर आणि रामदास साखीळकर आदी पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

“धर्मराज्य पक्ष”प्रणित ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चा औद्योगिक चमत्कार : रोह्यातील ‘डीआरटी अँथिया’ कामगारांना १४ हजारांची थेट भरघोस पगारवाढ — राजन राजे यांचे नेतृत्व ठळक!

रोह्यातील ‘डीआरटी अँथिया’ कंपनीतील कामगारांना, १४ हजार रुपयांची (CTC वगळून) थेट भरघोस पगारवाढ!
‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे अध्यक्ष राजन राजे यांचा, रायगड जिल्ह्यात औद्योगिक चमत्कार…
‘धर्मराज्य पक्ष’प्रणित ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघ’ या युनियनचा रायगड जिल्ह्यात झंझावात सुरु झाला असून, रोहा तालुक्यातील धाटाव एमआयडीसी या औद्योगिकक्षेत्रात असलेल्या, ‘डीआरटी अँथिया अरोमा केमिकल्स प्रा. लि.’ या कंपनीतील सुमारे १०५ कायम कामगार सभासदांना तब्बल १४ हजार रुपयांची थेट पगारवाढ (CTC वगळून) मिळाली आहे. ‘धर्मराज्य’चे अध्यक्ष आणि महाराष्ट्राच्या औद्योगिकक्षेत्रातील ज्वलंत कामगार-नेते मा. राजन राजे यांच्या नेतृत्वाखाली; तसेच, त्यांच्या कामगारक्षेत्रातील चळवळीला साजेशी ही भरघोस पगारवाढ झाल्याने, रायगड जिल्ह्यात अभिमानास्पद असा औद्योगिक चमत्कार घडला आहे. सोमवार, दि. २ फेब्रुवारी-२०२६ रोजी, ठाणे शहरातील टिपटॉप प्लाझा येथे संपन्न झालेल्या, पगारवाढीच्या या पहिल्यावहिल्या त्रैवार्षिक कराराप्रसंगी, व्यवस्थापनाच्या वतीने एचआर प्रमुख श्री. लतेश मिरकर, प्रोडक्शन मॅनेजर श्री. आशिष दगडे, व्यवस्थापनाचे वकील ॲड. मोहित कपूर; तर, युनियनच्या वतीने उपाध्यक्ष श्री. रमाकांत नेवरेकर, महासचिव श्री. महेशसिंग ठाकूर, सचिव श्री. समीर चव्हाण, युनिट अध्यक्ष श्री. प्रदीप जंगम, उपाध्यक्ष श्री. निखिल वरणकर, सेक्रेटरी श्री. मयुर कोंडे, कार्यकारिणी सदस्य श्री. विनोद मगर आणि श्री. रामदास साखीळकर आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. पगारवाढीच्या या करारात, कामगारांना ६० टक्के डीए बेसिकमध्ये आणि ४० टक्के अलाऊन्समध्ये वाढ मिळाली आहे. त्यामुळे याआधी ३० ते ३५ हजार पगार घेणारे कामगार आता, दरमहा ४५ ते ५० हजार पगार घेणार आहेत. त्याचबरोबर, नव्याने भरती होऊन कायम होणाऱ्या कामगाराला, २२ हजार रुपयांपासून पगाराची सुरुवात होणार आहे, जो आधी एंट्री लेव्हलच्या कामगाराला १३ ते १४ हजार रुपये इतकाच तुटपुंजा पगार मिळत होता, त्यातदेखील या कराराअंतर्गत समाधानकारक वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, ‘डीआरटी अँथिया’ या बहुराष्ट्रीय रासायनिक कंपनीतील कामगारांना, व्यवस्थापनाने गेल्या अनेक वर्षांपासून अतिशय कमी वेतनमानावर झुलवत ठेवले होते. मात्र, मा. राजन राजे यांच्या अध्यक्षीय नेतृत्वाखालील ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे सभासदत्व स्विकारल्यानंतर, कामगारांना सन्मानजनक वेतन व त्यांचे हक्क मिळावेत यासाठी, युनियनकडून कंपनी व्यवस्थापनासोबत बोलणी सुरु करण्यात आली. परंतु, व्यवस्थापन सकारात्मक प्रतिसाद देत नसल्याचे लक्षात येताच, मा. राजन राजे यांनी, कामगार सभासदांना आपल्या न्याय्यहक्कासाठी संपावर जाण्याशिवाय पर्याय नसल्याचे आदेश दिले. त्यासंदर्भात, कंपनी व्यवस्थापनाला “संपाची सूचना” देण्यात आली होती. अखेर व्यवस्थापनाने सामंजस्याची भूमिका घेत, युनियनने पाठवलेला सेवाशर्तींचा मसुदा मंजूर करुन, पगारवाढीचा त्रैवार्षिक करार संपन्न केला. या करारामुळे कामगारांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. यानिमित्ताने ‘डीआरटी अँथिया’च्या कामगार सभासदांचे अभिनंदन करताना मा. राजन राजे यांनी म्हटले की, “कामगारांनी ‘कामगारधर्म’ जोपासून, आपलं आत्मभान जागं केलं तर, भांडवली व्यवस्थेला शरण येण्यावाचून गत्यंतर नाही. कामगारांना आपली ताकद कळली पाहिजे. कारण, कारखान्यात घाम गाळून उत्पादन काढणारा कामगारच, राष्ट्रीय संपत्ती निर्माण करीत असतो. आज कामगारांच्या एकजुटीचा विजय झाला आहे, तुमच्या आतले दिवे आता कुठे पेटायला सुरुवात झालीय, ते तसेच धगधगत ठेवलेत तर, बाहेरच्या सूर्याची तुम्हाला गरजच भासणार नाही!” अशा जाज्ज्वल्य शब्दांत ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे अध्यक्ष मा. राजन राजे यांनी, ‘डीआरटी अँथिया’ कामगारांना पुन्हा एकदा शुभेच्छा दिल्या आणि रोहा-धाटाव परिसरातील उर्वरित कामगार-कर्मचारीवर्गाने या करारातून फार मोठा धडा घेण्याचे संकेत दिले!

ठाणे, दि. १२ फेब्रुवारी २०२६ : चार काळ्या कामगार कायद्यांच्या निषेधार्थ धर्मराज्य पक्षचे जोरदार निदर्शने; अध्यक्ष राजन राजे यांचा मोदी-शहा सरकारवर घणाघात

चार काळे कामगार कायदे लादून, श्रमिकवर्गाला उध्वस्त करण्याचा, केंद्र सरकारचा कुटील डाव!
‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे यांचा मोदी-शहांवर जोरदार घणाघात…
“आयोध्येत राम मंदिर बांधणारे; पण, कामगार-चळवळीला स्मशानभूमी दाखवणारे मोदी-शहा सरकार हे, श्रमिकांच्या विरोधात असून, कामगारांच्या जीवावर आणि त्यांच्या रक्ताघामाच्या लुटीवर, मस्तवाल झालेल्या धनदांडग्या-भांडवलदारी मालकशाहीचे तारणहार असलेल्या भारतीय जनता पक्षाला रान मोकळं सोडू नका… यातून केंद्र सरकारचा, श्रमिकवर्गाला उध्वस्त करण्याचा कुटील डाव आखला गेलाय!” असा जोरदार घणाघात ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष तथा ज्येष्ठ कामगार-नेते राजन राजे यांनी, ठाण्यात केला. केंद्र सरकारने लागू केलेल्या चार काळ्या कामगार कायद्यांचा निषेध करण्यासाठी, ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ गुरुवार, दि. १२ फेब्रुवारी-२०२६ रोजी जोरदार निदर्शने करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. तीन शेतकरी काळ्या कायद्यांप्रमाणेच, केंद्र सरकारने या चार काळ्या कामगार कायद्यांच्या माध्यमातून श्रमिकवर्गाचं शोषण करण्याचा कट रचला असून, कामगारवर्ग व कामगार-चळवळ उध्वस्त करु पाहणाऱ्या मोदी-शहा सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठीच ही निदर्शने करण्यात आली असल्याचे स्पष्ट प्रतिपादन राजन राजे यांनी यावेळी केले. एकीकडे नव-अस्पृश्यता म्हणून ओळखली जाणारी कंत्राटी-कामगारपद्धत ही, कामगारांना गुलामगिरीत ढकलत असतानाच, या चार काळ्या कामगार कायद्यांमुळे अवघे कामगारजगत उध्वस्त होणार आहे. त्यामुळे काळ्या कामगार कायद्यांचा नायनाट, हीच कामगारांच्या स्वातंत्र्याची पहाट ठरणार असून, काँग्रेसचे नेते व इंडिया-आघाडीचे अध्वर्यू राहुल गांधी यांनीदेखील या चार काळ्या कामगार कायद्याला कडाडून विरोध केला आहे. काँग्रेस सत्तेवर येताच, हे काळे कायदे रद्द करु, असं वक्तव्य राहुल गांधी यांनी नुकतेच लोकसभेत केले होते, त्याबद्दलही राजन राजे यांनी, आपल्या भाषणात राहुल गांधींचे जाहीर कौतुक करुन, त्यांचे आभार मानले. दरम्यान, आपल्या तडाखेबंद भाषणात राजे यांनी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा खरपूस समाचार घेतला. अहिल्यानगर येथील सुपा-पारनेर औद्योगिक वसाहतीत बोलताना त्यांनी, कारखानदारांची बाजू घेत, “उद्योगजकांना त्रास देणाऱ्यांना ठोकून काढू” अशी भाषा वापरली होती. दावोस परिषदेच्या माध्यमातून, महाराष्ट्रात कोट्यवधी डॉलर्सचे उद्योगधंदे आणण्याची भाषा करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळातच, मराठी कामगार देशोधडीला लागला, त्यांच्याच सरकारने कंत्राटीपद्धतीमुळे नोकऱ्या असुरक्षित केल्या, महाराष्ट्रातील उद्योग याच भाजपने राज्याबाहेर नेले आणि तेच मुख्यमंत्री, उद्योजकांची बाजू घेत, आपल्या न्याय्य-हक्कांसाठी आंदोलन करणाऱ्यांना ठोकून काढण्याची भाषा करतात, हे संतापजनक असल्याचा हल्लाबोल राजन राजे यांनी यावेळी केला. याप्रसंगी डावे पक्ष आणि कामगार संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी संपाला पाठिंबा देण्यासाठी, ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने, ही जोरदार निदर्शने करण्यात आली होती. यावेळी कॉ. शिशिर ढवळे, कॉ. उदय चौधरी, समाजवादी नेते जगदीश खैरालिया, संजय मंगला गोपाळ, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या वंदना शिंदे, ‘धर्मराज्य पक्षा’चे सचिव नरेंद्र पंडित, प्रवक्ते समीर चव्हाण, ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे महासचिव महेशसिंग ठाकूर, प्रसिद्धीप्रमुख संजय दळवी आदी पदाधिकाऱ्यांसह, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स यांच्यासोबतच विविध क्षेत्रातील कंत्राटी व कायम कामगार तसेच, ‘धर्मराज्य पक्ष’ आणि ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे कामगार सभासद मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

३१ जानेवारी २०२६ : कल्याणमध्ये माई आंबेडकर जयंतीनिमित्त आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांचा सत्कार

दि. ३१ जानेवारी २०२६ रोजी कॉम्रेड दत्ता देशमुख सभागृह, कल्याण येथे, कल्याणमधील विविध सामाजिक संघटनांच्या वतीने डॉ. सविता ऊर्फ माई आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. या जयंती महोत्सवामध्ये आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या नवविवाहित जोडप्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ लेखक तसेच माईसाहेबांचा अतिशय जवळून सहवास लाभलेले विजय सुरवाडे होते. कार्यक्रमासाठी खास संभाजीनगर येथून माईसाहेबांवर चित्रपट निर्माण करणारे निर्माते, लेखक व दिग्दर्शक प्रकाश त्रिभुवन उपस्थित होते. तसेच प्रख्यात कामगार नेते राजन राजे व जगदीश खैरालिया हेही ठाण्याहून विशेषतः कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात माईसाहेबांच्या प्रतिमेस अभिवादन करून करण्यात आली. त्यानंतर शरद लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामुदायिक वाचन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मिलिंद गायकवाड यांनी केले, तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुषमा बसवंत यांनी अत्यंत खुमासदार व प्रभावी पद्धतीने केले. कार्यक्रमादरम्यान विविध गायकांनी सादर केलेल्या चळवळीतील प्रबोधनपर व प्रेमगीतांनी कार्यक्रमाची रंगत वाढवली.
समता संघर्ष संघटनेच्या सुरेखा पैठणे, श्रमिक मुक्ती दलचे जगदीश खैरालिया व राजन राजे, ज्येष्ठ पत्रकार किरण सोनवणे तसेच चित्रपट निर्माते प्रकाश त्रिभुवन यांनी आपल्या भावना अतिशय थोडक्यात, मात्र अत्यंत प्रभावी शब्दांत मांडल्या.
कार्यक्रमामध्ये आंतरजातीय विवाह केलेल्या विवाहित जोडप्यांचा माईसाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या “डॉक्टर आंबेडकरांच्या सहवासात” या पुस्तकाच्या प्रती तसेच मोतन हिने मातीपासून तयार केलेली घंटा भेट देऊन सत्कार करण्यात आला.
नवविवाहित जोडप्यांमध्ये सबुरी–रवी, मोतन–प्रतिक, साक्षी–ओंमकार व आचल–सुचित या जोडप्यांचा समावेश होता. यावेळी प्रत्येक जोडप्याने व्यक्त केलेले मनोगत उपस्थितांना भावले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय सुरवाडे यांनी लोकांना माहिती नसलेल्या अनेक सत्यघटना उलगडून सांगितल्या, ज्यामुळे उपस्थितांना आश्चर्याचा धक्का बसला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उदय चौधरी, संकल्पना कऱ्हाडे, शंबूक, बाबा रामटेके, राजू रणदिवे, संतोष कटके, ज्ञानेश पाटील, संगीता जोशी तसेच इतर अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमामध्ये भारतीय महिला फेडरेशन, स्त्री मुक्ती संघटना, सकल भारतीय समाज, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, राष्ट्र सेवा दल, ऑल इंडिया युथ फेडरेशन, नागरी हक्क संघर्ष संघटना, आयटक व अनुबंध या सर्व संघटनांचा सक्रिय सहभाग होता. शेवटी सर्व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त, ठाण्यात ‘हुतात्मा दिन’ संपन्न!

धर्मराज्य पक्ष, ठाणे काँग्रेस आणि मूलभूत अधिकार संघर्ष समितीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात, डॉ. विवेक कोरडे व कॉ. आनंद तेलतुंबडे यांचे तडाखेबंद भाषण
भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या ७८व्या पुण्यतिथीनिमित्त, धर्मराज्य पक्ष, ठाणे काँग्रेस आणि मूलभूत अधिकार संघर्ष समिती यांच्या संयुक्त विद्यमाने, दि. ३० जानेवारी-२०२६ रोजी, ठाण्यातील मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या सभागृहात ‘हुतात्मा दिन’ साजरा करण्यात आला. ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत डॉ. विवेक कोरडे व डाव्या चळवळीतील विद्रोही नेते कॉ. आनंद तेलतुंबडे यांनी, “गांधीहत्या आणि आपण…” या विषयावर आपले मनोगत व्यक्त करुन, उपस्थितांना मार्गदर्शन केले. ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष तथा ज्येष्ठ कामगार नेते मा. राजन राजे यांच्या पुढाकाराने संपन्न झालेल्या या कार्यक्रमासाठी काँग्रेसच्या अर्थ विभागाचे अध्यक्ष विश्वास उटगी, आयटकचे काॅ. उदय चौधरी, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नेत्या वंदनाताई शिंदे, मूलभूत अधिकार संघर्ष समितीचे डॉ. जावळे, समाजवादी नेते संजय मं. गो., जगदीश खैरालिया, आंबेडकरवादी विचारवंत आनंदा होवाळ, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ठाणे उपजिल्हाप्रमुख प्रदीप शिंदे, काँग्रेसचे ठाणे जिल्हा सरचिटणीस महेंद्र म्हात्रे, काँग्रेस ठाणे सचिव राहुल पिंगळे, ॲड. नाना अहिरे आदी मान्यवर मंडळींची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान, कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ. विवेक कोरडे यांनी, आपल्या भाषणात उपस्थितांना संबोधित करताना, गांधीहत्येमागील कारणे विषद करताना तथाकथित हिंदुत्ववादी व आरएसएसवर एकच शरसंधान साधले. महात्मा गांधी हे कधीही देशाची फाळणी व्हावी या विचाराचे नव्हते, उलट त्यांचा देशाच्या फाळणीला विरोधच होता. ज्या आरएसएसने कधीही राष्ट्रध्वज स्विकारला नाही, त्यांचाच द्विराष्ट्रवादाला पाठिंबा होता आणि विनायक दामोदर सावरकर हे त्यांचे म्होरके होते. गांधीजी हे हिंदू-मुस्लिम ऐक्याचे एकमेव पुरस्कर्ते होते, अहिंसेचे पुजारी होते, अशा शब्दांत डॉ. विवेक कोरडे यांनी आपले परखड मत मांडले. यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात कॉ. आनंद तेलतुंबडे यांनीदेखील आरएसएसच्या विचारांवर एकच प्रहार केला. सद्यस्थितीत भारतातील जी राजकीय व सामाजिकव्यवस्था ढासळलेली आहे, त्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाची जातीयवादी विचारसरणीच कारणीभूत असल्याचे स्पष्ट करुन ते पुढे म्हणाले की, “पुढील एकहजार वर्षे तरी भारतातून भाजपची सत्ता जाणार नाही, जोपर्यंत ते ठरवत नाहीत”, असा अपप्रचार होत असला; तरी त्यात बिलकूल तथ्य नाही…आपण सारे एकत्र आलो आणि त्यांचं सगळं साम्राज्य, हे फक्त आणि फक्त, खोटारडेपणाच्याच पायावर उभारलेलं आहे, हे ध्यानात घेऊन त्यावर एकत्रित व सनदशीर मार्गाने प्रहार केला; तर, ते सहजशक्य आहे. आज त्यांनी सर्व शासकीय व प्रशासकीय व्यवस्था ताब्यात घेतलेल्या आहेत. राजन राजे यांच्यासारखी जी काही हाताच्या बोटावर काम करणारी मोजकी माणसं समाजात आहेत, त्यामुळेच भाजप-आरएसएससारख्या धर्मविद्वेशीशक्तींवर काही प्रमाणात का होईना, अंकुश आहे यातच समाधान असल्याचे प्रतिपादन कॉ. आनंद तेलतुंबडे यांनी यावेळी केले. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे, विद्रोही शाहीर संभाजी भगत यांनी खास उपस्थिती लावून आपल्या पहाडी आवाजात कविता सादर केळी. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॉ. शिरीष ढवळे यांनी केले तर, कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

डॉ. दीपक पवारांच्या ‘मराठीनामा–मराठीकारण’ चळवळीला राजन राजेंचा जाहीर पाठींबा

मराठी भाषेचे संवर्धन आणि मराठी समाजाच्या हितासाठी, ‘मराठी अभ्यास केंद्रा’चे डॉ. दीपक पवार हे, गेल्या अनेक वर्षांपासून आंदोलन व चळवळींच्या माध्यमातून, प्रस्थापित मराठीद्वेष्ट्या-महाराष्ट्रद्रोही, भांडवली-राजकीय व्यवस्थेविरोधात, लोकशाही आणि सनदशीरमार्गाने संघर्ष करीत आहेत. याचाच पुढचा भाग म्हणून, डॉ. दीपक पवार यांनी, दि. २ जानेवारी-२०२६ रोजी, ‘मुंबई मराठी पत्रकार संघ’ येथे पत्रकार परिषद घेऊन, “मराठीनामा आणि मराठीकारण” ही चळवळ नव्या जोमाने सुरु करण्यामागची आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांच्या या भूमिकेचे ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष तथा ज्येष्ठ कामगार-नेते मा. राजन राजे यांनी समर्थन करुन, त्यांना आपला जाहीर पाठींबा व्यक्त केला आहे. त्याबाबतचे एक पत्रदेखील डॉ. दीपक पवार यांना लिहिले आहे. “महाराष्ट्रात निर्माण झालेली संपत्तीच, महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या मुळावर येऊन, त्याला त्याच्या हक्काच्या महाराष्ट्रात दुय्यम नागरिकत्वाचा शाप भोगावा लागत आहे!” असे रोखठोक प्रतिपादन करुन, “आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या निमित्ताने, आपण तयार केलेला ‘मराठीनामा’ हा केवळ एका निवडणुकीपुरता जाहीरनामा न राहता, तो मराठी माणसाच्या अस्मितेचा आणि सर्वांगीण प्रगतीचा महामार्ग व्हावा!” अशी अपेक्षा व्यक्त करीत, मा. राजन राजे यांनी आपल्या पत्रातून, डॉ. दीपक पवार यांना, त्यांच्या पुढील वाटचालीस व ‘मराठीकारणा’च्या चळवळीस अनेकोत्तम शुभेच्छा आणि संपूर्ण पाठींबा जाहीर केला आहे.

error: Content is protected !!